आंबेडकरी विचारविश्वाचे काव्यात्म चिंतन : युगानुयुगे तूच
*आंबेडकरी विचारविश्वाचे काव्यात्म चिंतन : युगानुयुगे तूच*
“Art is not created in a vacuum. It is the work not simply of a person, but of an author fixed in time and space, answering a community of which he is an important, because of articulate part.”
- Wilbur Scott
कोणतीही कलाकृती स्वयंभू असत नाही. ती ज्या काळात प्रकटते त्या काळाचे असंख्य दबाव कवीवर आणि पर्यायाने कलाकृतीवर असतात. कवी त्याच्यासमोर उपलब्ध असणाऱ्या प्रदीर्घ अवकाशातून जे रचित निर्माण करतो ते समकालीन समाज-सांस्कृतिक पर्यावरणाला दिलेल्या भेदक प्रतिसादाच्या रूपाने व्यक्त होते. ज्या कविता विचार पक्ष घेऊन पुढे येतात, त्या बहुतांशी समाज-संस्कृतीचा ताणाबाणा घेऊनच येतात. अजय कांडर यांची 'युगानुयुगे तूच' ही दीर्घकविता याच पद्धतीची आहे.
मराठीत दीर्घ कविता लेखनाची मोठी परंपरा आहे. त्याच प्रमाणे कवी यशवंत मनोहर, ज.वि.पवार, नामदेव ढसाळ, अरुण काळे, रवींद्र श्रावस्ती अशा अनेक कवींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कवितेतून शब्दबद्ध केले आहे. अजय कांडर हे या परंपरेतलेच पुढचे नाव आहे. वस्तुतः एका महान व्यक्तीवरील दीर्घकविता ही चरित्राच्या अंगानेच पुढे जाते. परंतु अजय कांडर यांनी हा मोह टाळला आहे. त्यांची कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र मांडत नाही, तर त्यांच्या जीवनकार्याच्या संदर्भाने स्वतंत्र चिंतन मांडत राहते. त्यांचा विचार कवीला अधिक महत्त्वाचा वाटतो आणि समकाळाच्या संदर्भात त्यांच्या विचारांचे मोल कवी अधोरेखित करत राहतो. आज घडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हणून जगभर ओळखले जातात. जागतिक दर्जाचे मानववादी (Immanentist) म्हणून डॉ. आंबेडकरांचे स्थान अनन्यसाधारण आहे. भारतीय परंपरेत चार्वाक हे पहिले मानववादी होते, तर पश्चिमात्य परंपरेत कार्ल सेगलने हा विचार मांडलेला दिसतो. डॉ. आंबेडकरांनी आपल्या प्रदीर्घ अभ्यास व चिंतनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मानववादाची मांडणी केली. भारतीय संविधान हा त्याचा अत्युच्च अविष्कार होय. माणसाला माणसाच्या गुलामीतून मुक्त करणे आणि समतल पातळीवर आणणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट. ही गुलामी लादणाऱ्या धर्म संकल्पना, देवत्वाच्या अलौकिक संकल्पना नाकारून समता, बंधुता, न्याय अशा वैश्विक मूल्यांवर बेतलेली मानववादी भूमिका बाबासाहेबांनी आग्रहाने मांडली आणि प्रतिष्ठित केली. तत्पूर्वी म. फुले यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत असे म्हटले होते, "स्त्री-पुरुष हे उभयता जन्मतःच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र आहेत. एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही." म. फुलेंचा हा विचार डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वमान्य बनविला. त्यामुळेच डॉ. आंबेडकर यांचे जीवनचरित्र, कार्य आणि विचार हे विविध कला प्रकारातून, विविध रूपबंधातून पुन्हा पुन्हा अविष्कृत होत राहतात. खरे तर असे होणे ही काळाची गरजच आहे. अत्यंत दूरदृष्टीचे आणि राष्ट्रहितैशी भूमिका असणारे डॉ. आंबेडकर सर्व देश बांधवांना पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे.
ज्या पद्धतीने प्राचीन पौराणिक ग्रंथात काही महानायक उभे करण्यात आले आणि विविध प्रकारे त्यांच्या मिथक कथा रचण्यात आल्या, त्याच तोडीचा वास्तव (Real) महानायक डॉ. आंबेडकरांच्या रूपाने आज घडीला चित्र, शिल्प, साहित्य, गीत, चित्रपट अशा अनेक माध्यमातून उभा केला जातो आहे. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व कार्याचा प्रवास हा त्यांना झालेल्या प्रखर विरोधाकडून सार्वत्रिक स्वीकाराकडे झालेला आहे. त्यांच्या जीवित कालात त्यांना मोजकेच अनुयायी आणि प्रचंड संख्येने विरोधक लाभले, तर उत्तरोत्तर विरोधक कमी कमी होत राहिले आणि अनुयायी वाढत राहिले.
'युगानुयुगे तूच' या दीर्घकवितेच्या निर्मितीचा काळ हा २०१९चा आहे. धर्माधिष्ठित राजकारण मुसंडी मारून पुढे येण्याचा आणि भांडवलशाही व प्रसार माध्यमांनी संविधान विरोधी राजकारणाला उचलून धरण्याचा हा काळ आहे. अशा अस्वस्थ कालखंडात कवीला कवितेच्या माध्यमातून वर्तमान जीवनात हस्तक्षेप करावा वाटतो. तेव्हा अपरिहार्यपणे कवीला डॉ. आंबेडकर आठवतात. समाजाच्या सर्व स्तरात धर्मवादी मंडळी प्रचंड दहशत माजवत असताना कवीला डॉ. आंबेडकर हे भक्कम आधार वाटतात. समकालीन अनेक सामाजिक प्रश्नांवर डॉ. आंबेडकर हेच एक उत्तर आहे, असे कवीला वाटते. कारण कवी हा जन्मजात आंबेडकरवादी (Born Ambedkarist) नाही, तर तो विवेकी विचारातून आंबेडकरांच्या दिशेने खेचला गेलेला डोळस शब्दप्रभू आहे. कवीला याची जाणीव नक्कीच आहे की डॉ.आंबेडकर हा कवितेत मावणारा विषय नाही. मात्र त्याचे वर्तमान वास्तवावरील चिंतन आंबेडकरांशी विचार-संवाद साधूनच पूर्ण होऊ शकते. मानवमुक्तीची पहाट या विचारांच्या आग्रहातूनच उगवू शकते. म्हणूनच कवी हे आत्मसंवादी आणि बहुसंवादी चिंतन कवितेतून मांडत राहतो. ही दीर्घकविता मुक्तछंदातून आणि संवादी स्वरातून पुढे जाते. ज्याच्याकडे आपले हृद्गत मोकळेपणाने मांडावे असा सखा म्हणजे या कवितेचा नायक आहे.
कवितेच्या प्रारंभीच कवी डॉ. आंबेडकरांना दलितांचा मुक्तिदाता या संकल्पनेच्या बाहेर घेऊन जातो. कारण त्यांचे कार्य इतक्या छोट्या परिघांमध्ये झालेलेच नव्हते. 'सर्व अहंकार बाजूला सारून माणसाने माणसासाठी जगावे', हा डॉ. आंबेडकरांचा विचार कवीला जास्त महत्त्वाचा वाटतो. ही लढाई टप्प्याटप्प्याने मानवमुक्तीच्या एक एक पायऱ्या पूर्ण करत पुढे गेली, त्याचे व्यापक चिंतन कवी मांडत जातो. पाणी या मूलभूत गरजेच्या पूर्ततेसाठी शेकडो पिढ्या तडफडत राहिल्या. म्हणूनच पाण्याला 'चवदार' बनविणाऱ्या आंबेडकरांच्या कृतीचे मोल कवीला वाटत राहते.
जिथे पाण्यासाठी
माणसंच माणसामध्ये करतायत उभ्या
भेदाच्या भिंती
त्या उद्ध्वस्त करण्यासाठीच
तुझा होता विद्रोह
असे कवी म्हणतो. ही लढाई फक्त पाण्याची नव्हती, तर आम्हीही माणसे आहोत. आम्हाला अस्पृश्य म्हणून अवमानित करू नका, हे सांगणारा हा लढा होता. अस्पृश्यतेचे दाहक चटके ज्यांनी सोसले त्यांचे जीवन मातीमोल बनत गेले. 'आयुष्य नावाची एक सुंदर गोष्ट असते/ हेही माहीत नव्हतं/ त्यांना वाटत होतं/ जन्माला आलो हा अपराधच असेल/ उच्चभ्रू जातसमूहाच्या दुनियेत.' अशांसाठी डॉ. आंबेडकरांनी माणूसपणाच्या हक्कांची लढाई लढली.
अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता
तेव्हा तर
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता, लढता
फक्त तू आणि तूच
माणसाच्या स्वातंत्र्यासाठीही
लढत राहिलास
असा गौरव या कवितेतून सहजपणे उमटतो.
देशाच्या स्वातंत्र्याची लढाई एकदाच लढावी लागते, परंतु माणसाच्या स्वातंत्र्याची लढाई पुन्हा पुन्हा लढावी लागते. मुळात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यावी लागते, याचे प्रत्यंतर कवीला वर्तमान काळातही येत राहते. ही गुलामीची प्रखर जाणीवच उद्याच्या आत्मभानाची आणि क्रांतीची ठरू शकते, याचे सूचन ही कविता करते. वर्तमान वास्तवात गुलामीची नेमकी जाणीव न झाल्यामुळे अन्यायाची मालिका वाढत जाते, हे कवीचे निरीक्षण आहे. इथल्या अनेक शोषितांना आपल्या दुःखाचे मूळ अस्पृश्यतेत, जातीय विषमतेत आहे, याची जाणीव नव्हती. आजही नाही. अशांना याची स्पष्ट जाणीव करून देण्याचे काम ही कविता करते. बाबासाहेबांचे विचार कवीला आत्मभान देतात. कोणत्याही लढ्यापेक्षा व्यक्तिस्वातंत्र्याचा लढा मोठा असतो, याची जाणीव करून देतात. म्हणूनच कवी म्हणतो,
तुझ्यामुळेच मला उमगले
स्वातंत्र्याचे मोल
आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष,
स्वातंत्र्याची बांधिलकी,
ते मिळविण्यासाठी अंगात भिनवावी लागणारी
निर्णयक्षमता
व्यक्तीला मिळणारे, मिळू शकणारे स्वातंत्र्य हे जबाबदारीसह आहे. आज भारतीय संविधानाने ते आपल्या नागरिकास प्रधान केले आहे. परंतु त्याचे मोल कळणे बाकी आहे. बाबासाहेबांनी आपल्या भाषणांमधून त्याची नेमकी मांडणी केली आहे.
स्वातंत्र्य कळण्यासाठी
आधी विचारांची प्रगल्भता यावी लागते
प्रगल्भतेसाठी
अज्ञानातूनही मुक्त व्हावं लागतं
आणि ज्ञानाच्या भुकेसाठी
आधी ग्रंथही वाचावे लागतात
याची जाणीव बाबासाहेबांनीच करून दिलेली असते. बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम आणि ज्ञानालालसा आजच्या पिढीत संक्रमित व्हायला हवी आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ज्ञानवंत असल्याचा दिखावा केला जातो. दिवाणखान्यातील शोकेस मधून मुद्दाम काही ग्रंथ रचून ठेवले जातात. त्याच्या पलीकडे आत्मसन्मानाची लढाई लढण्यासाठी ग्रंथ बळ पुरवतात, याचे भान फार थोड्यांना असते. प्रखर बुद्धिनिष्ठा आली की अनेक अनिष्ट परंपरा नाकारल्या जाऊ शकतात. देवाधर्माचे गारुडही नाकारले जाऊ शकते. कवीने स्वतः ते नाकारले आहे. त्यामुळे भ्रामक कल्पनांच्या जंजाळात तो अडकून पडलेला नाही.
मला
देव नाकारण्याची
तूच दिलीस समज
आणि
तुझी प्रखर बुद्धिमत्ता समजून घेताना
नशीब नाकारायचेच असते
नशीब मानून काहीही मिळत नाही
हेही तूच समजावलंस
असं जेव्हा कवी म्हणतो, तेव्हा आजच्या काळात आवश्यक असणारा बुद्धिप्रामाण्यवाद कवीला अधोरेखित करायचा असतो. त्यामुळेच बाबासाहेबांना देवत्व देणे किंवा त्यांच्यामध्ये देवत्व शोधणे, बाजूला पडते. श्रद्धेपेक्षा निष्ठा आणि कर्तव्य भावना महत्त्वाची वाटते.
तू फक्त माणूस वाटलास माणसांसाठी झटणारा
म्हणूनच तू झालास माझ्यासाठी
युगानुयुगांचा नायक!
असे गौरवोद्गार सहजपणे कवीच्या तोंडून बाहेर पडतात.
या कवितेतील एक दीर्घ तुकडा स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दलच्या चिंतनाने व्यापलेला आहे. धर्मग्रंथांनी आणि परंपरेने स्त्रीचे भावविश्व, विचारविश्व अाकुंचित केले होते. तिचे स्वातंत्र्य हिरावले होते. संधी हिरावल्या होत्या. कोणत्याही संघर्षाशिवाय समान दर्जा, संधी, हक्क व अधिकार देण्याचे अभूतपूर्व कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी केले. कवीने अत्यंत वेगळ्या पद्धतीने या आंबेडकरी दृष्टिकोनाची नोंद कवितेत घेतलेली आहे. कवी लिहितो,
आजी म्हणायची
ज्या घरात बाईचा सन्मान राखला जाईल
ते घर आपलं समजावं
आणि
जो महापुरुष बाईला स्वातंत्र्य देण्यासाठी झटेल
तोच समजावा साऱ्या समाजाचा
तिला तरी कुठे माहीत होतं
ती तुझ्याविषयीच बोलत होती
वर्षांनुवर्षे म्हणून.
आजीचे अनुभवसिद्ध बोल तंतोतंत डॉ. आंबेडकरांनाच लागू पडत होते, हे कवीने वेगळ्या पद्धतीने मांडले आहे. स्त्रिया आणि दलित यांचे शोषण एकाच व्यवस्थेने चालविलेले होते. अशा गुलामी भोगणाऱ्या स्त्री वर्गाला स्वातंत्र्य देण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. त्यासाठी धर्मचिकित्सा केली. धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी, असा प्रश्न उपस्थित केला. बाईचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. या साऱ्याबद्दलची कृतज्ञता या कवितेतून पुन्हा व्यक्त झाली आहे. कवी लिहितो,
तू म्हणालास
बाईने कधीही नवऱ्याची दासी होऊ नये
किती साध्या शब्दात सांगितलेस
बाईला समतेचे तत्त्वज्ञान
कुटुंबातल्या समतेच्या वाटेवरूनच
बाहेरच्याही वाटा बाईसाठी मोकळ्या होत असतात
समतेच्या वाटा समृद्ध करण्याची संवेदनशीलता बाईमध्येच असते. माणूस मेल्याचे दुःख सहजपणे तिच्या हृदयातून पाझरते. ती मेलेल्याची जात किंवा धर्म पहात नाही. तरीही सांप्रत काळात तिचा बुद्धिभेद केला जातो आहे. तिची पराभूत मानसिकता वाढावी, तिचा आत्मविश्वास ढळावा आणि निष्ठा दुबळ्या व्हाव्यात, अशी अतिरचना निर्माण केली जात आहे. कवी लिहितो,
ती फक्त
उपभोग्य वस्तूच राहावी
म्हणून रचलं जातंय कुभांड
आता खुलेआम
म्हणूनच तू तिला दिलेल्या
लोकशाहीच्या हक्काचा जागर
दिवसेंदिवस वाढत जायला हवा!
डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने सर्व स्त्रिया या देखील उपेक्षित वर्गाचा एक घटक आहेत. म्हणूनच त्यांनी तिच्या हक्कासाठी परिषद आयोजित केली. तिचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या यांची जाणीव करून दिली. त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यामुळेच आज शेतामातीत राबणारी स्त्रीसुद्धा प्रश्नांना भिडते आहे. आपले हक्क आणि अधिकार ताब्यात घेते आहे. कारण तिला पुरुषांवर अधिकार गाजवण्याचा आनंद नको असतो. बाईला पुरुषाच्या बरोबरीने निव्वळ माणूस म्हणून स्वीकारावे एवढीच माफक अपेक्षा असते. आज विविध पद्धतीने अधिकार पदांवर पोहोचलेल्या स्त्रियांनी बाबासाहेबांच्या उदार अंतःकरणाची महती, दूरदृष्टीची कहाणी नव्या पिढीपर्यंत पोचवायला हवी, असे कवीला वाटते. म्हणून तो अपेक्षितो,
तुझ्या हिंदू कोड बिलाची गोष्ट
बाईने सांगावी या पिढीकडून त्या पिढीला
आज उजळमाथ्याने फिरणाऱ्या बाईच्या डोक्यावर
तुझाच तर वरदहस्त आहे
तिच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला तू निमित्तच नाहीस
तर सर्वस्वी कर्ताकरविताही आहेस
डॉ. आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हिंदू कोड बिलासाठीच दिला होता. हे हिंदू कोड बिल स्त्रियांच्या हक्क अधिकारांचा जाहीरनामा होते. याबद्दलचे नेमके चिंतन येथे व्यक्त झालेले दिसते. अधिक मुले जन्मास न घालता कुटुंबाची संख्या मर्यादित ठेवा आणि मुलांना शिकवा, असे बाबासाहेबांनी स्त्रियांना सांगितले होते. लोकसंख्या नियंत्रणाचा सल्ला अंतिमतः स्त्री वर्गाच्या हिताचा होता. वर्तमान काळात सगळ्या स्त्रियांना एक गणले जात नाही. धर्म, जात, शिक्षण, आर्थिक स्थिती यावरून त्यांच्यात भेद कल्पिला जातो. मात्र सर्व स्तरातील स्त्रिया एकाच वेळी भोगवस्तू असतात. हे कसे काय घडते, हा कवीचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी या स्त्रीच्या वस्तुकरणाला नकार दिला होता. म्हणूनच कवी म्हणतो,
बाई असते घराचा पोशिंदा
तिच्या श्रमाच्या वहिवाटीतूनच
तरारून येते मातीत पीक
तरीही पुरुषी वर्चस्व सोसताना ती आपल्या भावना कधी जात्याशी, कधी शेतीशी बोलून मोकळी होत असते. बाबासाहेबांचे हे वेगळे स्त्रीविषयक चिंतन पाठ्यपुस्तकातून कधी आलेच नाही, याची खंतही कवी व्यक्त करतो.
कवितेच्या पुढच्या टप्प्यात बाबासाहेबांचा शेतीविचार मांडलेला दिसतो. बाबासाहेबांनी शेत जमिनीच्या तुकडेकरणास नकार दिला होता. शेती कसणाऱ्या कुळांना न्याय दिला होता. कृषी अर्थविचार मांडला होता. या सगळ्याविषयी चिंतन कवीने केले आहे. बाबासाहेबांनी सांगितले होते,
सामुदायिक शेतीसोबत असावी जोड ज्ञानाची
आणि शेतीचे नवतंत्रज्ञान स्वीकारावे
हा विचार जर अमलात आणला गेला असता, तर शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले नसते, असे कवीला वाटते.
बाबासाहेबांची भारतवर्षाला मिळालेली अनमोल देणगी म्हणजे संविधान! या संविधानाने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिले. हे स्वातंत्र्य कसे स्वीकारले जाते, यावरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे, हे बाबासाहेबांनी पुन्हा पुन्हा सांगितले होते. २५ नोव्हेंबर, १९४९ च्या भाषणात बाबासाहेबांनी सामाजिक आणि आर्थिक समानतेचे लोकशाही टिकविण्यासाठी असणारे महत्त्व विशद केले होते. यावर भाष्य करताना कवी म्हणतो,
तू म्हणालास
समाजात नसावी मोठ्या प्रमाणात विषमता
असावेत आपल्याला विरोध करणारेही कार्यक्षम
त्यातूनच निर्माण होईल
बहुमताने लोकशाहीचे अधिराज्य
कवी वर्तमान वास्तव पाहून अस्वस्थ आहे. कारण लोकशाहीची थट्टा आणि संविधान पायदळी तुडविणे नित्याचेच झाले आहे. ज्या हातांनी संविधान स्वीकारले, ते हात एकमेकांवर उगारले गेले. एकसंघ भारत उभारण्याचे जे स्वप्न पाहिले, ते पायदळी तुडविले गेले. म्हणूनच कवी म्हणतोय,
तू दिलेल्या संविधान विचारांची
अंमलबजावणी होता होत नाहीय एकाधिकारशाहीचे मालक ती मोडून काढू पाहताना
धर्मांध भगवे मठ नवनवे प्रस्थापित होतायत
होतायत कत्तली धर्मांचा रंग बघून
आता प्रत्येकाला वाटू लागलंय
आपापल्या रंगांचीच आरास मांडली जावी सर्वत्र
आता बाबासाहेबांचे नाव घेता घेता संकुचित होत जाणारी पिढी जन्मली आहे. जातीच्या संघटना वाढत आहेत. आक्रमक होत आहेत. एका हातात आंबेडकरी विचार आणि दुसऱ्या हातात बुवा बाबांची प्रतिमा असा दुटप्पी व्यवहार सर्वत्र दिसू लागला आहे. अनेकांच्या जीवनातून विचार व व्यवहार हद्दपार झाला आहे. तरीही आंबेडकरांनी दाखवलेली वाट सोडू नये, असेच कवीला वाटते. कारण
तुझ्या दिशेने चालतानाची प्रसन्नता
अन्य दिशेला शोधूनही सापडली नाही
कारण तुझ्याच वाटेवर सापडली मला
बुद्धाची करुणा, प्रेम, दया, क्षमा, शांती!
बाबासाहेबांच्या वाटेवरून चालणे म्हणजे अंतिमतः बुद्धांच्या अपार करुणेच्या बोधिवृक्षाखाली जाऊन पोहोचणे आहे. अर्थात स्वतःला उन्नत करत जात असताना समकाळ समजावून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. कवी समकाळाच्या संदर्भातच बुद्ध आंबेडकरांची अपरिहार्यता मांडतो आहे. काळ तर भयंकर उफराटा आला आहे. शोषकांच्या गुणांचे गोडवे गाण्याचे दिवस आले आहेत. अनेक जण भेदाभेद करणाऱ्यांच्या सोबत बसायला मिळाले, एवढ्याच मर्यादित तुकड्यावर खुश आहेत. बाबासाहेबांनी दिलेले स्वाभिमानाचे वस्त्र आता दूर उडून गेले आहे. म्हणून कवी म्हणतो,
तू बहाल केलेल्या
लोकशाहीवर वक्रदृष्टी ठेवून
जात्यांध,
धर्मांध आपल्या मनातील धर्मग्रंथालाच
मानू लागलेत संविधान
ते पंक्तिभेद मानत असतानाही
आम्हाला आता त्यांच्या पंगतीत बसणे
गौरवाचे वाटायला लागले आहे
सत्तेचे वाटेकरी होण्यासाठी चाललेली लाचार व लापट धडपड खरे तर चीड आणणारीच. ज्यांच्या बुद्धीला लकवा मारला आहे, असे हे आजचे सत्तालोभी बहुजन. माणसाने कल्चरली करेक्ट राहावे, असा आग्रह धरणारे बाबासाहेब कोणत्याही लोभापाई तत्त्वांची तडजोड करत नव्हते. आज तसे अनुयायी उरलेले नाहीत. तरीही कवीचा आशावाद संपत नाही. बाबासाहेबांचे विचारविश्व आणि त्यांचा व्यापक दृष्टिकोन कवीला स्वतःकडे खेचत राहतो. आपल्या रक्तात कोणत्याच जातीच्या थेंबाचा अंश मिसळू नये, उलट रक्तातून मानवतेचा झरा वाहत राहावा, असे त्याला वाटते. आणि शेवटी तो असे स्वप्न पाहतो की,
जो गावगाडा एकत्र येतो
समूहाने बोलू पाहतो
त्याच्या पाठीवर जातीचं अक्षरही न उठो
जे शहर श्रमकर्त्यांच्या घामाने जाते भिजून
जिथे सर्व धर्माच्या अन्नाचा होतो काला
तिथल्या धर्ममार्तंडांची वाचा झडो
हिंसा आणि क्रौर्याचा
गिरवला जातो पाढा
त्या शाईलाही समतेचा पान्हा फोटो!
'युगानुयुगे तूच' ही कविता व्यक्तीची नसून समष्टीची आहे. ही जरी अजय कांडर यांची कविता असली तरी त्यातील विचार व भाव अनेकांच्या मनात तरारून आला आहे. दरवळतो आहे. या भावनेला शब्दांत पकडण्याचे कौशल्य या कवीचे आहे. त्यामुळे ही कविता एकाचवेळी आंबेडकरी विचारांचे फलित आहे आणि या विचारांची वाहकही आहे. म्हणूनच या कवितेचे नव्या पिढीकडून पुन:पुन्हा वाचन व्हायला हवे.
*- डॉ. श्यामसुंदर मिरजकर*
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
चलभाष : ९४२१२१२३५२
('युगानुयुगे तूच : संदर्भ आणि अन्वयार्थ' संपादक - एकनाथ पाटील - लोकवाङ्मय प्रकाशन या पुस्तकातून प्रकाशित झालेला लेख)
सर अप्रतिम मांडणी
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवासुंदर समीक्षात्मक लेख।।
उत्तर द्याहटवाचरित्राच्या अंगाने पुढे जाणाऱ्या कवितेचा मोह टाळून जशी अजय कांडर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर समकालाचे संदर्भ देत वास्तवाचा संदर्भ मांडणारी कविता लिहिली आहे; तद्वतच त्या कवितेच्या अनुषंगाने समीक्षा करणारी प्रस्तुत समीक्षा ही मर्मग्राही समीक्षा आहे हे या ग्रंथातून स्पष्ट होते.
उत्तर द्याहटवाअभिप्रायाबद्दल धन्यवाद सर
हटवा