'मृत्यू सुंदर आहे!' आत्मभान देणारे नवे पुस्तक...

      जीवनाचे व्यापक आत्मभान देणारे पुस्तक: मृत्यू सुंदर आहे!

       मानवी जीवनातील अटळ वास्तव म्हणजे मृत्यू! हा शब्द कानी पडला तरी अनेकांचा थरकाप उडतो. लोक प्राणभयाने व्याकूळ होतात. जवळच्या आप्तस्वकीयांचे मृत्यू माणसाला दुःखाच्या सागरात लोटतात. स्वतःच्या मृत्यूची कल्पना किती भयावह असेल!  मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाची समाप्ती, अशी एक सरधोपट जाणीव प्रत्येकाजवळ असते. त्यामुळेच अनेक धर्मातील पुरोहित मध्यस्थांनी मृत्यू कल्पनेला केंद्रस्थानी ठेवून अनेक कथा, कर्मकांड रचले. मृत्यूनंतरच्या जगाची एक कल्पना मांडली. सामान्य माणसांना अगतिक बनवले. त्यांना सुंदर सरळमार्गी जगण्यापासून वंचित केले. कोट्यवधी माणसांच्या जीवनातील जगण्याचा आनंद हिरावून घेतला.
       परंतु मृत्यू ही नैसर्गिक आणि सुंदर गोष्ट आहे, हे सांगणारे एक तत्त्वज्ञान भारतात आहे. त्याचा परिचय फार थोड्यांना होता. मराठीत प्रथमच डॉ.रवींद्र श्रावस्ती यांनी प्रदीर्घ आणि साधार लेखन करून हा विषय चर्चेत आणला आहे. 'मृत्यू सुंदर आहे!' या लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून यावर प्रकाशझोत टाकला आहे.
       मृत्युसौंदर्याचा सिद्धांत मांडताना रवींद्र श्रावस्ती लिहितात, "मृत्यू सुंदर होणे किंवा मृत्यू सुंदर करणे, याचा साधा अर्थ मृत्यू येण्यापूर्वी अवघे आयुष्य सुंदर जगून मरणे किंवा असे जीवन जगता जगता मरणे! त्यासाठी आयुष्य सुंदर आहे, हे कळायला हवे. ते तसे व्हावे यासाठी धडपडायला लागते, हेही कळायला हवे."
       मानवी जीवनातील प्रखर वस्तुस्थिती मांडताना डॉ. श्रावस्ती म्हणतात, "आयुष्य जगताना चुका होतात, प्रमाद घडतात. त्यातूनच दुःखाची निर्मिती होते. छान आयुष्य, सुंदर आयुष्य मग करपू लागते. मृत्यू आला तर दुःखद, करुण  शेवट होतो. चांगलं जगता आलं नाही म्हणून आणि इथून पुढे जगता येणार नाही म्हणून भयानक वाईट वाटू लागते. त्यातच मग करुण दुःखद असा शेवट होतो, मृत्यू होतो."
        अर्थातच हे टाळण्यासाठी दुसऱ्यांच्या सुंदरपणाची दखल घेत कमीत कमी चुका करत किंवा झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत जगणे म्हणजे सुंदर जगणे! त्यासाठी जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यावा. अर्थपूर्ण व परोपकारी जगणे जगावे, हे डॉ. श्रावस्तीनी स्पष्ट केले आहे.
       गौतम बुद्ध आणि समकालीन इतरांच्या मृत्यू संदर्भातील काही कथा लेखकांने चर्चेस घेतल्या आहेत. किसा गौतमीच्या कथेद्वारे मृत्यू हा नैसर्गिक व अटळ असून कोणत्याही वयात ओढवलेल्या मृत्यूला धीराने सामोरे गेले पाहिजे, असा संदेश बुद्ध देतात. पती, मुले, आई-वडील यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे दुःखाने शोकाकुल झालेल्या पटाचाराला गौतम बुद्ध सांगतात, "जिथे जन्म आहे, तिथे मृत्यु आहे. तू तुझे शील विशुद्ध कर. निर्वाण म्हणजे मुक्ती. त्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न कर." या उपदेशामुळे पुढे पटाचारा अर्हत पदाला पोहोचते.
       याशिवाय वक्कली, सुदत्त, नातवाच्या मृत्यूने दुःखी झालेली विशाखा अशा अनेकांच्या कथा लेखकाने चर्चेस घेतल्या घेतल्या आहेत. त्या त्या प्रसंगात बुद्धांनी केलेला उपदेश मृत्यू व जीवन यावर भाष्य करणारा आहे. भगवान बुद्ध आपले पिता शुद्धोधन यांच्या मृत्यूला मृत्यूल कसे सामोरे गेले आणि पुढे त्यांनी स्वतःच्या मृत्यूचे कसे स्वागत केले, ते मुळातून वाचावे असे आहे.
       या पुस्तकात जातक कथांमधील मृत्युदर्शन घडविणार्‍या अन्य काही कथा चर्चेस घेतल्या आहेत. तसेच राहुल सांस्कृत्यायन यांनी लिहिलेली 'प्रभा' ही कथाही चर्चेस घेतली आहे. या सर्व कथा अत्यंत वाचनीय असून नवी जीवनदृष्टी देणाऱ्या आहेत. ग्रंथाच्या पुढच्या भागात ख्रिश्चन, मुस्लिम, लिंगायत, शीख या परंपरांच्या अनुषंगाने मृत्यू संकल्पनेची चर्चा केली आहे. या सगळ्याच परंपरांमध्ये मृत्यूला सामोरे जाण्याचे अभिनव दृष्टिकोन आले आहेत.
       ग्रंथातील तिसरा भाग हा 'धर्म संकल्पना आणि मृत्युभय' स्पष्ट करणारा आहे. यामध्ये आत्मघातकी संकल्पना आणि आत्मविकासाच्या संकल्पना असे भेद करण्यात आले आहेत. विशेषतः ब्राह्मणी परंपरेने मृत्युभयाच्या माध्यमातून निर्माण केलेले भ्रामक कल्पना विश्व चर्चेस घेतले आहे. पुढे 'मिलिंद प्रश्न' या ग्रंथातील काही कथांच्या आधारे अनेक सूक्ष्म संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.
       'जगणं सुंदर असेल, तर मृत्यू सुंदर होईल! 'या प्रकरणाने पुस्तकाचा समारोप झाला आहे. आपले जगणे समृद्ध, आश्वासक, हितकारक आणि सुंदर करणे आपल्या हाती असते. त्यासाठी स्वतःचे जगण्याचे तत्त्वज्ञान असावे लागते. भगवान बुद्ध आपणास इथे मार्गदर्शक ठरतात. बुद्धांनी स्वतःच्या कृतीने विचाराने आणि तत्त्वज्ञानाने एक मोठा वारसा आपणासमोर ठेवला आहे. तो समजून घेतला तर खचितच जगणे आणि मरणेही सुंदर होईल. डॉ. श्रावस्तींच्या दोन वर्षांच्या साधनेतून हा काहीसा अप्रिय वाटणारा विषय आज आपल्यासमोर चर्चेसाठी खुला झाला आहे. मृत्यू संदर्भातील असंख्य कथा, तत्त्वज्ञान एकत्र वाचावयास मिळणे ही मोठी उपलब्धी आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत समर्पक असून एकूणच ग्रंथाची रचना व्यासंग व अभ्यास यांची प्रचिती देते.
                                  मृत्यू सुंदर आहे!
                                  डॉ.  रवींद्र श्रावस्ती
                                  लोकायत प्रकाशन, सातारा                                    संपर्क: 9822036159                                        पृष्ठे: ३०४ मूल्य: २५०/-

---------------------------------------------------------

                             डॉ. श्यामसुंदर मिरजकर
          कला,  वाणिज्य महाविद्यालय,  मायणी

टिप्पण्या

  1. उत्तम वास्तवदर्शी परीक्षण केले आहे.
    प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  2. डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी अभ्यासपूर्वक मांडणीतून साकारलेले मृत्यू सुंदर आहे हे पुस्तक. त्यावर डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी प्रकाश टाकला आहे. त्यातून मृत्यू हे वास्तव उघड होत जाते. पारंपरिक गैरसमज दूर होतात. मृत्यूबाबतचे अज्ञान दूर झाले तर जगणे सुसह्य, आनंदी करता येते हा विश्वास हे पुस्तक देते. अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  3. Absolutely death is beautiful. None is immortal in this world. The writer suggests the way to live for others happiness. Its the only way to become life beautiful self and other. Sir, you summaries the book short and sweet. Thank yyo

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)