ऐ ज़िन्दगी गले लगा ले ...

ऐ ज़िन्दगी गले लगा ले ... 
            सामान्य माणसाच्या जीवनाकडून असणाऱ्या अपेक्षा छोट्याशाच असतात. तो आपल्या वकुबानुसार स्वप्न पाहतो. ती पूर्ण होण्यासाठी धडपडतो. जीवाचे रान करतो. परंतु जीवन म्हणजे आशा-निराशेचा खेळ! सुखदुःखाची ऊनसावली आयुष्यभर येतजात राहते. जे हवंसं असतं ते प्राप्त होतंच असं नाही. जे नजरेसमोर असतं ते आपल्या हाती गवसतं असंही नाही. वाट्याला येणारे कटू अनुभव, अपयशाचे क्षण, दुःख म्हणजे जीवन नव्हे; तर आपली छोटी छोटी स्वप्ने पूर्ण होणे, खडतर वाटचालीतून यशापर्यंत पोहोचणे म्हणजे खरे जीवन! पण हे आनंददायी क्षण वाट्याला कधी आणि किती प्रमाणात येतील हे सांगता येत नाही. माणूस मात्र सतत अशा सुंदर मौल्यवान क्षणांची प्रतीक्षा करत राहतो. 
      कवी गुलजारजींनी 'सदमा'(१९८३) चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गीतात हा जीवनानुभव खूप सूचक व अर्थपूर्णरित्या व्यक्त झालेला आहे. या गाण्यांमध्ये नायक आपल्या जीवनाशी संवाद साधतो आहे. आपली इच्छा अपेक्षा बोलून दाखवतो आहे. तो म्हणतो, 

ऐ ज़िन्दगी गले लगा ले 
हमने भी तेरे हर एक ग़म को 
गले से लगाया है, है ना
       हे जीवना मला गळा भेट दे. आपुलकीचे आलिंगन दे. कारण तुझ्या सोबत आलेल्या प्रत्येक दुःखाला आम्ही पहिल्यांदा सोसलं, सहन केलं आहे. आता त्यानंतर का होईना हे आनंदमय जीवना मला तुला कडकडून भेटू दे. 
       जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या गळ्यात पडतात, तेव्हा खरे तर त्यांना त्या क्षणी एकरूप होण्याची इच्छा असते. कायमसाठी जवळ राहण्याची इच्छा असते. जसे सामान्य माणसाला त्याला हवे असणारे आनंदमय जीवन जवळ असावे वाटते, तसा हा भाव आहे. 

हमने बहाने से छुपके ज़माने से 
पलकों के परदे में घर भर लिया 
तेरा सहारा मिल गया है ज़िन्दगी
      तो पुढे म्हणतो, मी काहीतरी बहाना करून सगळ्या जगापासून लपून छपून माझ्या पापणीच्या पडद्यावर स्वतःला हवं असणार घर चित्रित केलं आहे. हे घर म्हणजे घरात असणारी माणसं आणि वस्तू देखील आहेत. खरे तर हे त्याने पाहिलेले स्वतःच्या आनंददायी जीवनाचे स्वप्न आहे. ते पूर्ण होण्यासाठी जीवनाची साथ हवी आहे. जीवनाने साथ दिली तरच हे सुखस्वप्न पूर्ण होऊ शकते. अन्यथा ते अशक्यच आहे. 

छोटा सा साया था, आँखों में आया था 
हमने दो बूंदों से मन भर लिया 
हमको किनारा मिल गया है ज़िन्दगी
       जे हवे असते ते पूर्णत्वाने मिळतेच असे नाही. कधी कधी त्याचा काही अंश आपल्याला लाभतो. त्या अपूर्णतेतही समाधान असते. नाहीतरी प्रत्येकाच्या सगळ्याच इच्छा कधी पूर्ण होतात का? जे हवे असते ते हव्या त्या प्रमाणात मिळते का? नाही ना? म्हणून मग जीवनाशी समझोता करावा लागतो. 
     त्यामुळेच तो पुढे म्हणतोय, जे हवे होते त्याची छोटीशी सावली मला लाभली. माझ्या दृष्टिक्षेपात आली. मला हवे असणारे भरलेले आभाळ मिळाले नाही, मात्र त्या आभाळामधून बरसलेले दोन थेंब मला मिळाले. तेवढ्यानेच मन भरून गेले. मला हवा असणारा पैलतीराचा किनारा मिळाला. 
               कधी कधी वाट्याला आलेले दोन थेंब 'अमृता'चे असतात. त्यांच्या आधारेच जीवनातील सगळ्या निराशेला, दुःखाला पळवून लावता येते. जीवनाचा खडतर प्रवास थोडासा सुसह्य होतो. 'तू नहीं तेरा ख़्वाब सही', असे एका शायरने म्हटले होते. इथे गुलजारजी त्या स्वप्नाचा जादुई स्पर्श व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतात. त्या स्वर्णीम स्पर्शाने अवघे जीवन सौंदर्यपूर्ण होऊन जाते. जीवनाला मोल प्राप्त होते. कवी गोविंदाग्रजांनी म्हटले होतेच, 'एक क्षण पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा, मग पुढे।' तसाच हा अनुभव आहे. 
       इथे जिंदगी असे जीवनाला उद्देशून संबोधलेले असू शकते. त्याचप्रमाणे त्याने आपल्या प्रेयसीला उद्देशूनही तो शब्द वापरलेला असू शकतो. कारण ती आणि जीवन या दोन भिन्न गोष्टी नाहीतच. ती सोबत असणे म्हणजेच खरेखुरे जीवन! तिच्या शिवाय केलेली मार्गक्रमणा म्हणजे दुष्काळातून घोटभर पाण्यासाठी मैलोन मैल चालत राहणे. संपूर्ण गाण्यात जिंदगी म्हणजे प्रेयसी/सहचारिणी असा अर्थ घेतला तर गाणे अधिक अर्थपूर्ण वाटू लागते. 
       तिने अति प्रेमाने त्याला हृदयाशी धरले काय, किंवा जीवनाने त्याची गळाभेट घेतली काय, दोन्हीचा अर्थ एकच! एकटेपणाला विसर्जित करण्याचा चरमबिंदू म्हणजे ती! म्हणजेच जीवन! याहून दुसरे काय हवे असते माणसाला? 
     या गाण्याच्या निर्मितीची कथा मोठी रोचक आहे. तमिळ दिग्दर्शक बाळू महेन्द्रू यांच्या 'मूंदरम पिरई' चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे 'सदमा' होय. मूळ तमिळ गाणे पूनगात्रु पुथीदनधू (Poongatru Puthidanadhu) च्या चालीवर नवे बोल लिहिणे कठीण होते. गुलज़ारजींनी नवी तिपेडी लिहिली. मूळ चालीत थोडा बदल करून नवी धून इलाई राजांनी तयार केली. एका क्लासिक गाण्याचा जन्म झाला. पुढे संगीतकार अमित त्रिवेदी यांनी या गीताचा मुखडा व पहिला अंतरा गायक अरजित सिंग आणि अलिया भट यांच्या कडून 'डिअर जिंदगी' (२०१६) चित्रपटासाठी गाऊन घेतला. तीही चाल लोकप्रिय ठरली आहे. इलाई राजाने पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांच्या सुरेल मिश्रणातून एका अद्वितीय गाण्याला जन्म दिला आहे. आजही अनेक अभागी जीव अशा जिंदगीच्या शोधात वणवणताहेत. खडतर जीवन धारेतून बाहेर पडायला एका सच्च्या नात्याचा किनारा हवा असतो. तो मिळत नाही तोपर्यंत घनगर्द व्याकूळता तन-मनाला व्यापून राहते, एवढे मात्र खरे! 

सदमा (१९८३
संगीतकार : इलाई राजा
गायक : सुरेश वाडकर
https://youtu.be/aw5FN0Dpy3Y?si=UO2Q_Lx6_slOKy5x

'डिअर जिंदगी' (२०१६)
संगीतकार : अमित त्रिवेदी
गायक : अरजित सिंग आणि अलिया भट
https://youtu.be/xQx5H14YTyQ?si=1rbGHIFRGeQfnpmv



 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)