दिल हूम हूम करे...
दिल हूम हूम करे...
राजस्थानचे वैराण वाळवंट तिच्या डोळ्यात उतरलेलं आहे. तिचे डोळे कोरडे ठक्क. त्या वाळवंटासारखेच. थोडाही ओलावा नाही. ती शनिवारी जन्मली म्हणून शनिचरी. तिचा जन्म झाला आणि बाप मेला. आई नौटंकीवाल्या बरोबर पळून गेली. म्हणून ती कलमुही. असेच कुणीतरी लहानाचे मोठे केले. एका दारुड्याने तिला पैजेत जिंकले आणि तिच्याशी लग्न केले. तिला एक मुलगाही झाला, तो बुधवा. दोन वेळचं अन्न कधी नीट मिळालं नाही. खालच्या जातीची, तशात अपशकुनी म्हणून अवहेलना अपमान नेहमीचाच.
अशातच एकदा दूर वरून पाणी घेऊन येत असताना तो भेटतो. ती वाळवंटातून लांबून थोडे पाणी माठातून आणतेय. तो उंटावरून चाललाय. तिला थांबवून पाणी मागतोय. तिला वर बघून बोल म्हणतोय. नजरेत नजर मिळवायला सांगतोय. तो लक्ष्मणसिंग ठाकूर आहे. जमिनदार. उच्च जातीचा. श्रीमंत. उंच हवेलीत राहणारा. ती दरिद्री. कमजात. ती त्याला पहिल्याच भेटीत आवडते.
तो तिला हवेलीत कामाला यायला सांगतोय. ती येते. तो तिला एकटीला गाठून आपला प्रेमभाव व्यक्त करतोय. तिला स्पर्श करतोय. नवरा मुलाला सोडून कायमची इथे रहा म्हणून प्रस्ताव ठेवतोय. पण तिच्यावर जबरदस्ती करत नाही. ती तो नाकारतेय. हे पाप आहे, म्हणतेय. नरकात जाईन, म्हणतेय. तो म्हणतो, तुझे आताचे जिणे हेच नरक आहे. यातून बाहेर पड. पापपुण्य स्वर्गनरक या ब्राह्मणवादाने रचलेल्या गोष्टी आहेत. तिला त्याचे म्हणणे पटते, परंतु ती तो मार्ग स्वीकारत नाही. स्वतःचा खडतर जीवनमार्ग चालत राहते. हवेली पासून, त्याच्या सावली पासून प्रयत्नपूर्वक दूर राहते. तोही तिचे हे स्वातंत्र्य मान्य करतोय.
दरम्यान एकदा भर पावसात सासू मरते. देवाच्या यात्रेतील प्रसादातून विषबाधा होऊन नवरा मरतो. तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब येत नाही. पुन्हा पुन्हा वाट्याला येणारे दुःख सोसून ती कोरडी झाली आहे. कारण खऱ्या ओलाव्याने कुणीही तिच्याशी जोडलेले नाही. या पार्श्वभूमीवर एकदा भर मैफिलीत तिला गाणं म्हणावं लागतंय. तेव्हा ती म्हणतेय....
दिल हूम हूम करे, घबराए, घन धम धम करे, गरजाए
एक बूँद कभी पानी की मोरी अँखियों से बरसाए
हृदय धडधडतय. थोडे घाबरलंय. मेघ गडगड आवाज करताहेत. गरजतात. माझ्या डोळ्यांतून पाण्याचा एक थेंब कधीतरी बरसू दे. इथे ती घाबरलेली, आक्रसलेली आहे. कोरडी आहे. भावशून्य. तो मात्र भरलेल्या आभाळासारखा आहे. आपल्या भावना तो गर्जना करून तिला कळवतोय.
तेरी झोरी डारूं, सब सूखे पात जो आए
तेरा छुआ लागे, मेरी सुखी डार हरियाए
स्वतःच्या वाट्याला आलेली सुकलेली पाने त्याच्या झोळीत टाकावीत, असे तिला वाटते. (सुकलेली पाने म्हणजेच वाट्याला आलेले निरस क्षण. त्याच्या झोळीत ते क्षण टाकले तर ते अर्थपूर्ण होऊन जातील, असे तिला वाटत असावे.) कारण त्याने एकदा स्पर्श केला होता. त्यामुळे तिची सुकलेली फांदी पुन्हा हिरवीगार झाली होती. म्हणजेच त्याच्या स्पर्शाने, सहवासाने तिचे जीवन रसरशीत हिरवेगार होऊन जाणार याची तिला खात्री आहे.
जिस तन को छुआ तूने उस तन को छुपाऊँ
जिस मन को लागे नैना, वो किसको दिखाऊँ
ती पुढे म्हणते, ज्या देहाला तू स्पर्श केलास, ती स्पर्शजाणीव मी माझ्या पुरतीच लपवून ठेवते. आणि तुझे डोळे ज्या मनाला स्पर्श करून गेले आहेत, ते मी कुणाला दाखवू? कुणाला सांगू?
खरेतर अत्यंत प्रेमाने केलेला तो स्पर्श तिलाही आवडलाय. ती तो अनोखा अनुभव जपून ठेवू पाहते. पहिल्यांदाच कुणाचे तरी डोळे तिच्या मनापर्यंत पोहोचले आहेत. हे तिच्यासाठी आनंददायी आहे. परंतु ती उघडपणे सांगू शकत नाही. कारण सामाजिक बंधने आहेत. ती विवाहित आहे. एका मुलाची आई आहे. सामाजिक व आर्थिक स्तरावर देखील ती खालच्या पातळीवर आहे. त्यामुळे तिच्या वाट्याला आलेले प्रेम ती स्वीकारू शकत नाही आणि कुणाला सांगू शकत नाही.
ओ मोरे चन्द्रमा, तेरी चांदनी अंग जलाए
तेरी ऊंची अटारी, मैंने पंख लिए कटवाए
शेवटी ती म्हणते, हे माझ्या चंद्रमा, म्हणजेच प्रियकरा तुझ्या प्रेमभावाचे चांदणे माझ्या देहाला जाळते आहे. त्याच्या प्रेमभावाचे चांदणे ती अंगावर ओढून त्याचा मनस्वी आनंद लुटू शकत नाही. उलट ते आपणास हवे असतानाही आपण स्वीकारू शकत नाही, या भावनेने ती आतल्या आत जळत राहते. हा एक प्रकारचा विरहाग्नी आहे. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो उंच वरच्या मजल्यावर आहे आणि तिने स्वतःच स्वतःचे पंख कापून टाकले आहेत. तिने स्वतः स्वतःला बंधने घालून सीमित केले आहे.
या गाण्याचे वैशिष्ट्य असे की, प्रेम आणि सामाजिक बंधने यांचे द्वंद्व इथे पहिल्यांदा दिसते आहे. ती स्वतःच तिच्यावर लादलेली बंधने निष्ठेने सांभाळते आहे. त्यासाठी अवचित वाट्याला आलेल्या प्रेमभावनेला नाकारते आहे. असा प्रेमभाव की जो तिला खूप आतून हवा आहे. ज्या प्रेमभावनेच्या स्पर्शाने तिचे अवघे जीवन पुलकित, रोमांचित होणार आहे. तिचे कोरडेपण संपणार आहे. हिरवा रसरशीतपणा तिला लाभणार आहे. तरीही मोठ्या निर्धाराने ती हा प्रेमानुभव नाकारते. आणि स्वतःचे सामाजिक उत्तरदायित्त्व सांभाळते. हेच भारतीय स्त्रीचे एक वैशिष्ट्य आहे.
कवी गुलजार यांनी नेहमीप्रमाणे एक अप्रतिम रचना आपल्या समोर ठेवली आहे. सूचक अर्थपूर्णता हे त्यांचे वैशिष्ट्य. रोजच्या अनुभवातील गोष्टी नवी प्रतीके, नव्या प्रतिमा म्हणून पुढे येतात. आता हेच पहा ना!
तेरी झोरी डारूं, सब सूखे पात जो आए
तेरा छुआ लागे, मेरी सुखी डार हरियाए
या दोन ओळी विलक्षण भावपूर्ण आहेत. वाट्याला आलेली सुकलेली पाने (रसहीन क्षण/अनुभव) मी तुझ्या झोळीत टाकते. असे का? तर वैराण वाळवंटी अनुभवातील नीरसता फक्त त्यालाच समजू शकेल, हे एका बाजूला. आणि तोच या सुकलेल्या क्षणांमध्ये प्राण भरू शकेल असा विश्वास दुसऱ्या बाजूला. म्हणूनच तिला त्रासदायक वाटणाऱ्या सगळ्या अप्रिय गोष्टी ती त्याच्या झोळीत टाकून रिकामी होते. आणि त्याने स्पर्श केला की तिची सुकलेली फांदीही हिरवीकंच होते. त्यात चैतन्य निर्माण होते. ती रसवंती होते. जणू प्रेमाचा संजीवनी स्पर्श एक नवे जीवन फुलवितो. योग्य सहचर वाळवंटातही चैतन्य फुलविणारा झरा असतो. तो साध्या वाटणाऱ्या छोट्या कृतींमधून सौंदर्य व अर्थपूर्णता निर्माण करतो. तर अयोग्य जोडीदार चांगल्या क्षणांचेही कटू अनुभवात रूपांतर करतो. किती सूचकतेने हे सगळं व्यक्त केलंय गुलज़ारजींनी!
रुदाली (१९९३) हा कल्पना लाजमी दिग्दर्शित अप्रतिम चित्रपट आहे. भूपेन हजारिका यांचे लोकसंगीताचा बाज असणारे संगीत, गुलजारजींची गाणी, लता मंगेशकर आणि भारतरत्न भूपेन हजारिका यांचा स्वर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हृदयात खोलवर उतरणारी गाणी तयार झाली आहेत. या गाण्याचे मूळ 'मणिराम दिवाण' या आसामी चित्रपटातील "बुकू होम होम कोरे" या भूपेन हजारिका यांनी गायिलेल्या गाण्यात आहे. रुदाली मधील भूमिकेसाठी डिंपल कपाडियाला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळालेला होता. खरोखरच तिचा या चित्रपटातील अभिनय अतिशय वेगळा आणि अचंबित करणारा आहे. तो आवर्जून पाहिला पाहिजे. लक्ष्मणसिंग ठाकूर (राज बब्बर), शनिचरी (डिंपल कपाडिया), बुधवा(रघुवीर यादव), भिकनी-पिवली (राखी) या सर्वांनी जीव ओतून काम केले आहे.
गाणे ऐकण्यासाठी खालील लिंक कॉपी करा
लता मंगेशकर
https://youtu.be/F10aeM9V1Ho?si=13cBvlFP2O1NPwuZ
भूपेन हजारिका
https://youtu.be/qxO1MN67Vtg?si=n-x0EgR1gI_jwgr9
रुदाली (१९९३)
दिग्दर्शक : कल्पना लाजमी
संगीतकार : भूपेन हजारिका
गीतकार : गुलजार
गायक : लता मंगेशकर, भूपेन हजारिका
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा