संत एकनाथ लिखित संतचरित्रे
संत एकनाथ लिखित संतचरित्रे
वारकरी संप्रदाय म्हणजे पूर्वपरंपरेशी केलेली स्वयंसिद्ध बंडखोरी! संत नामदेव-ज्ञानदेवांच्या काळात संप्रदायाला आचार विचार देण्याचे महद कार्य झाले. ते करत असताना संप्रदायात सर्वश्रेष्ठ स्थान म्हणून संतपद गौरविले गेले. वारकरी संप्रदायातील संत हे अनुभवसिद्ध आणि आदर्श कर्मयोगी होते. त्यांनी स्वतःचा व्यवसाय उद्योग केलाच, परंतु त्यासोबतच आपल्या सभोवताली अज्ञान अंधकारात बुडणाऱ्या लोकांविषयी कळवळा जपला. त्यांना सन्मार्ग दाखविला. ईश्वराशी कसे नाते जोडायचे ते शिकविले. 'यज्ञ याग विधी वायाची उपाधी', असे म्हणत आचरणसुलभ भक्तिमार्ग सांगितला. प्रयत्नपूर्वक वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. या संतांनी लिहिलेले वाङ्मय म्हणजे संप्रदायाला दिलेली आधारशीला होय. तत्कालीन सनातनी ब्रह्मवृंद या संतांना त्रास देत होता. छळत होता. त्यांच्या योग्यतेबद्दल शंका उपस्थित करीत होता. अशावेळी संत मंडळींची भलामन करणे गरजेचेच होते. म्हणून वारकरी संप्रदायातील संतांनी जाणीवपूर्वक आपल्या संतमंडळाचा गौरव केलेला दिसतो. ज्ञानेश्वरादी भावंडांच्या संदर्भात संत नामदेवांनी प्रथमतः असे केले. ब्रह्मवृंदाने बहिष्कृत केलेल्या भावंडांना संत या सर्वोच्च पदावर स्थापित केले. हाच कित्ता पुढे संत एकनाथ महाराजांनी गिरविलेला दिसतो. त्यांनी देखील आपल्या विपुल लेखनात संतचरित्रांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई यांची स्तुती व थोरवी एकनाथ महाराज नोंदवितात. तर संत नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा यांची चरित्रे त्यांनी आपल्या अभंगांमधून मांडलेली दिसतात.
*श्री निवृत्तीनाथांची स्तुती*
संत एकनाथांनी १९ अभंग लिहून संत निवृत्तीनाथांची स्तुती केलेली आहे. निवृत्तीनाथांना 'विश्वाचा तो गुरु', असे संबोधले आहे. ही परंपरा आदिनाथापासून सुरू झाली. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना ज्ञान दिले आणि चांगदेवांना बोध दिला. तोच बोध मी धारण केला आहे, असे एकनाथ म्हणतात.
केला उपकार जगीं तारियेले सर्व।
निवृत्ती गुरु माझा जीव उद्धरिले सर्व।।
असा गौरव ज्ञानदेवांच्या तोंडी आलेला आहे. तो व्यक्त करताना संत एकनाथ निवृत्तीनाथांनाच शरण जातात आणि एकदा का निवृत्ती म्हटले की संसार उरतच नाही, असा अनुभव घेतात. येथे नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायातील निवृत्तीनाथांचे ज्येष्ठत्व व श्रेष्ठत्व व्यक्त केलेले दिसते. हा शिवाचा अवतार आहे, अशीही धारणा संप्रदायात असलेली दिसते. म्हणूनच जसे परमेश्वराचे नाव घ्यावे, तसेच संतांचेही नामस्मरण करावे, असा दंडक नाथ महाराज सांगतात. वारकरी संप्रदायात संतनामाचा जयघोष आणि संतांच्या समाधी स्थळाला भेट, याला महत्त्व असलेले दिसते. या दोन्ही गोष्टी सर्वसामान्य भाविकांच्या मनात ठसविण्यासाठी हे अभंग महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत. हे करण्यामागे व्यक्तिगौरव असा हेतू नाही, तर आपली पूर्वपरंपरा कोणती आहे? कुठे आहे? हे नेमकेपणाने जाणून घ्यावे यासाठी पुन्हा पुन्हा संतगौरव आलेला दिसतो.
श्री निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे. त्याचे वर्णन करताना संत एकनाथ म्हणतात,
धन्य आजी डोळां। स्वामी निवृत्ती देखिला।।
कुशावर्ती करूं स्नान। घेऊं निवृत्तीदर्शन।।
प्रदक्षिणा ब्रह्मगिरी। चौऱ्यांशीची चुकली फेरी।।
गंगाद्वारी स्नान करतां। हारे पय पान व्यथा।।
ऐसीं तीन अक्षरें। एका जनार्दन स्मरे।।
त्र्यंबकेश्वर क्षेत्री जाऊन काय करावे, याचे मार्गदर्शन येथे घडते. ज्या दिवशी या क्षेत्री जाऊन निवृत्तीनाथांची भेट होते, तो दिवस धन्य, असे एकनाथ म्हणतात. जरी निवृत्तीनाथांचे नाम मुखी घेतले तरी भवबंधन गळून पडते, असा विश्वास त्यांच्या अभंगात दिसून येतो.
*श्री ज्ञानदेवांची स्तुती*
संत ज्ञानदेवांच्या स्तुतीचे २७ अभंग एकनाथ महाराजांनी लिहिले आहेत. संतमंडळात अत्यंत आदराचा विषय झालेले संत ज्ञानेश्वर माऊली आहेत. अल्पवयीन भावंडांना तत्कालीन जाचक धर्मबंधनांचा त्रास सहन करावा लागला, तरीही ही धैर्यवान भावंडे परंपरेशी झगडत, संघर्ष करत जनसामान्यांना नवा भक्तिमार्ग दाखवत राहिली. त्याबद्दल कौतुक आणि कृतज्ञता असे दोन्ही भाव व्यक्त होतात.
संत एकनाथांच्या मते अलंकापुर म्हणजेच आजची आळंदी हे 'संतांचे माहेर आणि विश्रांतीचे स्थान' आहे. कारण तिथे जीवाचा ठेवा असणारा ज्ञानदेव आहे. सिद्धेश्वरस्थानी दर्शन घेतल्याने मुक्ती मिळते आणि वटेश्वराजवळ ब्रह्मज्ञान प्राप्ती होते. ८४ सिद्धांचा मेळा भेटतो. कल्पवृक्षाचे म्हणजेच अजान वृक्षाचे दर्शन घडते. त्याला प्रदक्षिणा घातली तर पुण्यप्राप्ती होऊन स्वर्गात जागा मिळते. अमृतमय इंद्रायणी म्हणजे तीर्थराज आहे. अशा पवित्र ठिकाणी ज्ञानदेवांची समाधी आहे, असे वर्णन एकनाथ महाराज करतात.
समाधी वैभव पाहतां नयनीं।
चुकतसे आयणी जन्मव्याधि।।
असे एकनाथांचे सांगणे आहे.
माझा ज्ञानेश्वर कृपाळू आणि उदार आहे. त्याला माझा वारंवार नमस्कार असो. यातिकूळ न पाहता ही करुणा करणारी ज्ञानाबाई भक्ताला जवळ घेते. जन्म मरणाची व्याधी संपविते. अनाथांची माय होते, असे एकनाथांना वाटते.
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळी ।
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा।।
असे ज्ञानदेवांचे वर्णन ते करतात. हा ज्ञानियांचा शिरोमणी आहे आणि पूजास्थानी वंदनीय आहे. जड, अचेतन भिंत चालविणारा, चांगदेवांची भ्रांती हरण करणारा, रेड्यामुखी वेद बोलविणारा, ब्राह्मणांचा गर्वहरण करणारा, मोक्षमार्गाचा सांगाती आणि शांतिबिंब ज्ञानसूर्य प्रगटला आहे, असे गौरवोद्गार नाथ महाराज काढतात.
संत एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या संदर्भात केलेली दोन कार्ये महत्त्वाची आहेत. एक म्हणजे समाधीस्थानी अजान वृक्षाची मुळी ज्ञानदेवांच्या गळ्याला विळखा घालून होती, ती दूर करणे आणि दुसरे म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करणे. खरे तर या दोन्ही गोष्टी म्हणजे एकच रूपक आहे. त्याबद्दलची नोंद एकनाथांच्या एका अभंगात दिसून येते.
श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥
दिव्य तेजःपुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आनंदस्थलीं काढ वेगीं ॥३॥
ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापूरीं । तंव नदीमाझारी देखिलें द्वार ॥४।॥
एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥
ज्ञानेश्वरांचे वर्णन करताना नाथ महाराज लिहितात, हा उदार अंतःकरणाचा भक्त आहे. त्याची तिन्ही लोकांत कीर्ती आहे. कारण त्याने भगवद्गीतेचा अर्थ सांगितला आहे. म्हणूनच 'उजळला दीप ज्ञानदेवे' असा गौरव ते करतात. 'भाव धरूनिया वाची ज्ञानेश्वरी। कृपा करी हरी तया वरी।।' असे नाथांचे सांगणे आहे.
*श्री सोपानदेव स्तुती*
संत सोपानदेवांचा गौरव करणारे सहा अभंग एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहेत. ज्ञानदेव हे विष्णूचे अवतार, तसेच सोपानदेव हे ब्रह्मदेवाचे अवतार आहेत, असे संत एकनाथ लिहितात. या सोपानदेवांचा देव आणि भक्त जय जयकार करतात. त्यांच्या नावाचा घोष आकाशात गर्जत असतो.
नमो अगणितगुणा देवाधिदेवा । माझ्या सोपानदेवा नमन तुज ॥१॥
संवत्सर ग्राम कऱ्हातटीं उत्तम । पुण्यपावन नाम सोपानदेव ॥२॥
जग तारावया हरिलीला केली । प्रसिद्ध ती झाली सोपानदेवा ॥३॥
तुमचा प्रसाद द्यावा माझे हातीं । एका जनार्दनीं विनंती करीतसे ॥४॥
अशा शब्दात संत सोपानदेवांचे समाधीस्थान व श्रेष्ठत्व एकनाथांनी गौरविले आहे. या सोपानदेवांचे नामस्मरण केल्यास प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होते, असेही ते म्हणतात.
*श्री मुक्ताई स्तुती*
संत मुक्ताबाईच्या स्तुतीचे सहा अभंग नाथ महाराजांनी लिहिले आहेत. मुक्ताई म्हणजे जगाच्या उद्धारासाठी आदिशक्तीचा अवतार आहे, असे एकनाथांना वाटते. ही मुक्ताई मुक्तपणे मुक्त आहे. अज्ञानी व्यक्तीला बोध करून, सज्ञानी व्यक्तीची शुद्धी करून सर्वांना योग्य मार्ग दाखविणारी आहे. म्हणून तिच्या नावाचे स्मरण करता मोक्षपद लाभेल. सायुज्य संपदा पावेल, असे एकनाथ लिहितात. मुक्ताई ही स्वर्ग, पृथ्वी व पाताळ या तीन जगांना जन्म देणारी आदिशक्ती माता आहे. तिचा वरदहस्त माझ्यावर असावा, असे नाथांचे मागणे आहे.
अज्ञानासी बोध सज्ञानाची शुद्धी
तोडिली उपाधी सर्वत्रांची।।
अशा शब्दांत मुक्ताईचा कार्यगौरव संत एकनाथ करतात.
*श्री नामदेव चरित्र*
संत नामदेव चरित्राचे ८२ अभंग एकनाथांनी लिहिलेले आढळतात. येथे नामदेवांच्या जीवन चरित्रातील काही भाग नाट्यमय पद्धतीने मांडलेला आहे. हे चरित्र विश्वसनीय आहे, असे नव्हे. एकनाथांनी वर्णिलेला कथा भाग खुद्द नामदेव गाथेतील अभंगांच्या आधारे विस्तारलेला आहे. या नामदेवांच्या नाट्यमय चरित्रात लडिवाळपणा आहे. संत एकनाथांच्या मते नामदेव पूर्व जन्मात प्रल्हाद, अंगद, उद्धव होता. कलियुगात तो नामदेव म्हणून जन्मास आला. तेथून पुढे एकनाथांनी नामदेवाच्या बालभक्तीचे वर्णन केलेले आहे.
पंच वरुषी नामा जाहला। छंद विठूचा लागला।।
जाऊनियां राऊळांत । तेथें सावकाश बैसत ।।
विठ्ठल हरि वाचे छंद। विठ्ठलें लाविलासे वेध।।
एका जनार्दनीं सार। मंत्र जपे त्रिअक्षर।।
वयाच्या पाचव्या वर्षापासून विठ्ठल मंदिरात येऊन बसणाऱ्या नामदेवांना विठ्ठल हाच मंत्र लाभला आणि दिवसेंदिवस ही भक्ती घनदाट होत गेली. घर संसाराचे भान राहिले नाही. 'विठूच्या छंदासी। पडतां आहे रे विवसी।।', (विवसी म्हणजे झपाटून टाकणारी हडळ) असे नामदेवांचे वडील दामाशेटी समजावतात. परंतु नामदेवांचा छंद कमी होत नाही. उलट ध्यानीमनी विठ्ठलच असतो. 'नावडेचि आन। एका विठ्ठलावांचून।। नावडे संसार सर्वथा। आवड बैसली पंढरीनाथा।।' अशी त्याची अवस्था होते. नामदेवांची आई गोणाई व वडील दामाजी दोघेही नामदेवाला समजावितात, मारतात, कोंडून घालतात, उपाशी ठेवतात. परंतु विठ्ठलाचा ध्यास कमी होत नाही. या विठ्ठलाने आमच्या पोराला नादी लावली आहे, अशी त्यांची धारणा होते.
दुसऱ्या बाजूला नामदेवांच्या भेटीसाठी विठ्ठलच व्याकूळ झालेला असतो. तो मंदिर सोडून नामदेवाच्या घरी भेटीसाठी येतो. गोणाई शिव्या घालते, तरी विठ्ठल ते मनावर घेत नाही. 'शिव्या देतां यासी हांसतसे सुखें। न मानीं कांही दुःखें नाम्यासाठीं।।' असे विठ्ठलाचे वर्तन असते. या छंदापाई 'याचें तो बिढार राउळींच असे।' असे नामदेवाबद्दल आई म्हणू लागते. आई-वडील अनेक प्रकारे नामदेवाची समजूत घालू लागतात. मी दरिद्री आहे. जवळ पैसा नाही. आम्ही आता म्हातारे झालो. तू व्यापार धंदा केला पाहिजे. घर सांभाळले पाहिजे, असे परोपरीने सांगतात आणि त्याला कापड विक्रीसाठी बाजारात जाण्यास सांगतात. या सर्व कथेत विठ्ठल नामदेवांचा सखा सांगाती झालेला दिसतो. वारकरी संतांनी विठ्ठलाचे मानुषीकरण केले आहे, ते असे.
खरे तर एकनाथांनी हे जे लिहिले आहे ते सत्य नव्हे. कारण दामाशेटींची आर्थिक स्थिती चांगली होती. त्यामुळेच लोक त्यांना शेठ म्हणत होते. त्यांच्या घरी जनी व नागी या दोन दासी होत्या. काही कामधंदा न करणाऱ्या नामदेवांचे लग्न झाले, तेही या घराण्याकडे पाहूनच झाले असणार. ही वस्तुस्थिती लक्षात घेता एकनाथांनी सांगितलेला कथा भाग काल्पनिक आहे, असे वाटते.
पुढे नामदेवांनी कापड विक्रीला जाणे, गणोबाला कापड विकणे आणि धोंडोबा जामीन ठेवणे, आठ दिवसाच्या मुदतीत कापडाचे पैसे न मिळणे, त्या कारणे धोंडोबा उचलून घरात आणणे व खोलीत ठेवणे, तो धोंडोबा सोन्याचा होणे, असा कथा भाग आलेला दिसतो. एकनाथ या कथा रंगवून सांगतात.
पावसाळ्यापूर्वी घर शाकारणे ही नेहमीचीच गोष्ट असेच. एकदा नामदेवांचे घर शाकारायचे असताना मजूर मिळत नाहीत. तेव्हा विठ्ठलच त्यांचे घर शाकारून देतो. अशीही एक कथा एकनाथांनी दोन अभंगात सांगितली आहे. बापलेक बाहेर मजूर शोधत असताना मजूर मिळत नाहीत. घरी येऊन पाहतात तर एक मजूर घर शाकारणी करतो आहे. त्याला विचारल्यावर तो भक्तवत्सल विठोबा म्हणतो,
बिऱ्हाड तती माझें राउळाभीतरीं।
विठूजी निर्धारी नाम माझे।।
त्याचा भावार्थ इतकाच की त्याकाळी नामदेवांच्या श्रद्धेचा, भक्तीचा बोलबाला झालेला असावा. अशा सज्जन माणसासाठी अनोळखी मजूर मदतीला धावलेले असावेत.
पुढे नामदेवांचे लग्न कसे होणार, अशी चिंता दामाशेटींना लागते. परंतु त्याही वेळी विठोबा मदतीस धावतो आणि लग्नकार्य उरकते. यथावकाश नामदेवांना चार पुत्र होतात.
नारा महादा गोंदा विटा चौघे पुत्र जाहले
आनंदे लागले हरी भजनी।।
असे सगळे कुटुंबच विठ्ठलाच्या भजनी लागते. तसेच दासी जनी ही देखील विठ्ठलाला प्रिय होते. नामदेवांच्या संसारात अनेक संकटे येतात परंतु भक्ती कमी होत नाही. 'एकविध वाचे नामयासी छंद' असे नेमके वर्णन एकनाथ करतात.
नामा आणि दामा बाप लेक दोन्ही। राजाई गोणाई सासू सुना।।
नारा महादा गोंदा विठू चवघे पुत्र। जन्मले पवित्र हरिभक्त।।
आउबाई लेकी नाउबाई बहिणी। तिहीं चक्रपाणि वेधियेला।।
लाडी आणि येसी बहिना साकराई। एका जनार्दनीं
पाही वंशावळी।।
अशी संपूर्ण कुटुंबाची ओळख एकनाथांनी आपल्या एका अभंगात करून दिली आहे.
पुढे परिसा भागवताच्या घरातील परीस उसना मिळणे, राजाईने घरातील सगळ्या लोखंडी वस्तूंचे सोने करणे, नामदेव घरातील हे वैभव पाहून दुःखी होणे, परिस चंद्रभागेत फेकून देणे, नंतर परीसा भागवत आपला परीस मागण्यासाठी येतो तेव्हा चंद्रभागेतून ओंजळभर परीस बाहेर काढणे व परसोबास देणे, असे चमत्कार वर्णिले आहेत. 'दैन्यकाळ आम्हां नाहीं नाहीं।। आम्ही हरिदास कुबेर भांडारी। संपदा ती थोडी घरीं वसे।।' असे वर्णन येते.
धन्य धन्य नामदेव। सर्व वैष्णवांचा राव।।
कवित्व केलें शतकोटी। तारिले जीव कल्पकोटी।।।
असा उचित गौरव एकनाथांनी केला आहे. या नामदेवांची समाधी महाद्वारी आहे, याचीही नोंद एकनाथांनी केली आहे.
भक्त शिरोमणी लाडका डिंगर। आवडता फार विठोबाचा।।
कवित्व करुनी तारिले सकळ। निरभिमानी निर्मळ सदोदित।।
नामावांचुनी कांही नेणें तो नामा। तयाचा तो प्रेमा पांडुरंगी।।
अशा शब्दात संत एकनाथांनी संत नामदेवांची थोरवी वर्णन केलेली आहे. विठ्ठलाचा आवडता भक्त, कवित्व करून जनसामान्यांना उद्धरणारा संत, अहंकार रहित व निर्मळ मनाचा कवी, असे नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू संत एकनाथ महाराज सांगतात. तसेच नामदेवांना वंदन देखील करतात. नामदेवांचे हे लौकिक चरित्र आणि अलौकिक कार्य संप्रदायाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. अनेक कीर्तनकार व प्रवचनकारांनी संतांचा महिमा गाताना नाथ महाराजांच्या शब्दांत प्रमाण दिले आहे. मौखिक परंपरेने वारकरी संप्रदायाचा इतिहास अधिक ठळक केलेला आहे.
*संत गोरा कुंभार चरित्र*
नाथ महाराजांनी लिहिलेले संत गोरा कुंभार यांचे चरित्र (३१ अभंग) म्हणजे त्यांच्या जीवनातील अद्भुत चमत्कार कथाच होय. एका बाजूला गोरोबांचा जीवनपट उलगडत जातो, त्याचवेळी त्यांच्या एकविध देहभाव रहित भक्तीचा देखील परिचय होतो. गोरोबा नामसंकीर्तनामध्ये इतके तल्लीन होतात की त्यांना लौकिक जीवनाचे भान राहत नाही. त्यांच्या या गुणा मधूनच काही घटना घडत जातात. त्याचे वर्णन नाथ महाराजांनी केले आहे."
संत एकनाथ तेर गावास सत्यपुरी म्हणतात, तर गोरोबांचा उल्लेख हरिभक्तराशी असा करतात. 'नित्य वाचे नाम, आठवी विठ्ठल। भक्तिभाव सबळ हृदया माजी' असे गोरोबांचे वर्तन असते. प्रपंच व व्यापार उद्योग चांगला चाललेला असतो. एकदा ते माती भिजवतात आणि आळे करून विठ्ठल नाम घेत त्यामध्ये नाचू लागतात. त्याच वेळी त्यांची पत्नी रांगत्या बाळाला घरात ठेवून पाण्याला जाते. ते बाळ रांगत रांगत मातीच्या आळ्यात येते. भक्तीत रंगलेले गोरोबा बेभान होऊन नाचत असतात, तर दुसऱ्या बाजूला बाळ बापाचा पाय धरण्याचा प्रयत्न करते. पायाशी येते. मातीत रगडले जाते. रक्त मांसाचा चेंदामेंदा होतो. पाण्याला गेलेली पत्नी परत येऊन पाहते. तिला बाळ दिसत नाहीी. ती गोरोबांना विचारते. परंतु ते जणू समाधीस्थ झालेले असतात. मातीत तुडविले गेलेले गतप्राण बाळ पाहून ती रडते. गोरोबांना सावध करते. परंतु नामस्मरणाची समाधी भंगल्याने गोरोबा चिडतात. काठी घेऊन मारायला धावतात. तेव्हा ती म्हणते, 'स्पर्श कराल मजसी, तरी विठोबाची आण' या वाक्यासरशी गोरोबा थांबतात. पुढे ते पत्नीची शपथ पाडून तिला अजिबात स्पर्श करत नाहीत. त्यामुळे संसाराचा हेतू मागे पडतो. पुत्रप्राप्ती होत नाही. एकांतात राहतात, परंतु अंगसंग होत नाही. शेवटी ती घडलेली घटना वडिलांना सांगते. गावातील महाजन शेटे, जाणते कुंभार एकत्र येऊन यावर विचार करतात आणि गोरोबाच्या सासऱ्यांना धाकटी मुलगी गोरोबांना द्यावी, असा सल्ला देतात. त्यानुसार विधियुक्त दुसरे लग्न होते. कन्येला निरोप देताना सासरे जावयाला म्हणजे गोरोबांना म्हणतात, दोघींना एकसारखे वागवा. भेदभाव करू नका. वडीलधाऱ्यांचा हा शब्द पाळा. नंतर गोरोबा याबद्दल विचार करतात आणि दुसऱ्या पत्नीला देखील स्पर्श करत नाहीत. असे खूप दिवस उलटतात. शेवटी त्या दोघी एकमेकींशी विचार करतात आणि रात्री दोन्ही बाजूला दोघी झोपतात. झोपेत असलेल्या गोरोबाचा हात स्वतःच्या छातीवर ठेवतात. जागा झालेला गोरोबा पाहतो की आपला हात नको तिथे गेला आहे. आपली प्रतिज्ञा मोडली गेली आहे, जणू हाताने स्त्रीस्पर्शाची चोरी केली आहेे, म्हणून गोरोबा दोन्ही हातांना शिक्षा द्यायचे ठरवितात. दोन्ही हात तोडून टाकतात.
घडल्या प्रकाराने कुटुंबात नवीनच समस्या निर्माण होते. काम बंद पडते. अन्न वस्त्र मिळेनासे होते. तेव्हा 'माझिया भक्ताची मज राखणें लाज', असे म्हणून विठ्ठल वेष पालटतो आणि गोरोबाच्या दारी जातो. त्याचे सुंदर वर्णन एकनाथांनी केले आहे,
वेष पालटोनी देव कुंभार पैं जाहले। गरुडासी केलें गाढव तेव्हां।।
येऊनियां तेरे पुसतसे लोकां। कुल्लाळ तो देखा गोरा कोठें।।
आम्ही परदेशी जातीचे कुंभार। नाम विठु साचार मज म्हणती।
एका जनार्दनीं गोरियाचिया वाडां आलासे उघडा देवराव।।
विठ्ठल नोकर म्हणून तेथे राहतो. माती आणतो. आळे करतो. तुडवितो. विविध भांडी तयार करून भाजतो. त्यामुळे घरात समृद्धी येते. त्यादरम्यानच आषाढीची यात्रा येते. संत मेळा पंढरीला निघालेला असतो. ज्ञानेश्वरादी भावंडे आणि इतर अनुभवी संत पायी यात्रा करत तेर मध्ये पोहोचतात. तेथे विचारणा केल्यावर गावकरी गोरोबाची हकीकत सांगतात आणि 'परदेशी कुंभार पंढरीचा विटा। राहिलासे वाटा करूनियां।।' असे सांगतात. ज्ञानदेवांना शंका येते. ते सगळे संत गोरोबाच्या वाड्यात जातात. मात्र तत्पूर्वीच विठोबा रुक्मिणीसह गरुडावर बसून निघून गेलेला असतो. तेव्हा गोरोबाची गळाभेट घेऊन ज्ञानदेव म्हणतो, 'परदेशी नोहे, पंढरीराणा, केलेसे कारण कार्य तुझे।।'
प्रत्यक्ष पंढरीराणा तुझे काम करण्यासाठी आला. आमची साधी भेटही झाली नाही, असे ज्ञानदेव म्हणतात. विठ्ठलांनी भाजलेली भांडी हातात घेऊन पाहतात. तेव्हा ती भांडी दिव्यरूप दिसतात. त्यातून विठ्ठल विठ्ठल असा नाद निघत असतो. सगळे संत गोरोबाचा गौरव करतात. 'धन्य तुझी भक्ती, त्रैलोक्यात' त्यानंतर भोजन कीर्तन होते. कीर्तनात विठोबाची थोरवी वर्णन केली जाते. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी गोरोबा आपल्या पत्नीसह दिंडीसोबत जायला निघतो. चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतो. सगळी संतमंडळी महाद्वारात येतात. त्यांना विटेवर मूर्ती दिसते. ते त्या मूर्तीच्या पायावर मस्तक ठेवतात. या भक्तांना पाहून विठ्ठल देखील आनंदित होतो. मंदिराच्या महाद्वारात नामदेव कीर्तनासाठी उभा असतो. तेव्हा कीर्तन करताना नामदेव म्हणतात, "हाताची टाळी वाजवा आणि मुखी नाम घ्या." तेव्हा गोरोबा मनात संकोचतात. टाळी वाजवायला आपल्याला हातच नाहीत, म्हणून त्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. तरीही थोटक्या हाताने गोरोबा टाळी वाजविण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा चमत्कार घडतो.
मुखीं नाम वदे करें वाहे टाळी। कीर्तनाचे मेळीं सद्गदित।।
भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती। कीर्तनीं गोरियाप्रति कर आले।।
टाळी पिटूनियां नामाचा उच्चार। करीत साचरा गोरा तेव्हां।।
एका जनार्दनीं पुरला मनोरथ। मूलही कीर्तनांत देखियेलें।।
या चरित्र कथेच्या शेवटी संत एकनाथ लिहितात, 'ऐसें भक्तचरित्र ऐकतां कान। होतसे नाशन महापापा।।' याचा अर्थ असा की या चरित्रकथा कीर्तनात प्रवचनात सांगितल्या जाव्यात आणि त्याद्वारे संतांचे मोठेपण सर्वसामान्यांच्या मनात बिंबविले जावे, हे या अभंगवाणीचे सांप्रदायिक प्रयोजन आहे.
संत चोखामेळा चरित्र
चोखोबांचा गौरव आठ अभंगांमध्ये संत एकनाथांनी केला आहे. हे चोखोबांचे संपूर्ण चरित्र नाही, तर चोखोबांच्या संदर्भात रचलेली मिथक कथा आहे. स्वर्गात अमृत विटले तर ते भूवैकुंठ असणाऱ्या पंढरपुरात चोखामेळाच्या घरात शुद्ध होते, असा संदेश देणारी ही कथा आहे. चोखामेळा महारयाती मध्ये जन्मल्यामुळे अस्पृश्य गणला जात होता. परंतु त्याचे आचरण व भाव अत्यंत शुद्ध होता. त्याची ईश्वरभक्ती आणि स्वयंप्रज्ञा त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करत होती. परंतु लोकांनी ते मान्य करायला हवे, यासाठी चोखोबांच्या घरी देव जेवतात आणि अमृत शुद्ध होते, अशी नवी मिथक कथा एकनाथांनी रचलेली दिसते. एकनाथांनी हा कथा भाग पुढील प्रमाणे नोंदविला आहे.
एकदा स्वर्गामध्ये अमृत नासले. अमरनाथ म्हणजे इंद्राला ते गोड लागेनासे झाले. तेव्हा त्याने नारदाला विचारले, की हे अमृत कोठे शुद्ध होईल? त्यावेळी नारदाने सांगितले 'पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी। पुंडलिकाचे द्वारी देव उभा।।' तिथे अनाथांचा नाथ असणारा विठ्ठल विटेवरी उभा आहे. तिथे संतांच्या कीर्तनात प्रत्यक्ष देव नाचतो.
पंढरीची मात सांगे नारदमुनी।
संतांचे कीर्तने नाचे देव।।
नामाच्या गजरें नाचताती संत।
सुरवरांचा तेथे काय पाड।।
तिन्ही लोकांत असे क्षेत्र नाही. तिथे हे अमृत शुद्ध होईल, असे नारदाने सांगितले. तेव्हा एकादशी सोमवारी आलेली होती. इंद्राचे विमान पंढरीत उतरले. अमृताचे ताट घेऊन इंद्र आला. चहुकडे जय जयकार चाललेला होता.
देव सुरवर आले पंढरीसी। नामा कीर्तनासी उभा असे।।
सुरवर देव बैसले समस्त। कीर्तनीं नाचत नामदेव।।
एका जनार्दनीं देव कीर्तनासी। सांडोनी स्वर्गासी इंद्रराव।।
त्यावेळी चोखोबा आणि त्याची पत्नी दोघांनी एकादशी व्रत केले होते. दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी चोखोबांनी पत्नीला सांगितले, "पारणे फेडण्यासाठी तुझ्या घरी येईन", असे देवाने मला सांगितले आहे. त्यावेळी चोखोबाने करुणा भाकली. चोखोबांची करुणा ऐकून पंढरीनाथ भोजनास चालले. नामदेवांसह सगळे गंधर्व, इंद्रादी देव सोबत होते. नारदाने पुढे जाऊन चोखोबांना निरोप दिला. रिद्धी सिद्धी येऊन त्यांनी भोजनाची व्यवस्था केली. चोखोबाने लोटांगण घातले. विठ्ठलाने त्याला उठवून आलिंगन दिले. चोखोबाच्या अंगणात पंगती बसल्या. सोयरा वाढत होती. तेव्हा इंद्राने अमृताचे ताट पुढे केले आणि विठ्ठलाला सांगितले की, हे शुद्ध केले पाहिजे. विठ्ठलाने चोखोबाला बोलावून ते अमृत शुद्ध करण्यास सांगितले. चोखोबा म्हणाले, "देवाच्या नामासमोर अमृताची काय थोरवी!" परंतु देवाच्या आज्ञेनुसार चोखोबा आणि त्याच्या पत्नीने अमृत शुद्ध केले.
येथे एवढा सगळा दिव्य कथा भाग घडत असताना चोखोबांच्या मनात मात्र भीती आहे. तो दोन्ही हात जोडून पंढरीनाथास म्हणतो, "तुम्ही मला दुर्बळाला पवित्र केले. परंतु हे पंढरपूरच्या ब्राह्मणांनी पाहिले तर मला त्रास होईल. माझे चांगले त्यांना पाहवत नाही." यावर सगळे हसतात. कारण देव ज्याचा सखा त्याला इतरांची काय भीती! पुढे पंढरीच्या ब्राह्मणांनी चोखोबाला छळले. तो त्रास थांबवण्याचा थांबवण्याचे काम देवाने केले. शेवटी एकनाथ म्हणतात,
एका जनार्दनीं ऐशी चोखियाची मात।
जेवी पंढरीनाथ त्याचे घरीं।।
याशिवाय नाथ महाराज असे लिहितात की, चोखोबांच्या भक्तीची देवाला आवड होती. म्हणूनच देव त्याची सर्व नीच कामे करीत होता. मेलेली ढोरे ओढीत होता. त्याच्या पत्नीचे बाळंतपण स्वतः देवाने केले. अशी भक्तांच्या भक्तीची आवड पंढरीनाथाला होती. त्या भक्तिसुखाला देव भुलला होता. त्यामुळेच 'नीच याती न मनीं कांही' असे भेदभाव रहित वर्तन पंढरीनाथ करतात, असे नाथ महाराज नोंदवितात.
संत सावता माळी चरित्र
संत सावता माळी चरित्राचे १३ अभंग एकनाथांनी लिहिले आहेत. या अभंगांमध्ये एक चमत्कार कथा आलेली आहे. खरे तर ही मिथक कथा आहे. ती अशी : एकदा नामदेवांना मीच पांडुरंगाचा खरा लाडका भक्त आहे, असा अभिमान झाला. मग तो उतरविण्यासाठी पांडुरंगाने एक युक्ती केली. देव म्हणाला, "मी पळून जातो. तू मला शोधून काढ." देव पुढे पळतो आहे, नामदेव शोधत शोधत मागे मागे जातो आहे. देव जाता जाता ओळखीच्या खुणा म्हणून फुले टाकत पुढे जातो. तो थेट सांवता माळ्याजवळ जातो. येथे एकनाथांनी सावतोबांचे वर्णन 'संसारी असोनी जीवनमुक्त भक्त' असे केले आहे. सावतोबा नामस्मरण करत समाधी सुखात तल्लीन झालेला होता. त्याला उन्मनी अवस्था लागली होती. पांडुरंगाने त्याच्या मस्तकी हात ठेवून त्याला सावध केले आणि तो म्हणाला, "माझ्या पाठीमागे चोर लागलेला आहे. तू मला कुठेतरी लपव." ज्याची स्वर्ग, पृथ्वी व पाताळ अशा त्रिभुवनात सत्ता चालते, त्याने म्हणावे चोर पाठी लागले आहेत, मला लपव, हे बोलणेच नवलाचे आहे. परंतु येथे सावतोबांचे वैभव प्रकट करण्यासाठी पांडुरंगाने ही माव रचली आहे. त्याचे वर्णन करताना संत एकनाथ लिहितात,
देव म्हणे सांवत्या लपवी मजला। उशीर बहू जाहला येईल चोर।।
लपावया स्थान नसे दुजें आन। उदर फाडून लपविला।।
भक्ताचे उदरी बैसे नारायणा। कृपेचे सिंहासन घालूनियां।।
त्या ठिकाणी नामा येतो आणि रडू लागतो. आज विठ्ठलाचे चरण दिसले नाहीत, तर मी या क्षणी प्राण सोडेन, असे म्हणतो. तेव्हा सावता त्यास म्हणतो, 'अभिमानें नाडले प्रपंची भागलें। ते या श्रीविठ्ठलें उद्धरिले।।' जे अभिमानाने नाडले आहेत, प्रपंचात दमले-भागले आहेत, त्यांचा श्री विठ्ठलाने उद्धार केला आहे. नामदेवा तुला तर अभिमान नाही, असे म्हणताच नामदेव सांवतोबाच्या पायी मिठी घालतो आणि शरण जातो. नामदेवांचा अभिमान गळाला, हे पाहताच सांवतोबा त्याला पोटाशी धरतो. त्याचवेळी नामदेवांना सांवतोबाच्या हृदयात पितांबर झळकताना दिसते. त्याची एक दशी बाहेर असते, ती ओढून विठ्ठलाला बाहेर काढतो. सगळे जयजयकार करतात. मात्र नामा रडू लागतो. विठ्ठल त्याला उठवून प्रेमाने आलिंगन देतो. असा हा कथा भाग आलेला आहे.
शेवटच्या एका अभंगात 'माळियांचे वंशी सांवता जन्मला। पावन तो केला वंश त्याचा।।, असे वर्णन एकनाथांनी केले आहे. हातात खुरपे घेऊन विठ्ठल सांवतोबा बरोबर काम करतो. सगळ्या कामात मदत करतो, असा सांवतोबाचा महिमा व्यक्त झालेला आहे.
थोडक्यात, संत एकनाथांनी सादर केलेली संतचरित्रे म्हणजे संतांचे संपूर्ण लौकिक चरित्र नव्हे. संतचरित्रातील काही प्रसंग, काही मिथक कथा एकनाथांनी रंगवून सांगितल्या आहेत. त्यासोबतच देव भावाचा भुकेला, असल्याचे सांगितले आहे. तसेच संतांचे महिमान वर्णिले आहे. कथा कीर्तनात या अभंगांना फार महत्त्व आहे. कारण संतांचे अभंग हेच संप्रदायात प्रमाण आहेत. श्री विठ्ठलाचे भक्तवत्सल व्यक्तिमत्त्व बिंबविण्याचे कार्य या अभंगांनी केलेले आहे.
*डॉ. श्यामसुंदर मिरजकर*
कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणी
दूरभाष : ९४२१२१२३५२
(ज्ञानोबातुकाराम विशेषांक २०२५ मध्ये लेख प्रकाशित)
🌹💐सर,आपण लेखनात व्यक्त केलेली प्रयत्नवानी फारच सुरेख-छान आहे....आपला मित्रवर्य सदाशिव तांदळे.
उत्तर द्याहटवासंत एकनाथांनी गायिलेल्या संत चरित्रांचा आढावा ओघवत्या शैलीत व औचित्यपूर्ण अवतरणआंसह घेतला आहे.अभिनंदन.
उत्तर द्याहटवाडॉ.कळके
उत्तर द्याहटवाछान माडणी...
उत्तर द्याहटवालेख उत्तम झालेला आहे. संत एकनाथांनी आपल्या पूर्वसूरींचे चमत्कारासह चरित्रलेखन केलेले आहे.
उत्तर द्याहटवायाला जरी मिथक कथा म्हटले तरी हे चमत्कारच आहेत आणि ते आताच्या काळातील लोकांना पटतील का हा प्रश्न आहे ?