आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी (लेख)
आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी ज्येष्ठ-आषाढ महिना म्हणजे 'पाऊस पाणी आबादानी' म्हणण्याचा महिना! आकाशात भरल्या ढगांच्या राशींवर राशी चढत जातात. 'मल्हार महुडे गगनी दाटले', अशी अवस्था होते. भरून आलेलं निळं सावळं आभाळ आणि वैशाख वणव्यात तापून तगमगलेली काळी धरित्री यांच्या मीलनाला समृद्ध सुख सोहळ्यात रूपांतरित करण्यासाठी शेतकरी कष्टत असतो. आकाशातल्या काळ्यासावळ्या मेघराजाला हात जोडतानाच या बळीवंताच्या हृदयात पंढरीच्या विठुरायाची मूर्ती जागी झालेली असते. मग शेतकामातून उसंत मिळताच, 'भेटी लागी जीवा लागलिसे आस' अशी त्याची अवस्था होते. खरे तर घरच्या देव्हार्यात हा काळा सावळा विठू असतोच. गावात त्याचे छोटे साधे मंदिरही असते. दर एकादशी द्वादशीला तिथे भजन रंगते. परंतु पंढरीची ओढ ही अनावर असते. विठू सगळीकडे सारखाच पण देव- स्थळ-तीर्थ आणि भक्त एकवटलेली पुण्यवंत भूमी म्हणजे पंढरी. या पंढरीत येऊन मनोभावे दर्शन घेतल्याशिवाय वारकऱ्यांच्या मनाचे समाधान होत नाही. 'आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी' अशी श्रद्धा असणारे वारकरी मैलोन् मैल चालत, हरिनामाचा गजर करत, संतांचे अ...