चतुरस्त्र प्रज्ञेचे पत्रकार व संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी पत्रकारिता विविध ध्येय उद्दिष्टांनी प्रभावित होती. समाजाच्या बौद्धिक विकासाची लोकहितेच्छू वृत्ती, सामाजिक सुधारणांचा आग्रह, धार्मिक परंपराभिमान व जाज्वल्य देशाभिमान अशा अनेक प्रेरणांनी वृत्तपत्रे निघत गेली. दर्पण (१८३२), मित्रोदय, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, अरुणोदय, प्रभाकर, सुधारक ही लोककल्याणार्थ आणि ज्ञानप्रसारार्थ चालवलेली वृत्तपत्रे! पुढे १८८१ मध्ये केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू झाली आणि देशाभिमानाची दुदुंभी फुंकली गेली. याच पठडीतील गुराखी, राष्ट्रमत, महाराष्ट्र ही पत्रे होती. ती परंपरावादीही होती. 'संदेश'कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी वृत्तपत्रे म्हणजे माहिती आणि वैचारिक वाद-विवाद ही रूढ भूमिका सोडली. अनेक सदरे, विविधांगी वाचनीय मजकूर आणि रंजक साहित्यिक मांडणी यामुळे त्यांचे वृत्तपत्र लोकप्रिय ठरले. याच कालखंडात सत्यशोधक ब्राह्मणेतर वृत्तपत्रांचे आगमन झाले. सत्सार, दीनबंधू, जागृती, शेतकऱ्यांचा कैव...