बाप रखुमादेवीवरु विठ्ठल... (लेख)

बाप रखुमादेवीवरु विठ्ठले...

       अवघ्या महाराष्ट्राला युगानुयुगे आधार देणारा बाप माणूस म्हणजे श्रीविठ्ठल! तो लडिवाळ आहे. कारुण्यसिंधू आहे. भक्तवत्सल आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारा, लगबगीने धावणारा 'इष्टमित्र बंधू मायबाप सखा' आहे. पतित-पावन देखील आहे. या अनाथांचा नाथ असणाऱ्या पंढरीरायाच्या भक्तीचा सुखसोहळा प्रतिवर्षी लाखो लोक अनुभवतात. परंतु हा सोहळा ज्या ज्ञानेश्वरादी संतांच्या लेखन-वर्तनातून उभा राहिला त्या संतांना घडविणाराही एक बाप माणूस आहे. तो फारसा परिचित नाही. प्रसिद्ध नाही. पण एका कठोर अभेद्य व्यवस्थेला निर्धाराने तोंड देणारा, ती व्यवस्था खिळखिळी करण्याचे सामर्थ्य स्वतःच्या मुलांमध्ये भरणारा आणि व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यात बलिदान देणारा हा बापमाणूस म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी! सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेने पावन न  करून घेतलेला पतित. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चार प्रज्ञावंतांचा काळजीवाहक प्रेमळ पिता.
        तो काळ होता कर्मठ वैदिक परंपरेच्या प्रभावाचा. धर्मसत्तेचा. त्याकाळातील महाराष्ट्राची राजधानी देवगिरी. राजा रामदेवराव यादव. त्याचा प्रधान हेमाद्री पंडित हा वैदिक परंपरेचा पक्का अभिमानी. आणि 'चतुर्वर्गचिंतामणी' या एका वर्षात करावयाच्या बाराशे व्रतांचा परिचय करून देणाऱ्या व्रतकोशाचा करता. अशा काळात आपेगाव या छोट्याशा गावात गोविंद आणि निराई या दाम्पत्याच्या पोटी विठ्ठलपंतांचा जन्म झाला. ते दोघे पती-पत्नी गहिनीनाथांचे अनुग्रहित. त्यामुळे नाथ परंपरेचा वारसा जन्मापासून विठ्ठलपंतांना लाभला. तसे पाहता विठ्ठल हे नाव ब्राह्मण कुटुंबात सहसा न आढळणारे. कारण पूर्वीपासूनच विठोबा बहुजनांचा. शेतकरी कष्टकऱ्यांचा. तरीही या दोघांनी आपल्या मुलाचे नाव विठ्ठल ठेवले. म्हणजे त्यांची विठोबावर श्रद्धा असणार. किंवा नाथ संप्रदायामुळे इतर लोकांसोबत वावरताना हा सर्वांना सामावून घेणारा विठ्ठल भावला असणार. आपला मुलगाही असाच सर्वांकडे समदृष्टीने पाहणारा, सर्वांना सामावून घेणारा व्हावा, म्हणूनच त्याचे नाव विठ्ठल ठेवले असावे. मुळात हे पती-पत्नी नाथपंथी. वैराग्याकडे झुकलेले. संतसंगतीला आसुसलेले. तशातच सज्जनांचा मेळा जमविणाऱ्या विठोबाचे नाम मनीमानसी रुजले. त्यामुळे आपसूकच जन्मलेला पुत्र विठ्ठल नामांकित झाला. पुढे लवकरच आई-वडिलांचा वैराग्यभाव  त्याच्यामध्येही सामावला.
       तत्कालीन रूढीप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी या विठ्ठलाचा उपनयनसंस्कार झाला असावा. मग गुरुगृही ज्ञान संपादन. वेदशास्त्रव्याकरण आणि रामायण-महाभारतादी काव्ये यांचा अभ्यास त्याने केला, असे नामदेवराय सांगतात. हे अध्ययन साधारणपणे बारा वर्षे म्हणजे एक तप चालले असावे. मग कदाचित तत्कालीन परंपरेप्रमाणे समावर्तन विधी करून, गुरुदक्षिणा देऊन विठ्ठलपंत तेथून बाहेर पडले असावेत. हे ग्रांथिक ज्ञान म्हणजे आजच्या भाषेत theory पूर्ण झाली. पण ज्या समाजात या ज्ञानाचा वापर करून उपजीविका करायची त्या समाजाचे ज्ञान नको का व्हायला? मग विठ्ठलपंत तीर्थयात्रेला बाहेर पडले. यामध्ये तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची भावना वरवरची असावी. मुळात पहायचे होते ते लोकजीवन. लोकव्यवहार. विविध प्रथा-परंपरा.
       विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघाले. महाराष्ट्रातून थेट गुजरातला. प्रथम द्वारावतीची कृष्णमूर्ती, मग पिंडारक (आजचे पिंडारा), तेथून मंगळहडी मार्गे द्वारका, मग भालुकातीर्थ प्रभास, सोरटी सोमनाथ, मुचकुंद गुंफा(काळयवन), धवलपुरी (पद्मनाभ), सप्तशृंगी, कपालेश्वर (नाशिक), त्र्यंबकेश्वर, कुशावर्त, ब्रह्मगिरी, भीमाशंकर, पंढरपूर आणि शेवटी आळंदी असा हा मोठा प्रवास झाल्याचे नामदेवराय नोंदवितात. या सगळ्या तीर्थयात्रेत जगरहाटी कळली असेल. विविध प्रांतातील ब्रह्मवृंदाशी चर्चा झाली असेल. प्रवासात येता जाता इतर त्रैवर्णिकांशीही संपर्क आला असेल. स्वत:चे ज्ञान वर्तमान वास्तवाच्या सहाणेवर घासून लखलखित केले असेल.
       यानंतर विठ्ठलपंतांच्या आयुष्यात चमत्कार वाटावा अशी घटना घडली. आळंदीत या सुब्राह्मणाला पाहून सिद्धोपंतांनी कोण, कुठले, म्हणून विचारपूस केली. 'विठ्ठलाचे नाव, रामेश्वरी भाव, वृत्ती आपेगाव, गोदातीरी।।' असे उत्तर दिले. तिथे वृद्ध माता पिता असतात आणि मी नुकताच द्वारकादी तीर्थस्थानांची यात्रा करून परततो आहे, असेही विठ्ठलपंतांनी सांगितले. मग सिद्धोपंतांनी घरी नेले. आदर सत्कार केला. ध्यानीमनी नसताना रुक्मिणीशी लग्नही झाले. वेदशास्त्र जाणणारा, सत्शील, धर्माचरण करणारा आणि गावात 'वृत्ती' असणारा जावई सिद्धोपंतांना मिळाला. लग्नानंतर हे पती-पत्नी पंढरपुरी गेले. तेव्हा नेमकी यात्रा चालली होती. वैष्णवांची दाटी जमलेली. विठ्ठलाचा जयजयकार चाललेला. मृदंग घोष चाललेला. तो सुखसोहळा पाहताना विठ्ठलपंतांचे देहभान हरपले. एका विठ्ठलाचे दुसऱ्या विठ्ठलाशी नाते जुळले.
       आळंदीत परतल्यावर सासर्‍यांनी 'आश्रमविधी करावे पालन' असे सांगितले. पण विठ्ठलपंतांचे मन तीर्थाटनीच होते. सिद्धोपंतांनी ते जाणले. तीर्थयात्रेची परवानगी दिली. यावेळी विठ्ठलपंत दक्षिण भारतात गेले. श्रीशैल्य, अभोळ, नरसिंह, श्रीवासुदेव, वेंकटाद्री, चिदंबर, दक्षिण मथुरा कावेरी, रामेश्वर, गोकर्ण, हाटकेश्वर, कोल्हापूर, कऱ्हाड, संगम माहुली, आळंदी असा प्रवास झाला. मग पती-पत्नी तीर्थरूपांच्या दर्शनाला म्हणजेच मात्यापित्यांच्या भेटीला अापेगावला गेले. सोबत आलेल्या सिद्धोपंतांनी सगळी कहाणी व्याह्यांना सांगितली. त्या गोविंद निराईने 'चिरंजीव नांदा' असा आशीर्वाद आनंदाने दिला.
        यानंतर काही काळ लोटला. विठ्ठलपंतांच्या वृद्ध मातापित्यांचे देहावसान झाले. उदास झालेल्या विठ्ठलपंतांना घेऊन सिद्धोपंत आळंदीस आले. मन संसारातून उडाले होते. तेव्हा 'पुत्र संतती प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला वाटेल ते करा,' असे सिद्धोपंतांनी सांगितले. आळंदीत नित्य हरिकथा, नामसंकीर्तन चालले होतेच. आषाढी कार्तिकी वारीला पंढरीस जाणे घडत होते. मात्र एकच उणीव होती. पुत्र प्राप्ती होत नव्हती. हळूहळू विठ्ठलपंतांचे मन अधिकच विरक्त झाले आणि त्यांनी पत्नीला संन्यास घेण्याची परवानगी मागितली. 'संतती वाचूनी न घ्यावा सन्यास', असा सासर्‍यांनी निरोप दिला. परंतु एका बेसावध क्षणी रुक्मिणीची परवानगी मिळवून विठ्ठलपंत वाराणसीस संन्यास घेण्यास गेले. तिथे त्यांना श्रीपाद स्वामी हे गुरु भेटले. त्यांनी विठ्ठलपंतास शिष्य म्हणून स्वीकारून चैतन्य हे नाव दिले.
     पुढे चैतन्य म्हणजेच विठ्ठलपंत अाजन्म संन्याशी राहिले असते, तर कोणतेच नाट्य घडले नसते. कोणताच मोठा प्रश्न उभा राहिला नसता. परंतु तसे होणे नव्हते. इकडे पती वियोगामुळे दुःखी झालेल्या रुक्मिणी मातेने अश्वत्थाची कठोर सेवा आरंभिली. योगायोगाने एकदा श्रीपाद स्वामी तेथे आले. रुक्मिणीने नमस्कार केला. श्रीपाद स्वामींनी 'पुत्रवती भव', असा आशीर्वाद दिला. रुक्मिणीच्या म्लान चेहऱ्यावर उदासवाणे हस्य प्रकटले. स्वामींनी ते जाणले. रुक्मिणीची व्यथा जाणली आणि आपला शिष्य चैतन्य हाच रुक्मिणीचा पती हे जाणून ते पुन्हा वाराणसीस गेले. तेथे चैतन्याकडून खरी हकिकत जाणून त्याला पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा केली. 'अविधी कर्माचे न धरावे भय। यासी आहे साह्य जगदीश।।' असेही सांगितले. गुरुआज्ञेने विठ्ठलपंत पुन्हा संसारी झाले. आणि खर्‍या पेचप्रसंगाला सुरुवात झाली.
       मुळात वेदशास्त्रांचा अभ्यास असणाऱ्या आणि जगरहाटी माहीत असणाऱ्या विठ्ठलपंतांना आपण काय करतोय याचे भान नव्हते काय? आपल्या कृतीचे आपल्या ऐहिक व पारमार्थिक जीवनावर काय परिणाम होतील याची जाणीव नव्हती काय? की वर्णाश्रम व्यवस्थेचा फोलपणा जाणवून त्यांनी ही आतताई वाटणारी कृती केली? असे अनेक प्रश्न इथे निर्माण होतात.
       त्या काळातले धर्मशास्त्र काय सांगत होते? तर द्विज असणाऱ्या पुरुषांना आश्रम आणि पुरुषार्थ ही व्यवस्था लागू आहे. द्विज म्हणजे ज्यांची मुंज, उपनयन संस्कार झाली आहे, असे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य पुरुष. त्यातही पुन्हा वर्णानुसार उपनियम होते. उदाहरणार्थ, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मुलांची मुंज अनुक्रमे वयाच्या आठ, दहा, अकराव्या वर्षी होईल. ब्राह्मणास ब्रह्मचर्य, गृहस्थ, संन्यास व वानप्रस्थ हे चारी आश्रम लागू असतील. तर क्षत्रियांना पहिले तीन, वैश्यांना पहिले दोन आणि शूद्रांना फक्त गृहस्थाश्रम लागू असेल, इत्यादी. ब्रह्मचर्याश्रमात वेदाध्ययन व गुरुसेवा करून ऋषिऋणातून मुक्त होणे आवश्यक होते. तर गृहस्थाश्रमात अर्थ व काम हे पुरुषार्थ पूर्ण करून पुत्रप्राप्तीने पितृऋण फेडणे बंधनकारक होते. तरच मोक्षप्राप्ती होणार होती.
       हे धर्मशास्त्राचे नियम माहीत असूनही विठ्ठलपंतांनी ते मोडण्याचे वेडे साहस का केले असावे? मुळात आई-वडिलांकडून मिळालेले नाथ परंपरेचे संस्कार विठ्ठलपंतांना बंडखोर बनवत असावेत काय? कारण नाथ हे अतिवर्णाश्रमी आहेत. म्हणजेच त्यांना वर्णाश्रम व्यवस्थेचे नियम लागू नाहीत. ते या नियमांच्या पलीकडे आहेत. मुळात संन्यस्त वृत्ती, त्यात वेदशास्त्रांचा सखोल अभ्यास आणि नंतरचे तीर्थाटन. मग संसाराचा नीरस अनुभव. यामुळे विठ्ठलपंत धर्मशास्त्र बाजूला सारण्यास उद्युक्त झाले काय? छांदोग्य उपनिषदाने सर्वप्रथम ही आश्रम व्यवस्था सांगितली. आणि या उपनिषदांचा अभ्यास विठ्ठलपंतांनी निश्चितच केला असणार. तरीही गृहस्थाची कर्तव्ये पार न पाडताच संन्यास स्वीकारला तर मोक्ष मिळणार नाही, हे अत्यंत स्पष्ट असताना, त्यांनी ही आश्रम व्यवस्था मोडली कशी, हा प्रश्न उरतोच.
       वर उल्लेखिल्याप्रमाणे जर विठ्ठलपंत गृहस्थ जीवनातून संन्याशी झाले आणि तसेच निवर्तले असते, तर कदाचित असा काही अधर्म घडून गेलेला आहे, याचे नामोनिशाण आज मागे राहिले नसते. कारण त्यांनी केलेल्या अपराधाची परिणती त्यांना स्वतःलाच मोक्ष न मिळण्यात झाली असती. इतरांना त्यामुळे काही फरक पडला नसता. पण पुढे जाऊन त्यांनी पुन्हा संसार स्वीकारला. त्यातून खरी गडबड सुरू झाली. लोक हसले. विठ्ठलपंत हे उपहासाचा विषय झाले. बरा संन्यास घेतला होता, असे म्हणू लागले. ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. इतरांनी संबंध तोडला. आप्तस्वकियांनी उपेक्षा केली. हे वाळीत टाकणे, उपहास आणि उपेक्षा एकदोन दिवसांची नव्हती की महिना दोन महिन्यांची नव्हती, तर तब्बल बारा वर्षे सगळ्यांकडून हा छळ चालला होता. या सगळ्या कुटुंबाचे ब्राह्मणत्व काढून घेण्यात आले होते. त्यांचा दर्जा शूद्र आणि अस्पृश्यांपेक्षा खालचा म्हणजे चांडाळाचा ठरविण्यात आला होता.
       याबाबत धर्मशास्त्राची भूमिका काय होती? डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपल्या 'वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी' पुस्तकात याची विस्ताराने चर्चा केली आहे. 'गौतमधर्मसूत्रा'नुसार धर्मशास्त्रांनी ज्या कर्मांची निंदा केली आहे, ती कर्मे पुनःपुन्हा करणारा मनुष्य पतित ठरतो आणि त्याचा द्विज या नात्याने कर्मे करण्याचा करण्याचा अधिकार गमावला जातो. 'द्विजातिकर्मभ्य: हानि: पतनम्।' असे शास्त्र सांगते. इतकेच नव्हे तर 'आपस्तंभ धर्मसूत्र' म्हणते, "चांडाळाला स्पर्श केल्यामुळे जसे पाप लागते, तसेच त्यांच्याशी बोलल्यामुळे आणि त्याला पाहिल्यामुळेही पाप लागते.''
        धर्मशास्त्राच्या नियमानुसार विठ्ठलपंत पतित होतेच, पण त्यांचा दर्जा चांडाळाचा होता. त्यामुळे ब्राह्मण म्हणून त्यांना यज्ञयाग, अध्यापन, दान घेणे अशी कोणतीच कर्मे करता येणार नव्हती. इतकेच नव्हे तर चांडाळ ठरविल्यामुळे सगळ्या समाजापासून त्यांना एकटे पाडले गेले होते. अशा अवस्थेत त्यांनी बारा वर्षे काढली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चार मुलांना जन्म दिला. त्यांचे पालन पोषण केले. इतकेच नव्हे तर त्यांना वेद, शास्त्र, काव्य आदींचे सखोल ज्ञान देऊन, त्यामध्ये पारंगत केले. दुसऱ्या बाजूला नाथ संप्रदायाचा योगमार्ग त्यांना दिला. त्यांची आंतरिक शक्ती वाढविली. त्यामुळेच ही मुले 'संन्याशाची पोरे' म्हणून दबली गेली नाहीत. उलट त्यांचे ज्ञान, त्यांचा अधिकार, त्यांची प्रज्ञा याद्वारे ती मुले तेजपुंज बनली. फुलून आली.
       यादरम्यान विठ्ठलपंतांना अशी आशा वाटत होती की शास्त्राधार मिळेल. जरी आपणाला शुद्ध करून घेतले नाही, तरी आपल्या मुलांना ही शिक्षा लागू असणार नाही. कारण काही शास्त्रकारांची भूमिका होती की, पतितांनी एकत्र जमून धर्माचे आचरण करावे. त्यांनी एकमेकांचे यज्ञ करावेत. एकमेकांना अध्यापन करावे. परस्परांशी विवाह संबंध करावेत. पुत्रांना जन्म दिल्यावर त्यांना म्हणावे, "आमच्यापासून निघून जा. असे केले असता तुम्ही आर्यांची प्राप्ती कराल."
        परंतु उदारमतवादी शास्त्रकारांची ही भूमिका  हरिताने नाकारली. बौद्धायनाने, "अशुद्ध वीर्यापासून जन्मलेल्या पतिताच्या पुत्रा बरोबर कसलाही संपर्क ठेवता कामा नये," हे हरिताचे मत उचलून धरले. याशिवाय 'गौतमधर्मसूत्रा'वरील टीकेत हरदत्ताने शातातप नावाच्या शास्त्रकाराचे, "संन्याशाच्या मुलांना चांडाळा बरोबर राहायला लावावे", हे मत उद्धृत केले.
       वैदिक शास्त्रकारांची वर उद्धृत केलेली मते आणि संत नामदेवांनी ज्ञानदेवांच्या 'आदी' मध्ये केलेले वर्णन, हे सगळे जुळणारे आहे. चार भावंडे वाढत होती, घडत होती. मात्र आपल्या मुलांचे सगळे आयुष्य जाती-धर्म बहिष्कृत म्हणून जाणार याची चिंता विठ्ठलपंतांना लागली होती. बारा वर्षे ब्रह्मवृंदाच्या बहिष्कारासमोर न झुकलेले विठ्ठलपंत  मुलांच्या भवितव्याच्या शंकेने व्याकूळ झाले. त्यांनी ब्रह्मसभेसमोर अपराध कबूल केला. प्रायश्चित्त मागितले. तुम्ही सांगाल ते आम्ही सहाजण मान्य करतो, परंतु आम्हा पतितांना शुद्ध करून घ्या, अशी विनवणी केली. सभाश्रेष्ठ महाजनांनी, वेदज्ञ व शास्त्रज्ञ ब्राह्मणांनी ग्रंथ पाहिले आणि देहांत प्रायश्चित्त सांगितले. संस्काराने देह शुद्ध होतो, असे सांगितले. तेव्हा 'त्रिवेणी संगमावर मी देह दंडीन', असे म्हणून विठ्ठलपंत पत्नी, मुले व घर त्यागून निघून गेले, असे वर्णन नामदेव करतात.
       धर्मशास्त्राचा एक नियम सांगतो की ब्राह्मणाने केलेला राज्यत्याग हा देहदंडाबरोबर असतो. त्यामुळे ब्राह्मणाला मृत्युदंड न देता राज्यातून हाकलून लावावे. विठ्ठलपंतांच्या बाबतीत असे काही झाले असावे काय? नामदेवकृत वरील प्रसंग वर्णनात विठ्ठलपंतांचे गुरु श्रीपाद स्वामीही आहेत. आपल्या शिष्याच्या अग्निपरीक्षेच्या प्रसंगी त्यांनी उपस्थित रहावे,  हे फार महत्त्वाचे व सूचक आहे. ते म्हणतात, "देह हे दंडीन अनुतापे।" केलेल्या चुकीचा मनःपूर्वक झालेला पश्चाताप म्हणजे अनुताप होय. असा अनुताप शिष्याला घडवीन, हा गुरूंचा शब्द आहे. तेव्हा ब्रह्मसभा म्हणते, ''झाल्या गोष्टीची पुनरावृत्ती होता कामा नये.'' मग गृहदारासुत यांचा  त्याग आणि वैराग्य असे प्रायश्चित्त घेऊन गुरुकृपेने विठ्ठलपंत शुचिर्भूत झाले, असे वर्णन नामदेव करतात.
         विठ्ठलपंत तर अज्ञात मार्गाने निघून गेले. आता ''आम्हा भावंडांची गती काय?'', असा प्रश्न निवृत्तीनाथांनी ब्रह्मसभेला केला. तेव्हा तेथील ब्रह्मवृंदाने सांगितले ''पैठणच्या ब्रह्मसभेकडून पत्र आणावे. त्यांचे म्हणणे आम्ही मान्य करू.'' ब्रह्मवृंदाच्या या निर्णयावर निवृत्ती ज्ञानदेव सोपान या तिघांच्या तीन प्रतिक्रिया आहेत आणि त्या महत्त्वपूर्ण आहेत. निवृत्तीनाथ म्हणतात, "आम्हाला जाती कुळ वर्ण आणि त्या परत्वे मिळणारा अधिकार नाही. आम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, देवगण, यक्ष, किन्नर, ऋषी, निशाचर असे काहीही नाही. तर आम्ही अविनाश, अव्यक्त व जुनाट आहोत. माझे इष्ट स्वरूप स्वतःच्याच उपदेशाने तयार झाले आहे. आम्ही पंचमहाभूते, सगुण-निर्गुण असे काही नाही आहोत. इथे निवृत्तीने आपली परंपरा ही अनुभूतीची आणि अतिवर्णाश्रमाची असल्याचे स्पष्ट केले आहे.
       तर ज्ञानदेव मात्र धर्मशास्त्रांचे आचरण करावे या मताचे आहेत. सोपानदेवांना नाथपंथी योग मार्गच श्रेष्ठ वाटतो. हा दुर्घट असला तरी आम्हाला सेव्य आहे, असे ते म्हणतात. 'भक्ती हे सरती, जाती न सरती। ऐसी आत्मस्थिती स्वसंवैद्य।।' अशी त्यांची भूमिका आहे. व्यास, वाल्मीकी यांचे कुळ जसे पाहिले जात नाही, तसेच आम्ही आहोत, असे सोपानदेव म्हणतात.
       पैठणच्या ब्रह्मवृंदाकडून कसलेही पत्र मिळण्याआधी या तीन संतांची वरील भूमिका आहे. यातील निवृत्ती आणि सोपानदेव उघड बंडखोर आहेत. त्यांना शुद्धिपत्राची प्रशस्ती वाटत नाही. परंतु ज्ञानदेव मात्र 'प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता। पावन अवस्था जरी झाली।।' या भूमिकेचे आहेत. तरीही ही भावंडे पैठणच्या ब्रह्मसभेला ''अनाथ पतितांना सनाथ करण्याची'', विनंती करतात तेव्हा ब्रह्मसभा म्हणते, "या पातकाला प्रायश्चित्त नाही. तुम्ही सगळे कुलभ्रष्ट आहात. फक्त शास्त्राधारे एकच उपाय आहे, तो म्हणजे अनन्य भक्तीला अनुसरावे. तीव्र अनुतापे भजन करावे. गाय, गाढव आणि कुत्रा यांना वंदन करावे. अंत्यजांना म्हणजे अस्पृश्यांना हे ब्रह्म आहेत, या भावनेने वंदावे." हे ब्रह्मवृंदाचे आदेश ऐकून निवृत्तीनाथ मनोमन आनंदले. 'धन्य तुमची वदन्ति तीर्थरूप!' असे म्हणत ब्रह्मसभेचे आदेश प्रमाण मानले. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हेही आनंदले. कारण ही भावंडे वर्णाश्रम व्यवस्थेच्या विधिनिषेधापासून दूर होती. त्यांचा संपर्क संबंध प्राय नाथ, लिंगायतांशी होता. पुढे या पोरक्या भावंडांना भोजलिंग काकांनी आधार दिला हे सर्वश्रुतच आहे. एकंदर ब्राह्मणेतरांसोबत राहणेच या भावंडांसाठी स्वाभाविक होते. नव्हे, त्यांना तेच तर करायचे होते. या अठरापगड जातीं सोबत राहून भक्तीचा प्रसार करायचा होतो. खरे धर्मकीर्तन करायचे होते. त्यामुळेच तर शुद्धिपत्रा नंतरची एक महत्त्वाची कृती म्हणजे निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानदेवांनी गीतेवर भाष्य असणारी ज्ञानेश्वरी लिहिणे. संस्कृतमध्ये बंदिस्त असणारे ज्ञान इतरांना खुले करणे.
       खरेतर ज्ञानदेवादी भावंडांच्या कार्याची खरी सुरुवात येथूनच होते. या ब्रह्मसभेच्या शास्त्रसंमत उपायास अनुसरूनच ती आहे, असे नामदेव नोंदवितात. ब्रह्मसभेने गाय, गाढव, कुत्रा असे प्राणी आणि अस्पृश्य यांना ब्रह्मभावनेने वंदावे असे सांगितले. कारण त्यांच्या दृष्टीने ही भावंडे या सर्वांपेक्षा नीच योनीतील म्हणजे चांडाळ आहेत आणि शूद्रादिकांना उपलब्ध भक्तिमार्ग चांडाळांनाही उपलब्ध आहे, असे ही ब्रह्मसभा म्हणते. मुळात ही भावंडे जातिवर्णआश्रम या सर्वांच्या पलीकडे पोहोचली आहेत. कारण वैदिक धर्मात महत्त्वाच्या म्हणून सांगितलेल्या या गोष्टी माणसाच्या उन्नतीस बाधक आहेत, हे अनुभवाने त्यांनी जाणले आहे.
       एका बाजूला ब्रह्मसभेपुढे शास्त्रार्थ चाललेला असताना ही भावंडेही पैठणला वेदान्तावर व्याख्यान देत आहेत. पुराण सांगत आहेत. हरिकीर्तन करत आहेत. त्यांचे मंत्रोच्चार, अमोघ वाणी आणि निरूपण एेकून अवघा समाज वेडावला आहे. या भावंडांचा अधिकार आणि सामर्थ्य मोठे आहे, हे ब्रह्मवृंदाने जाणले आहे. शेवटी शास्त्राधार शोधून एकमेकांच्या विचाराने, 'हे परलोकीचें तारू, देवत्रय कोणी। प्रायश्चित्त काय द्यावें कोणी।।' असे शुद्धिपत्र लिहिले. इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ब्रह्मसभेने या भावंडांना अलौकिक देव म्हटले, परंतु ब्राह्मण म्हणून मान्यता दिली नाही.
       एखाद्या जाणत्या कायदेपंडिताने आपणाला हवी तशी केस चालवावी आणि कोर्टाकडून न्याय पदरी पाडून घ्यावा, अशी ही रंजक कहाणी आहे. हे सगळे घडविणारा मास्टर माईंड म्हणजे विठ्ठलपंत! दुसऱ्या कुणाच्याही मदतीशिवाय आपल्या मुलांना वेदशास्त्र प्रवीण बनवणे; संयम, विवेक, सहनशीलता व विचारक्षमता हे ब्रह्मचर्याश्रमाचे अपेक्षित गुण आपल्या मुलांमध्ये उतरविणे; नाथपंथाकडून भक्तीकडे जाण्याचा मार्ग त्यांना उपलब्ध करून देणे; आणि 'भक्ती हे सरती, जाती न सरती', असे सोपानदेवांनी आत्मविश्वासपूर्वक म्हणावे, अशी तयारी करून घेणे, याचे कर्तृत्व निःसंशयपणे विठ्ठलपंतांचे! त्यांनी आश्रमव्यवस्था मोडून एक पातक जाणतेपणाने केले होते. पण पुढे जातिवर्ण श्रेष्ठत्वाचा दंभ आपल्या मुलांनी मोडावा, भक्तिमार्गात समता प्रस्थापनेत सहभागी व्हावे, हे या माणसाचे स्वप्न असावे. त्यामुळे त्यांनी मोठ्या विश्वासाने आपल्या चारही मुलांना बहुजनांच्या स्वाधीन केले आणि वैदिकांनी बहिष्कारलेल्या या भावंडांची प्रज्ञा, प्रतिभा ओळखून अठरापगड जातीच्या वारकर्‍यांनी त्यांना संत म्हणून आदरपूर्वक आपल्या खांद्यावर बसविले. मिरविले. वंदनीय,पुजनीय बनविले. म्हणूनच मला प्रश्न पडतो 'बाप रखुमादेवीवरु विठ्ठले, मज ऐसे केले', असे ज्ञानदेव म्हणतात, ते नेमके कोणाला उद्देशून होते बरे?    
                                - डॉ. शामसुंदर मिरजकर
                                 दूरभाष ९४२१२१२३५२

टिप्पण्या

  1. बहुजनांच्या स्वाधीन केले पण त्यांचे उल्लेख आढळत नाहीत ज्यांनी त्यांचा सांभाळ केला जे भोजलींगकाका त्यांचा अखंड ज्ञानेश्वरीत एकदाही उल्लेख येत नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. भोजलिंग काका यांचा उल्लेख ज्ञानेश्वरीत नाही, हे खरे आहे. परंतु ज्ञानेश्वरीत विठ्ठलाचाही उल्लेख नाही. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी असे समीकरण करून चालणार नाही. ज्ञानेश्वरीच्या पलीकडील ज्ञानदेव समजून घेतले पाहिजेत.

      हटवा
  2. त्या काळात विठ्ठलपंथ हे बंडखोर मानावे लागतात. उत्तम लेख आणि शेवटचा प्रश्नसुध्दा.

    उत्तर द्याहटवा
  3. सर आपला लेख अतिसुंदर आहे। वारकरी पंथाचे पहली यात्रा विटठलपंत ने केली आहे।

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. विठ्ठलपंत जेव्हा तीर्थयात्रेस गेले तेव्हा ते नाथपंथी होते. वारकरी संप्रदायात तीर्थयात्रेला अजिबात महत्त्व नाही, हे कृपया आपण समजून घेतले पाहिजे. धन्यवाद अप्पासाहेब जगदाळे सर! (शेवगाव अहमदनगर)

      हटवा
  4. Seema Musale: "स्वतःचे ज्ञान वर्तमान वास्तवाच्या सहाणेवर घासून लखलखीत केले", सुंदर रचन
    विठ्ठल पंतांबद्दल अप्रतिम नवाकोरा लेख वाचल्याचे समाधान मिळाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वा ची वेगळी आणि खरी ओळख हा लेख करून देतो. खूप आवडला सर लेख.

    उत्तर द्याहटवा
  5. अंत्यंत अभ्यासपूर्ण बारकाव्यांसह नितांत सुंदर मांडणी केली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. विठ्ठलपंतांच्या कार्याचा चिकित्सकपणे केलेला हा अभ्यास समकालीन समाजजीवनावर यथोचित प्रकाश टाकतोच त्याचबरोबर dyaneshvaradi भावंडाच्या कार्यापाठी मागील वडिलांचे अनन्यसाधारण योगदान स्पष्ट करतो.
    खूपच सुंदर लेख.💐💐👍👍👌👌

    उत्तर द्याहटवा
  7. सर आपला हा लेख खुप खुप आवडला. बालपण जागे झाले. संतांचे अभंग, भजन, पोथी वाचन या सर्व गोष्टी बालपणी जगलो. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांचे नाव ऐकले नाही असा दिवस गेला नाही. पुढे या सर्व साहित्यापासून दूर गेलो. विज्ञानाचा विद्यार्थी झालो तरी संताप्रती आदर कायम मनामध्ये होता, आहे आणि राहणार यात शंका नाही. एका अनाहुत टप्प्यावर मी वैज्ञानिकांचा जीवनपट अभ्यासू लागलो. आपण संतांचा जीवनपट उलगडून दाखवला आहे. माझ्या मनातील संत ज्ञानेश्वराबाबतच्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्या लेखातून मिळाली. प्रत्यक्ष भेटल्यानंतर मी काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा लेख ज्ञानेश्वरांच्या जडणघडण तशी का झाली याचे समाधान करते. खूपच सुंदर लेख. मन:पूर्वक अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा
  8. विठ्ठलपंतांचे एक बंडखोर विचारवंत म्हणून अनोखे दर्शन या लेखाने घडवले.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)