गोडसे@गांधी.कॉम (नाट्य समीक्षा)
भारतीय नाट्य साहित्यात हिंदीची एक स्वतंत्र व प्रभावी परंपरा आहे. अनेक प्रतिभावंत नाटककारांच्या नाटकांचे प्रयोग हिंदीबरोबरच अन्य भारतीय भाषांमध्येही खेळले गेले आहेत. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही हिंदी नाटकांनी आपला एक ठसा उमटवला आहे. मोहन राकेश, हबीब तनवीर, भीष्म साहनी, शंकर शेष, सर्वेश्वरदयाल सक्सेना, सुरेंद्र वर्मा अशा काही प्रमुख नाटककारांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. आपल्या अनोख्या शैलीने आणि नाविन्यपूर्ण मांडणीने बहुचर्चित झालेले हिंदीतील एक महत्त्वाचे नाटककार म्हणजे असगर वज़ाहत होय. फिरंगी लौट आये, इन्ना की आवाज़, वीरगती, समिधा, जिस लाहौर नई देख्या ओ जम्याइ नई, अकी, गोडसे@गांधी.कॉम, पाकीटमार रंग मण्डल अशी त्यांची आठ नाटके प्रसिद्ध आहेत. त्यापैकी 'समिधा' हे नाटक त्यातील धर्म चिकित्सेच्या आशयामुळे रंगमंचावर येऊ शकले नाही, तर 'जिस लाहौर...' या नाटकाने त्यातील मानवतावादी दृष्टिकोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर असगर वज़ाहत यांचे नाव नेले. 'गोडसे@गांधी.कॉम' हे त्यांचे बहुचर्चित ठरलेले माइलस्टोन म्हणावे असे नाटक आहे.
'गोडसे@गांधी.कॉम' हे भारतीय ज्ञानपीठने (२०१२) प्रकाशित केलेले नाटक हिंदीबरोबरच गुजराती, कन्नड, असामी आणि पंजाबीतूनही सादर झालेले आहे. ३० जानेवारी, १९४८ रोजी नथुराम गोडसेने केलेल्या गोळीबारातून गांधी वाचले. ते पुढे ५ जुलै,१९६० पर्यंत आणि पुढेही जिवंत होते, अशी कल्पना करून हे नाटक रचले गेले आहे. एक प्रकारे जादुई वास्तवातून (Magic realism) पुढे जाणारे हे नाटक आहे. जर नथुरामने केलेल्या खुनी हल्ल्यातून गांधीजी वाचले असते, तर पुढे काय झाले असते? राजनीती, ग्रामस्वराज्याची संकल्पना, त्यांचे सत्याचे प्रयोग, त्यांचा कर्मवाद आणि कर्मठ हिंदुत्ववाद्यांशी भिडण्याची त्यांची वृत्ती यातून कोणत्या घडामोडी साकारल्या असत्या याचा वेध या नाटकातून घेण्यात आलेला आहे. हे नाटक फक्त गांधी विरुद्ध गोडसे असे नाही, तर संपूर्ण गांधीवादावर क्ष-किरण टाकणारे आहे. एकूण अठरा दृश्यांमधून हे दीर्घांक नाटक उलगडत जाते.
नाटककाराने गांधी, नथुराम, नेहरू, पटेल, मौलाना आझाद, नाना आपटे, करकरे अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखांसोबतच बावनदास, सुषमा शर्मा, नवीन जोशी, निर्मला शर्मा अशा काही काल्पनिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून नवे नाट्य निर्मिले आहे. बावनदास ही फणीश्वरनाथ रेणु यांच्या 'मैला आंचल' कादंबरीतील व्यक्तिरेखा आहे. गांधींवर निस्सीम श्रद्धा असणारा अंधभक्त, असे त्याचे वर्णन करता येईल. गांधीवादाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविताना नाटककाराने रचलेली प्रसंग मांडणी अनोखी आहे, हेही आवर्जून लक्षात घ्यायला हवे.
हे नाटक २०१२ च्या दरम्यान लिहिले गेले. हा काळ देशभर आक्रमक हिंदुत्वाचा आहे. गांधी व नेहरू घराण्यावर प्रचंड टीका सुरू होण्याचा हा काळ आहे. दुसऱ्या बाजूला खुनी नथुराम गोडसे हाच खरा देशभक्त, वीरपुरुष असे जाणीवपूर्वक ठसविण्याचा हा काळ आहे. अशा काळात गांधीविचारांची, कृतींची तटस्थ चिकित्सा व मांडणी करत हे नाटक पुढे जाते. गांधी हे त्यांच्या समकाळातच जगावर गारुड करणारे Legend बनले होते. त्यांच्या हट्टाग्रही भूमिका नवे पेच तयार करत होत्या. त्यामुळेच समकालीन अनेक महान राष्ट्रनिर्माते गांधींवर टीका करत होते. वेगळा मार्ग चोखाळत होते. परंतु गांधीहत्या घडविण्याचा विचारही तत्कालीन कम्युनिस्ट, समाजवादी, रॉयवादी, मुस्लीम लीग, आंबेडकरवादी, पेरियारवादी, नेताजी सुभाषचंद्रांसारखे सशस्त्र क्रांतिकारक यांच्या मनी-मानसीही आला नाही. परंतु स्वतःला हिंदुत्ववादी म्हणविणार्या सावरकरपंथी हिंदू महासभेच्या प्रभावातून हे लांच्छनास्पद कृत्य अल्पशिक्षित नथुराम गोडसेच्या हातून घडविले गेले. आणि त्याला काही लोकांकडून भारतीय इतिहासातील सोनेरी क्षण म्हणून गौरविले गेले. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गांधी नीटपणे समजून घेण्याचा एक प्रयास म्हणजे हे नाटक आहे.
नथुरामच्या गोळीबारातून गांधी वाचले आहेत. ते हॉस्पिटलमध्ये असून त्यांची तब्येत सुधारत आहे, तर नथुरामला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो तिहार जेलमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर नाटक सुरू होते. हॉस्पिटलच्या एका खोलीत आपला स्वीय साहाय्यक प्यारेलाल बरोबर गांधी आहेत. ते वर्तमानपत्र वाचत आहेत. आपण बरे झालो आहोत, अशी त्यांची खात्री झाली आहे. याच दरम्यान दिल्लीतील एका कॉलेजमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक असणारा नवीन जोशी आणि गांधींच्या प्रचंड प्रभावात असणारी कॉलेजकन्या सुषमा शर्मा हे प्रेमी गांधींना भेटायला येतात. ते गांधींसोबत आश्रमात राहण्याची अनुमती मागतात. सुषमाला परवानगी मिळते, पण नवीनला अध्यापनाद्वारे देशसेवा करण्यास सांगितले जाते.
याच दरम्यान पटेल, नेहरू, मौलाना येतात. चर्चे दरम्यान पटेल गांधींना नथुरामबद्दल सांगतात. गांधीजी गोडसेला एकट्याने भेटण्याचा आपला मनोदय व्यक्त करतात. सगळे चकित होतात. गांधी हट्टापुढे कुणाचेच काही चालत नाही.
दुसऱ्या दृश्यात गांधी तिहार जेलमध्ये कोणत्याही सुरक्षिततेशिवाय, कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि कोणत्याही मध्यस्थाशिवाय नथुरामला भेटतात. गुन्हा कबुल करण्याचे धैर्य दाखविल्याबद्दल त्याचे अभिनंदन करतात. नथुराम म्हणतो, मी कोणताही अपराध केलेला नाही. तुमचा वध करणे हाच माझा उद्देश होता. गांधी विचारतात, "तो तुम मेरी हत्या को अपराध नही मानोगे?" अर्थातच नथुराम हा अपराध नाकारतो. हिंदू, हिंदुस्तान व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी अशा शेकडो हत्या करायला मी तयार आहे, असेही तो सांगतो. प्रत्युत्तरात गांधी म्हणतात, "मैं विचारों को गोली से नहीं, विचारों से समाप्त करने पर विश्वास करता हूँ..." या पहिल्याच भेटीत नथुराम आपल्या कृत्याचे समर्थन करताना त्याला धर्मकार्य व राष्ट्रकार्य संबोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याची जाज्वल्य धर्मकार्यनिष्ठा लेखकाने नेमकेपणाने टिपली आहे. या भेटीत गांधी नथुरामला 'मी तुला माफ केले' असे सांगतात. त्याच्याविरोधात साक्ष देणार नाही, असेही सांगतात. गांधींच्या या अकल्पित भूमिकेने नथुराम घाबरतो. तू ब्राह्मण आहेस. तुझे कर्म ज्ञान, दया, क्षमा आणि आस्तिकता असायला हवे, असेही ते म्हणतात. पहिल्याच भेटीत गांधी नथुरामला विचार प्रवृत्त करू पाहतात.
तिसऱ्या दृश्यात गांधी नेहरू व पटेल यांना काँग्रेस विसर्जित करायला सांगतात. अन्यथा मी काँग्रेसमध्ये नाही, असेही सुनावतात. "सरकारें हुकूमत करती हैं जवाहर...सेवा नही करती..." असेही गांधींचे मत असते. परंतु काँग्रेस वर्किंग कमिटी गांधींचा प्रस्ताव धुडकावून लावते. गांधी नवा प्रयोग आश्रम उभारण्याचे ठरवितात. बावनदास, नवीन, सुषमा, प्यारेलाल, निर्मलादेवी हे सगळे गांधींसोबत जाण्याचा निर्णय घेतात. परंतु गांधी नवीनला दिल्लीतच राहण्याचा आदेश देतात. दुसऱ्या बाजूला गांधींनी नथुराम व त्याच्या साथीदारांना माफ केल्याचे कोर्टाला लेखी सादर केलेले असते. त्यामुळे नथुराम, नाना आपटे व करकरे यांना अनुक्रमे पाच, तीन व दोन वर्षांची सजा होते. तुरुंगात त्यांना गांधींनी काँग्रेस सोडल्याची बातमी कळते. नथुराम याला गांधीचे ढोंग म्हणतो. गांधी पाकिस्तानचे 'जनक' आहेत. त्यांच्यामुळेच आपल्या पवित्र भारतभूमीवर इस्लामी राष्ट्र उभे राहिल्याचे दुःख व खंत व्यक्त करतो. "...गुरुजी ने जब कहा कि गांधी ने अपनी उम्र जी ली है, तब मुझे लगा था कि यही समय है," अशा शब्दात सावरकरांचा प्रभाव व गांधीहत्येची प्रेरणा स्पष्ट करतो.
पुढे गांधी बिहार मधील संगरी गावात प्रयोग आश्रम उभारतात. तिथे बेतिया आदिवासी जमातीचे लोक असतात. आश्रम उभारणीस सहकार्याचे आदेश नेहरूंनी मुख्यमंत्री श्री बाबूंना दिलेले असतात. त्यानुसार जिल्हाधिकारी, एसपी, जिल्हा इंजिनियर आदी गांधींची भेट घेतात. गांधी काही गोष्टी नाकारतात, तर काही स्वीकारतात. त्यानुसार त्यांच्यासाठी डाक सेवा सुरू होते. त्यामधून आलेल्या पत्रांमध्ये गांधींना नवीनने सुषमाला लिहिलेले प्रेमपत्र आढळते. गांधी ते स्वतः वाचतात आणि म्हणतात की, प्रेम म्हणजे वासना, लालसा आणि गंदगी आहे. ते सुषमाला आश्रम सोडण्याचा आदेश देतात. सुषमा क्षमायाचना करते. गांधींकडून तिला पुन्हा एक संधी दिली जाते.
गांधींनी अगोदरच ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली होती. त्याचा प्रयोग गांधी बिहारमध्ये करतात. त्यांच्या प्रयोगास चार जिल्ह्यात प्रतिसाद मिळून यश येते. हे चार जिल्हे स्वतंत्रपणे कारभार चालवून स्वतःच्या निवडणुका स्वतः घेतात. तसेच येणाऱ्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये काँग्रेसला सहकार्य करण्याची नेहरूंची अपेक्षा गांधी नाकारतात. त्यामुळे नवा संघर्ष आकारास येतो. त्याची परिणती पुढे गांधींना संविधान विरोधी व देशद्रोही ठरविण्यात होते. परिणाम स्वरूपी गांधींना शिक्षा होऊन ते नेमके तिहार जेलमध्ये पोचतात.
दुसरीकडे गांधींच्या ब्रह्मचर्य आग्रहाची झळ सुषमा व नवीनला बसते. अतीव प्रेमापोटी नवीन सुषमाला भेटण्यास आश्रमात येतो. तिला भेटतो. गांधी ते आडून पाहतात. सुषमाला आश्रम सोडण्यास सांगतात. संयम तिच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे, असेही ते म्हणतात. कारण गांधींचे ब्रह्मचर्यासाठी भगीरथ प्रयत्न चाललेले असतात. नवीन म्हणतो, "महात्माजी...जो आप नही कर सके, उसकी तालीम दूसरों को क्यों दे रहे हैं।" अर्थात 'माझे सिद्धांत' या शब्दांशिवाय दुसरे उत्तर नसते. नवीनला आश्रमात राहण्यास किंवा लग्नास अनुमती नाकारली जाते. तेव्हा नवीन म्हणतो, देवदास व लक्ष्मी यांना परवानगी मिळू शकते. कारण देवदास तुमचा मुलगा आहे. तेव्हा गांधी त्याला पाच वर्षे थांबण्याची सूचना करतात. नवीन त्याला होकार देऊन निघून जातो.
आश्रमात राहणाऱ्या सुषमाच्या डोळ्यातील भाव व बेचैनी पाहून गांधी चिंतित होतात. त्यांना एक स्वप्नदृश्य दिसते. त्यामध्ये कस्तुरबा येऊन गांधींना दोष देऊ लागतात. गांधी घाबरतात. कस्तुरबा म्हणतात, "जो तुम्हारे महात्मा होने से नहीं डरता, उससे तुम डरते हो." पुढे कस्तुरबा म्हणतात, स्वतःच्या सिद्धांतांसाठी स्त्रियांना दुःख देणे बंद करा. यावर गांधी कस्तुरबांची माफी मागतात. कस्तुरबा म्हणतात, तुम्हाला जयप्रकाश नारायण आणि प्रभादेवी, देवदास आणि लक्ष्मी, मुन्नालाल आणि कंचन, मीरा, सुशीला, आभा, कनु यांची माफी मागायला हवी. "दूसरों की आंखो से भी कभी कुछ देख लिया करो।" असेही त्या सुनावतात. यावर गांधी स्वतःचे सिद्धांत, स्वतःच्या धारणा या बाबी पुढे करतात, तेव्हा स्पष्ट शब्दांत कस्तुरबा म्हणतात, नवीन व सुषमाच्या मध्ये येऊन तुम्ही मानसिक हिंसा करीत आहात. त्रास देत आहात.
या स्वप्नदृश्यातून बाहेर आल्यानंतर गांधी विचार करतात, स्वतःचे दुसरे मन कस्तुरबाच्या रूपात आले होते की काय? अर्थात तेच खरे असते.
पुढे गांधींना शिक्षा होऊन त्यांची तिहार जेलमध्ये रवानगी होते, तेव्हा गांधी नथुरामचीच कोठडी मागून घेतात. त्यांच्या मते नथुराम बरोबरचा संवाद संपूर्ण देशासाठी जरुरी असतो. त्यांना सत्याच्या सामर्थ्याची परीक्षा घ्यायची असते. नथुराम बरोबरची चर्चा हा नाटकाचा गाभा आहे. प्रारंभी नथुराम सावधपणे चर्चा करतो. आपला विचारपक्ष प्रभावीपणे मांडण्यासाठी तो उत्सुक असतो. परंतु गांधी त्याच्यासमोर मूलभूत प्रश्न उपस्थित करून त्याला विचार प्रवृत्त करतात. तेव्हा तो बचावात्मक भूमिकेत जातो. उदाहरणार्थ, हिंदू या शब्दाचा तुला अभिप्रेत असणारा अर्थ काय? हिंदू शब्द वेद पुराणात नाही. या प्रदेशाला पूर्वीपासून भारत म्हणतात. मग तुझे प्रेम कशावर? हिंदुस्तानवर? जर असे असेल तर तू हिंदुस्थान पाहिला आहेस काय? माझे गुरू नामदार गोखले यांच्या आज्ञेनुसार मी संपूर्ण हिंदुस्थान एक वर्ष फिरून पाहिला आहे. सगळं जग या हिंदुस्थानात आहे, हे पाहून मी चकित झालो होतो. अर्थात नथुराम गांधींचा हा मुद्दा मान्य करत नाही. हिंदुस्थान हा फक्त हिंदूंचा देश आहे. तुम्ही विनाकारण राम-रहिम एक केले आहेत, असे नथुराम म्हणतो. यावर गांधी म्हणतात, होय मी तेच करत आहे, जे हा देश हजारो वर्षांपासून करत आलेला आहे. समन्वय आणि एकता. नथुराम गांधींचे विचार अमान्य करतो.
चर्चा पुढे चालू राहते. नथुराम गांधींची हिंदुविरोधी म्हणून निर्भर्त्सना करतो. गांधी विचारतात, ते कसे? नथुराम म्हणतो, तुम्ही म्हणाला होता, पाकिस्तान माझ्या प्रेतावर उभा राहील. मग नंतर सहमती का दिली? गांधी म्हणतात, सावरकरही असेच म्हणाले होते. सावरकर हिंदू व मुस्लिम अशा दोन राष्ट्रीयता एकाच देशात राहतात असे म्हणत होते. मग जर ती दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तर सावरकरांनी स्वागतच करायला हवे होते. त्यांनी का फाळणीला विरोध केला? मी तर हिंदू-मुस्लीम विभिन्न मानलेच नाहीत नाहीत. त्यामुळे फाळणीचे मोठे दुःख मला झाले. तेव्हा नथुराम 55 कोटींचा मुद्दा पुढे करतो. गांधी म्हणतात, हा पाकिस्तानला पैसे देण्याचा मुद्दा नाही, तर प्राण जाये पर वचन न जाये ही रघुकुलरिती आहे, त्याचे पालन करावयाला मी लावले. मग नथुराम मुस्लीम तुष्टीकरणाचा मुद्दा काढतो. गांधी म्हणतात, दक्षिण आफ्रिकेपासून असहकार आंदोलनातपर्यंत कुठे मुस्लीम तुष्टीकरण आहे? जेव्हा मुस्लिम ब्रिटिशांविरोधात खिलाफत आंदोलन लढवत होते, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो.
मग हिंदू राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे येतो. गांधी विचारतात, हे हिंदुराष्ट्र काय आहे? तेव्हा गोडसे हिंदुराष्ट्राचे मानचित्र दाखवितो. गांधी म्हणतात, यामध्ये आर्यांचे मूळ स्थान अफगाणिस्तान कुठे आहे? या चित्रामध्ये पवित्र कैलास पर्वत आणि मानस सरोवर कुठे आहे? हे तर ब्रिटिश इंडियाचे चित्र आहे. अशाप्रकारे गांधी नथुरामचे एक एक तकलादू मुद्दे निरस्त करत जातात. याच दरम्यान गांधी तुरुंगात स्वच्छता अभियान चालवतात आणि घरातली व मनातली घाण साफ करण्याचा प्रतीकात्मक संदेश देतात.
दुसऱ्या बाजूला सुषमा विरह भावनेने व्याकुळ व दुखी झालेली असते. तिचे निरस जीवन व डोळ्यातील पाणी पाहून सुषमाची आई निर्मला ही गांधींशी संवाद साधते. माझ्या मुलीला काही झाले तर मी तुला सोडणार नाही, असे धमकावते. गांधी नवीनला बोलावण्याची सूचना करतात. प्यारेलाल विचारतो, तुमच्या सिद्धांताचे काय? गांधी म्हणतात, "सिद्धांत जीवन को सुंदर बनाने के लिए होते है, कुरूप बनाने के लिये नहीं होते।" नवीन येतो. त्याचे व सुषमाचे लग्न लावून दिले जाते. गांधी त्यांना 'गीता' ग्रंथ भेट देतात आणि "ब्रह्मचारियों जैसा जीवन बिताओ।" असा आशीर्वाद देतात. त्याच वेळी नवविवाहितांना मी लिहिलेले 'विवाह का अर्थ' हे पुस्तक देण्याची सूचना प्यारेलालला करतात.
दरम्यान तुरुंगामध्ये गांधी-गोडसे यांची चर्चा होतच राहते. गांधी म्हणतात, तू प्रार्थनासभेत का बसत नाहीस? नथुराम म्हणतो, मला तुमच्या प्रार्थनेबद्दल आस्था नाही. गांधी विचारतात, तुझी प्रार्थनेवर श्रद्धा नाही? नथुराम म्हणतो, मी हिंदू आहे आणि माझी हिंदू धर्मावर अास्था आहे. इथे गांधी त्याला अनेक प्रश्न विचारून शेवटी असे सांगतात की, अनेक हिंदू जी प्रार्थना श्रद्धापूर्वक करतात त्याला नाकारणे आणि स्वतःचे स्वतंत्र श्रद्धा विचार जोपासणे म्हणजे हिंदुत्वाला संकुचित करणे आहे. हिंदूधर्म उदार आणि विशाल आहे. त्याला छोटा करू नकोस.
पुढे दोघांची गीता ग्रंथावर चर्चा होते. दोघेही गीता हेच जीवनदर्शन आहे, असे म्हणतात. तेव्हा गांधी म्हणतात, ही किती अजब गोष्ट आहे की गीतेने मला मारण्याची प्रेरणा तुला दिली आणि तुला क्षमा करण्याची प्रेरणा मला दिली. नथुराम म्हणतो, फळाची अपेक्षा न करता कर्म करायला गीतेने सांगितले आहे. त्यामुळेच अर्जुनाने युद्धभूमीवर आपल्या प्रियजनांची हत्या केली. गांधी म्हणतात, युद्धभूमीवरील हत्या व प्रार्थना सभेतील हत्या यात फरक आहे. नथुराम 'हत्येचा उद्देश महत्त्वाचा', असे सांगतो. तर गांधी म्हणतात, आत्म्याची हत्या का केली नाहीस? गीतेने सांगितलेला मित्र शत्रू समतेचा भाव तू का जपला नाहीस? नथुराम पुन्हा म्हणतो, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुमचा वध जरुरी होता. गांधी विचारतात, हे कोणी ठरविले? नथुराम म्हणतो, देशातील हिंदू जनतेने. गांधी विचारतात, माझ्याशिवाय इतर सर्व हिंदूंनी ठरविले काय? नथुराम म्हणतो जे सच्चे हिंदू होते, त्यांनी ठरविले होते. गांधी म्हणतात, चांगले वाटणारे काम चुकीच्या पद्धतीने आणि वाईट भावनेने केले तरी त्याचा परिणाम चांगला निघत नाही. आपण सगळे स्वतःच्या विचारांसाठी स्वतंत्र आहोत, परंतु कोणाची हत्या करण्यासाठी स्वतंत्र नाही.
या चर्चा महिनोंमहिने वर्षानुवर्षे चालू राहतात. जेव्हा ५ जुलै, १९६० रोजी दोघांची एकाच दिवशी सुटका होते, तेव्हा गांधी डाव्या दिशेने तर नथुराम उजव्या दिशेने जायला निघतात. थोडे अंतर चालून गांधी थांबतात. नथुराम मागे वळतो. गांधींच्या डाव्या बाजूला येउन उभा राहतो. गांधी त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपल्या दिशेने घेऊन जातात. पार्श्वभूमीवर गीतेने सांगितलेली शत्रू व मित्रांशी समान वर्तन करणाऱ्या स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगून असे वागणाऱ्यांचा गौरव करणारा आवाज येत राहतो.
'गोडसे@गांधी.कॉम' हे नाटक आशय आणि शैली या दोन्ही पातळीवर अनोखे आहे. गांधी हे नायक आणि नथुराम खलनायक असे कृष्णधवल चित्र येथे नाही. गांधी पहिल्याच भेटीत नथुरामला माफ करतात. त्यामुळे ते पुढे नथुरामशी सहृदयतेने चर्चा करू शकतात. प्रकृतीची एक अद्भुत रचना समजून घेण्याच्या हेतूने त्याच्याशी संवाद साधतात. गांधींच्या नजरेतून नथुराम हा दुसऱ्याच्या विचारांनी भारावलेला व भरकटलेला अल्पशिक्षित तरूण आहे. लोक एक तर नथुरामचा द्वेष करतात किंवा त्याच्यावर खूप प्रेम करतात. गांधी हे दोन्ही टाळतात. ते खरे स्थितप्रज्ञ आहेत. ते संवादाचा मध्यम मार्ग स्वीकारतात. जो गांधीबद्दलच्या द्वेषातून, तिरस्कारातून खुनाच्या अत्युच्च हिंसात्मक पातळीवर पोहोचलेला आहे, त्याचेही मतपरिवर्तन, मनपरिवर्तन संवादाच्या माध्यमातून होऊ शकते, याचा विश्वास आणि प्रात्यक्षिक हे नाटक सादर करते.
गांधींचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले त्यांना हिंदुस्थान पाहण्याचा, समजून घेण्याचा सल्ला देतात तर गोडसेचे गुरुजी हिंदुस्तान हा फक्त हिंदूंचा अशी संकुचित शिकवण देतात. गोडसे स्वतंत्र बुद्धीचा स्वतंत्र प्रज्ञेचा नाही. त्यामुळे तो तेच बोलतो जे त्याला शिकवण्यात आले आहे. पुन्हा पुन्हा चुकीच्या गोष्टी सांगून त्याचा बुद्धिभेद केला आहे. तो अल्पशिक्षित आहे. विचारी कमी आणि भावनाप्रधान जास्त आहे. तारुण्याच्या जोशात असणाऱ्या नथुरामच्या मनात हिंदुत्व रक्षणाचे एक संकुचित प्रारूप भरून द्वेषाची भावना भरवली आहे. नथुराम हा एका विशिष्ट विचारधारेचा पाईक आहे. नाटकातील गांधी त्या नथुरामला विचाराच्या, संवादाच्या पातळीवर आणतात. मगच अनुकूल बदल घडू शकतो. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांचा विचार केला तर नेमके असेच घडलेले दिसेल. नवे नथुराम निर्माण करण्याची फॅक्टरी बंद पडलेली नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संकुचित हिंदुत्वाला, द्वेष भावनेला चर्चेच्या पातळीवर निरस्त करणे आपणास जमलेले नाही. समन्वय व एकतेचे हिंदू धर्माचे शेकडो वर्षांचे प्रारूप गांधींना पुढे न्यायचे होते. परंतु गांधी सोबत असणाऱ्या नेहरू-पटेल आदी नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि सत्ता संपादनाला महत्त्व दिले.
गांधींच्या अतर्क्य अकल्पित भूमिका व हटवाद या स्वभाव विशेषांचा नाटकात परिणामकारक वापर झाला आहे. त्यामुळेच गोडसेची पहिली भेट किंवा नंतर त्याच्या कोठडीत गांधींनी राहणे या प्रसंगांमुळे वेगळेच नाट्य निर्माण होते. गांधींच्या या स्वभावामुळे ते नेहरू पटेल यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात आणि प्रसंगी तुरूंगातही जाऊ जाऊ शकतात, हे सगळे आपणास शक्य वाटू लागते. कारण लेखकाने magic realism चा वापर करत अशक्य ते शक्य करून दाखविले आहे.
गांधींचे ब्रह्मचर्याचे प्रयोग आणि त्यामुळे त्यांच्या प्रचंड प्रभावातील स्त्रियांच्या वाट्याला आलेले अतोनात दुःख सर्वश्रुत आहे. त्याचीच पुनरावृत्ती नाटकातील नवीन व सुषमाच्या बाबतीत होते. जयप्रकाश नारायण व प्रभादेवीची यासंदर्भात आठवण होणे स्वाभाविकच आहे. नाटकातले हे प्रसंग निश्चितपणे गांधींचा गौरव करणारे नाहीत. दुसऱ्याला आलेले पत्र वाचणे, दुसऱ्यांचा संवाद लपून ऐकणे आणि प्रेम भावनेला वासना व गंदगी म्हणणे हे महात्म्याला शोभते का? पण अशाही गोष्टी नाटकात येतात आणि गांधींच्या ऋणात्मक बाजूचे दर्शन घडते.
एकंदर असगर वज़ाहत यांनी आजच्या समकालीन संदर्भात गांधीवादाची नाट्यमय अनुभूती सादर केली आहे. या महान व्यक्तिमत्त्वाचे संपूर्ण जगणे आणि त्यांची हत्या हा जगभर कुतुहलाचा विषय आजही आहे. अनेक अंतर्विरोध असणारे गांधी हे व्यक्तिमत्त्व संपूर्ण भारतीय समाजावर प्रभाव टाकून त्याला एका निश्चित दिशेला घेऊन जाणारे होते. मानवी जीवन सुंदर बनविण्यासाठी प्रसंगी आपले सिद्धांत बदलविणारे आणि संवाद व समन्वय यावर विश्वास असणारे गांधी ही आजच्या काळाची गरज प्रस्तुत नाटकात अधोरेखित झालेली आहे. मानवी वृत्ती-प्रवृत्तीतील आंतरद्वंद्व उजागर करण्यासाठी नाटककाराने काही काल्पनिक व्यक्तिरेखांचा हस्तक्षेप खुबीने केला आहे. त्यामुळे हे नाटक विचारनाट्य किंवा चर्चानाट्य न बनता जीवनस्पर्शी अनुभूती देणारे नाटक बनले आहे. म्हणूनच या नाटकाचे अनेक भाषेत प्रयोग होऊन समकालीन भारतीय नाटक म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे.
- डॉ. श्यामसुंदर मिरजकर
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
सर जी ,खूप छान लिहिले आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद मनोज
हटवासर नाटक वाचण्याची गरज राहिली नाही.खूप छान अनूभव आला.खूप छान समिक्षा ,गांधीवादाचे खूप वेगळे विवेचन .
उत्तर द्याहटवाधन्यवाद विठ्ठल रोटे सर
हटवाअतिशय सुरेख आशय दर्शन.... नाटक वाचलेच पाहिजे असे वाटते
उत्तर द्याहटवाखरं आहे. नाटक वाचलंच पाहिजे असं आहे.
हटवानाट्यमय घडामोडी मांडणी चांगली वेगवेगळ्या कोनातून निरीक्षण.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुधीर सर
हटवासर खुप छान आहे. गांधीजींचा नवीन पैलू समजतो. नवीन याला निश्चितच मागणी राहते.
उत्तर द्याहटवानाट्य समीक्षा उत्तम झाली आहे. गांधीविचारांची आजची प्रस्तुतता काय आहे? हे या समीक्षेतून समजते .मूळ नाटक वाचण्याची उत्सुकता तर आहेच .त्याचबरोबर महात्मा गांधीजींचे विचार मुळापासून समजून घेऊन त्याचा अन्वयार्थ लावण्याची आज गरज आहे .याचे प्रत्यंतर तुमची नाट्यसमीक्षा वाचल्यानंतर येते. लेखनाबद्दल अभिनंदन !
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर!
हटवाछान, नाट्य समीक्षेतून नातकविषयीची उत्सुकता वाढविली आहे. नाटकाच्या मर्यादांचा उल्लेख प्रकर्षाने येत नाही. बाकी आस्वादात्मक व विश्लेषणात्मक अशा दोन्ही गुणांनी आपली समीक्षा मंडित झाली आहे. वैचारिक समतोल हे प्रगल्भतेचे लक्षण होय.
उत्तर द्याहटवामी या नाटकाचा नाटकाचा मराठी अनुवाद केला आहे आणि सहा प्रयोग केले आहेत...
हटवाखरं आहे सर
हटवानाटक वाचावे,पाहावे अशी इच्छा निर्माण करणारा लेख आहे सर. खुप छान लिहिले आहे.
उत्तर द्याहटवामी या नाटकाचा नाटकाचा मराठी अनुवाद केला आहे आणि सहा प्रयोग केले आहेत...
हटवानाटक वाचलंच पाहिजे
हटवानमस्ते सर आपला आलेख खूप सुन्दर अहे,गान्धी जी ना पुन:नवींन दृष्टी ने विचार करायल लावन आहे,
उत्तर द्याहटवाअति सुंदर. गांधीजीचा एक नवा पैलू समजला��
उत्तर द्याहटवानाटकाच्या प्रत्येक दृश्याचे अतिशय समृद्ध व ओघवत्या भाषेत सविस्तर समीक्षण केले आहे. आपल्या या समीक्षकाने नाटक वाचण्याची तीव्र इच्छा झाली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद जगताप सर
हटवाखूप छान सर लेखन 👌👌
उत्तर द्याहटवामस्त नाटक परिक्षण? मराठी अनुवाद कोठे मिळेल?
उत्तर द्याहटवापंचफुला प्रकाशन औरंगाबाद किंमत 80 रु बालाजी जाधव 94225 28290
हटवाखूपच छान समीक्षा
उत्तर द्याहटवाWell written sir 👌👌
उत्तर द्याहटवावाचत असताना सगळ काही डोळ्यासमोर घडत असल्याचा भास होतो आहे,Great work
उत्तर द्याहटवासर खूप छान, विषयानुरूप लेखन. गांधीजींनी नथुराम गोडसे नी त्यांना मारण्याचा प्रयत्न करूनही ते त्याला भेटले. त्याच्याशी संवाद साधला. आपल्यासाठी अशक्य आहे हे सगळं पण ते गांधीजी होते त्यांच्या इतकी. सत्यप्रियाता, अहिंसा आपण लोक ठरवल तरी पूर्णपणे आचरणात आणू शकत नाही. समीक्षा लिहिताना भाषा सहज सुलभ आहे.वाचलं की बोलणाराची तळमळ कळते. आता संपूर्ण नाटक वाचायला आवडेल.👌👌
उत्तर द्याहटवा