झुम्कुळा : सशक्त अनुभवविश्वाची कथा

झुम्कुळा: सशक्त अनुभवविश्वाची आश्वासक कथा

        मानवी जीवनातील असंख्य चढ-उताराचे लघु दर्शन घडविणारा लोकप्रिय वाङ्मय प्रकार म्हणजे कथा होय. मराठी कथेची एक दीर्घ परंपरा आहे. 'काळ तर मोठा कठीण आला' अशी कथा लिहिणाऱ्या हरिभाऊ आपटेंपासून 'श्रीलिपी' लिहिणाऱ्या किरण गुरवांपर्यंत अनेकविध वृत्ती प्रवृत्तीच्या लेखकांनी मराठी कथेचा पैस समृद्ध केलेला आहे. समाजाच्या सर्व स्तरांना मराठी कथेने कवेत घेतले आहे. त्यामुळेच कथा वाङ्मय अधिक लोकप्रिय दिसते. लोकांपर्यंत पोहोचलेले दिसते.
       साधारणत: मराठीत समृद्ध अनुभवविश्वाची वानवा आहे. अनेक लेखक स्वतःच्या धर्म, जात, व्यवसायनिष्ठ अनुभवविश्वात गुरफटलेले दिसतात. त्याच्या पलीकडे जाऊन जगण्याचा संघर्ष पेलणाऱ्या सामान्य माणसांचा प्रयास शब्दात पकडणारे लेखक कमी आहेत. मराठीत आश्वासक, आशावादी कथा तुलनेने अल्प प्रमाणात लिहिली जाते.  माणसाच्या जगण्यात अनेक विसंगती असतात. अनेक प्रकारच्या समस्या, अभावग्रस्तता, अन्याय वाट्याला येत असतो. त्यामुळे बहुसंख्य कथा या शोकात्म किंवा शोकांतिक झालेल्या आपणास आढळतात. मात्र त्याच्याही पलीकडे जीवनाची सकारात्मक बाजू माणसाला जगण्याला उमेद देत असते. आशावाद पेरत असते. ते टिपणारा वसीमबार्री मणेर हा नव्या पिढीतील सकारात्मक भूमिकेचा लेखक आहे.
         'झुम्कुळा'(२०१९) या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा   मराठी साहित्य विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण  करण्याच्या क्षमतेच्या आहेत. या सगळ्या कथा साधारणतः दहिवडी, फलटण या परिसरातल्या आहेत. म्हणजेच थोडासा दुष्काळी भाग, थोडा माणदेश या कथांमध्ये येतो आहे. या परिसरातील लोकांचे जगणे तसे कष्टप्रद आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करीत नाहीत. त्याचे सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडते.
       त्याबरोबरच समकालीन समाज वास्तवाचे चित्रणही साहित्यात अभिप्रेत असते. आजच्या काळाचे प्रश्न साहित्यातून अधोरेखित करणे, त्यावर भाष्य करणे आणि सशक्त पर्याय देणे हे लेखकाचे काम असते. वसीमबार्री मणेर यांच्या कथेमधून हेच झालेले आहे. आजचा काळ हा धार्मिक विद्वेषाचा आहे. राजकारणासाठी जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये, दोन समूहांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. अविश्वासाचे व विसंवादाचे वातावरण निर्माण केले जात आहे. अशा काळात मानवतेची वीण उसवली जाणार नाही, याची काळजी घेत लेखन करणे लेखकाची जबाबदारी आहे. वसीम मणेर यांनी आपल्या अनेक कथांमधून सामान्य माणसांनी टिकवलेल्या सामाजिक एकजिनसीपणाचे आणि समाजाच्या अस्सल सहिष्णुतेचे, एकतेचे दर्शन घडविले आहे. हे करताना देखील त्यांनी ओढून ताणून किंवा प्रचारकी थाटाने ते केलेले नाही. समाजाचे अस्सल चित्र त्यांनी सहजपणे रंगवले आहे. ज्यांमध्ये सामान्य माणूस जाती-धर्माच्या पलीकडे विचार करतो, एकमेकांना मदत करतो. एकमेकांचे सुख दुःख समजून घेतो, याचे दर्शन या कथांमधून घडते. यादृष्टीने 'मैमुनाचा मालक' ही कथा आवर्जून पाहावी लागेल. मनमोकळ्या स्वभावाची मैमुना ही नवर्‍याने टाकलेली आहे. तिला पै-पाहुणे  कामापुरती वापरून घेतात. परंतु तिला खरा आधार देतात ते तिच्या वडिलांचे मित्र असणारे गावातील पाटील आणि पाटलीन बाई. बाकी इतर मुस्लीम समाज 'तिला रीतभात नाही', असे समजतो. मशिदीत अजान देणारा बांगीसाब देखील गैरसमजातून तिला दोष देतो. तिचे जेवण नाकारतो. त्यामुळे ती आत्महत्या करते.
        'खारी' या कथेत पावसाळ्यामुळे खारी विक्री न झाल्याने अगतिक झालेल्या लियाकतची गोष्ट येते. खरेतर पावसाळी वातावरणात त्याची खारी विक्री होण्याची तीळमात्र शक्यता नसते. मात्र सुरेंद्र पाटील हा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा त्या खारीमध्ये भावनिक दृष्ट्या गुंततो. त्याची सगळी खारी विकत घेतली जाते. आणि सुरेंद्र खारीवाल्या लियाकतला मामा म्हणून हाक मारतो. त्याला आग्रहाने चहा खारी खायला लावतो. इथे धर्माच्या भिंती कोसळून पडतात आणि निखळ मानवता पुढे येते.
       याशिवाय 'घरभरवनी' कथेत मुस्लिम भाडेकरूची काळजी घेणारा हिंदू मालक येतो. 'सुगंधी शुटर' कथेत गवती चहा विकून २-२ रुपये मिळविणाऱ्या म्हातारीला कमी किमतीत स्वेटर विकून तिच्यामध्ये स्वतःची आई पाहणारा एजाज शेठ येतो. 'आंबटचुका' कथेत वसंतराव या मित्राच्या परसातील भाजी चोरल्याबद्दल असिफ व जमीर या तरुणांना मारायला पाठ लागलेला रियाजभाई येतो. या सगळ्या कथा धर्माची पाठराखण करत नाहीत, तर मानवतेची पाठराखण करतात, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
       दुसऱ्या बाजूला सामान्य माणसांचा जगण्याचा संघर्ष अनेक कथांमधून चित्रित झालेला आढळतो. 'मल्हारी' कथेतील पोरकेपणा घेऊन जगणारा मल्हारी, 'ऑपरेशन' कथेतील नव्याने जनावराचा डॉक्टर झालेला सामान्य शेतकरी कुटुंबातील तुकाराम, 'खारी' कथेतील लियाकत, 'सत्कार' कथेतील नरेश किंवा 'घरभरवनी' कथेतील युसुफ बांगडीवाला, दस्तगीर आचारी या सगळ्यांचे रोजच्या जगण्याचे संघर्ष लेखकाने टिपले आहेत. त्याबरोबरच मुस्लीम स्त्रीच्या वाट्याला येणारे टाकलेपण, परित्यक्ता असणे हे 'बैदा' व 'मैमुनाचा मालक' या दोन कथेत आलेले कथेत आलेले आहे.

# आशयसंपन्न कथा #
       'आंबटचुका' या पहिल्याच कथेत रियाजभाई आणि वसंतराव बोरावके या पन्नाशीच्या पुढे असणाऱ्या मित्रांच्या आत्मीयतेची पार्श्वभूमी येते. मुंबईत स्वतःचा उद्योग करणारी दोन मुले असणारे रियाजभाई पत्नीच्या आग्रहाने आणि मित्राच्या प्रेरणेने 'आत्तार मण्यार तांबोळी समाजाचा विवाह सोहळा' आयोजित करतात. परंतु या कार्यक्रमाची जोडणी करताना येणाऱ्या अडचणीतून काही पेच तयार होतात. ऐनवेळी मशिदीत परगावची जमात येते, म्हणून कार्यक्रमाला जागा मिळत नाही. मित्र वसंतराव बोरावके यांचे मंगल कार्यालय घ्यायचे ठरते. परंतु जेवणात कमीत कमी 'दालचा' पाहिजे आणि त्यासाठी आंबटचुक्याची भाजी पाहिजे, या ठिकाणी गाडी अडते. बाजारात कुठेही आंबटचुका मिळत नाही. परंतु नेमका वसंतरावांच्या पत्नीने तो घरामागे लावलेला असतो. कार्यकर्ते असणारे असिफ, जमीर ही मुले तो उपटून आणतात आणि नवेच नाट्य निर्माण होते. याचे  खुमासदार वर्णन कथेत येते.
       'मल्हारी' या कथेत जातिग्रस्त मानसिकता कशी काही माणसांना वेढून असते, ते व्यक्त होते. विशेषतः जी माणसे स्वतः चुकीचे वागतात, सामाजिक अपराध करतात, त्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते. या कथेत कोळेकर, टिंगरे व मल्हारी हे तीन मित्र येतात. वेगवेगळ्या समाज स्तरातील हे मित्र आहेत. त्यातला मल्हारी आई-वडिलांच्या आधाराशिवाय वाढलेला आहे. म्हणूनच हॉटेलमध्ये पडेल ते काम करून जगणारा आहे. तर दुसऱ्या बाजूला टिंगरे हा स्वतः लफडेबाज असताना दुसऱ्याला दोष देणारा उच्चजाती अभिमानी आहे. तो सामाजिक पार्श्वभूमी लक्षात न घेता मल्हारीला दोष देताना दिसतो. लहानपणी 'मैं रावण हूँ।' असे म्हणून खदाखदा हसणारा मल्हारी  नेक माणूस आहे. उलटपक्षी स्वतःला उच्च समजणारा टिंगरे चारित्र्यहीन आहे, असे या कथेत दिसते.
       संग्रहातील 'बैदा', 'किल्ला' आणि 'घरभरवनी' या तीन कथांमधून बालमानस चित्रित झाले आहे. या कथा वाचताना रस्किन बॉंडच्या कथांची आठवण येते. बैदा म्हणजे अंडे. कोंबडी अंडे कसे घालते, याचे कुतूहल असणारी दोन मुले, वेगवेगळ्या कोंबड्यांना त्यांनी ठेवलेली नावे, त्यांना कोंबड्यांच्या अंडी घालण्याबद्दलचे असणारे अपुरे ज्ञान यातून गंमतशीरपणे ही कथा पुढे जाते. तर 'किल्ला' कथेत गुटगुटीत गोऱ्या गोमट्या मुलाबरोबर खेळता खेळता अचानक लैंगिक चाळे करणारा पौगंडावस्थेतील मुलगा येतो. त्यामुळे  खेळ अर्धा टाकून  छोटा पिंकू घरी परततो.
       'ऑपरेशन' ही या संग्रहातील अत्यंत दर्जेदार कथा आहे. तुकाराम आबाजी गायकवाड या नवखा जनावराचा डॉक्टर असणाऱ्या गरीब शेतकरी तरुणाच्या धडपडीची ही कथा. लोणंद भागातील एका गावातील हा साधा पण होतकरू तरुण बी. व्ही. एस्सी. पदवी घेऊन जनावरांचा डॉक्टर झाला आहे. मात्र त्याला काम मिळत नाही. अचानक लोणंदच्या बस स्टँडवर त्याला एका बैलाच्या आजारपणाची बातमी कळते. तो प्रत्यक्ष जाऊन पाहतो. कॅन्सर झाल्यामुळे त्या बैलाचे वृषण प्रचंड वाढलेले असते.  त्या परिसरातील नामांकित डॉ. देशपांडे या आजारावर उपचार नाही, असे म्हणतात. डॉ. पठाण, डॉ.पिंगळे, डॉ.शिंत्रे असे सगळेच उपचार टाळतात. त्याचे एक कारण सामाजिक असते. कारण तो बैल दगडू नाना कांबळे यांचा असतो. बैल दगावला तर त्रास नको, या भावनेने उपचारच टाळले जातात. या उलट स्वतःजवळ ऑपरेशनची कसलीच साधने नसताना तुकाराम हे आव्हान स्वीकारतो. लागणाऱ्या साहित्याची कशीबशी जुळणी करतो आणि हे ऑपरेशन यशस्वी करतो. अत्यंत रोमांचक खिळवून ठेवणारी कथा येथे आपणास वाचावयास मिळते. ही कथा जनावरांचे दुखणे, त्यावरील उपचार यावर प्रकाश टाकते, परंतु त्याचबरोबर समाजातील जात वास्तवही नेमकेपणाने टिपते. म्हणून ही कथा प्रत्ययकारी वाटते.
        'झुम्कुळा' ही कथासंग्रहाची शीर्षक कथा थोडी हलकीफुलकी आणि विनोदाचा स्पर्श असणारी आहे. कथानायक म्हादा रणवरे हा पैलवान आहे. सरपंचाचा मुलगा आहे. तालेवार आहे. तसेच तो सर्पमित्रही आहे. त्याचे लग्न ठरले आहे. मात्र आजोबाच्या मृत्यू नंतर एका वर्षात लग्न करायचे शक्य न झाल्यामुळे लग्न तीन वर्षे पुढे लांबले आहे. त्याची भावी पत्नी रूपाली मोबाईल वरून वेगवेगळे संदेश पाठवते. चॅटिंग करते. परंतु मोबाईल वापराबाबत सराईत नसलेला म्हादा तिला काय उत्तर द्यायचे या संभ्रमात असतो. याच दरम्यान माळावर धामिणीचा झुम्कुळा आढळतो. ते बघायला लोकांची तोबा गर्दी उसळते. म्हादा तेथे जातो. तर दोन धामण नर शक्तिप्रदर्शन करत असतात. त्यांच्या शक्ती प्रदर्शनाचे चित्रीकरण तो शिवाजी या मित्राच्या सांगण्यावरून रूपालीला पाठवतो आणि गंमत निर्माण होते. याचे अत्यंत चित्रमय दर्शन लेखकाने घडविले आहे. विविध भावनांचे बारकावे, क्रिया प्रतिक्रिया, तरुण मुलींची मानसिकता, पहिलवान असणाऱ्या तरुणांची मानसिकता लेखकाने नेमकेपणाने टिपली आहे.
       'सुगंधी शुटर' ही या कथासंग्रहातील काळजाला स्पर्श करणारी कथा. आईच्या मृत्यूमुळे दुःखात असणारे एजाज शेठ महिना उलटला तरी आपल्या कपड्याच्या दुकानात नियमितपणे येत नाहीत. मात्र एके दिवशी संध्याकाळी ते दुकानात आलेले असताना, एक गरीब दुबळी म्हातारी स्वेटर विकत घेण्यासाठी येते. ती काही स्वेटर पाहून एक पसंत करते. एजाज शेठ तिच्या ऐपतीचा अंदाज घेऊन तो स्वेटर तिला खरेदीपेक्षा कमी किमतीत विकतात. आणि आनंदाने चेहरा फुललेली ती म्हातारी स्वेटर घालूनच बाहेर पडते. आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या एजाज शेठना आनंद होतो. अशी माणुसकीच्या नात्याची दर्शन घडवणारी ही कथा आहे.
       'खारी' हीदेखील एक अत्यंत प्रभावी कथा आहे. पावसाळ्याच्या दिवसात खारीची विक्री नसल्यामुळे घरात चूल पेटून न शकलेला लियाकत खारीवाला स्वतःच्या जीवन चरितार्थाच्या विवंचनेत असतो. तर दुसर्‍या बाजूला कॉलेजचा  विद्यार्थी प्रतिनिधी असणारा सुरेंद्र पाटील हा तरुण आणि कैलास हा त्याचा मित्र हे वेगळ्याच भावनिक पातळीवर असतात. लियाकत सातारा एमआयडीसीतील एका हॉटेलच्या समोर खारी विकण्याचे दुकान मांडतो आणि त्याच हॉटेलमध्ये सुरेंद्रने येण्याची गाठ पडते. सुरेंद्र आपल्या मामाच्या मृत्यूच्या दु:खात असतो. त्याला मामासोबत खाल्लेली चहा खारी आठवते आणि तो एका वेगळ्याच मनस्थितीत जातो. ते ओळखून त्याचा मित्र कैलास आपल्या सगळ्या मित्रांना चहा खारीची पार्टी देतो. सुरेंद्रला खारी विकणाऱ्या लियाकतमध्ये आपला मामा दिसू लागतो. वेगळीच भावनिक आंदोलने निर्माण करणारी ही कथा  जाती-धर्मा पलीकडील माणूसपणाचा संदेश देते.
       याशिवाय 'सत्कार' या कथेत तीन चाकी डुगडुगी चालवणाऱ्या भीमनगरमधील नरेशची कहाणी येते. गाडीवर छत नाही आणि पावसाचे दिवस आहेत, या विवंचनेत असणाऱ्या नरेशला त्याचा मित्र विज्या सुनामी याच्यामुळे मदत होते, याचे तपशीलवार व प्रत्ययकारी चित्रण या कथेत येते.
         'घरभरवनी' व 'मैमुनाचा मालक' या दोन कथांमध्ये मुस्लीम जीवनाचा परिघ चित्रित झाला आहे. दोन खोल्यांचे घर बांधून त्याचा गृहप्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणारा युसूफ, त्याला मदत करणारा मेव्हणा दस्तगीर हे गृहप्रवेशाचे नियोजन करत असतात. त्याच वेळी रियाज हा छोटा मुलगा मामू आल्यामुळे आनंदात असतो. त्याच्या गाडीत बसून खेळत असतो. तो तेथेच आपण मोठे झालो आहोत, मामू सारखे आचारी झालो आहोत, अशी स्वप्ने रंगवत असतो. मात्र त्याच दिवशी नेमकी महापुरुषाच्या विडंबनेमुळे सगळीकडे दंगल सुरू होते. त्यामुळे छोटा रियाज आणि त्याचे आब्बा  यांचे स्वप्न विरून जाते. त्यांना आपला कार्यक्रमच रद्द करावा लागतो. सामान्य कष्टकरी मुस्लीम माणूस कशाप्रकारे आपल्या जगण्याचे सूत्र जुळवू पाहतो, ते आपणास येथे पहावयास मिळते. तर 'मैमुनाचा मालक' मध्ये साधी भोळी, परोपकारी, कष्ट करून जगणारी आणि नवऱ्याने सोडल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना दादा, बाबा म्हणत जगण्यात आनंद शोधणारी मैमुना येते. त्यांच्या गावातील मशिदीतील बांगीसाबला आठवड्यातून एक दिवस जेवण देऊ इच्छिते. पुण्याचे काम करू इच्छिते. मात्र तो बांगीसाब दुसऱ्याचे ऐकून मैमुनाच्या जेवणाला नकार देतो. तिला दोष देतो. धिक्कारतो. त्यामुळे ती  भल्यापहाटे विहिरीत जीव देते. तिच्या अंत्यसंस्कारासाठी तिचा नवरा कय्यूम याला शोधून आणले जाते. मात्र यादरम्यान  मुस्लीम बिरादरीतील लोक तिच्याबद्दल शंका-कुशंका व्यक्त करतात. नको ते बोलतात. याचे सूक्ष्म तपशिलाने चित्रण लेखकाने केलेले आढळते. सरळमार्गी, सुस्वभावी  मैमुना कोठे आणि काडीची मदत न करता तिला दोष देणारे समाजबांधव मुस्लीम कोठे असा विरोधाभास येथे दिसतो.
         'फळकुट' आणि 'किल्ला' या दोन कथा सोडल्या तर इतर सगळ्या कथा मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. लेखकाची भाषाशैली हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. दहिवडी, फलटण परिसरात बोलली जाणारी बोली लेखकाला आत्मसात आहेच, मात्र त्यासोबतच या परिसरातील मुस्लीम मराठी माणसांची दखनी भाषा लेखकाने नेमकेपणाने टिपली आहे. त्यामुळे एकूण मराठीच्या भाषा वैभवात मोठी भर घालण्याचे काम लेखकाने केलेले आहे.
         वसीमबार्री मणेर यांच्या कथांमधून येणाऱ्या मुस्लीम व्यक्तिरेखा जे बोलतात ते अस्सल दखनी आहे. मराठी हिंदी इंग्रजी शब्दांचा वापर करत त्यांचा संवाद सुरू होतो. त्यातही माणदेशी बोलीचा स्पर्श या संवादाला आलेला दिसतो. उदाहरणार्थ,  बैदा कथेतील टिल्लू आपल्या भावाला म्हणतो, "उप्परशे मैने सुन्याय आरीपभाई कू बोलताना...तलंगा बैदा नै देते. " तर 'आंबट चुका' कथेतील आसिफ म्हणतो, "जाधव साहेबका गेट बटाताय, थांबो वळंबा करके फोन करताव."  सुगंधी शूटर कथेतील एजाज शेठ म्हणतो, "अम्मी ले तो क्या तबी...भवानी हुंदे तेरे हातशे." मैमुनाचा मालक कथेतील बशीर म्हणतो, "क्या बी मुकु आयींगा सो बुलू नक्को वाज्या!"   या सगळ्या वाक्यांवर मराठीचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो.
       याशिवाय 'झुम्कुळा', बैदा, व्ह्य असे अनेक नवे शब्द येतात. "नायतर दुसरा कुटाना हून बसायचा." "नाना पन कावत्याल." "पैलवान काय बघताय?", "जुडीदार हाय आपला,"  अशा वाक्यांमधून वेगळीच शब्दरूपे आलेली दिसतात. मराठीची भाषिक समृद्धता वाढविण्यास हा कथासंग्रह हातभारच लावेल.
         सहजता, सूक्ष्म तपशील, नैसर्गिक साधेपणा, मानवी स्वभावाचे विविध कंगोरे या सगळ्यांचे दर्शन ही कथा घडविते. अंगभूत साधेपणा हेच या कथेचे वैशिष्ट्य आहे. योगायोग, नाट्यमयता, उपदेश, कल्पनारम्यता याला कथेत कुठेच स्थान नसल्यामुळे ही कथा सच्ची, टोकदार व गोळीबंद झालेली आहे. वसीमबार्री मणेर यांचा दुसरा कथासंग्रह लवकरच येतोय. व्यवसायाने चलचित्रकार, चित्रपट दिग्दर्शक असणारा हा लेखक मराठी कथेमध्ये मोलाची भर घालणार, हे नक्की.

झुम्कुळा
वसीमबार्री मणेर
दवात ए दक्कन प्रकाशन, फलटण
प्रथमावृत्ती: ऑगस्ट २०१९
पृष्ठे: १४२, मूल्य: २५०

डॉ. श्यामसुंदर मिरजकर
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी.
दूरभाष:९४२१२१२३५२

टिप्पण्या

  1. आदरणीय डॉ. श्यामसुंदर मिरजकर सर,
    वसीमबार्गी मणेर यांच्यासारख्या उपेक्षित मुस्लिम समाजातील नवोदित लेखकाच्या'झुम्कुळा' या कथासंग्रहाची अत्यंत नेटक्या, शैलीदार व लयदार अशा शैलीत आपण स्वागतसमीक्षा केली आहे. आपली ही स्वागतसमीक्षा वाचून हा कथासंग्रह मुळापासून वाचण्याची उत्कंठा लागलेली आहे शिवाय एका अलक्षित अशा उमद्या नवोदीत कथा कार्याचा परिचय आपण मराठी विश्वाला करून देत आहात, हे आपले एक संवेदनशील समीक्षक म्हणून असलेले मोठेपण आम्हाला दिसून आले. शिवाय एक कथा संग्राम मुळे दख्खनी बोलीचा एक लहेजा अनुभवण्याची संधी वाचकाला मिळणार आहे. दखनी भाषेचे सौंदर्य इतके आम्ही येत आहे की अशा प्रकारचे जास्तीत जास्त साहित्य मराठीत निर्माण झाल्यास मराठीचे दालन ते निश्चितपणे समृद्ध करणार आहे, असा विश्वास वाटतो. यानिमित्ताने लेखक वसीम बर्गे मनेर यांच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा देतो. आणि आपणासही अशा अनेक अलक्षित उपेक्षित लेखकांना पुढे आणण्यासाठी करण्याची शुभेच्छा देतो. धन्यवाद! डॉ. तातोबा बदामे

    उत्तर द्याहटवा
  2. आदरणीय डॉ. श्यामसुंदर मिरजकर सर,
    वसीमबार्गी मणेर यांच्यासारख्या उपेक्षित मुस्लिम समाजातील नवोदित लेखकाच्या'झुम्कुळा' या कथासंग्रहाची अत्यंत नेटक्या, शैलीदार व लयदार अशा शैलीत आपण स्वागतसमीक्षा केली आहे. आपली ही स्वागतसमीक्षा वाचून हा कथासंग्रह मुळापासून वाचण्याची उत्कंठा लागलेली आहे शिवाय एका अलक्षित अशा उमद्या नवोदीत कथा कार्याचा परिचय आपण मराठी विश्वाला करून देत आहात, हे आपले एक संवेदनशील समीक्षक म्हणून असलेले मोठेपण आम्हाला दिसून आले. शिवाय एक कथा संग्राम मुळे दख्खनी बोलीचा एक लहेजा अनुभवण्याची संधी वाचकाला मिळणार आहे. दखनी भाषेचे सौंदर्य इतके आम्ही येत आहे की अशा प्रकारचे जास्तीत जास्त साहित्य मराठीत निर्माण झाल्यास मराठीचे दालन ते निश्चितपणे समृद्ध करणार आहे, असा विश्वास वाटतो. यानिमित्ताने लेखक वसीम बर्गे मनेर यांच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा देतो. आणि आपणासही अशा अनेक अलक्षित उपेक्षित लेखकांना पुढे आणण्यासाठी करण्याची शुभेच्छा देतो. धन्यवाद! डॉ. तातोबा बदामे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सन्मित्र डॉ. तातोबा बदामे,
      साहित्य लेखन हे विविध क्षेत्रातील लोक स्वतःचे व्याप सांभाळून करत असतात. परंतु त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन ही आपल्यासारख्या अभ्यासकांची जबाबदारी असते. नव्या साहित्याचे स्वागत व्हावे, त्याची चर्चा व्हावी. त्याचे गुणदोष वाचकांना/लेखकाला कळावेत या सगळ्या हेतूने मी नव्या पुस्तकांवर लिहीत असतो. आपण सविस्तर प्रतिसाद दिलात. खूप बरे वाटले. मनःपूर्वक धन्यवाद!

      हटवा
  3. मा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर,
    वसीमबार्गी मणेर यांच्या नवोन्मेषी कथालेखनाचा परिचय मराठी वाङमय क्षेत्राला करून दिल्याबद्दल आपले कौतुक केले पाहिजे. आपल्या अत्यंत मनोवेधक पुस्तक परिचयाने/समीक्षेने सदरचे पुस्तक वाचण्याची उत्कंठा लागून राहिली आहे. कथेच्या व कथासंग्रहाच्या शीर्षकापासून अनेक गोष्टी मराठी साहित्य जगतासाठी नवीन आहेत. कारण समाजामध्ये वंचित राहिलेल्या अनेक घटकांचे व त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब या कथासंग्रहामध्ये उमटले आहे असे आपल्या परीक्षणावरून दिसून येते. एका चांगल्या पुस्तकाची ओळख आपण आम्हास करून दिली याबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मित्रवर्य डॉ. श्रीकृष्ण महाजन
      आपण शिवाजी विद्यापीठात वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहातच, तरीही त्यातून वेळ काढून इतरही विषयांचे वाचन करता. सामाजिक विषयांवर सतत लेखन करता. मुख्य म्हणजे 'वांटेड सन रे' या कविता संग्रहातून तुमची सकस कविता पुढे आली आहे. आपणासारखे वेगळ्या विषयात/क्षेत्रात कार्यरत असणारे लोकच मराठीचे साहित्य दालन समृद्ध करत आहेत. आम्ही फक्त दर्जेदार साहित्याची लेखकांची सर्वांना ओळख करून देतो. त्यातील गुणदोषांची चर्चा करतो. वाङ्मयीन वातावरण, आकलन आणि अभिरूची जपण्याचा प्रयत्न करतो. हे आमचे कामच आहे, असे मला वाटते. उमद्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

      हटवा
  4. डॉ.श्यामसुंदर मिरजकर हे जसे सर्जनशील लेखक आहेत, तद्वतच ते साक्षेपी समीक्षकही‌ आहेत.त्यांनी वसीमबार्गी मणेर यांच्या 'झुम्कुळा 'या कथासंग्रहाची करून दिलेली ओळख अभ्यासपूर्ण आहे.नव्या उमेदीच्या लेखकाला प्रोत्साहन देणारी आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वर्गमित्र डॉ.चंद्रकांत कांबळे
      नव्या लेखकांना बळ देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

      हटवा
  5. खूप छान सर....खूप छान समीक्षा....👌👌👍

    उत्तर द्याहटवा
  6. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. ग्रामीण बोली भाषेतील कथा वाचताना आनंद वाटतो. लेखकाच्या सर्व कथांचा सारांश छान मांडला सर तुम्ही. आता संपूर्ण कथा वाचयाच्या आहेत. पुस्तक कोठे मिळेल सांगा.

    उत्तर द्याहटवा
  8. खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला पुस्तक मिळू शकेल.

    https://www.amazon.in/Zumkula-Wasimbarry-maner/dp/819389314X

    उत्तर द्याहटवा
  9. सुंदर समीक्षा. पुस्तक वाचायलाच हवे अशी इच्छा निर्माण झाली आहे. एका वेगळ्या धाटणीच्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  10. समीक्षा वाचून पुस्तक वाचनाची ओढ लागली आहे.खूपच छान वसीम.खूप खूप अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  11. झुमकुळा - अतिशय सुंदर आणि साक्षेपी समीक्षा. कथानक स क्षिप्त पण त्यावर सामान्य वाचकालाही समजेल अशी टिपण्णी केली आहे. अलिकडच्या काळात समीक्षक खूप बोजड, दुर्बोध भाषा वापरतात. त्यामुळे समीक्षा त्यांच्या पांडित्य प्रदर्शनासाठी असे वाटते. पण मी सातत्याने तुमची समीक्षा वाचते. ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आणि ते पुस्तक वाचकाने वाचावे यासाठीप्रेरीत करणारी आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. डॉ नीला जोशी
      समीक्षेने पारदर्शी असावे. एकूण वाङ्मयय व्यवहारात सकारात्मक हस्तक्षेप करणारे असावे, असे मला वाटते. म्हणून मी अशा पद्धतीचे लिहितो. धन्यवाद मॅडम!

      हटवा
  12. सुंदर ओळख करून दिली आहे, वाचनाची ओढ लागली आहे. लॉक डाउन संपल्यावरच मिळेल असे वाटते..

    उत्तर द्याहटवा
  13. कथेचे सर्व पदर उलगडून दाखवले आहेत.खेड्यातील माणसांच्या मनाचा वेध कथाकाराने घेतला आहे.धर्माच्या पलीकडे असणारे माणुसकीचे नाते कथांमध्ये मांडले आहे.आजच्या काळात हे आवश्यक झाले आहे.संपूर्ण कथांची उत्तम समीक्षा केली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)