श्रमण परंपरा आणि वारकरी संत - डॉ. श्यामसुंदर मिरजकर

*श्रमण परंपरेचे वारकरी संत*

       वारकरी संत हे विविध जातींमधून पुढे आले आणि त्यांनी स्वतःची जाती विशिष्ट परिभाषा भक्ती वाङ्मयात प्रतिष्ठित केली. त्यांची ही वाङ्ममयीन कृती मराठी भाषेवर, संस्कृतीवर दीर्घकालीन प्रभाव टाकणारी होती. आपापल्या जात व्यवसायाच्या पर्यावरणासह अध्यात्माच्या गहन क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभे ठाकणे सहज सोपे नव्हते. ही भाषिक बंडखोरी केल्यामुळे संतांच्या वाट्याला अपमान, अवहेलना, कुचेष्टा, छळ आणि शिक्षा या गोष्टी आल्या. परंतु संत आपल्या निर्धारित ध्येयापासून ढळले नाहीत. इतके साहस आणि अंगीकृत कार्यावरील दृढ श्रद्धा त्यांनी कुठून प्राप्त केली असावी? त्यांच्या अभंगातून जात व्यवसायाची परिभाषा सहज उस्फूर्तपणे अभिव्यक्त झाली की त्यामागे हेतुपूर्वकता आहे? त्यांना जात व्यवसायाचा अभिमान आहे की जाती अभिमान मोडून नवा समाज घडवायचा आहे? असे काही प्रश्न सहजच आपल्यासमोर अवतरतात. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आपणाला थोडे भारताच्या धार्मिक इतिहासात डोकावून पाहावे लागेल.
       भारताचा धार्मिक इतिहास हा श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती यांच्या संघर्ष व समन्वयाचा इतिहास आहे. आर्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या श्रमण संस्कृतीला परास्त करण्याचा प्रयत्न आर्य ब्राह्मणांनी वेद वाङ्ममयाच्या माध्यमातून केला. समाजाची ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा चार वर्णांत विभागणी केली. त्रैवर्णिकांची सेवा हे शूद्रांचे विहित कर्तव्य सांगितले. वैदिकांना प्रखर विरोध करणारे वर्णव्यवस्थेच्या बाहेर राहिले. त्यांना अस्पृश्य ठरविण्यात आले.
       श्रमण संस्कृतीचा जोरदार पुरस्कार इ. स. पू. पाचव्या शतकातील आजीवकांपासून सांगितला जातो. मंखलीपुत्र गोशाल याने त्याची स्थापना केल्याचे मानले जाते. परंतु या गोशाला पूर्वीही अनेक आजीवक अस्तित्वात असावेत. सम्राट अशोकाचा नातू दशरथाने आजीवकांना सात गुंफा दान दिल्याचे उल्लेख आहेत. श्रमण हा शब्द अर्धमागधीत समण असा आढळतो. 'समणे भगवं महावीर' असे जैन ग्रंथात उल्लेख आहेत. तसेच शमण असाही उल्लेख आढळतो. यावरून श्रम करणारे, समानता जोपासणारे आणि शांतता प्रस्थापित करणारे असे तीन गुण श्रमणांचे सांगता येतील.
       जैन आणि बौद्ध या दोन्ही परंपरा श्रमण संस्कृतीच्या आहेत. त्यांनी श्रम आणि श्रमिक या दोहोंप्रती सन्मान व आदर भाव जोपासला. त्यामुळे आजही आपणास बौद्ध पाली वाङ्ममयात अनेक श्रमिक कारागिरांचा आदरपूर्वक उल्लेख आढळतो. "इंद्रियनिग्रह, अपरिग्रह, आत्मशुद्धी, अहिंसा यांना महत्त्व देणारी श्रमण संस्कृती आहे," असे अ. र. कुलकर्णी म्हणतात.
      आजीवक, जैन-बौद्ध यांचा प्रभाव नष्ट केल्यानंतर वैदिकांनी पुन्हा वर्णव्यवस्थेला दृढमूल केले. नंतरच्या काळात जातिव्यवस्थाही निर्माण झाली आणि ती टिकवण्यासाठी गीता, मनुस्मृती अशा ग्रंथांचा मोठ्या खुबीने वापर केला गेला. इ. स. पू.२०० ते इ. स. २०० या काळात गीता, मनुस्मृती, ब्राह्मण ग्रंथ, इतर स्मृतिग्रंथ यांची नवी संस्करणे निर्माण झाली. त्यामुळेच गीतेत श्रीकृष्णाच्या वाणीतून 'चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।'(४.१३) अशी मांडणी झाली. ब्राह्मण परंपरेत ब्रह्म जाणणे, ब्रह्म प्राप्ती याला प्रचंड महत्त्व दिले गेले आणि ते आजही तसेच आहे. मात्र 'बह्म जाणाति स: ब्राह्मण:।' असे म्हणून एक विशेषाधिकार प्रस्थापित केला गेला. इतरांनी ब्राह्मण जे सांगतील त्याचे पालन करावे असा दंडक केला गेला. त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम बहुजनांवर झाला.
       विविध व्यवसाय करणाऱ्या कारागिरांचे वर्ग जातीत बंदिस्त झाले. त्यामुळे श्रमिकांची विभागणी झाली. इथे फक्त श्रमिकांची विभागणीच झाली असे नव्हे, तर त्यांच्यात उच्चनीच भाव रुजविला गेला. क्रमिक असमानतेची उभी उतरंड अस्तित्वात आली. मुळात वर्णव्यवस्थेने प्रत्येक वर्णाला विहित कर्मे सांगितली होतीच. त्यांचे आचरण अपरिहार्य होते. 'अगा स्वधर्मु हा आपुला। जरी का कठीणु जाहला। तरी हाचि अनुष्ठिला। भला देख।।'(ज्ञानेश्वरी ३२१९) ही समाजमान्यता होती. 'म्हणौनि आणिकांसी जे विहित। आणि आपणपेया अनुचित। ते नाचरावें जरी हित। विचारिजे।।' (ज्ञानेश्वरी ३.२२) हा दंडक होता. पुढे जातिव्यवस्थेत जात आणि व्यवसाय यांचे समीकरण दृढ बनले. कामाच्या स्वरूपानुसार माणसाचे मोल ठरत गेले. एकूणच कुणबी-शिंपी-सोनारांपासून मांग-महार-चर्मकारांपर्यंत सर्वांनाच दुय्यम आणि हीनदीन ठरविण्यात आले. शिक्षण, शस्त्र धारण आणि व्यवसाय बंदी यांमुळे आत्मविश्वासाचा अभाव, कौशल्य विकासाला मज्जाव, बौद्धिक पंगत्व आणि न्यूनगंड लादला गेला. स्वजाती व्यवसाय सोडून इतर जातींचे व्यवसाय स्वीकारणे हा धार्मिक अपराध होता. वरिष्ठ जातींनी कनिष्ठ जातींचे व्यवसाय स्वीकारू नयेत. कारण त्यामुळे कमीपणा येतो. आपद्धर्म म्हणून क्वचित अपरिहार्यपणे असे करण्याची मुभा होती. मात्र कनिष्ठ जातींना आपद्धर्म म्हणूनही वरिष्ठाचे व्यवसाय स्वीकारण्याचा परवानगी नव्हती. चुकून एखाद्याने वरिष्ठांचा व्यवसाय स्वीकारला तर त्याला भयंकर शिक्षा होती. त्यामुळे बहुजन समाज हा शबल आणि दिशाहीन बनला.
       अशा पार्श्वभूमीवर श्रमण संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य प्रथम बसवण्णांच्या लिंगायत संप्रदायाने केले. त्यांनी जातीय उच्चनीचता व भेदभाव नाकारला. आचरण व अनुभवाला महत्त्व दिले. अनुभवमंटपाची स्थापना करून तिथे सर्व जातीतील अनुभवी जाणत्यांना सन्मानाचे स्थान दिले. त्या सर्वांचे अनुभवाचे बोल 'वचन साहित्य' म्हणून संग्रहित केले. हे करताना श्रेष्ठत्व मिरवणार्‍या संस्कृतला नाकारून कन्नड भाषेतून चर्चा, विचारमंथन व वचन साहित्य निर्मिले. 'कायकवे कैलासु' असा सिद्धांत मांडून कायक म्हणजे श्रम/व्यवसाय हाच कैलास प्राप्तीचा मार्ग सांगितला. विविध व्यवसायांचे गौरवीकरण केले. एका वचनात बसवण्णा म्हणतात,
      मेलेल्या गायीचे कातडे काढतात आमचे मादार चन्नय्या
      मेलेल्या वासराचे कातडे काढतात आमचे ढोर कक्कया
     मलीन वस्त्रे धुतात आमचे मडिवाळ माचय्या
     त्या दोघा-तिघांना मागेल ते देतात कुडलसंगमदेव
या विविध जातीच्या लोकांशी स्वतःचे जैविक ऋणानुबंध आहेत, असेही बसवण्णा एका वचनात घोषित करतात. ते म्हणतात,
     वडील माझे मांग चन्नय्या
     आजोबा माझे ढोर कक्कया
     पणजोबा माझे चिक्कय्या
     भाऊ माझा किन्नरी बोमय्या
     मला तुम्ही कसे ओळखत नाही कुडलसंगमदेवा?
या वचनात आलेला चिकय्या हा बसवण्णांवर घातलेला मारेकरी होता. त्याने हत्येची सुपारी तर घेतली, पण गावात आल्यावर त्याने जे ऐकले, पाहिले त्यावरून त्याला बसवण्णाच्या थोरपणाची प्रचिती आली आणि तो शिवशरण झाला. असा आपला मारेकरी, मातंग, ढोर, किन्नर हे सगळे नातलग आहेत, असे मानणे हेच एक क्रांतिकारक पाऊल होते. ही सगळी माणसं समान योग्यतेची, समान दर्जाची होती. बसवण्णांनी निसंकोचपणे त्यांच्या व्यवसायासह त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले. म्हणूनच ते एका वचनात म्हणतात,
     श्रीयाळाला शेट्टी (व्यापारी) म्हणू शकतो का?  
     माचय्याला धोबी म्हणू शकतो का?
     कक्कय्याला ढोर म्हणू शकतो का?
     चन्नय्याला मांग म्हणू शकतो का?
     मी स्वतःला ब्राह्मण म्हणालो तर कुडलसंगम हसतो देवा!
या सगळ्यांकडे विशिष्ट जातीचा किंवा विशिष्ट काम करणारा म्हणून न पाहता माणूस म्हणून समत्व भावनेने पहावे, असे बसवण्णांना वाटते. इतकेच नव्हे तर ते एका वचनात देवाला उद्देशून असे म्हणतात, की हे देवा, तू तुझे गोत्र मादार चन्नया, डोहर कक्कया का सांगत नाहीस?
     बसवण्णांनी आपल्या विचारातून, तत्त्वज्ञानातून आणि कृतीतून वैदिकांच्या विरोधात जहाल भूमिका घेतली. पुढे जाऊन आंतरजातीय विवाह ही घडविला. हा आक्रमक बंडखोरपणा मान्य न झाल्याने वैदिक धर्म पंडितांच्या सांगण्यावरून बिज्जल राजा सोविदेव रायमुरारी याने बसवण्णांच्या शरणांच्या विरोधात आघाडी उघडली. परिणामी अनेक लिंगायत अनुयायांच्या कत्तली होऊन त्यांना परागंदा व्हावे लागले.
     लिंगायतांच्या उदय ऱ्हासाचा, कार्यपद्धतीचा आणि तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव पुढे वारकरी संप्रदायावरही पडला. आद्य संत नामदेवराय यांनी वारकरी संप्रदायाची ज्ञानदेवांच्या साहाय्याने पायाभरणी केली. तेव्हा त्यांनी वैदिकांशी थेट संघर्ष टाळला. परंतु वैदिक परंपरेला शह देतच आपली वाटचाल सुरू केली. 'जरी वेदें बहुत बोलिलें। विविध भेद सूचिले। तऱ्ही आपण हित आपुलें। तेंचि घेपे।।', असे ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. 'न पढावे वेद, नको शास्त्रबोध, नामाचे प्रबंध पाठ करा।' असे म्हणत नामदेवांनी 'नामवेद' स्थापिला.
     संत नामदेवांचा हा नवा भक्तिमार्ग रंजल्या-गांजल्यांसाठी होता. अधिकार विहीन लोकांसाठी होता. स्त्री शूद्रातिशूद्रांसह सर्वांना खुला होता. परंतु समाजातील तळच्या लोकांमध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाची पेरणी करणे आवश्यक होते. ही भक्ती म्हणजे टाळकुट्यांची संसार विन्मुख होऊन केलेली उपासना नव्हती. उलट 'अवघाची संसार सुखाचा करीन' असा आश्वासक स्वर होता.
     अगा येऊनिया संसारा। नवजावे आणिकांच्या द्वारा।
     इष्ट मित्र सज्जन सोयरा। बंधु आदिकरून।
     नाम विक्रयो न करावा। दान प्रतिग्रहो न घ्यावा।
     कष्टें करुनी मेळवावा। तोचि ग्रास आपुला।।
असा संत नामदेवांचा स्पष्ट निर्देश होता. त्यामुळे व्यवसाय सोडायचा नव्हता. उलट न्यूनगंड टाकून आत्मविश्वासपूर्वक भक्तीच्या प्रांगणात पाय टाकायचा होता. वैदिक ब्राह्मणी परंपरेने शूद्रांचे विहित कर्म  त्रैवर्णिकांची सेवा असे सांगितले होते. परंतु वारकरी संतांनी आपल्या व्यवसायाचा आणि व्यावसायिक परिभाषेचा वापर लोकांच्या हितासाठी, ज्ञानदीप लावण्यासाठी केला.
     आम्ही परीट चोखट शुद्ध केले नटखट।
     बोध साबण लावूनी ठायीं डाग उडविला पाही।।
असे नामदेवराय एका अभंगात म्हणतात. स्वतःची जात, व्यवसाय आणि अंगीकृत कार्य यांचे उत्तम रूपक नामदेवरायांनी दुसऱ्या एका अभंगात रचले आहे.
     सिंपियाचें कुळी जन्म माझा जाला।
     परी हेतु गुंतला सदाशिवीं।।
     रात्रिमाजीं सिवी दिवसामाजी सिवी।
     अराणूक जीवी नोव्हे कदा।।
     सुई आणि सुतुळी कात्री गज दोरा।
     मांडिला पसारा सदाशिवीं।।
     नामा म्हणे सिवीं विठोबाची अंगीं।
     म्हणोनिया जगी धन्य जालों।।
येथे श्री विठ्ठलाचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी, लोकांसमोर मांडण्यासाठी झटत राहिलो असे नामदेव सूचित करतात. पारंपरिक व्यवसाय आणि सेवादास्य या निर्बंधांना ओलांडून या संतांनी आपले कार्यक्षेत्र अधिक व्यापक केले. ज्ञानाचे, उपासनेचे प्रतिबंधित क्षेत्र त्यांनी ओलांडले. परिणामी सगळ्या संतांना अपमान, शिक्षा यांना सामोरे जावे लागले. परंतु नामदेवरायांनी जाती व्यवसाय गौरविकरणाचा जो संकेत घालून दिला, तो इतर संतांनी पाळला. ज्ञान आणि अध्यात्माच्या क्षेत्रातली बंदी धुडकावून वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेशी विद्रोह केला. एक नवी श्रमण परंपरा जोपासली.
     त्यामुळेच 'कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी।' म्हणत सर्व पिकांत आणि शेतमळ्यात विठ्ठलाला पाहणाऱ्या संत सावता माळी यांनी एका अभंगात म्हटले आहे,
     आमची माळीयाची जात। शेत लावू बागाईत।
     आम्हा हाती मोट नाडा। पाणी जातें फुलझाडा।
     शांति शेवंती फुलली। प्रेम जाई-जुई व्याली।
     सावतानें केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।।
शेतमळ्यात आणि कामात देव पाहणाऱ्या सावतोबांनी अवघ्या चराचरात ईश्वर व्यापिला आहे, ही अनुभूती स्वतः घेतली आणि आपल्या समोर मांडली. त्याच पद्धतीने विठ्ठल नामात  तल्लीन झालेले गोरोबा काका चिखल तुडविता तुडविता नामसंकीर्तन करतात. 'मृत्तिके माझारी' नाचणाऱ्या या संताचे वर्णन
     कुलालाचे वंशी जन्मले शरीर।
     तो गोरा कुंभार हरिभक्त।।
असे केलेले आढळते. एकाच वेळी पारंपरिक व्यवसाय आणि भक्तिसाधना यांचा सुरेख संगम येथे झालेला दिसतो.
     संत नरहरी सोनार यांनी आपल्या अभंगात आपल्या व्यवसायाचे बहारदार रूपक रचलेले दिसते. ते म्हणतात,
     देवा तुझा मी सोनार। तुझे नामाचा व्यवहार।।  
     देह बागेसरी जाणे। अंतरात्मा नाम सोनें।।
     त्रिगुणाची करुनी मुस। आंत ओतिला ब्रह्मरस।।
     जीव शिव करुनी फुंकी। रात्रंदिवस ठोकाठोकी।।
     विवेक हातवडा घेऊन। कामक्रोध केला चूर्ण।।
     मन बुद्धीची कातरी। रामनाम सोनें चोरी।।
     ज्ञान ताजवा घेऊन घेऊन हातीं। दोन्ही अक्षरे जोखिती।।
     खांदा वाहोनी पोतडी। उतरला पैलथडी।।
     नरहरी सोनार हरीचा दास। भजन करी रात्रंदिवस।।
सोनारकामातील सगळी साधने येथे भक्तिमार्ग  घडविण्यासाठी वापरलेली दिसतात. जीवशिवाची फुंकणी, विवेकाचा हातवडा, बुद्धीची कातरी अशा अनेक साधनांचा वापर येथे झालेला दिसतो.
     संत सेना महाराज आपल्या व्यावसायिक प्रतिमांच्या माध्यमातून संतांचे कार्य, जबाबदारी यांचे दर्शन घडवितात.
     आम्ही वारिक वारिक। करू हजामत बारीक।।
     विवेक दर्पण आयना दाऊं। वैराग्य चिमटा हालवू।।
     उदक शांती डोईं घोळू। अहंकाराची शेंडी पिळू।।
     भावार्थाच्या बगला झाडूं। काम क्रोध नखें काढूं।।
     चौवर्णा देऊनी हात। सेना राहिला निवांत।।
     तर जगद्गुरु तुकोबांनी आपण कुणबी असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. 'बरा देवा कुणबी केलो। नाही तरी दंभेचि असतो मेलो।।' असे ते म्हणतात. 'शेत करा रे फुकाचे। नाम विठोबारायाचे।।' असेही ते म्हणतात.
     बीज पेरी शेती। मग गाडेवरी वाहाती।।
     वाया गेले ऐसे दिसे। लाभ त्याचे अंगी वसे।।
     पाल्याची जतन। तरी प्रत्याय येती कण।।
     तुका म्हणे आळा। उदक देता लाभे फळा।।
असा एक रूपकात्मक अभंग तुकोबांनी रचला आहे. त्यांच्या अनेक अभंगातून कुणबी असण्याचा आणि शेतीच्या कामकाजाचा दाखला येतो. शेतीतील दृष्टांत देऊन ते भक्तिमार्ग धरण्याचा उपदेश देतात.
     संत संताजी जगनाडे यांनी आपल्या व्यवसायिक परिभाषेचा वापर करीत जाती विहीन समतेचा पुरस्कार केलेला दिसतो. ते म्हणतात,
     सगुण हा घाणा घेऊनि बसलों।
     तेली जन्मा आलों घाणा घ्याया।।
     नाहीं तर तुमची आमची एक जात।
     कमी नाहीं त्यांत अणुरेणू।
     संतु म्हणे जाती दोनच त्या आहे।
     स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे।।
प्रत्येक जातीच्या व्यक्तींचा अणू रेणू सारखाच आहे, असा अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन संत संताजी जगनाडे यांनी येथे मांडला आहे. स्त्री आणि पुरुष इतक्या दोनच जाती आहेत, बाकी सगळे समान असेच ते सुचवितात. अनेक संतांनी जात व व्यवसायाचा प्रभावी वापर करून नवा विचार रुजविला आहे. आपला पारंपरिक व्यवसाय न सोडता आत्मविश्‍वासाने ताठ मानेने उभे राहण्याचा आणि समत्व बोधाचा संदेश दिला आहे.
     अर्थात सगळ्याच संतांनी जात व्यवसायाचा गौरवपूर्ण उल्लेख केला असला, तरी काहींनी जातीच्या जाचाकडेही लक्ष वेधले आहे.
     आमुची केलीं हीन याती। तुज कां न कळे श्रीपती।।
     जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।। असा रोकडा सवाल कर्ममेळा एका अभंगात करतो. 'स्वधर्मे निधनं श्रेय परधर्म भयावहः।' हा गीतेचा संदेश वारकरी संतांनी पाळलेला नाही. बंडखोरी करत ज्ञानार्जनाचे नवे मार्ग त्यांनी चोखाळले. दाण दक्षिणा मागून जगण्यापेक्षा कष्ट करून जगलेले चांगले, असे संतांना वाटते. 'भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जीणे लाजिरवाणे।।' असे तुकोबा म्हणतात. तुकोबांच्या प्रभावातूनच महात्मा फुलेंनी 'जळो जळो तुमचे जीणे। उद्योगा आधी ताजे खाणे।।' असे म्हटले होते.
     याचा एक अर्थ असा की संतांनी श्रमाला, कष्टाला अधिक महत्त्व दिले आहे. नामदेवरायांनी स्वकष्टार्जित मिळकत तेवढीच आपली, असे म्हणणे आणि तुकोबांनी भिक्षापात्राचा धिक्कार करणे, यातून एक वैचारिक वर्तुळ पूर्ण होते. 'उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी', असे तुकोबा म्हणतात, ते याचमुळे!
     मूळच्या व्यवस्थेत जात हे शोषणाचे साधन होते. संतांनी त्याच जातीला संघर्षाचा, आत्मविश्वास पूर्वक मिरवण्याचा नवा आयाम दिला. वारकरी संतांनी अभंगातून स्वतःच्या जातव्यवसायाचा आणि अनुभवसिद्ध भक्तिमार्गाचा उच्चार केला. त्यामध्ये जातीच्या अभिमाना पेक्षा कष्ट करून खातो हा स्वाभिमान महत्त्वाचा होता. कोणताही व्यवसाय हलका नाही आणि व्यवसायामुळे कोणत्याही व्यक्तीला कमीपणा येत नाही, हेच संतांना बिंबवायचे होते. इतकेच नव्हे तर वारकऱ्यांचा विठ्ठल स्वतः सगळ्या संतांची कामे करतो. नामदेवांच्या घरी घरकाम करणाऱ्या दासी जनी सोबत तो जाते ओढतो, मुसळ घेऊन कांडण करतो, धुणे धुतो, शेणी वेचतो.
     'झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।।
     पाटी घेऊनी डोईवरी। नेऊनियां टाकी दूरी।।
     ऐसा भक्तीसी भुलला। नीच कामे करू लागला।।
असे वर्णन जनाबाईने एका अभंगात केले आहे. कोणतेही काम हलके नाही. कमी दर्जाचे नाही. हे बिंबवणाऱ्या अनेक मिथक कथा संतांनी रचल्या. त्यामुळेच तर दासी असणारी जनाबाई ही संत नामदेव उत्तर भारतात गेल्यावर वारकऱ्यांचे नेतृत्व करू लागली. अत्यंत आत्मविश्वासाने 'डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी।।' म्हणू लागली. संतांच्या या मांडणीमुळे जाती निर्मूलन झालेले नाही, की जातीचा वृथा अभिमान बळावला नाही. तर जातीचे चिरेबंद ढिले झाले. नामदेवांनी सुरू केलेल्या गोपाळकाल्यामुळे सहभोजन सुरू झाले. आत्मविश्वास दुणावला. विचारांची देवाण-घेवाण झाली आणि कर्मकांडाची फोलकटे गळून पडली. संतांनी स्वतःच्या आचरणाने एक आदर्श लोकांपुढे उभा केला. 'आधी केले, मग सांगितले' असे वर्तन करणारे संत शुद्धाचरण, चराचरांकडे पाहण्याचा समभाव आणि एकविध भक्ती या माध्यमातून नवा विचार रुजवू  लागले. म्हणूनच फक्त लोकाश्रयावर वाढलेला हा वारकरी संप्रदाय श्रमण परंपरेशी नाते जोडत वर्धिष्णु होत राहिला आहे.

               डॉ. श्यामसुंदर मिरजकर
       कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
            ता. खटाव, जि. सातारा

टिप्पण्या

  1. वारकरी संप्रदायाचे महत्त्व,विचार विनिमय, संस्कृती याबाबतचे वर्णन अतिशय उत्कृष्टरित्या मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर लेख
    अभिनंदन !!
    हाच विषय पीएचडी साठीही होईल .

    उत्तर द्याहटवा
  3. भारतीय संस्कृतीतील मूळ श्रमण परंपरेचा नेमका वेध, या संदर्भातील जैन व बुद्ध विचारपरंपरा, पण पुढे आर्यांची याकडे पाहण्याची हिणकस दृष्टी, त्यामुळे श्रमण परंपरेचे झालेले अधःपतन, पुन्हा तिच्या पुनरुज्जीवणासाठी लिंगायत संप्रदाय, वारकरी संप्रदायानी केलेले काम, नवविचारांचं दिलेलं अधिष्ठान आणि त्यातून पुन्हा श्रमण परंपरेचे महत्त्व व आजच्या काळाच्या अनुषंगाने त्याची प्रस्तुतता याविषयी चिकित्सक मांडणी प्रस्तुत लेखात आली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. श्रमणपरंपरेला संतांशी जोडणारा लेख

    उत्तर द्याहटवा
  5. अप्रतिम मांडणी केली आहे... वर्तमान पिढीला ख-या संतसाहित्याची ओळख होणं नितांत गरजेचं आहे...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)