वीर वारीकर संत नामदेव - डॉ. श्यामसुंदर मिरजकर

*वीर वारीकर संत नामदेव*

     महाराष्ट्र भूमीत प्रवर्तित झालेला वारकरी संप्रदाय म्हणजे प्रगल्भ बंडखोरीचा नवा आयाम! सगळे संत हे या वारकरी पंथाचे शिल्पकार! समाजाच्या बहिष्कृत जात वर्गातून हे संत पुढे आले. स्वतःच्या अलौकिक प्रज्ञेने त्यांनी नवा आचार-विचार दिला. त्याला वास्तव अनुभवाची जोड दिली. जनसामान्यांची दिशाभूल करणारे, शोषण करणारे कर्मकांड, धार्मिक आचार-विचार त्यांनी नाकारले. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा, ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य जर श्रमजीवी बहुजनांना अज्ञानी अपात्र ठरवून धर्मक्षेत्राच्या बाहेर ठेवत असेल आणि त्यांना त्रैवर्णिकांची सेवा करा हाच तुमचा विहित धर्म आहे, असे सांगत असेल, तर ते नाकारणेच हिताचे असा विचार करून स्वतःचा स्वतंत्र उपासना मार्ग निर्माण करणे श्रेयस्कर, असे या संतांनी मानले. त्यातून श्री विठ्ठल हे दैवत, पंढरी हे क्षेत्र, चंद्रभागा हे तीर्थ यांना प्रमाण मानणारे वारकरी घडले. या वारकरी संप्रदायातील आद्य संत म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव महाराज होय.
         वस्तुतः श्री विठ्ठल हा गोपजनांचा देव. पंढरपूरचा प्राचीन उल्लेख इ.स.५१६ च्या ताम्रपटात पांडरंगपल्ली असा आढळतो. संत नामदेव व संत ज्ञानदेव या दोघांच्या कुटुंबात पूर्वापार श्री विठ्ठलाची उपासना सुरू असल्याचे दिसते. म्हणजेच श्री विठ्ठल आणि पंढरपूर हे विकसित होत चाललेले तीर्थक्षेत्र होते. संतांनी या दैवताच्या उपासनेचा नवा आचारधर्म घडविला. नव्या मिथक कथा रचल्या. देवाचे भक्तवत्सल रूप घडविले. श्री विठ्ठल आणि पंढरी माहात्म्य रचले. वारकऱ्यांचे विधिनिषेध ठरविले. त्यातूनच हळूहळू हा संप्रदाय नावारूपास आला. लोकप्रिय झाला.
      कोणत्याही धर्मात विशिष्ट काळात नवा संप्रदाय का सुरू होतो? त्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या विशिष्ट काळात धर्माला आलेली अवकळा. धर्मामध्ये निर्माण झालेले साचलेपण. आणि धर्माच्या नावाखाली माजलेली कर्मकांडाची बजबजपुरी. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या काळात महाराष्ट्रावर रामदेवराय यादवांचे राज्य होते. ते इ. स. १२७१ ते १३१० असे दीर्घकाळ चालले. त्या काळात हिंदू हा शब्दच प्रचलित नव्हता. तो नंतर मुस्लीम राजवटीत रूढ झाला. तर त्या काळातील महाराष्ट्राचा मुख्य धर्म हा वैदिक धर्म होता. त्याला वर्णाश्रमधर्म, ब्राह्मण धर्म, श्रौतस्मार्त धर्म असेही म्हटले जात होते. वेद वाङ्मयाला प्रमाण मानून यज्ञ, व्रत, उद्यापने यांच्या माध्यमातून धर्माचरण होत होते. याकाळी रामदेवराय यादवांच्या दरबारात प्रधान असणाऱ्या हेमाद्री पंडिताने 'चातुर्वर्गचिंतामणी' हा एका वर्षात करावयाची २००० व्रते सांगणारा व्रतकोश रचला. अशाच प्रकारचा 'कृत्य कल्पतरू' हा ग्रंथ भट्ट लक्ष्मीधराने रचला. वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेचे नियम कडकपणे पाळले जात होतेच. त्यासाठी 'मनुस्मृति' बरोबरच 'याज्ञवल्क्य स्मृती' आणि विज्ञानेश्वराने लिहिलेला 'मिताक्षरा' हा ग्रंथ आधारभूत होता. त्यामुळेच अाश्रमव्यवस्थेचा नियम मोडणाऱ्या ज्ञानदेवांच्या माता-पित्यांना देहदंडाची शिक्षा धर्मसभेने दिली होती आणि या कुटुंबाला ब्राह्मण ज्ञातीतून बहिष्कृत करून त्यांचा दर्जा अस्पृश्यांपेक्षा खालचा 'चांडाळ' असा ठरविला होता.
        या पार्श्वभूमीवर पंढरपुरातून नव्या संप्रदायाची सुरुवात संत नामदेवांनी केली. त्यांनी प्रारंभी देव, जग आणि उपासना या बाबतीत वैदिक ब्राह्मण, शास्त्री, पंडित, पुराणिक, हरिदास यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही त्यांचे समाधान करू शकले नाही. (नामदेव गाथा अभंग क्र. १५८४) त्यानंतर त्यांनी स्वतःची स्वतंत्र उपासना पद्धत निर्माण केली. "माझिया मने मज उपदेश केला। तो मज बिंबला हृदयकमळी।।" असे ते एका अभंगात म्हणतात. विठ्ठल मंदिरात तासनतास बसल्यावर त्यांना भावतंद्री लागत होती. ते विठ्ठलाच्या रूप गुणाचे वर्णन करत होते. त्यातून मराठीत प्रथमच अभंग निर्मिती नामदेवांनी केली. त्याला चाल लावून ते गाऊ लागले. मग सामुदायिक भजन सुरू झाले. नंतर अभंगाचा अर्थ स्पष्ट करणारी वारकरी कीर्तनाची पद्धती त्यांनी सुरू केली. हे करताना त्यांना प्रथम पारंपरिक मान्यताना छेद द्यावा लागला. स्त्रीशूद्रातिशूद्रांना नीच, बुद्धिहीन ठरविणारे वेद, स्मृतिग्रंथ यांना बाजूस सारण्याची भूमिका नामदेवादी संतांनी स्वीकारली. वैदिक परंपरेत महत्त्वाचे मानलेले यज्ञ मंत्र दान सोवळेओवळे यांना नाकारणारी त्यांचे महत्त्व कमी करणारी भूमिका नामदेवांनी घेतली. दुसऱ्या बाजूला नामसंकीर्तनाला वेदांचा दर्जा दिला. वर्णजाती श्रेष्ठत्व नाकारून शुद्धाचरण असणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला भक्तीचा अधिकार बहाल केला.

*याज्ञिका सबळ अभिमान*
       वैदिक परंपरेने यज्ञाला सर्वश्रेष्ठ उपासना ठरविली आहे. परंतु वारकरी संतांनी यज्ञयागादी क्रिया बाजूस सारून त्यांना नामजपाचा पर्याय दिला आहे. संत नामदेवांनी कृष्णलीला वर्णनाच्या काही अभंगात यज्ञाचे वर्णन केले आहे. (ना.गा. अभंग क्रमांक १३०-१३४) या अभंगातून एक कथाकाव्य निर्मिले आहे. वनात यज्ञ करणारे ब्राह्मण प्रत्यक्ष श्रीकृष्णाला भोजन देत नाहीत. परंतु यज्ञात मात्र तूप, धान्य जाळतात. तेथे गेलेले गोपाळ परस्परांशी बोलू शकत नाहीत. कारण ते शूद्र आहेत. "पडे प्रायश्चित्त बोलू नका कोणी। ऐकू नये कानी शब्द यांचा।।" असे ते परस्परांना म्हणतात. हे ब्राह्मण 'स्वर्ग सुखासाठी करिताती यज्ञ।  टाकिती अवदान अग्निमुखे।।' असेही वर्णन नामदेव करतात. गंमत म्हणजे याज्ञिक असल्याचा सबळ अभिमान असणाऱ्या ब्राह्मणांवर त्यांच्या पत्नीही विश्वास ठेवत नाहीत. त्या कृष्णाला भजतात, असे संत नामदेवांनी नमूद केले आहे. म्हणजेच नामदेवांनी रंगविलेला कृष्ण हा यज्ञविरोधी आहे. पुढे गोवर्धन पूजेच्या प्रसंगात हा कृष्ण 'तुझा मोडीला म्या यज्ञ।" असे इंद्राला उद्देशून म्हणताे, असे दिसून येते. संत नामदेवांचे याज्ञिक ब्राह्मणांविषयीचे असणारे अनुभवसिद्ध मत त्यांच्या अभंगातून आले आहे. ते म्हणतात,
     'यज्ञादिक कर्म करुनि ब्राह्मण। दंभ आचरण दावी लोका।
    लोकांसी दाविती मीच कर्मनिष्ठ। अभिमान खोटा वागविती। (१७९२)
या अभिमानी याज्ञिकांना दंभ सोडून नामस्मरणाने वैष्णव होण्याचे आवाहनही नामदेव करतात. कारण 'यजन याजनें जीवाते दंडताती सदा'(१३६१) असा नामदेवांचा अनुभव आहे. म्हणूनच ते म्हणतात,
    न लगे करावे यज्ञयाग। न लगे आणिक मंत्रलाग।
    एक सेविलिया पांडुरंग। अनंत तीर्थे घडतील।। १९५१

*दुर्दुराचे परी जिव्हा वटवटी।*
      वैदिक परंपरेत मंत्रपठनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण वैदिकांच्या मते, सर्व जग हे देवांच्या अधीन आहे. देव मंत्राच्या अधीन आहेत. मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहेत. म्हणून ब्राह्मण हेच माझे दैवत आहे, असे इतर लोकांनी म्हणावे. परंतु वारकरी संत याही गोष्टीला नाकारतात. वारकरी संतांनी मंत्र ज्या भाषेत आहेत, ती संस्कृत भाषाच नाकारली. आणि स्वतःचा भक्तिविचार लोकभाषेत म्हणजेच मराठीत सांगितला. इतकेच नव्हे तर सर्वजनसुलभ असा 'रामकृष्णहरी' हा ओंकार रहित नामघोष मंत्राला पर्याय म्हणून दिला. बऱ्याच वेळेला मंत्रोच्चार करणाऱ्या पुरोहिताला आपण जे म्हणतो आहोत, त्याचा अर्थही कळत नाही. त्यामुळे ते बोलणे व्यर्थ असते, असे नामदेव म्हणतात. म्हणूनच त्यांनी या मंत्र पठनाची तुलना बेडकाच्या डराव डराव ओरडण्याशी केली आहे. "दुर्दुराचे परी जिव्हा वटवटी। सांडोनि हरिगोष्टी आणिक सांगे।।" (१६८३) असे त्यांचे मत आहे.
     'चावळी वटवट बोलणे बासर।
     हे तव अवघे चार मर्कटांचे।। (३१८)
असे त्यांचे प्रतिपादन आहे. कारण 'मंत्रतंत्र दीक्षा सांगतील लक्ष। परी राम प्रत्यक्ष न करी केव्हा।।' असा त्यांचा अनुभव आहे. म्हणूनच
     "नामा परता मंत्र नाही वो आणिक।
     सांगती ते मूर्ख ज्ञान हीन।।'  (३१८) असा त्यांचा उपदेश आहे. म्हणजेच पावित्र्याचे अवडंबर माजवून म्हटल्या गेलेल्या संस्कृत मंत्रांपेक्षा आणि मंत्राचा अधिकार असणाऱ्या द्विजांपेक्षा अार्त भक्तिभावाने केलेले नामस्मरण श्रेष्ठ, असे नामदेव म्हणतात.

*काय वाणू गुण भिकारपणाची*
       वैदिक परंपरेनुसार दान स्वीकारणे हा ब्राह्मणांचा विशेषाधिकार आहे आणि त्यांना दान देणे हे इतरांचे विशेष कर्तव्य आहे. त्यामुळेच आजही सगळ्या मंदिरातील पुरोहित दक्षिणेचा आग्रह धरताना दिसतात. प्रत्येक व्रताच्या उद्यापनाच्या वेळी विविध वस्तू दान म्हणून ब्राह्मणाला द्याव्यात, असे म्हटले जाते. वेगवेगळे पर्वकाळ, ग्रहणकाळ आणि पिडाकाळ ही तर दान दक्षिणा उपटण्याची पर्वणीच होय. खरे तर इथूनच भाविकांचे शोषण सुरू होते. जर सर्व भक्तांनी मंदिरांना आणि भट पुरोहितांना दान देणे बंद केले, तर खूप मोठ्या अंधश्रद्धा संपुष्टात येतील. देवाच्या नावावर चालणारी फसवणूक संपेल. या संदर्भात संत नामदेवांची भूमिका काय होती, हे आपण समजून घेऊ. एका अभंगात संत नामदेव म्हणतात,
   काय आम्हापाशी आहे धन वित्त।
   दान तें उचित देऊ काय।।
   देतां घेतां आम्हा पुरे पुरे झाले।
   संगती त्यागिले भिवोनिया।
   काय वाणूं गुण भिकारपणाची।
   होसी पंढरीची नामनौका।
   नामा म्हणे पुढें दाखवी मारग।
   आम्ही तुज मागें येऊ सुखे।।सोळाशे 29 या अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे की, आमच्या जवळ कितीसे धन-वित्त आहे? त्यामुळे उचित दान आम्ही कसे देणार? असे दान देऊन देऊन आम्हाला पुरे पुरे झाले आहे. त्यामुळे घाबरून आम्ही अशांची संगतच सोडली आहे. त्यांच्या भिकारपणाचे गुण किती वर्णन करू! त्यामुळेच आम्ही पंढरीची नामरूपी नौका या भवसंकटातून तरून जाण्यासाठी धरली आहे. ती पुढे मार्ग दाखवेल आणि आम्ही तिच्या मागे सुखाने येऊ.
   'पद तीर्थ दान हे सर्व कुवाडें।' असेच नामदेवांचे मत आहे. कारण जेव्हा कोणी दानधर्म करत असेल तेव्हा 'धावतात तेव्हा विप्र सगळिक। एकावर एक पडताती!  असेही त्यांचे निरीक्षण आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या वारकरी बांधवांना, कीर्तन-प्रवचनकारांना असा उपदेश केला आहे की
   नाम विक्रयो न करावा। दान प्रतिग्रहो न घ्यावा।
   कष्टें करुनी मेळवावा। तोची घास आपुला।।
       आद्य वारकरी कीर्तनकार संतश्रेष्ठ नामदेवांनी सांगितलेला हा उपदेश आजचे बुवा, महाराज अनुसरतील काय? खरेतर नामदेवांचा भक्तिमार्ग हा डोळस श्रद्धेतून आलेला आहे. या भक्तिमार्गात श्री विठ्ठल हा माय बाप सखा आहे. या विठ्ठलाला भेटण्यासाठी कोणा मध्यस्थाची, कोणत्याही विशेष मंत्राची, दान-दक्षिणेची गरज नाही. सासरी नांदणारी लेक अनिवार ओढीने माहेरी जाते, तसेच या वारकऱ्यांचे पंढरीकडे धावणे आहे. इथे सोवळे-ओवळे नाही, योग तप नाही, शरीराला कष्ट देणे नाही. आहे ती फक्त भावसमृद्धता! मन निर्मळ करणे, आचरण शुद्ध करणे आणि भक्ताच्या भेटीसाठी आसुसलेल्या विठ्ठलाला कडकडून आलिंगन देणे. इतकेच करायचे आहे. म्हणूनच
'ब्राह्मण हो शूद्र वैश्य नारी नर। सर्वांशी आधार नाम सत्य।।' असे म्हणत नामदेव सर्वांना साद घालत आहेत. एक संयमित बंडखोरी करत आहेत. पंढरपूर पासून पंजाब पर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म देत आहेत. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरे जावे लागले. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतवर्षावर अखंडितपणे वाढतोच आहे.

                    डॉ. शामसुंदर मिरजकर
               कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
                     ता. खटाव, जि. सातारा
                     संपर्क : ९४२१२१२३५२



टिप्पण्या

  1. हा नवा पैलु तुम्ही या निबंधात सप्रमाण विवेचन केला आहे

    उत्तर द्याहटवा
  2. तुमच्या लेखनातून नविन माहिती मिळते.
    सुंदर लेख 🙏👍

    उत्तर द्याहटवा
  3. संत नामदेवांची वारकरी संप्रदायासंदर्भातील मूळ भूमिका आपण अत्यंत साध्या, सोप्या भाषेत परंतु थेट नमूद केली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)