ज्यांचे हात मातीचे... (ललित लेख)

ज्यांचे हात मातीचे आज-काल अनेकांच्या दिवसाची सुरुवात प्रियजनांना शुभसंदेश पाठवण्याने किंवा प्रियजनांचे संदेश स्वीकारण्याने होत असते. या शुभसंदेशामागे अनेक अंतःस्थ हेतू असतात. आम्ही सुखरूप आहोत, भल्या पहाटे तुमची आठवण आली किंवा आपला दिवस आनंदात जावो, असे खूप काही स्पष्ट-अस्पष्ट मजकूर या संदेशात दडलेले असतात. भल्या पहाटे, सकाळी किंवा रात्री पाठवल्या जाणाऱ्या संदेश छायाचित्रांकडे बारकाईने पाहिले, तर असे लक्षात येईल की जवळजवळ ७०% संदेशांमध्ये फुलं, पक्षी, झाडं, नदी किंवा समुद्र असतो. म्हणजेच निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याची ओढ प्रत्येकाच्या अंतरंगी असतेच असते. आपले प्रेरक सुविचार निसर्गाची पार्श्वभूमी घेऊन नजरेसमोर येतात तेव्हा ते अधिकच प्रभावी ठरतात. निसर्ग हा नेहमीच आपली प्रसन्नता वाढवितो. चेहर्यावर मधुर स्मित निर्माण करतो. अलीकडे स्वतःचे फोटो काढण्याचे वेड भलतेच जोमात आहे. यातील बहुसंख्य फोटो हे निसर्गाच्या साक्षीने काढलेले असतात. सूर्योदय, रंगीबेरंगी फुले, सुंदर वनराई, तळे, नदी, समुद्र, सूर्यास्त अशा निसर्...