ज्यांचे हात मातीचे... (ललित लेख)
ज्यांचे हात मातीचे
आज-काल अनेकांच्या दिवसाची सुरुवात प्रियजनांना शुभसंदेश पाठवण्याने किंवा प्रियजनांचे संदेश स्वीकारण्याने होत असते. या शुभसंदेशामागे अनेक अंतःस्थ हेतू असतात. आम्ही सुखरूप आहोत, भल्या पहाटे तुमची आठवण आली किंवा आपला दिवस आनंदात जावो, असे खूप काही स्पष्ट-अस्पष्ट मजकूर या संदेशात दडलेले असतात. भल्या पहाटे, सकाळी किंवा रात्री पाठवल्या जाणाऱ्या संदेश छायाचित्रांकडे बारकाईने पाहिले, तर असे लक्षात येईल की जवळजवळ ७०% संदेशांमध्ये फुलं, पक्षी, झाडं, नदी किंवा समुद्र असतो. म्हणजेच निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याची ओढ प्रत्येकाच्या अंतरंगी असतेच असते. आपले प्रेरक सुविचार निसर्गाची पार्श्वभूमी घेऊन नजरेसमोर येतात तेव्हा ते अधिकच प्रभावी ठरतात. निसर्ग हा नेहमीच आपली प्रसन्नता वाढवितो. चेहर्यावर मधुर स्मित निर्माण करतो.
अलीकडे स्वतःचे फोटो काढण्याचे वेड भलतेच जोमात आहे. यातील बहुसंख्य फोटो हे निसर्गाच्या साक्षीने काढलेले असतात. सूर्योदय, रंगीबेरंगी फुले, सुंदर वनराई, तळे, नदी, समुद्र, सूर्यास्त अशा निसर्गसौंदर्यासह स्वतःचे फोटो असावेत, असे प्रत्येकाला वाटते. हिरवळ, डोंगर-दऱ्या, बहरलेली झाडे या सगळ्यांना खूप पसंती मिळते. म्हणजेच कळत-नकळत आपण हे मान्य करतो की आपले छायाचित्र निसर्गाच्या सर्वांगसुंदर सहभागाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.
त्याच बरोबर भक्तिभाव व्यक्त करताना, एखाद्याचे स्वागत व अभिनंदन करताना किंवा मनातील प्रेमभाव व्यक्त करताना आपण फुलांचा वापर करतो. एकंदर निसर्ग हा आपला आनंद द्विगुणित करणारा सखा असतो. असे असूनही आपण निसर्गाच्या फुलण्या, बहरण्याला किती मदत करतो? पर्यावरणाच्या संवर्धनात किती सहभाग देतो? याचे आत्मपरीक्षण करायला हवे. फार पूर्वी बहिणाबाईंनी म्हटले होते,
अंगी नाही बळ
दारी नाही आड
त्याने फुलझाड
लावू लावू नये ।।
आता घराघरात पाणी पोहोचले आहे. तरीही किती घरांच्या अंगणात फुलझाड असते? किती लोक आपल्या घरासमोरच्या रिकाम्या जागेत फुलाफळांची झाडे लावतात? किती जणांच्या परसात पाखरांचा किलबिलाट असतो? आपणाला याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. आपण खरीखुरी जंगले नष्ट करून त्या जागी सिमेंटचे जंगल उभे करत चाललो आहोत. या सिमेंटच्या जंगलात आपला श्वास गुदमरतो. ना मोकळी हवा मिळते, ना सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश. निसर्गातले उत्कट रंग-गंध हरवताहेत. सर्वत्र करडा रखरखीत रंग आणि कृत्रिम गंध जाणवत राहतो. त्यातून अलर्जी सारखे आजार आणि मानसिक ताणतणाव वाढतात.
खरे तर आपणाला जे मनापासून आवडते, आनंद देते, त्याचे जतन संवर्धन करायला हवे. आपल्या घराजवळ, कामाच्या ठिकाणी थोडा थोडा निसर्ग फुलवायला हवा. असे म्हणतात, की ज्यांचे हात मातीचे असतात, त्यांच्याच अंगणात ऋतू फुलतात. त्यांच्याच गाली गुलाब खुलतात. म्हणूनच मातीतून सौंदर्य फुलवण्याची सृजनक्षमता आपण जपली, जोपासली पाहिजे.
काय करू शकतो मी एकटा, असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात येईल. त्यासाठी तुम्हाला एक सत्यकथा सांगतो. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात जाधव मोलाई पयांग हा सामान्य आदिवासी राहतो. १९७९ मध्ये ब्रह्मपुत्रेला प्रचंड पूर आला आणि खूप मोठ्या प्रमाणात सर्प मरून पडले. जोहरात भागात अगोदरच खूप वृक्षतोड झाल्यामुळे वैराण निर्जन प्रदेश तयार झाला होता. त्यावेळी जाधव पयांग हा सोळा वर्षांचा होता. त्याने या जमिनीत झाडं लावायची असे ठरविले. तो वनविभागाकडे मदत मागायला गेला. ते म्हणाले, "या बंजर जमिनीवर काही उगवू शकत नाही." मग त्याने बांबू लागवडीपासून सुरुवात केली. काही स्थानिक वृक्ष लावले. तीस वर्षे तो एकटा झाडे लावत होता. जगवत होता. तीस वर्षात त्याने स्वबळावर १३६० हेक्टर म्हणजे सुमारे १३.६ वर्ग किलोमीटर इतके जंगल तयार केले. त्यामध्ये आज शेकडो वन्यजीव आणि पक्षी परतले आहेत. २००९ मध्ये एका वन्यजीव फोटोग्राफरमुळे ही विलक्षण कहाणी लोकांसमोर आली. पुढे २०१२ मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने जाधव पयांग यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया असे संबोधले. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना अडीच लाख रुपयांची मदत मदत देऊन गौरविले. तर २०१५ मध्ये त्यांना 'पद्मश्री' देण्यात आली. एक सामान्य माणूस आपल्या अथक प्रयत्नातून जंगल उभे करू शकत असेल, तर आपण थोडीशी हिरवाई फुलवू शकणार नाही काय? लांब कशाला साताऱ्याच्या प्रा. संध्या चौगुले यांनी हिरवाई फुलविण्यासाठी सातारा आणि परिसरात शेकडो वृक्ष लावून जगविले. आपण स्वतःच्या किंवा आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून ते जगवण्याचा संकल्प करू शकणार नाही का? किंवा कुणाचे अभिनंदन करताना बुके देण्याऐवजी एखादे फुला फळांचे रोप देऊन 'निसर्गमित्र' होण्याला प्रोत्साहन देता येणार नाही का? आपण यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. एका कवितेत मीच असे म्हटले आहे की,
ज्यांचे हात मातीचे
त्यांचेच बीज रुजते
ज्यांचे अंतःकरण फुलांचे
त्यांनाच गाणे सुचते
डोळ्यात ओल घेऊन
जे पाऊसगाणी गातात
त्यांच्याच अंगणात नेहमी
पाखरं खेळ मांडतात
डोळ्यातली उब ज्यांच्या
फुला-फळात भरते
मधुवंती गोडी त्यांच्या
घरा-दारात झरते
श्वासातला वायू ज्यांच्या
रोपांत प्राण भरतो
तिथे सावली तिथे सुख
तिथेच दरवळ उरतो
हृदये ज्यांची रेशमाची
गगनासम होतात
तिथे येते श्रावणसर
तिथेच वसंत फुलतात
- डॉ श्यामसुंदर मिरजकर
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी (सातारा)
पयांग सारखे प्रयत्न केल्यास ही वसुंधरा नक्कीच ग्लोबल वॉर्मिंग पासून वाचेल.सुंदर लेख.
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर विवेचन.
उत्तर द्याहटवातुम्ही नेहमीच निसर्गाबद्दल अतीव मायेने बोलता... लिहिता. हाहा लेख त्या मायेचे प्रतीक. अतीशय उत्तम.
उत्तर द्याहटवासीमा मुसळे
सुंदर लेख
उत्तर द्याहटवा