चतुरस्र प्रज्ञेचे पत्रकार व संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
चतुरस्त्र प्रज्ञेचे पत्रकार व संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी पत्रकारिता विविध ध्येय उद्दिष्टांनी प्रभावित होती. समाजाच्या बौद्धिक विकासाची लोकहितेच्छू वृत्ती, सामाजिक सुधारणांचा आग्रह, धार्मिक परंपराभिमान व जाज्वल्य देशाभिमान अशा अनेक प्रेरणांनी वृत्तपत्रे निघत गेली. दर्पण (१८३२), मित्रोदय, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, अरुणोदय, प्रभाकर, सुधारक ही लोककल्याणार्थ आणि ज्ञानप्रसारार्थ चालवलेली वृत्तपत्रे! पुढे १८८१ मध्ये केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू झाली आणि देशाभिमानाची दुदुंभी फुंकली गेली. याच पठडीतील गुराखी, राष्ट्रमत, महाराष्ट्र ही पत्रे होती. ती परंपरावादीही होती. 'संदेश'कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी वृत्तपत्रे म्हणजे माहिती आणि वैचारिक वाद-विवाद ही रूढ भूमिका सोडली. अनेक सदरे, विविधांगी वाचनीय मजकूर आणि रंजक साहित्यिक मांडणी यामुळे त्यांचे वृत्तपत्र लोकप्रिय ठरले.
याच कालखंडात सत्यशोधक ब्राह्मणेतर वृत्तपत्रांचे आगमन झाले. सत्सार, दीनबंधू, जागृती, शेतकऱ्यांचा कैवारी, विजयी मराठा, प्रबोधन, राष्ट्रवीर, नवयुग, हंटर, सत्यवादी अशा अनेक नियतकालिकातून परखड व प्रभावी मांडणी सुरू झाली. बहुजन समाजाला जागृत करणे आणि सनातन्यांचे कारस्थान उघड करणे, हे या नियतकालिकांचे धोरण होते. शेतकरी कष्टकरी समाजाची बाजू उचलून धरण्याचा प्रामाणिक प्रयत्न या नियतकालिकांनी केला.
या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांचा मराठी पत्रकारितेत प्रवेश झाला. वर निर्देश केलेल्या अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांचा परिचय हा विशेषत्वाने त्यांनी चालवलेल्या वृत्तपत्रांमुळेच आपणास आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसे नाहीत. जरी डॉ. आंबेडकरांच्या समकाळात अनेक वृत्तपत्रे मराठीत प्रसिद्ध होत असली, तरी खऱ्या अर्थाने अस्पृश्य व बहिष्कृत समाजाची कैफियत मांडणारे, त्यांच्या न्याय हक्क अधिकारांची उद्घोषणा करणारे आणि या समाजातील नवशिक्षितांचे प्रबोधन करणारे एकही वृत्तपत्र नव्हते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१३ मध्ये बी.ए. झाले. त्यांनी १९१३ ते १९१६ या काळात अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले. ते २ जून १९१५ रोजी एम. ए. झाले आणि १९१६ मध्ये त्यांनी आपला पीएच.डी.साठीचा प्रबंध सादर केला. तेथूनच ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स' या संस्थेत प्रवेश घेतला. तिथे त्यांच्या अमेरिकेतील उच्च पदव्यांचा विचार करून त्यांना बी.एस्सी. ऐवजी थेट एम. एस्सी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला. त्याच वेळी त्यांनी 'गेज इन' या संस्थेत बार अॅट लॉ साठी प्रवेश घेतला. परंतु आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण अपुरे सोडून जून १९१७ मध्ये त्यांना भारतात परत यावे लागले. ३१ ऑगस्ट, १९१७ मध्ये त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी पत्करली. परंतु अस्पृश्यतेच्या दाहक अनुभवांमुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली. नंतर त्यांनी मुंबईत येऊन १० नोव्हेंबर, १९१८ ते ११ मार्च, १९२० या काळात सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत नोकरी केली.
डॉ. आंबेडकरांनी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी अविरत धडपड केली. ती कशाकरिता होती? उच्च दर्जाची नोकरी मिळविणे, आर्थिक सुबत्ता व मान मराबत मिळविणे, राजसत्तेतील एखादे पद उपभोगणे असे छोटे उद्दिष्ट त्यांचे कधीच नव्हते. आपल्या अस्पृश्य बहिष्कृत समाजाच्या उन्नतीचे मार्ग शोधणे आणि समाजसुधारणेच्या दीर्घकालीन चळवळीसाठी स्वतःला तयार करणे, यासाठी हे शिक्षण होते. त्यामुळेच पुढे त्यांनी प्राध्यापकी सोडून आपले अपुरे शिक्षण पूर्ण केलेले दिसते.
प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यातील पहिली म्हणजे २७ जानेवारी, १९१९ रोजी साऊथ बरो कमिटीपुढे दिलेली साक्ष! या घटनेने डॉ. आंबेडकरांचा सामाजिक, राजकीय जीवनात प्रवेश झाला, असे मानले जाते. खरेतर प्राध्यापकीच्या सरकारी सेवेत असल्यामुळे त्यांना या कमिटीपुढे आपली भूमिका मांडण्याची संधी मिळणे शक्य नव्हते. परंतु डॉ. आंबेडकरांनी अर्ज विनंती करून ही संधी मिळविली आणि अस्पृश्य वर्गाची बाजू मांडली. यामध्ये त्यांनी लोकशाहीच्या विकासासाठी प्रत्यक्ष लोकसहभागाचे महत्त्व, मताधिकाराचे महत्त्व आदी गोष्टी स्पष्ट केल्या. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली.
डॉ. आंबेडकरांनी प्राध्यापक असताना केलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ३१ जानेवारी, १९२० रोजी सुरु केलेले 'मूकनायक' वृत्तपत्र! त्याच्या पहिल्याच अंकात आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. आंबेडकर लिहितात, "आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रा सारखी अन्य भूमीच नाही." इथे हेही नमूद केले पाहिजे, की जशी डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणास सयाजीराव गायकवाड महाराजांची मदत झाली, तसेच डॉ. आंबेडकरांनी 'मूकनायक'च्या माध्यमातून उभारलेल्या लोकशिक्षणास राजर्षी शाहूमहाराजांनी उदार अंतःकरणाने दिलेल्या २५०० रु. देणगीची मदत झाली. त्यामुळे डॉ. आंबेडकर अस्पृश्यांची जी चळवळ उभी करू पाहत होते, त्याला मुखपत्र मिळाले.
'मूकनायक'च्या शीर्षस्थानी संत तुकारामांच्या अभंगातील काही ओळी डॉ. आंबेडकरांनी घेतल्या होत्या.
काय करू आता धरूनिया भीड
निःशंक हे तोंड वाजविले।।
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण
सार्थक लाजोनी नव्हे हित।।
म्हणजेच मूक समाजाचा कोणीच वाली नसल्यामुळे हे वृत्तपत्र सुरू केले आहे आणि त्यामुळे समाजात मान्यवर असणाऱ्या समर्थांशी आपला संघर्ष अटळ आहे, अशी स्पष्ट जाणीव डॉ. आंबेडकरांना होती, असे दिसते. त्यावेळी तांत्रिक अडचणींमुळे बाबासाहेबांनी पांडुरंग नंदराम भटकर यांना संपादक केले. परंतु या अंकाचे संपादकीय अग्रलेख बाबासाहेब स्वतःच लिहीत होते. पुढे ५ जुलै, १९२० रोजी ते अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा इंग्लंडला गेले. तोपर्यंत 'मूकनायक'चे १२ अंक प्रकाशित झाले होते. त्यापैकी ६ अंक आता उपलब्ध आहेत. यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले, 'स्वराज्याची सर सुराज्याला नाही!', 'हे स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य!', 'स्वराज्यातील आमचे आरोहण, त्याचे प्रमाण व त्याची पद्धती', 'राष्ट्रातील पक्ष' आदी अग्रलेख महत्त्वपूर्ण आहेत. या अग्रलेखाद्वारे अस्पृश्यांचे स्वतंत्र अस्तित्व, त्यांचे प्रतिनिधित्व, त्यांच्या राजकीय सत्तेची गरज आदी गोष्टी आलेल्या दिसतात. त्याचबरोबर या अंकातून राजर्षी शाहू महाराजांच्या उपस्थितीत २१-२२ मार्च १९२० रोजी झालेली 'माणगाव परिषद' आणि ३० मे - १ जून १९२० रोजी नागपूर येथे झालेली 'अखिल भारतीय बहिष्कृत परिषद' यांचे वृत्तांत आहेत. अस्पृश्यांचे स्वतंत्र प्रतिनिधी असावेत आणि ते याच वर्गातून त्याच जनतेच्या मताधिकारातून पुढे आलेले असावेत, या बाबासाहेबांच्या विचारांचा पुनरुच्चार या अंकातून पहावयास मिळतो. या मागणीला राजर्षी शाहूंची सक्रीय साथ होती, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ आंबेडकरांनी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जाताना 'मूकनायक'ची संपादकीय जबाबदारी ज्ञानदेव घोलप यांच्यावर सोपविली. त्यांनी ३१ जुलै, १९२० ते २३ ऑक्टोबर, १९२० या कालखंडात ७ अंक प्रकाशित केले. ते सर्व आज उपलब्ध आहेत. पुढे आर्थिक निधी व अन्य काही कारणांनी हे वृत्तपत्र बंद पडले.
'बहिष्कृत भारत'ची निर्मिती
पुन्हा इंग्लंडला गेलेल्या डॉ. आंबेडकरांनी २० जून, १९२१ रोजी अर्थशास्त्रातील एम. एस्सी. ही पदवी प्राप्त केली. तसेच २८ जून, १९२२ रोजी बॅरिस्टर अॅट लॉ ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा प्रबंध डी. एस्सी. (डॉक्टर ऑफ सायन्स) पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये विद्यापीठात सादर केला. अर्थशास्त्रामध्ये अधिकचे संशोधन करून जर्मनीच्या बॉन या विद्यापीठातूनही डॉक्टरेट प्राप्त करावी म्हणून ते जर्मनीला गेले. तेथे त्यांनी जर्मन भाषा आत्मसात केली. याच दरम्यान डी. एस्सी. प्रबंधात सुचविण्यात आलेल्या दुरुस्त्यांच्या संदर्भाने त्यांना त्यांचे मार्गदर्शक एडविन कॅनन यांनी इंग्लंडला बोलावून घेतले. स्वतः जवळचे पैसे संपत चालल्याने बाबासाहेबांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. ३ एप्रिल, १९२३ रोजी ते भारतात परतले. ऑगस्ट १९२३ मध्ये त्यांनी आपला प्रबंध पुनर्लेखन करून विद्यापीठाकडे पाठविला. तो स्वीकारून नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी. ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांचा प्रबंध डिसेंबर १९२३ मध्ये ग्रंथरूपात प्रसिद्ध झाला. त्यामुळे लवकरच त्यांची अर्थशास्त्र व राज्यशास्त्रातील तज्ज्ञ विद्वान व कायदेपंडित म्हणून ख्याती पसरली. मुंबईच्या उच्च न्यायालयाने ५ जुलैै, १९२३ मध्ये त्यांना वकिलीच्या प्रॅक्टिससाठी अनुमती दिली. त्यानंतर त्यांनी परळच्या दामोदर हॉलमध्ये स्वतःचे ऑफिस उघडून वकिली सुरू केली. मात्र पुरेशी आमदनी नसल्यामुळे त्यांनी 'बाटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूट'मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.
याच दरम्यान बहिष्कृत अस्पृश्य वर्गाच्या उत्थानाचे डॉ. आंबेडकरांचे प्रयत्न सुरूच होते. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेऊन अस्पृश्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा केली होती. ९ मार्च, १९२४ रोजी त्यांनी परेलच्या दामोदर हॉलमध्ये आपल्या सहकाऱ्यांची सभा बोलावून 'बहिष्कृत हितकारणी सभा' स्थापन केली. त्यासाठी 'शिका। संघटित व्हा। संघर्ष करा।' हे ध्येयवाक्य निवडले. अस्पृश्यांना नाकारलेल्या नागरी, धार्मिक, तसेच राजकीय हक्कांबद्दल जागृती घडविणे हा सभेचा उद्देश होता. डॉ. आंबेडकरांनी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिशनकडे पत्र पाठवून मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली. 'बहिष्कृत हितकारिणी सभेच्या' वतीने अनेक ठिकाणी शाळा, वसतिगृहे, ग्रंथालये सुरू करण्यात आली. अनेक परिषदा भरविण्यात आल्या. १९-२० मार्च १९२७ रोजी महाड येथे आयोजित 'कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेवर स्पृश्यांनी हल्ला चढविला. अशा परिस्थितीत सनातनी वृत्तीशी वैचारिक संघर्ष करण्यासाठी आणि मागासलेल्या समुदायाला योग्य दिशादर्शन घडविण्यासाठी स्वतःच्या वृत्तपत्राची गरज आहे, याची प्रखर जाणीव ठळक झाली. त्यातूनच ३ एप्रिल, १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत'चा जन्म झाला. 'बहिष्कृत भारत' हेही पाक्षिक होते. ते ३ एप्रिल, १९२७ ते १५ नोव्हेंबर, १९१९ या कालखंडात चालू राहिले. आर्थिक पाठबळा अभावी ते बंद पडले. परंतु या काळातील चळवळीचा भक्कम आधारस्तंभ म्हणून त्याचे महत्त्व बहुमोल आहे.
या अंकातून विविध परिषदा व सभांची माहिती, विचार विनिमय, विविध विषयसंग्रह, पत्रव्यवहार असा सदरवजा मजकूर असे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे 'आजकालचे प्रश्न' आणि अग्रलेख होय. डॉ. आंबेडकरांच्या तर्कशुद्ध अभ्यासपूर्ण मांडणीचे प्रत्यंतर त्यांच्या अग्रलेखातून येते. ते एकाच विषयाचा विविधांगी विचार करत होते, हे महाडच्या चवदार तळ्याच्या संघर्षावरील अग्रलेखातून दिसून येते. 'महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी' या लेखात त्यांनी अस्पृश्यतेची रूढी कायदे संमत आहे काय? असा प्रश्न उपस्थित करून त्या विरोधातील लाहोर, मद्रास हायकोर्टाच्या निकालाचे दाखले दिलेले दिसतात. तर 'महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी' या लेखात धर्मग्रंथाचे दाखले देत संयमाने उच्चवर्णीय हिंदूंच्या डोळ्यात अंजन घातले आहे. तसेच 'महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी' या लेखात अस्पृश्यांमधील तेज व सत्त्व जागे करण्याचे आवाहन केलेले आहे. या लेखनातील डॉ. आंबेडकरांच्या भाषाशैलीचे वैविध्य बारकाईने अभ्यासावे असेच आहे.
या अंकातील 'आजकालचे प्रश्न' या सदरात महत्त्वपूर्ण प्रश्नांना वाचा फोडलेली आढळते. 'ब्राह्मणेतरांचा लपंडाव', 'सरकार अस्पृश्यता मानते काय?', 'खोट्या साक्षीने खरे सिद्ध होते काय?', 'केसरीचा अगलावेपणा', 'मांग पुढाऱ्यांची परवशता', 'सुशील पदरी असेल तरच सुबुद्धी होईल', 'हिंदू महासभा लुली का पडली?', 'न्यायमूर्ती जातीवर गेले!', 'सर शंकर नायरचा स्त्री वर्गास बोध', 'प्राथमिक शिक्षण परिषद', 'ब्राह्मण सभेतील वादाने काय साधले?', 'जर दोन्हीकडून मार मिळतो तर धर्मांतर बरे नव्हे काय?', 'डॉ. आंबेडकरांची महार वतनावर गदा', 'मनुस्मृती का जाळली?' असे अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले गेलेले दिसतात.
'बहिष्कृत भारत'ने अस्पृश्य वर्गाच्या स्वतंत्र अस्तित्वाला अधिमान्यता मिळवून दिली. हे पाक्षिक एकाच वेळी इंग्रज, स्पृश्य हिंदू व अस्पृश्य समाजबांधव या तिघांची संवाद साधत होते. एक जबरदस्त वैचारिक घुसळण करण्याचे कार्य या पक्षिकाने केले. गावागावात या अंकाचे सामुदायिक वाचन होई आणि अस्पृश्यांना आत्मविश्वास, चैतन्याची लहर आणि नवी दिशा देण्याचे कार्य हा अंक करीत असे. समाजाच्या सर्वच स्तरांना आत्मपरीक्षण करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाई. त्याचबरोबर त्या काळातील घडामोडींचे आणि वैचारिक जडणघडणीचे दस्तऐवजीकरण या अंकाने केले. त्यामुळे बहिष्कृत भारतचे अंक हे आजही अनमोल आहेत.
'मूकनायक'च्या शीर्षस्थानी तुकारामांचा अभंग ठेवून मुक्यांचा आवाज होण्याची भावना बोलून दाखविली होती, तर पुढे 'बहिष्कृत भारत' मध्ये ज्ञानेश्वरीतील ओव्या ठेवून संघर्षाची उद्घोषणा केली गेली. 'आता कोदंड घेऊनि हाती, आरुढ पां इयें रथीं। देईं अलिंगन वीरवृत्ती। समाधाने।।' या ओवीमधील वीर रस 'बहिष्कृत भारत'च्या पानापानात प्रवाहित झालेला दिसेल. जातिभेदाचे समर्थन करणारे आणि सबुरीचा सल्ला देणारे टिळक पंथीय पत्रकार संपादक आणि ब्राह्मणेतर चळवळीतील मुखंड यांच्यावर सडकून टीका 'बहिष्कृत भारत' मध्ये आलेली दिसते. त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रांतात अस्पृश्यांचा चालविला जाणारा अमानुष छळ उदाहरणासहित देऊन त्याचा जाब स्पृश्यांना विचारण्यात आला आहे. 'महार आणि त्यांचे वतन' या अनुषंगाने सलग काही अंकात लेखन करून महारवतन नष्ट करण्याची भूमिका मांडली गेली आहे.
पक्षिक समता
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, त्यांची तर्कशुद्ध प्रागतिक विचारसरणी यांचा प्रभाव तत्कालीन स्पृश्य हिंदूंवरही पडत होता. त्यातील काही बाबासाहेबांच्या कार्यात सहभागी होत होते. महाडच्या चवदार तळ्याच्या संघर्षानंतर हे प्रमाण वाढतच गेले. पुढे देवराव नाईक, भा.र.कद्रेकर, डॉ. आर.एन.भाईंदरकर, एस. एस. गुप्ते अशा अनेक मंडळींच्या सहभागातून 'समाज समता संघा'ची स्थापना ४सप्टेंबर, १९२७ रोजी करण्यात आली. लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत टिळक व रामभाऊ हेही या संघात सामील झाले. या संघाचे मुखपत्र म्हणून 'पाक्षिक समता' २९ जून, १९२८ पासून सुरू करण्यात आले. १५ मार्च, १९२९ पर्यंत त्याचे एकूण १९ अंक प्रकाशित झाले. डॉ. आंबेडकरांच्या पुढाकाराने निघणाऱ्या या अंकाचे संपादक देवराव नाईक होते. त्यांच्या संपादकत्वाखाली निघणारे 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' वृत्तपत्र बंद करून ते समतेचे संपादक झाले. 'समते'चे वर्गणीदार कमीच होते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या 'समता' लवकरच बंद पडू शकले असते. त्यावरील उपाय म्हणून बुडीत फंड नावाने देणग्या जमा करण्याचे आवाहन केले गेले. 'समता' मध्ये डॉ. आंबेडकरांचे लेखन फारसे आढळत नाही. परंतु त्यांच्या प्रभावातील स्पृश्य ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांचे विचार पहावयास मिळतात. समता या संकल्पनेची साधार चर्चा, ब्राह्मणांवरील अविश्वास व त्यास प्रत्युत्तर, सावरकरांशी झालेला वादविवाद असे महत्त्वाचे विषय 'समते'च्या अंकात आलेले आढळतात. त्याचबरोबर राखीव जागांच्या धोरणाचे समर्थन व स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा उद्घोषही येथे आढळतो. 'समता'चे सगळे अंक हे डॉ. आंबेडकरांच्या चळवळीची दिशा व वर्तनव्यवहार स्पष्ट होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
व्यापक चळवळीचे मुखपत्र : जनता
'बहिष्कृत भारत' आणि 'समता' ही दोन्ही पाक्षिके आर्थिक कारणांनी बंद पडली. त्याच दरम्यान देशात सायमन कमिशनचे कामकाज सुरू होते. या सायमन कमिशनला बाबासाहेबांनी एक अहवाल सादर केल्यामुळे काँग्रेसी लोकांकडून अपप्रचाराचे शिखर गाठले गेले. डॉ आंबेडकर गोलमेज परिषदेला जाणार होते. परंतु आपली राजकीय व सामाजिक भूमिका जनतेसमोर मांडणे तितके जरुरीचे होते. गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी मुंबईमध्ये २ ऑक्टोबर, १९३० रोजी एका सभेचे आयोजन करून तेथे डॉ. आंबेडकरांना मानपत्र व थैली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. आंबेडकरांनी आपले बंद पडलेले वृत्तपत्र नव्या नावाने नव्या स्वरूपात सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. या नव्या वृत्तपत्राचे नाव 'जनता' असे राहील आणि त्याचे संपादक देवराव नाईक हेच असतील, असे स्पष्ट करण्यात आले. 'बहिष्कृत भारत' हे एका विशिष्ट समाजाचे तर 'समता' हे एका विशिष्ट सामाजिक विचाराचे वाहक आहे, असे ध्वनित होत होते. त्यामुळे त्या वृत्तपत्रांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे व्यापक लोक समुदाय जोडण्यासाठी व त्यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्न मांडण्याच्या हेतूने हे नवे समर्पक व व्यापक नाव स्वीकारण्यात आले. प्रारंभी २४ जानेवारी, १९३० ते १९ ऑक्टोबर, १९३१ या कालावधीत 'जनता' पक्षिक स्वरूपात सुरू राहिले. या एक वर्षाच्या काळात एकूण २४ अंक प्रकाशित झाले. या अंकातून १९३०-३१ या वर्षातील डॉ. आंबेडकरांच्या कार्याचे, समकालीन प्रश्नांचे विश्वासार्ह दर्शन घडते. 'जनता' च्या प्रत्येक अंकातून सामाजिक, राजकीय, धार्मिक घडामोडींचा धांडोळा घेतला जाई. विविध प्रांतात होणारे अन्याय, अस्पृश्यांच्या सभा, गोलमेज परिषदेच्या वृत्तान्त अशा अनेक महत्त्वाच्या बाबी अंकात आल्या आहेत. 'जनता' हे नि:संशय स्वराज्यवादी असेल. परंतु स्वराज्य म्हणजे मूठभर उच्चवर्णियांचे राज्य नव्हे, तर ते खर्या अर्थाने जनतेचे राज्य असले पाहिजे, या भूमिकेचा पाठपुरावा 'जनता' पत्रांने केला. हे सगळे मुळातून वाचायला हवे, असेच आहे.
पुढे १० डिसेंबर, १९३२ पासून 'जनता' साप्ताहिक स्वरूपात सुरू झाले. ते २८ जानेवारी, १९५६ पर्यंत चालले. डॉ.आंबेडकर यांच्या जीवनाचे व कार्याचे प्रतिबिंब जनताच्या अंकातून दिसत राहिले. आंबेडकरांचा स्वतंत्र मतदार संघासाठी संघर्ष, पुणे करार, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन, आंबेडकरांची राजकीय वाटचाल, मंत्री म्हणून कारकीर्द, संविधान सभेतील प्रवेश व कामकाज, बौद्ध धम्माच्या दिशेने प्रवास अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार 'जनता' राहिले आहे. पुढे जनतेचे संपादक बदलत गेले, परंतु भूमिका बदलली नाही. जनता पत्राने मे १९३३ मध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून एक खास अंक प्रकाशित केला. तोच डॉ. आंबेडकरांवरील पहिला गौरव अंक होय. त्या काळात बाबासाहेबांसोबत अनेक पातळ्यांवर काम करणाऱ्या मान्यवरांनी बाबासाहेबांवर लेख लिहिले. ते या महत्त्वपूर्ण अंकात समाविष्ट आहेत.
'प्रबुद्ध भारत'ची वाटचाल
'जनता' च्या ७ जानेवारी, १९५६ च्या अंकात या अंकाचे नाव 'प्रबुद्ध भारत' असे बदलण्याची घोषणा झाली. या साप्ताहिकाच्या संपादक मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअरमन व भाऊराव गायकवाड, आर. डी. भंडारे, बी. सी. कांबळे हे सदस्य होते. ४ फेब्रुवारी, १९५६ ते १ डिसेंबर, १९५६ या कालखंडात 'प्रबुद्ध भारत'चे ३९ अंक प्रकाशित झाले. त्यामध्ये डॉ. आंबेडकर जयंती विशेषांक, बुद्ध जयंती विशेषांक, धम्मदीक्षा विशेषांक, शाहू विशेषांक आणि महात्मा फुले विशेषांक या पाच विशेषांकांचाही समावेश होतो. ऐतिहासिक धम्मचक्रप्रवर्तनाची पृष्ठभूमी तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य 'प्रबुद्ध भारत'ने केले. डॉ. आंबेडकरांचा धर्मांतराचा प्रवास, त्या संदर्भात लोकांनी उपस्थित केलेले प्रश्न व त्यांची उत्तरे, बौद्ध वाङ्मयाचा परिचय यासंबंधी लेखन अंकातून प्रसिद्ध झालेले दिसते. त्याबरोबरच मुंबई केंद्रशासित ठेवण्याचे राजकारण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, नेहरूंच्या धोरणाचे वाभाडे असे कितीतरी विषय या अंकातून आलेले दिसतात. 'प्रबुद्ध भारत'चे अंक म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या मार्गक्रमणेची दैनंदिनी होय. बहिष्कृत ते प्रबुद्ध अशा विकासाचा दस्तऐवज म्हणूनही त्याकडे पाहता येते.
एकंदर, भारतातील रक्तविहीन सामाजिक क्रांतीचे वाहक आणि साक्षीदार म्हणजे आंबेडकरांची वृत्तपत्रे होत. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत या शीर्षकातूनच हा विकासक्रम स्पष्ट होतो. बाबासाहेबांची पत्रकारिता मूक असणाऱ्या समाजाचा नायक म्हणून उभी राहिली. भारतातच एक मोठी लोकसंख्या असणारा वर्ग बहिष्कृत आहे, याची स्वतंत्र जाणीव एतद्देशीय व परकीय राज्यकर्त्यांना करून दिली गेली. ही बहिष्कृत असणारी लोकसंख्या उद्याच्या स्वतंत्र भारताची 'जनता' असेल आणि ती निश्चितच 'प्रबुद्ध' असेल असा विश्वास बाबासाहेबांच्या लेखणीने या भारतभूमीला दिला. एका प्रचंड मोठ्या मुक्या लोकसमूहाचे रूपांतर शासनकर्त्या जमातीत करण्याचे भव्य दिव्य स्वप्न डॉ. आंबेडकरांनी पाहिले आणि त्याचा राजमार्ग आपल्या लेखनातून आखून दिला. भारतातील कोणत्याही समकालीन नेत्याला/संपादकाला साधता आला नाही, असा चमत्कार त्यांनी बुद्धी, वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून घडविला. म्हणूनच बाबासाहेबांची पत्रकारिता ही एकाच वेळी मानवमुक्तीची आणि नव भारताच्या निर्मितीची गाथा आहे.
प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
ता. खटाव, जि. सातारा ४१५ १०२
दूरभाष : ९४२१२१२३५२
('पत्रकारितेतील दीपस्तंभ' संपादक : प्रा. रवींद्र पाटील पुस्तकात प्रसिद्ध झालेला लेख दि. ०६/०१/२०२२)
अत्यंत सविस्तर मांडणी व सुत्रबद्ध माहिती असणारा हा दीर्घ लेख असून यातून लेखकाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा उद्देश, स्वरूप व उपयोगीता स्पष्ट केली आहे. अत्यंत दुर्मिळ तथा नवी माहिती याद्वारे वाचकांना मिळाली असेल. एका उत्तम लेखनाबद्दल डाॅ. श्यामसुंदर यांचे अभिनंदन!
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवालेखकाने अतिशय संशोधनपर लेख लिहला आहे. आणि डॉ. आंबेडकरांची संविधान निर्माता म्हणून पत्रकारितेला बघण्याची दृष्टी कशी होती हे समजू शकते सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक पत्रकाराने वाचावं असा लेख..
उत्तर द्याहटवापत्रकारच फार कमी वाचतात
हटवासर आपण अतिशय अभ्यास पुरक मांडणी केली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम
हटवाअभ्यासपूर्वक मांडणी. केवळ डॉ. आंबेडकरांनी अंक काढले. त्यामध्ये अस्पृश्यांची बाजू मांडली .अशी मोघम विधाने न करता अग्रलेख ,त्यातील विचार नेमकेपणाने मांडले आहेत .हे अंक सर्वत्र उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे गोलमाल मत मांडले जाते. आपण त्यावर पुराव्यानिशी उत्तर दिले आहे. धन्यवाद!
उत्तर द्याहटवाडॉ. आंबेडकराचे सर्व अंक आता ग्रंथ रूपात उपलब्ध आहेत।
हटवाबाबासाहेबांची चतुरस्त्र पत्रकारिता व त्यांनी संपादक म्हणून दिलेले योगदान डॉ श्याम सुंदर मिरजकर यांनी अतिशय सविस्तर पणे या लेखात मांडले असून पत्रकारितेची निष्ठा आपल्या विचारातून आणि कृतीतून पुढे येताना ती किती प्रामाणिक असावी लागते याचे मूर्तिमंत उदाहरण डॉ आंबेडकर हे होते असे यावरून दिसून येते तत्कालीन सामाजिक राजकीय आर्थिक अशा विविध प्रश्नांना सामोरे जाऊन त्याची चिकित्सा करून परखडपणे लेखन करणे आणि त्या त्या प्रश्नाला न्याय देणे हे पत्रकाराचे कर्तव्य कसे पार पाडावयाचे हे आपण बाबासाहेबांच्या पत्रकाराच्या लेखणीतून वाचू शकतो मूकनायक बहिष्कृत भारत जनता अशा विविध नियतकालिकांमधून त्यांनी मांडलेले विचार राष्ट्रउभारणीसाठी व मानव मुक्ती साठी संपूर्ण जगाला दिशा देणारे आहेत डॉ मिरजकर यांनी हा लेख लिहून ते समर्पक पणे सर्वांसमोर मांडले आहे या लेखाचा समारोप अतिशय महत्त्वाचा आहे तो वाचून समजावून घेणे गरजेचे आहे
उत्तर द्याहटवाआपला अभिप्राय प्रेरणादायी आहे. सविस्तर चर्चा आपण घडविता, हे महत्त्वाचे। धन्यवाद सर
हटवाआपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या चतुरस्र पत्रकारितेतील वैविधता प्रवाहित स्वरूपात अभ्यासपूर्ण मांडताना चपखलपणे तपशील, संदर्भ, कार्यकारणभाव यांची गुंफण अप्रतिम आहे.
उत्तर द्याहटवाअत्यंत अभ्यासपूण॔ व सखोल लेख.
उत्तर द्याहटवाउत्तम मांडणी, सखोल चिंतन याचे प्रदर्शन
उत्तर द्याहटवालेखक डॉ शामसुंदर मिरजकर यांचे अभिनंदन
संशोधात्मक लेखनाचा उत्तम नमुना आणि अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणीमुळे लेख संग्रही ठेवण्यासारखा आहे.धन्यवाद प्रा.डॉ.श्यामसुंदर मिरजकर सर.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवा