झुंड : व्यवस्थेची दगडी भिंत पारदर्शक बनविणारा सिनेमा
हम को दुनिया ने रोज देखा है
फिर भी अनदेखा झुंड है।
हम न जिंदा थे, हम न मरते है
लोग कहते है, झुंड है।
या गाण्याच्या ओळी आहेत दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'झुंड' चित्रपटातल्या. एक असे जग, जे आपल्या आजूबाजूला सतत अस्तित्वात आहे, परंतु आपण त्याची दखल घेत नाही. दुर्लक्ष करतो. उपेक्षा करतो. आपण त्यांचे श्रम घेतो, पण माणसं नाकारतो. जगण्यासाठी दररोज संघर्ष आणि भागदौड करणारा हा वर्ग घाणीत कष्टतो. घामात भिजतो. व्यसनात बुडतो. आणि बेवारस होऊन संपून जातो. समाजव्यवस्थेच्या तळच्या जातवर्गातून आलेली ही 'झुंड' शहरांच्या तथाकथित सौंदर्याला गालबोट लावणाऱ्या झोपडपट्टीत राहते. पलीकडेच एक चकचकीत आकर्षक नीटनेटका वर्ग कॉलनी, सोसायटी आणि अपार्टमेंटच्या टॉवरमध्ये राहतो. तो शाळा, कॉलेज आणि मॉल संस्कृतीत वाढलेला शायनिंग इंडिया आहे. कष्टणारा भारत आणि शायनिंग इंडिया यांच्या दरम्यान एक उंच भिंत आहे. त्या भिंतीला दरवाजा नाही. इंडियावाले लोक भिंतीवरून पलीकडे सगळा कचरा टाकतात. तो कुठे पडतोय आणि तिथे कोणी आहे का, याची त्यांना फिकीर नाही. उलट आमच्या कचऱ्यावर हे जगतात असा दर्प! या झोपडपट्टीवाल्या भारतातून चकचकीत इंडियात येण्यासाठी एक मोठी भिंत चढून त्यावरून उड्या मारून जावे लागते. मात्र अशा घुसखोरांना भिंतीपलीकडे ठेवण्यासाठी कधी वर्दीतले, कधी वर्दीत नसणारे सिक्युरिटी वर्कर कार्यरत असतात.
नागराज आपल्या विलक्षण धारदार चित्रशैलीने या वास्तवाचे दर्शन घडवितो. कुठेही अतिरंजित न होता, एकामागोमाग एक अनेक चित्रचौकटी मांडत राहतो. वरवर पाहता झोपडपट्टीतील मुला-मुलींना फुटबॉलची गोडी लावून त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या, जगण्यातील उमेद वाढविणाऱ्या विजय बोराडे (प्रत्यक्षातील विजय बारसे) या क्रीडाशिक्षकाची ही कहाणी वाटते. पण नागराज या कहाणीला खेळ आणि ध्येयासक्त क्रीडाशिक्षक यात सीमित ठेवत नाही, तर तो त्याही पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला लावणारे खूप काही दाखवितो.
चेन स्नॅचिंग, धावत्या रेल्वेतून दगडी कोळसा चोरी, मोबाईल चोरी करणारे आणि गुटखा/खर्रा, दारू, गांजा यात गुरफटून गेलेले तरुण एकदा भर पावसात प्लास्टिकच्या डब्याला फुटबॉल करून खेळताना दिसतात. त्यांच्यातील स्पोर्ट स्पिरिट विजय बोराडे या क्रीडाशिक्षकाला भावते आणि तो त्या झोपडपट्टीवाल्या मुला-मुलींच्या जीवनात फुटबॉल आणतो. हा खेळ हळूहळू त्यांचे जगणे बदलतो. समृद्ध करतो. आशादायी करतो. त्याची ही कहाणी आहे.
नागराजने ती मांडली आहे आपल्या नेहमीच्या 'हट के' शैलीत. त्यातील प्रत्येक कॅरेक्टर हे एकेक नमुने आहेत. ते अभिनय करत आहेत, असे वाटतच नाही. इतकी सहजता व लवचिकता. अफलातून संवाद. ते त्या वस्तीचे लोकांचे अविभाज्य भाग असावेत, असे. यातील मुले गुन्हेगारीकडे वळलेली, परंतु वस्तीतल्या माणसांची चौकशी करणारी. काळजी घेणारी. मदतीला धावणारी. नागराज या सगळ्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो.
उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीला लागोपाठ मुली झाल्या, तर तिलाच दोष देण्याची समाजप्रवृत्ती असते. चित्रपटात एका मुस्लिम तरुण स्त्रीला तीन छोट्या मुली आहेत. नवरा तिला दोष देतोय. नव्हे संशयही घेतोय. मारायला धावतोय. ती मुली घेऊन घराबाहेर पडते. तो तिला घरात चल म्हणून धमकावतो. पण तो तिला भररस्त्यात मारू शकत नाही. 'परिणाम वाईट होतील', असे तो तिला म्हणतो. ती म्हणते, "क्या करेगा तू? तलाक देगा? अरे तू क्या मुझे तलाक देगा. मै तेरी कु तलाक देती. तलाक....तलाक....तलाक..." आणि निघून जाते. पुढे ती फुटबॉल खेळते. तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होते. पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे आणण्यासाठी ती नवर्याच्या दारी जाते तर सासू तिला घरात घेत नाही. नंतर नवरा तिला कागदपत्रे देण्यासाठी तिच्या दारी जातो, तर त्याची सासू त्याला घरात घेत नाही. या दोन दृश्यातून नातेसंबंधातील संघर्ष कुठे, कसा, कुणामुळे वाढत जातो, ते नेमकेपणाने टिपले आहे. धर्माचा बागुलबुवा न निर्माण करता ते सारे धाडसाने मांडले आहे. पुढे तो नवरा आपल्या पत्नीला सपोर्ट करतो. असे अनेक प्रसंग संपूर्ण चित्रपटात पहावयास मिळतात.
एका दृश्यात रेल्वे लाईन वर जीव द्यायला गेलेला तरुण ऐनवेळी कचरतो. माघारी फिरतो. त्याच वेळी त्याला लांबून फुटबॉलचा जल्लोष ऐकू येतो. तो एक मोठी भिंत ओलांडून पलीकडे जातो आणि मृत्यूकडून जीवनाकडे जाण्याचा मार्ग त्याला सापडतो. तो चांगला गोलकिपर असतो.
खरेतर राज्यघटनेमध्ये संधीची आणि दर्जाची समानता सर्व नागरिकांना प्रदान करण्याचे अभिवचन आहे. परंतु प्रत्यक्षात काय दिसते? अनेक माणसांना आपण माणूस समजतच नाही. ध्येय धोरण ठरवताना, निर्णय घेताना, त्यांचा विचारच करत नाही. त्यांना संधी मिळाली, तर ते काय करू शकतात? हा सिनेमा सांगतो, ही झोपडपट्टीतली झुंड कॉलेजच्या प्रशिक्षित टीमला हरवू शकते. "जी मुलं दगडाच्या एका टिपिऱ्यात डुकराला पाडू शकतात, त्या मुलांच्या हातात बॉल दिला तर ते तेज बॉलर होणार नाहीत का? छोटे छोटे देश ऑलिम्पिकची अनेक पदकं नेतात आणि आपल्या देशात टॅलेंट नाहीच, हे मला मान्य नाही. फक्त ते शोधलं पाहिजे. त्याला संधी दिली पाहिजे", हे विजय बोराडे (अमिताभ बच्चन) या क्रीडा शिक्षकाच्या तोंडचे संवाद या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
हे सगळे झोपडपट्टीवासी एका अधोविश्वात जगतात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे प्रेरणा स्थान आहे. त्यामुळेच जयंती उत्सवाचा जल्लोष चित्रपटात येतो. डीजे आहे. बेभान होऊन नाचणे आहे. त्याच वेळी एक ऍम्ब्युलन्स येते आणि काही कार्यकर्तेच त्या गाडीला ताबडतोब रस्ता करून देतात. हे जबाबदार वर्तन बघून विजय बोराडे (म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीचा महानायक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवा समोर हात जोडून उभा असल्याचे दृश्य आपणास दिसते. हा सकारात्मक संदेश संपूर्ण जगभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून नागराज मंजुळे आपणास देतो आहे. बॉलिवूड मध्ये प्रथमच चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले गेले आहे. ते श्रेय ठाम वैचारिक भूमिका असलेल्या नागराजचेच.
नागराजने अमिताभ बच्चन यांना चित्रपटाच्या कथेच्या गरजेप्रमाणे काम करायला बाध्य केलेले दिसते. कुठेही सुपरस्टार असण्याचे वलय आडकाठी ठरणार नाही, याची काळजी त्याने घेतली आहे. विरोधी गुंड टोळी बरोबर राडा करून परतलेल्या अंकुश डॉनला हा क्रीडा शिक्षक अमिताभ म्हणतो, "माफी मागितली असती तर काय बिघडले असते?" इथे वलयांकित डॅशिंग इमेजच्या पलीकडे असलेला अमिताभ दिसू लागतो. जो तरुणाईला लढण्यापेक्षा स्वतः घडण्याचे महत्त्व पटवून देऊ पाहतो.
या चित्रपटातील दोन दृश्ये फार मार्मिक आहेत. एका दृश्यात झोपडपट्टीत फुटबॉल ग्राउंड तयार करायचे चालले आहे. त्यामुळे एका भंगारवाल्याने अडवलेली जागा मोकळी करायला मुले भाग पाडतात. त्याच वेळी त्या मोकळ्या जागेत एक शेंदूर फासलेला देव आहे. त्याला हटवून दुसरीकडे ठेवायचे आहे. तरीही मनातून थोडे कचरणे आलेच. तेव्हा एक महिला पूजा करते. नंतर एक मुलगा पुढे येतो. शेंदूर माखलेला देव उचलतो, तर ती एका दुचाकीची पेट्रोल टाकी असते. सगळेच हसू लागतात आणि त्या आजवर पुजलेल्या देवाला भंगारात टाकतात.
दुसऱ्या एका प्रसंगात आदिवासी मुलीची पासपोर्ट मिळविण्यासाठी झालेली ससेहोलपट आली आहे. या आदिवासी मुलीकडे ना रहिवासी दाखला असतो, ना शाळा सोडल्याचा दाखला. तरीही अशिक्षित मुलगी आणि तिचा बाप यांची कागदपत्र मिळवण्यासाठी चाललेली धडपड आपल्यालाच अंतर्मुख बनवते. आपली व्यवस्था माणसांचे जिवंत असण्याचे पुरावे कागदावर शोधते, याची खंत वाटत राहते.
चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात ही 'झुंड' आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परदेशी जात असलेली दिसते. तेव्हा विमानतळावर तपासणी प्रवेशद्वारातून जाताना अंकुशला पुन्हा पुन्हा अडवले जाते. त्याच्या एक एक वस्तू बाजूला काढून ठेवायला सांगितल्या जातात. बूट, बेल्ट आणि इतरही काही वस्तू. तरीही मशीन रेड सिग्नल देते. तेव्हा त्याने नेहमीप्रमाणे पॅन्ट मध्ये ठेवलेला छोटा कटर, की जो कागद फळे कट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो, तो डिटेक्ट होतो. अंकुश हा कटर काढून कचराकुंडीत फेकून देतो. गुन्हेगारी जगताची एक छोटी निशाणी तो फेकून देतो आणि पुढच्याच दृश्यात ढसाढसा रडतो. इथे त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिवर्तन स्पष्ट होते. छोटा कटर घेऊन गुन्हेगारी जगताच्या दिशेने वळलेले पाय फुटबॉलचा चेंडू मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्याच्या दिशेने जातात. एका शिक्षकाने वंचितांना संधी उपलब्ध करून देऊन घडवलेले हे परिवर्तन असते.
कोरोनापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींनी भारतात बोलविले. तेव्हा ट्रम्पच्या नजरेस गलिच्छ झोपडपट्टी पडू नये म्हणून अहमदाबाद (गुजरात) येथे रस्त्याच्या कडेने भिंती उभारण्यात आल्या होत्या. नागराज अशा भेदरेषा ठळक करणाऱ्या भिंतींना पारदर्शक बनवतो. आणि एका अप्रिय वाटणाऱ्या भारताचे दर्शन घडवितो. आपल्याला याची जाणीव करून देतो की, हेही आपलेच बांधव आहेत. आपण जे प्रतिज्ञेतून वारंवार उद्घोषिले होते, तसे बांधव. फक्त या मुलांची खंत इतकीच आहे, की ,"आपुन को पहिले किसी ने पूछा नही की तू कैसा है? " म्हणूनच या वस्तीतला एक छोटा मुलगा निरागसपणे प्रश्न विचारतो, "ये भारत क्या होता है?"
अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर एकदा हा चित्रपट पाहायलाच हवा. कारण नागराजने चित्रपटाच्या भाषेतून स्वतःला जे म्हणायचे आहे, ते अत्यंत प्रभावीपणे म्हटले आहे. आणि जगाच्या पटलावर एक नवा विषय चर्चेसाठी खुला केला आहे. Strictly prohibited to cross this wall, असे म्हणणाऱ्या भिंती अजून किती दिवस जपून ठेवायच्या, हे आता आपल्यालाच ठरवावे लागेल. फार पूर्वी कवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतात लिहिले आहे, 'ही भिंत पाडूया भेदाची'. त्याचाच हा एक प्रयास आहे.
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
सर झुंड चे परीक्षण अतिशय सुंदर, वास्तव्य आणि ओघवत्या शैलीत केले आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम जी
हटवाझुंड चित्रपट ऐकून होतो. पण खरं सांगू श्यामू तुझ्या या परीक्षणाने संपूर्ण चित्रपटच डोळ्यापुढे उभा राहिला.चित्रपट बघायला भाग पाडणारे तुझे परीक्षण आहे . धन्यवाद
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रा
हटवानेमके, व मार्मिक, चित्रपटाचा नेमका आशय संक्षेपात आले आहेतच पण वर्तमान संदर्भही आशयाला जोड देणारा.... छानच!
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद
हटवाSir........
उत्तर द्याहटवाAmazing review sir.........
वास्तव भाष्य केलं आहेस श्याम....
उत्तर द्याहटवाधन्यवाद पोतदार सर
हटवाव्वा, खूपच छान परीक्षण केलं आहे.ज्याने चित्रपट पाहिला आहे, त्याला या परिक्षणाने पुन्हा पाहता आला.ज्याने पाहिला नाही, त्याला चित्रपट पाहण्याची नक्की इच्छा निर्माण करेल
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद
हटवावास्तववादी चित्रपटाचं वास्तववादी परिक्षण
उत्तर द्याहटवा"झुंड" चित्रपटाची समीक्षा केवळ आस्वादात्मक पातळीवर केली आहे असे नाही; तर चित्रपट पाहण्याच्या नव्या दिशा सूचित करणारी आहे. एखाद्या चित्रपटाचे कथानक आस्वादात्मक पातळीवर पाहण्यापेक्षा विचारप्रवर्तक म्हणून अशा कथानकाची ताकद किती मोठी असते याचे उत्तम उदाहरण म्हणून मिरजकरानी केलेली समीक्षा अव्वल दर्जाची आहे.
उत्तर द्याहटवाखरं आहे पाटील सर. हा चित्रपट ही एक अजोड कलाकृती आहे. ती स्वतःची चित्रभाषा घेऊन येते. चित्रपटात वापरलेली चिन्हव्यवस्था वेगळीच आहे. खूप बारकाईने पहावे लागेल. मनःपूर्वक धन्यवाद!
हटवाखूप छान आणि वास्तविकता येथे मांडली आहे.
उत्तर द्याहटवासर,खुप अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. भारत देशाचे वास्तव दर्शविणारा चित्रपट व भितींपालिकडची म्हणजेच कुसाबाहेरील ,वांचित , उपेक्षित युवक भारताला अधिक सुंदर बनवतील, पण मानवतेच्या भावनेतून त्यांच्यातील अनेक सुप्त गुणांचा विचार करण्याची वेळ मात्र आली आहे . हे मात्र नक्की .हा महत्वपूर्ण विचार चित्रपट देतो.शिवाय आपणही सर नेमक्या शब्दात अवश्यक तो संदेश अनुभूतीतून दिलात . अभिनंदन सर. डॉ.सुकुमार आवळे
उत्तर द्याहटवासुकुमार सर मनःपूर्वक धन्यवाद
हटवाखूपच वस्तुनिष्ठ ,उत्तम वर्णन सर
उत्तर द्याहटवानेमके... मार्मिक आणि कसदार परिक्षण.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान मांडणी सर,प्रत्यक्ष सिनेमा पाहून विचार करणार नाहीत कदाचित पण हा लेख वाचनात आल्यावर नक्कीच जागृत होतील इतकी नेमकी आणि स्पष्ट मांडणी केलीत👌
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर अश्विनी
हटवासुंदर मांडणी ,समीक्षा करताना बारकव्याने वाक्ये व त्यातून व्यवस्थेला विचारलेले प्रश्न मांडले आहेत.अखेरीस झुंड का पहावयास हवा ते सांगितले आहे ,हे उत्कृष्ट समिक्षकाचे लक्षण आहे.छान मांडणी केली आहे.
उत्तर द्याहटवा