'शब्दांची रोजनिशी': हरवत चाललेल्या भाषा व संवादाचे नाटक
'शब्दांची रोजनिशी' : हरवत चाललेल्या भाषा व संवादाचे नाटक
भाषा हे संपर्क व संवादाचे साधन असते, हे मुळातच अर्धसत्य विधान आहे. त्यासोबतच भाषा हे सांस्कृतिक आक्रमणाचे, लपवाछपवीचे, भासमान वास्तव निर्मितीचे साधन आहे, हेच खरे! लेखन तंत्र, छपाई, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया अशा सगळ्या प्रगतीच्या पायऱ्या आपण चढत जात असताना अनेक लोकसमूह आपली भाषा गमवत आहेत. नव्हे आपल्या मागील सगळ्या पिढ्यांचे लोकसंचित गमवत आहेत. हळूहळू जुन्या पिढीतील लोक आणि त्यांच्या सोबतच भाषा मारू लागल्या आहेत. याचे एक गंभीर भान देणारे नाटक 'शब्दांची रोजनिशी' काल पाहिले. रामू रामनाथन या लेखकाने इंग्रजीमध्ये लिहिलेले 'द डायरी ऑफ अ वर्ड' हे नाटक अमर देवगांवकर यांनी मराठीत अनुवादित केले आहे. तर त्याचा अत्यंत उत्तम प्रयोग दिग्दर्शक अतुल पेठे आणि नायिका केतकी थत्ते यांनी सादर केला आहे. कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात काल या नाटकाचे दोन प्रयोग सादर झाले. मोजकेच नव्वद-शंभर प्रेक्षक. नाटकावर मनस्वी प्रेम करणारे. आणि समोर नाटकघर, पुणे यांचा नाटक समरसून जगणारा रंगकर्मींची संच.
नाटक सुरू होते कदाचित भविष्यकाळातील एका अति उंच टॉवर मधील ३२१ व्या मजल्यावर. तिथे खरेतर भाषेवर लक्ष ठेवणारी, भाषा वापरांबद्दल संशोधन करणारी एक यंत्रणा उभी आहे. त्यामध्ये एक घटस्फोटीत असणारा तरुण काम करतोय. त्याच्या त्या जागेत एक लहान बाळ घेऊन तरुण स्त्री येते आणि असंबंध वाटणाऱ्या संवादातून नाटक सुरू होते. त्याला मध्येमध्ये त्याच्या आईचे फोन येतात, जे त्याला सतत वर्तमान वास्तवात त्याच्यासमोर असणाऱ्या समस्येची जाणीव करून देतात. दुसर्या बाजूला त्याला आदेश देणारी एक हाय्यर अॅथोरिटी त्याला विविध सूचना देते आणि त्याबरहुकूम काम करण्यासाठी बाध्य करते. तरीही ती दोघं माणसं आहेत. त्यांच्याजवळ संवेदनशीलता शिल्लक आहे. आदेशांचे यंत्रवत पालन ते करतीलच असे नव्हे. त्यामुळेच वेगवेगळ्या भाषेमधून आपल्या साहित्यासह लुप्तप्राय होऊ लागलेले लेखक आणि अंदमानपासून केरळपर्यंत अनेक जमातींची मरू घातलेली भाषा, संस्कृती, जीवनशैली याबद्दल ते बोलत राहतात. राजसत्तेचा आदेश आणि आग्रह किंवा भांडवलशाहीचा शिरकाव यामुळे मुलं शाळेत वेगळीच भाषा शिकतात, की जी घरात बोलली जात नाही. त्यामुळे आजोबा आणि नातू यांच्या दरम्यान योग्य संवाद होऊ शकेल, याची शक्यता धुसर होऊ लागली आहे. हे भयकारी वास्तव या दोघांच्या संवादातून उलगडत जाते.
जुन्या कविता नव्या रूपात अभ्यासक्रमात येतात. म्हणजेच जुन्या जीवन जाणिवा आणि मूल्ये पूर्णतः बदलली जातात. त्यामुळेच 'बा बा ब्लॅक शीप, हॅव यू एनी वूल?' हे बडबड गीत 'बा बा बॅक शिप, हॅव यू एनी टूल?' असे बदलले जाते. एकंदर संवादा ऐवजी विसंवादच वाढतो आहे. बहुसांस्कृतिकता नष्ट होऊ लागली आहे आणि म्हणून बहुभाषिक समाज हेही हळूहळू संपत चालले आहेत, याची गंभीर जाणीव हे नाटक देते.
कोणत्याही कारणाने जवळ आलेले दोन जीव एकमेकांकडे संशयाने, शत्रुत्व भावनेने पाहत राहतात. परंतु तरीही त्यांच्या आतमध्ये प्रेमाची एक जिवंत शक्यता असते आणि म्हणूनच नाटकाच्या शेवटी नाटकाची नायिका नायकाला प्रेमाचा हात मागते. कारण तिच्या छकुल्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी हे प्रेमच जपणे गरजेचे आहे.
अत्यंत सुंदर नाट्यानुभव, अत्यंत ताकदीचा अभिनय, दोन्ही कलाकारांची शब्दांवर असणारी हुकूमत हे सारे अप्रतिम होते. अत्यंत छोट्या मंचीय अवकाशात सादर झालेला, पण मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारा हा प्रयोग होता. विशेषतः केतकी थत्ते हिने चार-पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये सादर केलेली गीते ही आतमध्ये भिडणारी होती. जरी त्या गाण्यांंचा, शब्दांचा अर्थ कळत नसला तरी गाणे पोहोचत होते. खरेतर प्रत्येक रसिकांनी हा नाट्यानुभव स्वतः घेतला पाहिजे. आणि आजच्या संवादावर पाळत ठेवण्याच्या काळात संवाद हरवतो, भाषा नष्ट होते म्हणजे काय, याचाही थोडा विचार केला पाहिजे. अतुल पेठे आणि सर्व रंगकर्मींना मनःपूर्वक धन्यवाद!
👌👌नाटक एकदा बघावे अशी इच्छा झाली
उत्तर द्याहटवाबघितलेच पाहिजे एकदा
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवानाटकाचा विषय आणि सादरीकरण दोन्ही विषयी छान लिहिले आहे. नाटक पाहायची उत्सुकता वाढवणारे लेखन...
उत्तर द्याहटवाShyamsundar Mirajkar संधी मिळाली तर नक्कीच पहा.
हटवानाटक पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे !!
उत्तर द्याहटवा