सणकांडी मुक्ताई

* सणकांडी मुक्ताई * इ. स. १२९०-९१ च्या दरम्यानची गोष्ट. पंढरपुरात नामदेव नावाचा एक २० वर्षांचा तरुण हरिभक्त अभंग लेखन, भजन-कीर्तन या माध्यमातून ख्यातकीर्त झाला होता. समविचारी लोकांचा मेळा जमवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. श्रीविठ्ठलाची भक्ती आणि आषाढी कार्तिकी वारी यामुळे पंढरपूर एक जागते तीर्थक्षेत्र बनले होते. याच दरम्यान पंढरपुरात आळंदी-पैठण इकडून येणाऱ्या भक्त मंडळींकडून एक वार्ता पोहोचली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई नावाच्या चार भावंडांना ब्राह्मणांनी वाळीत टाकले आहे. परंतु ही नाथपंथी भावंडे बुद्धिमान आहेत. वेदशास्त्र, उपनिषद, पुराणांचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी पैठणच्या ब्रह्मवृंदांशी शुद्धिपत्र मिळविण्यासाठी वाद घातला आहे. तेथील ब्राह्मण थक्क झाले आहेत. परंतु या भावंडांना शुद्धिपत्र मिळालेले नाही. त्यांनी वेदान्तावर व्याख्यान दिले. पुराण सांगितले. इतकेच नव्हे तर कव्ययज्ञात अस्खलितपणे मंत्रोच्चाराने पितरांना आवाहन केले. त्यांच्या अलौकिक वाणीने, प्रतिभेने जन वेडावले आहेत. पुढे त्या भावंडातील ज्ञानदेवाने गीतेव...