सणकांडी मुक्ताई
*सणकांडी मुक्ताई*
इ. स. १२९०-९१ च्या दरम्यानची गोष्ट. पंढरपुरात नामदेव नावाचा एक २० वर्षांचा तरुण हरिभक्त अभंग लेखन, भजन-कीर्तन या माध्यमातून ख्यातकीर्त झाला होता. समविचारी लोकांचा मेळा जमवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. श्रीविठ्ठलाची भक्ती आणि आषाढी कार्तिकी वारी यामुळे पंढरपूर एक जागते तीर्थक्षेत्र बनले होते. याच दरम्यान पंढरपुरात आळंदी-पैठण इकडून येणाऱ्या भक्त मंडळींकडून एक वार्ता पोहोचली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई नावाच्या चार भावंडांना ब्राह्मणांनी वाळीत टाकले आहे. परंतु ही नाथपंथी भावंडे बुद्धिमान आहेत. वेदशास्त्र, उपनिषद, पुराणांचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी पैठणच्या ब्रह्मवृंदांशी शुद्धिपत्र मिळविण्यासाठी वाद घातला आहे. तेथील ब्राह्मण थक्क झाले आहेत. परंतु या भावंडांना शुद्धिपत्र मिळालेले नाही. त्यांनी वेदान्तावर व्याख्यान दिले. पुराण सांगितले. इतकेच नव्हे तर कव्ययज्ञात अस्खलितपणे मंत्रोच्चाराने पितरांना आवाहन केले. त्यांच्या अलौकिक वाणीने, प्रतिभेने जन वेडावले आहेत. पुढे त्या भावंडातील ज्ञानदेवाने गीतेवर प्राकृत टीकाही लिहिली आहे. आता ही भावंडे आळंदीत मुक्कामी आहेत.
या वार्तेने चळवळ्या नामदेव उत्तेजित झाला. या भावंडांची भेट घेऊन नेमके काय घडले ते जाणून घेण्याची त्याला उत्सुकता लागली. कारण ब्रह्मवृंदांशी वाद-विवाद ही सामान्य गोष्ट नव्हे, हे नामदेव जाणत होता. तो स्वतः अनेक वेळेला वेदज्ञ, शास्त्री, पंडित, पुराणिक, हरिदास अशा ब्राह्मणांना जाऊन भेटला होता. त्यांच्याशी चर्चा करून अध्यात्म ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या ब्राह्मणांनी नामदेवाला थातूरमातूर गोष्टी सांगितल्या. त्याचे समाधान केले नाही (अभंग क्र.१५८४). पुढे नामदेवाने स्वतःचा भक्तिमार्ग स्वतःच शोधला. 'आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म।' म्हणत भक्त मंडळींना जमा करू लागला. अशा या नामदेवाला त्या चार भावंडांची भेट घ्यावी वाटणे स्वाभाविकच! पंढरपूरपासून सुमारे दीडशे मैलांवर असणाऱ्या आळंकावती (आळंदी) गावी जाऊन नामदेवाने या भावंडांची घेतलेली भेट हा महाराष्ट्र संस्कृतीच्या इतिहासातील सुवर्णक्षण होय! ही भेट फक्त दोन व्यक्तींमधील नव्हती, तर तो दोन विचारांचा संगम होता. ज्यातून पुढे वारकरी परंपरा सिद्ध झाली. समृद्ध झाली.
खरेतर ही पहिली भेट या पाच जणांमध्ये घडली आहे. या भेटीला इतर कोणी साक्षीदार नाही. परंतु या भेटीचे डॉक्युमेंटेशन नामदेवांनी एका अभंग मालिकेत केले आहे. तेही खूप नंतर. काही वर्षांनी. नामदेव कल्पक मिथमेकर. एका नव्या भक्तिपंथाची उभारणी करणारे. त्यांच्या सभोवती अठरापगड जातीतील स्त्री-पुरुषांचा मेळा जमलेला. त्यामधील सत्शील हरिभक्तांना नामदेवांनी हाताशी धरले. त्यांच्या अलौकिक कथा अभंगांमधून रचल्या. त्यांची प्रतिष्ठा वाढविली. त्यांना संत संबोधून आदर्श आचरणाचे वस्तुपाठ म्हणून पुढे केले. सावता, नरहरी, चोखा, जना अशी अनेक नावे सांगता येतील. ज्ञानेश्वरादी भावंडेही अशीच. ती मुळात बहिष्कृत. नंतर नाथपंथी. त्यांना वारकरी मेळ्यामध्ये सन्मानपूर्वक आणावे, ही नामदेवांची मनीषा. म्हणूनच त्यांनी वर्णिलेला हा पहिल्या भेटीचा प्रसंग विलक्षण नाट्य आणि अकल्पित घटनांनी भरलेला आहे. या मिथक कथेने या चार भावंडांना प्रतिष्ठित केलेच, परंतु या कथेचा एक दुष्परिणाम असा झाला की नामदेवांचे मडके कच्चे ठरविले गेले. या कथेतील आशय अभ्यासकांनी, कीर्तन-प्रवचनकारांनी शब्दशः खरा मानला. त्यातून सगळ्यांचीच फसगंमत झाली.
नामदेवांनी वर्णिलेला हा कथाभाग अभंग क्र. १३१५ ते १३४४ मधून आलेला आहे. या पहिल्या भेटीनंतर नामदेवांचे या भावंडांशी सख्य जमले ते कायमचेच. मग नामदेवांनी या भावंडांचे पूर्वायुष्य जाणून घेतले. त्याचेही डॉक्युमेंटेशन 'श्रीज्ञानदेवांची आदी' या ३१ अभंगाच्या मालिकेतून केले. (अभंग क्रमांक ८७२-९०२) आज आपल्याला या भावंडांचे जे अल्पस्वल्प चरित्र माहीत आहे, ते संत नामदेवांमुळेच.
*श्रीज्ञानदेवांची आदी*
संत नामदेवांनी लिहिलेल्या या 'ज्ञानदेवांच्या आदी'मधून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. या भावंडांचे वडील विठ्ठलपंत वेदशास्त्र, काव्य, व्याकरण यांचा उत्तम अभ्यास असणारे, परंतु विरक्त वृत्तीचे गृहस्थ होते. गुरू आज्ञेने ते संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात परतले. पुढे त्यांना चार मुले झाली आणि ब्रह्मवृंदाने हे संपूर्ण कुटुंब जातीतून बहिष्कृत केले. विठ्ठलपंतांनी वर्ण-आश्रमाचे बंधन नसलेला नाथपंथ स्वीकारला. मुलांना वेदशास्त्र पुराणात पारंगत केले. योगमार्गाने चित्तवृत्ती स्थिर करायला शिकविल्या. तरीही विठ्ठलपंतांच्या मनी आपल्या मुलांचे भवितव्य काय? हा प्रश्न होताच. कारण मुलांची मुंज झाली नव्हती. त्यांना ब्राह्मण म्हणून मान्यता नव्हती. पुढे त्यांच्या विवाहाचेही प्रश्न निर्माण होणार होते. एका बापाला आपल्या मुलांची काळजी वाटणे स्वाभाविकच. मग आळंदी येथील ब्रह्मवृंदाला शरण जाणे, त्यांनी देहांत प्रायश्चित्त सांगणे, ते विठ्ठलपंतांनी स्वीकारणे, या गोष्टी घडल्या. पुढे या मुलांची गती काय? असा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा या भावंडांना पैठणच्या ब्रह्मवृंदाकडे जाण्यास सांगितले गेले. आळंदी ते पैठण जवळ जवळ १३० मैलांचे अंतर (२०५ किमी). पैठणच्या जवळच दहा मैलांवर वडिलांचे मूळ गाव आपेगाव होते. ही भावंडे पैठणला गेली. तेथील ब्रह्मवृंदाला आळंदीच्या ब्राह्मणांनी दिलेले पत्र दिले. ब्रह्मवृंदाने शास्त्रार्थ केला. परंतु आश्रम व्यवस्था मोडणाऱ्या आरूढपतित अशा पातकाला प्रायश्चित्त नाही. त्यामुळे मुंज नाही. उपनयन संस्कार नसल्यामुळे वेदमंत्रांचा, वैदिक परंपरेचा कोणताच अधिकार नाही. मग एक उपाय सांगण्यात आला. शूद्रातिशूद्राप्रमाणे अनन्यभावे भक्ती करावी. घडल्या अपराधाबद्दल तीव्र अनुताप म्हणजेच खेद व्यक्त करून देवाचे भजन करावे. अस्पृश्य हे ब्रह्म आहेत, असे जाणून त्यांना वंदन करावे. थोडक्यात चांडाळा प्रमाणे राहावे.
यावर निवृत्ती ज्ञानदेवांनी ब्रह्मवृंदाशी वाद-विवाद केला. पैठणमध्ये वेदान्तावर व्याख्याने दिली. पुराण सांगितले. हरिकीर्तन केले. कव्ययज्ञात प्रभावी मंत्रोच्चार करून पितरांना आवाहन केले. या त्यांच्या अमोघ वाणीने सामान्य लोक आणि ब्रह्मवृंद सारेच वेडावले. या तीन भावंडांना देवत्रय संबोधले. 'यांना आम्ही काय प्रायश्चित्त देणार', अशी थोडी नमती भाषा व्यक्त केली गेली. परंतु बहिष्कार मागे घेतला नाही.
इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, ब्रह्मवृंदाने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या तिघांनाच देवत्रय म्हटले. मुक्ताई ही स्त्री असल्याने तिला उपनयन संस्काराचा अधिकारच नाही. ती शूद्र! सामान्य! परंतु नामदेवांनी मात्र तिला 'आदिमाया मुक्ताई' संबोधले आहे. कारण तिचा अधिकार, तिचे मोठेपण नामदेव जाणत होते.
नामदेवांनी शब्दबद्ध केलेले हे पूर्ववृत्त त्यांना या भावंडांकडून प्रसंगोपात समजले असावे. या भावंडांच्या प्रथम भेटीचा वृत्तांत वेधक आहे. विशेषतः नामदेवांनी तो एका नाटकीय पातळीवर नेल्यामुळे त्यामध्ये व्यक्तिरेखांचे विभिन्नत्व व घटना प्रसंगांची गुंतागुंत पहावयास मिळते. तसेच या प्रसंगात विजेसारखी तेजःपुंज दिसते ती मुक्ताई! खरेतर ती सगळ्यात धाकटी. त्यातही मुलगी म्हणून ती दुर्लक्षिली जाऊ शकली असती. परंतु नामदेवांनी मांडलेल्या या प्रसंगचित्रात तीच महत्त्वाची भूमिका पार पाडते आहे.
इथे एक प्रश्न सहजपणे मनात उद्भवतो, ब्रह्मवृंदाने बहिष्कृत केलेली, दारिद्र्याने गांजलेली चार अनाथ मुले आणि पंढरपुरात आपल्या अार्त भक्तीने ख्यातकीर्त झालेला या चारही भावंडांपेक्षा वयाने ज्येष्ठ असणारा तरुण नामदेव, यांच्या प्रथम भेटीतच नामदेवांना उणेपणा देणारा, नामदेवांचे मडके कच्चे ठरविणारा, असा प्रसंग खरोखरच घडला असेल का? या सगळ्या कथेचा नव्याने अन्वय शोधला पाहिजे.
*संत नामदेव कृत मिथककथा*
संत नामदेवांनी आपल्या अभंग मालिकेतून चित्रित केलेला प्रसंग असा आहे : श्री विठ्ठलाला ज्ञानेश्वरादी भावंडांचा विलक्षण कळवळा असल्याने विठ्ठलाने काहीशा आग्रहाने नामदेवाला आळंदीस पाठवले आहे. नामदेवही थोड्याशा अनिच्छेनेच जवळजवळ दीडशे मैलांवर असलेल्या या अलंकापुर गावी आला आहे. नामदेव शोधीत विचारीत या भावंडांच्या झोपडी पाशी येतो. अंगावर जीर्ण वस्त्रे, हातात नरोटी अशी त्या भावंडांची अवस्था आहे. घरात परळ, भोपळा अशी संपत्ती दिसते. घरात खर्चायला कवडी नाही. त्यांचे दारिद्र्य पाहून नामदेवाचा जीव कासावीस होतो.
नामदेवाला दारात पाहून निवृत्ती उठून त्याच्या स्वागतास पुढे येतो. पायावर डोके ठेवतो. 'पंढरीचा प्रेमा घरी आला', असे संबोधतो. आपण वयाने ज्येष्ठ आहोत आणि आपला श्री विठ्ठला जवळ नित्य सहवास आहे, या भावनेने थोडा अहंकार चढलेला नामदेव निवृत्तीला प्रतिनमस्कार करत नाही. पाठोपाठ ज्ञानेश्वर व सोपानही नमस्कार करतात, तेव्हाही नामदेव प्रतिनमस्कार करत नाही. या भेटीचा आनंद सोपानदेव सहजपणे व्यक्त करतो. "आमची रंजल्या गांजल्यांची विचारपूस करायला (इतक्या लांबून) तुम्ही आलात. संतांच्या मनात आम्हा अनाथांविषयी अपार माया आहे. आज प्रत्यक्ष मायबाप भेटल्याचे समाधान मनाला लाभले आहे", असे सोपानदेव म्हणतो.
परंतु मुक्ताई मात्र नामदेवाला नमस्कार करत नाही. बारा-तेरा वर्षांची चिमुरडी मुक्ताई नामदेवांच्या मनातील अहंकार ताबडतोब हेरते आणि पहिलेच वाक्य बोलते,
अखंड जयाला देवाचा शेजार ।
का रे अहंकार नाही गेला ।।
मान-अपमान, हेवा या भावना कशाला वाढवितो आहेस? अगोदर हा वृथा अभिमान दूर कर.
जालासी हरिभक्त तरी आम्हा काय ।
आंतली ती सोय न ठाऊकी।।
टाळ दिंडी घेऊन हरिकथा (कीर्तन) करतोस. स्वतःला हरिदास म्हणवून मोठेपणा मिरवतोस. परंतु गुरूविना तुला मोक्षप्राप्ती नाही, हे लक्षात ठेव. तू स्वतःला नीट ओळखले नाहीस, तर परमेश्वराबद्दल ब्रह्मबोली काय सांगणार?
ऐक रे नामया होई आत्मनिष्ठ ।
तरीच तू श्रेष्ठ ज्ञानी म्हणे।।
मुक्ताई पुढे म्हणते, "यांने प्रभावी बोलून स्वतःचा मोठेपणा वाढविला आहे. कोणी गुरू नसल्यामुळे हा आतून कोरा आहे. संतांचा सन्मान करावा हे ज्याला कळेना, त्याने देवाजवळ राहून काय केले? याचा थोडा सन्मान करताच याच्या मनातील अहंकाराने फडा वर काढला आहे. हा लोकांना पंढरीचे भूषण सांगतो, परंतु याच्या मनात तीळभरही बोध (शहाणपण) नाही."
यावर निवृत्ती म्हणतो, "असे बोलू नये. आपले भाग्य धन्य! म्हणून हे संत घरी आले. आपण स्वतःचे हित साधावे. संतांचा सन्मान करायला चुकू नये. मुळात पंढरीत राहणारे लोक धन्य होत! तशात या नामदेवाने आपल्या प्रेमाने पांडुरंगाला वेडे केले आहे. त्यामुळे त्याला अरे तुरे न करता त्याच्या पायी डोके ठेव, हेच बरे!" तेव्हा मुक्ताई म्हणते, "तुम्हीच लोटांगण घाला. मला याच्या दर्शनाची गरज नाही."
याप्रसंगी मुक्ताईचे मत पडते की, नामदेवाचे मडके कच्चे आहे. ते नीट भाजले पाहिजे. परंतु हे मडके कच्चे की पक्के ते कोण ठरविणार? कारण ही भावंडे नामदेवापेक्षा वयाने लहान आणि बहिष्कृत आहेत. तेव्हा वयोज्येष्ठ व अनुभवी म्हणून गोरोबा काकांना बोलवा, असे म्हटले जाते. गोरोबाकाका कुंभार, वय २३. राहणार तेर ढोकी. आळंदी पासून ३०० किलोमीटर दूर. मग त्यांना कसे बोलवणार? इथे कथेत एक अडचण (twist) निर्माण होते. तेव्हा योगसिद्धीचा वापर करून मुक्ताई गोरोबांना भेटते. मग नामदेवांसहित भावंडे एका गुंफेत समाधी लावतात. योगसिद्धीचा वापर करून गोरोबाकाका तिथे येतात. आणि नामदेवांच्या डोक्यावर थापटणे मारून हा कोराच राहिला आहे, असा निर्वाळा देतात.
नामदेव स्वतः योगमार्गी नाहीत. त्यामुळे या भावंडांचे बोलणे न कळणारे आहे, असे नामदेवांचे मत बनते. लाकडाने डोके फोडून कोरे ठरविल्यावर अस्वस्थ व अवमानित झालेले नामदेव तेथून निघून जाऊ लागतात. तेव्हा मुक्ताई म्हणते, "चैतन्याचा केर। ब्रह्म अग्नीवर चेतवावा. आम्ही हा कुंभ आतून-बाहेरून भाजून काढतो. येथील जीवित्व काढून तेथे शिव घडवितो. याला योगसाधना शिकवितो, " परंतु नामदेव ते स्वीकारत नाहीत. तेथून निघून ते थेट पंढरी गाठतात. मुक्ताई म्हणते, "आसन स्थिर नाही नामयाचे!"
नामदेवांनी स्वतः चित्रित केलेल्या या प्रसंगात नामदेवांचीच फजिती झालेली दिसते. नामदेव म्हणतात, "ही भावंडे कैकाड्याप्रमाणे गुड गुड बोलतात. त्यांची गूढ वाणी मला कळेना. 'आम्ही प्रकाशाचे गाणे गातो', असे ती भावंडे म्हणतात. परंतु मला तरी ते अघोरवाणेच दिसते आहे. पाखंड वाटते आहे."
लहानशी मुक्ताई जैसी सणकांडी ।
केले देशोधडी महान संत!!
असे नामदेव उदगारतात.
कसा तरी जीव वाचवून आलो, अशी भावना होऊन नामदेव विठ्ठलाजवळ तक्रार करू लागतात. कशाला मला तिकडे पाठवले, असे म्हणतात. तेव्हा पांडुरंग म्हणतो,
संतांची विन्मुख जालासी गव्हारा।
नाही आतां थारा इहपरलोकीं।।
नाही वेड्या संतांचा अंगवळा।
झोंप बैसली डोळां अज्ञानाची।
भ्रांतीनें तुझी पुरविली पाठी।
सज्जनाच्या गोष्टी कडू जाल्या।।
हाता आला लाभ गमाविला सारा।
भुललासी गव्हारा भ्रमभूली।।
मोह सर्पे तुझें व्यापियलें अंग ।
म्हणे पांडुरंग काय आतां।।
*फटकळ परंतु स्पष्टवक्ती मुक्ताई*
बारा-तेरा वर्षांची मुक्ताई. वीस-एकवीस वर्षांचा नामदेव. तोही ख्यातकीर्त. ज्याच्या नावाचा सर्वत्र बोलबाला आहे, असा! परंतु या मोठेपणाचे कणभरही दडपण मुक्ताई वर येत नाही. उलट ती स्पष्टपणे म्हणते, नित्य देवाचा शेजार असूनही तुझ्या मनातील अहंकार गेलेला नाही. प्रथमदर्शनी तिचे नामदेवांबद्दल झालेले मत काही अंशी बरोबरही आहे. ही भावंडे दुबळी आहेत आणि आपण त्यांना आधार दिला पाहिजे, असा स्वतःकडे मोठेपणा घेण्याचा भाव या पहिल्या भेटीतच नामदेवांच्या कृती उक्तीत असला पाहिजे. परंतु परिस्थितीचे अनेक चटके सोसलेली ही भावंडे वेळ आल्यावर सर्वोच्च स्थानी असणाऱ्या ब्रह्मवृंदांशी भिडली आहेत. त्यांनी स्वतःचा अधिकार सिद्ध केला आहे. तरीही ऋजुता जपली आहे. ही ऋजुता आपण ज्ञानेश्वरीत पाहू शकतो. निवृत्ती ज्ञानदेवांच्या वर्तनात पाहू शकतो. पण मुक्ताई स्वभावतःच तिखट आहे. रोखठोक आहे.
या पहिल्याच प्रसंगाने जरी नामदेवांना कोरा किंवा कच्चे मडके ठरविले असले आणि पुढे औंढ्या नागनाथाला विसोबा खेचराकडे पाठवून त्याचे डोळे उघडविले असले, तरी या पहिल्या प्रत्यक्ष भेटीत काय चर्चा झाली असेल, हा मुद्दा मागे उरतोच. वरील मिथक कथेतून काही तथ्ये हाती येतात. १. नामदेव सगुण-साकाराची भक्ती करणारे आणि समूहाला सोबत घेऊन जाणारे आहेत. २. याउलट ही भावंडे योगमार्ग चोखाळणारी, निर्गुण-निराकाराची उपासना करणारी आणि मोजक्याच लोकांसह या खडतर मार्गावर चालणारी आहेत. ३. सरळ साधी भक्ती करणाऱ्यांसाठी हा योगमार्ग कैकाड म्हणजे कठीण आहे. ४. कोणता मार्ग अनुसरावा याबाबत पहिल्या भेटीत या दोन पक्षांचे एकमत झालेले नाही.
नामदेवांनी चित्रित केलेल्या या मिथक कथेत काय दिसते? तर सनातनी ब्रह्मवृंदाने बहिष्कृत ठरविलेल्या भावंडांची प्रत्यक्ष पांडुरंगच काळजी करतो. त्यांच्यासाठी पांडुरंगाचा जीव कळवतो. परंतु पंढरपुरात स्वतःचा नावलौकिक असलेल्या नामदेवाला या भावंडांबद्दल कळवळा नाही. तो अनिच्छेनेच पांडुरंगाने सांगितले म्हणून या भेटीला गेला आहे. त्यांचे दारिद्र्य आणि गूढ वाटणारे वर्तन पाहून त्या भावंडांबद्दलचे मत आणखीनच नकारात्मक बनते.
येथे नामदेवांनी संपूर्ण समाजाचे मत स्वतःच्या माध्यमातून मांडले आहे. समाज ज्या नजरेने या भावंडांकडे पाहतो, त्या नजरेनेच या मिथक कथेतील नामदेव या भावंडांकडे पाहतो आहे. ब्रह्मवृंदाने ज्या कुटुंबाला बहिष्कृत केले, त्या कुटुंबावरील बहिष्कार कोण काढू शकतो? अर्थातच प्रत्यक्ष परमेश्वर! त्यामुळेच या मिथक कथेत प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवाला, पर्यायाने सगळ्या समाजाला या भावंडांचे श्रेष्ठत्व समजावून सांगतो आहे. ही एक सुंदर तर्कशुद्ध मांडणी आहे. या भावंडांचे श्रेष्ठत्व समाजामध्ये स्थापित करण्यासाठी नामदेव प्रस्तुत मिथक कथेत स्वतःकडे कमीपणा घेतो आहे आणि विठ्ठलाच्या मुखातून या भावंडांवरील बहिष्कार धुडकावून लावतो आहे.
इथे आणखी एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तो असा की, बह्मवृंदाने बहिष्कृत केलेल्या या भावंडांच्या भेटीला नामदेव गेलाच कसा? ज्यांचा दर्जा चांडाळ ठरविला गेला आहे, त्यांच्याशी संपर्क-संवाद ठेवलाच कसा? याचे उत्तर आहे, बह्मवृंदाच्याही वर असणाऱ्या परमेश्वर या Super authorityचा, म्हणजेच श्री विठ्ठलाचा आदेश होता. नामदेवांनी रचलेल्या या अलौकिक मिथक कथेमध्ये पुढे वारकरी संप्रदायात आणि समाजातही या भावंडांचे श्रेष्ठत्व स्थापिले गेले. नामदेवांना नेमके हेच साध्य करायचे होते.
नंतरच्या एका मिथक कथेत विसोबा खेचर यांच्या भेटीमध्ये नामदेवांचे डोळे उघडण्याचा प्रसंग येतो. 'सर्व काळी परमात्मा आहे सर्व देशी', याचा साक्षात्कार नामदेवांना होतो. 'डोळियांचे डोळे उघडले जेणे। आनंदाचे लेणे लेवविले।।' अशी नामदेवांची अवस्था होते. नंतर ज्ञानदेव आग्रहाने नामदेवांना आपल्यासोबत तीर्थयात्रेस नेतात. तिथेही दोघांची सगुण निर्गुण उपासना पद्धतीवर विस्ताराने चर्चा होते. योगमार्ग हा सर्वजन सुलभ नाही, याउट भक्तिमार्गच सामूहिक भक्तीसाठी योग्य, यावर या उभयतांचे एकमत होते. शेवटी ज्ञानदेव नामदेवास म्हणतात, 'सिंधुहुनी सखोल सरस तुझे बोल। आनंदाची ओल नित्य नवी।।" अर्थातच त्यानंतर नाथपंथी असणारी ही चार भावंडे, शैवमार्गी असणारे विसोबा खेचर आणि निर्गुण-निराकाराची उपासना करणारे वैराग्यमूर्ती गोरोबा कुंभार सगळेच वारकरी संप्रदायात येतात. संत होतात. अभंग लिहितात. कच्चे मडके असणारा नामदेव हा संतमेळा जमवून चंद्रभागेच्या वाळवंटात नाचत राहतो आणि वारकऱ्यांचे रिंगण दिसामासाने विस्तारत जाते.
*डॉ. श्यामसुंदर मिरजकर*
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
ता. खटाव, जि. सातारा ४१५ १०२
दूरभाष : ९४२१२१२३५२
अतिशय सुंदर लेख,काही प्रसंग डोळ्यासमोर उभारतात,,,,त्यावेळच्या वातावरणात घेऊन जातात,,,,वाचताना प्रसंगांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला,,,,खूप खूप आभार आणि धन्यवाद,,,,
उत्तर द्याहटवाअतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. चिकित्सक पद्धतीने ज्ञानदेवादी भावंडे व नामदेव यांच्या भेटीचे विश्लेषण आवडले.
उत्तर द्याहटवामध्ये काही ठिकाणी केलेला इंग्रजी शब्दांचा वापर मात्र खटकतो. आपलं मातृभाषा प्रभुत्व खूप मोठे आहे मग इंग्रजी कशासाठी ?
सुंदर माहिती .. सोप्या भाषेत ..
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर मांडणी,
उत्तर द्याहटवाआशय व शैली खूपच छान आहे. आशयपूर्ण छोटी छोटी वाक्ये, "फसगंमत" सारखे मजेशीर पण आशयसंपन्न व चपखल शब्द.....संत नामदेवांचे कार्य खूपच प्रगल्भ, पुरोगामी, समानता प्रस्थापित करणारे...बुद्बांची करुणा, प्रज्ञा, शील या संकल्पना प्रत्यक्षात आणणारे, या विचारांना प्रवाहित करणारे आहे. ही क्रांतीच आहे. हे तुमच्या पुस्तकातून व आता या लेखातून जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. त्या दृष्टीने तुमचे लेखन महत्त्वाचे आहे. लेखाचे नाव मला फारच आवडले. थोड्या व नेमक्या शब्दांत ....."सणकांडी".....अप्रतिम.
उत्तर द्याहटवाप्रा. सुलभा पाटील, संगमनेर
छानच झाला आहे लेख.
उत्तर द्याहटवाइंग्रजी शब्दांचा वापर अजिबात खटकला नाही.
छान शैलीत उतरला आहे लेख.
डॉ. रमेश साळुंखे, निपाणी
खूपच छान.
उत्तर द्याहटवाअभ्यासपूर्ण लेखन
कथाकार संभाजी गायकवाड
माहिती अतिशय सोप्या शब्दात अत्यंत महत्त्वाची असून आजच्या पिढीला यामुळे मुक्ताई माहीत होणार आहे. कारण आजची पिढी मोबाईल मध्ये गुंतली आहे. आजच्या धावपळीचे जीवनात आपल्या संस्कृतीची माहितीसाठी असे लिखाण उपलब्ध करून आपण सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवले. याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
उत्तर द्याहटवासर,नामदेवांची मिथक कथा उलगडून दाखवताना नामदेवांची फजिती,पांडुरंगाचा आदेश आणि मुक्ताईचं रोखठोक मत हे सर्व तर्कशुद्ध लेखनकौशल्य आणि मांडणी अप्रतिमच आहे आणि संतसाहित्यातील कठीण भाग सहजपणे सोप्या भाषेत मांडण्याची तुमचं कौशल्य अद्वितीय. छान लेख .आवडला.अभिनंदन !!!
उत्तर द्याहटवा