गवंडी मायाप्पा गायकवाड आणि डॉ. बाबासाहेबांची पुस्तकं

गवंडी मायाप्पा गायकवाड आणि डॉ. बाबासाहेबांची पुस्तकं

      सामान्य कष्टकरी माणूस बहुधा आतबाहेर सर्वत्र प्रांजळ प्रामाणिक असतो. हे कष्टकरी निरक्षर असतात किंवा अल्पशिक्षित असतात. तरीही जगण्याची लढाई लढताना त्यांच्यामध्ये आशावाद ठासून भरलेला असतो आणि कोणता आदर्श नजरेसमोर ठेवायचा याचे एक जागते भान देखील त्यांच्याकडे असते. जत विजापूरकडून रोजगारासाठी सांगलीत आलेल्या मायाप्पा गायकवाड या कन्नड बांधकाम मजुराशी माझा संबंध येण्याचे तसे काही कारण नव्हते. धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस होता. सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मी पुस्तकांचा स्टॉल मांडला होता. दुपारी दोन अडीच पर्यंत विक्री केली आणि पुस्तके गोळा करून स्टॉल आवरू लागलो. त्याच वेळी एक उन्हाने रापलेला काळासावळा माणूस स्टॉल जवळ उभा राहिला. अंगात टेरिकॉटचा शर्ट, पांढरी विजार आणि अगदी जुनी कामचलाऊ सायकल. बघता क्षणीच खेडवळ वाटावा असा. 
        त्याने विचारले, "काय हाय वो अण्णा? पुस्तकं हाईत व्हय." 
       मी पुस्तके लावता लावता म्हणालो, "होय." 
      त्याने पुढे विचारले, "आमच्या बाबासाहेबाची पुस्तकं हाईत का?"
       त्या वाक्यासरशी मी चमकून त्याच्याकडे पाहिले. हातातले काम थांबवून मी त्याला म्हणालो, "आहेत की!" 
       तो म्हणाला, "द्या एक-दोन चांगली."
त्याला छोटी छोटी कमी किमतीची पुस्तके दाखवली. तो म्हणाला, "मला वाचायला येत न्हाई ओ अण्णा. द्या तुमीच चांगली बघून."
      त्यातल्या तीन पुस्तकांची मिळून किंमत ८० रुपये होत होती. तो शंभर रुपयाची नोट माझ्याकडे देत म्हणाला, "काही कमी होत न्हाई व्हय, अण्णा. एक दहा रुपये कमी करा की. तेवढंच तीस रुपय दारू प्यायला हुतील." खरे तर त्याच्याकडून दहा रुपये कमी घ्यावेत, असे मी ठरवले होतेच. परंतु दारू प्यायला, असे शब्द ऐकल्याबरोबर मी म्हणालो, "नाही कमी होत." तो हिरमुसला. 
       "बर द्या मग," असं म्हणत तीन पुस्तके व वीस रुपये घेतले. थोडा वेळ तिथेच बोलत उभा राहिला. मी म्हणालो, "तुमची पोरं काय करतात? त्यांना काय व्यसन आहे का?" तो उसळून म्हणाला, "उंडगीच्यास्नी लोळवीन की व्यसन केलं तर! शाळंला जात्यात पोरं माजी. हे बाबासाहेबाचं वाचून कायतरी शानी हुतील. मोठी हुतील. म्हणून पुस्तकं घेतोय, अण्णा. मला एक वाचायला येत न्हायी. माजी पोरं तरी वाचू देत." 
       मी म्हणालो, "तुमच्या पोरांना त्यांचे शाळेतले दोस्त म्हणत असतीलच की तुझा बाप दारू पितोय म्हणून. त्यांना वाईट वाटत नसेल काय? 
      मायाप्पा म्हणाला, "खरं हाय तुमी म्हणतासा ते. खरं काय करायचं. दिवसभर विटा, वाळू, सिमेंट यात हात घालून राबावं लागतंय. लई अंग दुखतंय. मग घेतो थोडी थोडी. आताबी हे पैसं दारूसाठीच ठेवलं हुतं. पुस्तकं बघून म्हटलं न्यावं पोरास्नी." त्या अशिक्षित कष्टकरी सरळसोट स्वभावाच्या माणसात मुलांच्या भविष्यासाठी धडपडणारा तळमळणारा बाप मला दिसत होता. मी त्याला प्रा. हरी नरके लिखित 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले' हे ३० रुपयांचे पुस्तक भेट देत म्हणालो, "हे पुस्तक माझ्याकडून तुम्हाला भेट देतोय. फक्त माझी एक अट आहे, राहिलेले वीस रुपये तसेच ठेवा. आजच्या दिवस दारू पिऊ नका." माझ्याकडे बघत तो म्हणाला, "बर आण्णा, नाही पीत." पुस्तकांकडे बघत पुढे जाता जाता म्हणाला, "उद्या तुमी हितं हाइसा काय?" मी म्हणालो, "नाही. आता सहा डिसेंबर रोजी परत येणार."
  "बरं, येतो मग तवा." असं म्हणत नेटाने पायंडेल मारत तो आपल्या रस्त्याने निघून गेला. सीमाभागातील एक सामान्य कष्टकरी माणूस दारूसाठी राखलेले पैसे 'आपल्या' बाबासाहेबांचे पुस्तक घेण्याकरिता खर्च करतो, याचे मला विलक्षण समाधान वाटले. त्या समाधानातच स्टॉलवरून मी घरी आलो. 
       पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर, २०२१ रोजी मी स्टॉल लावण्यासाठी पुन्हा सांगलीला गेलो. सकाळचे साडेसहा पावणे सात वाजले असतील. ठरलेल्या ठिकाणी मी टेबल मांडू लागलो. तेवढ्यात मला बघून तो काळा सावळा मायाप्पा गायकवाड पुढे आला. म्हणाला, "अण्णा वळखलं का? अहो सहा वाजल्यापास्नं हितं येऊन बसलोय तुमची वाट बघत. म्हटलं तुमच्या लक्षात हाय का नाय कुणास ठावुक. तुम्ही आलासा बरं वाटलं बघा."
     त्याचा चेहरा फुलला होता. त्याने स्टॉल मांडायला मदत केली. टेबल धरू लागला. पुस्तकांच्या जड पिशव्या धरू लागला. नंतर म्हणाला, "ते भारतबाबा का कोणतरी लिवलेलं बाबासाहेबाचं पुस्तक माज्या पोरानं मला वाचून दाखवलं बरं का! बाबासाहेब भला माणूस होऊन गेलं बघा. त्यांचं आयुष्य ऐकून डोळ्यात पाणी आलं माज्या. मी तीन दिवस दारू पिलो न्हाई बघा. लई अंग दुकत हुतं. तरी पिलो न्हाई. आणि तुमी भेट दिलेलं पुस्तक माज्या पोरीकडं हाय. मी संध्याकाळी कामावरनं आल्यावर ती रोज जरा जरा वाचून दाखवत्या." असं म्हणून त्याने डोळे पुसले. बाबा भारती लिखित 'डॉ. आंबेडकरांचे जीवनरहस्य' हे पुस्तक त्याला त्याच्या पोराने वाचून दाखवले होते, हे माझ्या लक्षात आले. 
     तुमच्या मर्जीने चांगली पुस्तक द्या, असे तो म्हणाला. त्याला मी पुस्तकं दाखवली. कोणत्या पुस्तकात काय आहे, तेही समजावून सांगितले. त्याने काही पुस्तकं निवडली. त्यांची किंमत २३० रुपये झाली. मी म्हणालो २०० द्या. तर तो म्हणाला, "तसं नको वो अण्णा. तुम्ही मला लई चांगलं सांगितलासा. २३० रुपयच घ्या. बाबासाहेबाच्या पुस्तकाची किंमत लई मोठी हाय." आग्रह करूनही त्याने सूट घेतली नाही, की एखादे जास्तीचे पुस्तक भेट म्हणूनही घेतले नाही. त्याला पुस्तकात ठेवण्यासाठी एक दोन बुकमार्कर देत होतो, तर तेही नको नको म्हणत होता. मी त्याला सांगितले, हे फुकट असते. पुस्तकात ठेवण्यासाठी वापरतात. "त्यावर काय लिवलंय?" असे त्याने विचारले. मी त्याला वाचून दाखवले, 'खिडकी शिवाय घर नाही आणि पुस्तकांशिवाय प्रकाश नाही.' त्याचे डोळे लकाकले. "हे आमच्याच धंद्यातलं हाय की ओ!" तो म्हणाला. 
     तो पुन्हा म्हणाला, "अण्णा, त्यादिवशी दारू पिली नाही बरं का. तीन दिवस पिली नाही बघा. लई अंग दुखत हुतं तरी पिली नाही. म्हटलं तुम्ही एवढं चांगलं मला सांगितलं तर आपण चांगलं वागावं. तुम्ही आज आला, आनंद वाटला बघा." आपण शब्दाला जागलो हे तो आवर्जून सांगत होता. बोलता बोलताच खरेदी केलेली पुस्तके घेऊन तो सायकलच्या दिशेने जाऊ लागला. लांबूनच त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हात जोडले. मी एकदा मायाप्पाला पाहिले. पुन्हा बाबासाहेबांच्या निश्चयी करारी पुतळ्याकडे पाहत म्हणालो, "बाबासाहेब, आजही दीन दुबळ्यांना तुमचाच खरा आधार वाटतो आणि ही निष्ठावान माणसं आम्हाला जगण्याला बळ देतात. तुमच्या विचारांचा प्रचार प्रसार हेच आमचे तुम्हाला अभिवादन!"

(त्या मायाप्पाचा फोटो घ्यायचा राहिला, याची रुखरुख मनाला लागून राहिली आहे.)

                         त्र्यंबकेश्वर मिरजकर
                 नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर
                           ९८८१०३५८०३
             (शब्दांकन : श्यामसुंदर मिरजकर) 

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर, प्रेरणा माणसात उतरण्यासाठी प्रमाण शिक्षणच पाहिजे असे नाही, तर सजगता आणि शहाणपण हवे.

    "अडाणी बाप घरादाराला ताप" असे एक घोषवाक्य साक्षरतेच्या चळवळीत लिहिलेले असे ते मला कधीच पटले नाही कारण या अनेक उच्चशिक्षित लेखांच्या लेकांचे लेकींचे बाप अडाणीच होते. पण त्यांनी शहाणपण दाखविले आणि आपल्या मुलांना शिकविले. शिक्षणाने तेच शहाणपण येणे आवश्यक आहे.

    शब्दांकन अतिशय संवेदनशील झाले आहे

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर लेख आज सकाळी उठल्याबरोबर वाचला. आजच कॉलेजमधल्या माझ्या वर्गातील विद्यार्थींना वाचून दाखवावा म्हणतोय.
    सर खूप छान लेख.पाठ्यपुस्तकातल्या धड्यासारखा !

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान सर निव्वळ प्रचार प्रसारच करीत नाहीत आपण तर लोकांना स्फूर्ती प्रेरणेसह समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहात. 9423272454

    उत्तर द्याहटवा
  4. समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग झाले आहेत व आजही होत आहेत. परंतु शाहू फुले आंबेडकर पेरियार विचार धारेची पुस्तके घरोघरी पोहचवून केलेलं समाज परिवर्तन हे कायम स्वरुपी करणारे मिरजकर बंधूंचा प्रयत्न दाद देण्यासारखा आहे. मी गेली पंचवीस वर्षे हे अथक परिश्रम पाहतोय. अगदी तळमळीने, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हे दोन्ही बंधू निरपेक्ष भावनेने काम करत आहेत. मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे एकमेव पुस्तकांचे केंद्र आहे. समाज परिवर्तनासाठी लागणारी पुस्तकांची सामुग्री मोठ्या कष्टाने व तितक्याच ताकदीने चालवत आहेत. मला वाटते मिरजकर बंधूंचा हा प्रयत्न समाज परिवर्तन घडवून आणणारा एक स्तुत्य उपक्रम आहे. मनापासून शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान प्रसंग ...प्रेरणादायी..

    उत्तर द्याहटवा
  6. खुप छान, प्रेरक!!✔️
    मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही कही भी हो आग, आग जलनी चाहिए।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)