झाड वाचूया आनंदे (ललित लेख)

झाड वाचूया आनंदे
       "परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः।" असा एका संस्कृत श्लोकाचा पूर्वार्ध आहे. 'अामूलाग्र परोपकार' असं आपण वृक्षांचं वर्णन करू शकतो. पशु, पक्षी, मानव सर्वांना वृक्ष काहीतरी देतच असतात. जे वृक्षांना पाणी घालतात, त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून झटतात, त्यांनाही वृक्ष फलपुष्पपत्रछाया देतात आणि जे वृक्षतोड करावयास येतात त्यांनाही वृक्ष फलपुष्पपत्रछाया या सगळ्या गोष्टी देतात. म्हणूनच संत ज्ञानदेवांनी वृक्षांना सत्पुरुष म्हटले आहे. परंतु या परोपरकारी मित्रांना आपण किती समजून घेतो? त्यांचे मोठेपण किती जाणतो? कवी वसंत आबाजी डहाके यांची एक विलक्षण वेगळी कविता आहे.
        झाड तोडायचे, कापायचे
        लगदा करायचा, कागद बनवायचा
        त्यावर लिहायचे, ते छापायचे
        एवढा खटाटोप कशासाठी?
        सरळ झाडच वाचावे!
खरे तर साहित्य हे जीवन समजून घेण्यासाठी असते. जगणे अनुभवण्यासाठी असते. इथे कवी म्हणतोय, तुम्ही जर नेमकेपणाने झाड, म्हणजेच निसर्ग वाचू शकलात, तर कविता वाचायची गरजच नाही.
      खरोखर झाड वाचता येईल आपल्याला? काय करावे लागेल त्यासाठी? तर त्यासाठी प्रत्येक झाडाचे त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात आणि सर्व ऋतूत निरीक्षण करावे लागेल. "शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी।", असे आपल्या तुकोबांनी म्हटलेच आहे. आणि एका बीजाचे सामर्थ्य केवढे? तर एका चिंचोक्यामध्ये एक अाख्खे चिंचेचे झाड सुप्त रूपात वास करते. त्या सुप्त बीजाला अनुकूल वातावरण मिळाले, तर बीज रुजते. अंकुरते. हळूहळू मूळ धरते. वाढते. आणि नीट संगोपन केले, तर इवल्याशा रोपाचे हळूहळू झाडात, वृक्षात रूपांतर होते. बालपणी वाऱ्यावावटळाने किंवा तृणभक्षी प्राण्यांच्या दातलण्याने मुळापासून उपटून निघण्याची भीती असणारे रोप वृक्ष झाल्यावर मात्र मदमस्त हत्तीच्या टकरेलाही समर्थपणे तोंड देते. हे अंगभूत सामर्थ्य झाडात असते, तसेच ते मनुष्यप्राण्यातही दडलेले  असते.
       'जसे हवामान तशा तरुवेली' हा निसर्गाचा साधा नियम असतो. अति पर्जन्याच्या प्रदेशात घनगर्द पर्णसंभार असणारे वृक्ष असतात, तर कमी पावसाच्या प्रदेशात काटेरी झाडाझुडपांची संख्या जास्त असते. काही झाडे कठीण कणखर, तर काही हलकी सहज मोडणारी असतात. काही पानाफुलांचे सौंदर्य असणारी शोभेची, तर काही फळभार देणारी असतात. प्रत्येक झाडाची तऱ्हा वेगळी. गुणधर्म वेगळे. एकदा महर्षी चरकांनी आपल्या शिष्याला औषधी गुणधर्म नसलेली वनस्पती शोधायला सांगितले. काही काळाने तो शिष्य परत येऊन म्हणाला, "गुरुदेव, या पृथ्वीतलावर औषधी गुणधर्म नसलेली एकही वनस्पती नाही."
      आपण आपल्या परिसरातील वृक्षवेलींना नीट ओळखतो का? त्यांची नीट देखभाल करतो का? हा एक प्रश्न आहे. काही झाडांना कमी पाणी मिळाले तर ते सुकतात. उदाहरणार्थ केळी. काही झाडांना जास्त पाणी दिले, तर ते मानवत नाही. उदाहरणार्थ, डाळिंब. मोहर किंवा कळ्या यायच्या दरम्यान फळझाडांना जास्त पाणी दिले, तर फळभार कमी येतो. याउलट मोहराच्या काळात ठरावीक अंतराने आणि नियंत्रित पाणी देऊन कळी, मोहर आणि फळभार वाढविता येतो. याला झाडाला ताण देणे म्हणतात. कुंडीतील रोपांना जास्त पाणी दिले तर मुळं कुजतात. पानं पिवळी पडतात.
     औदुंबर, चंदन अशी झाडे जलस्रोत दर्शक असतात. वड, पिंपळ, लिंब, अशोक, जांभूळ ही झाडं अधिक ऑक्सिजन  निर्माण करतात. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा या झाडांचे रोपण केले जाते. ऊस आणि बांबू हे गवताचे प्रकार आहेत. जेव्हा बांबू धानात येतो म्हणजेच फुलतो तेव्हा लगतच्या वर्षात दुष्काळाची जास्त शक्यता असते. घराच्या जवळ लोक शेवगा, पपई आणि बदामाचे झाड लावत नाहीत. त्याचे खरे कारण म्हणजे ही झाडं हलकी असतात. या झाडांवर मुलं चढली तर फांद्या तुटून अपघात होण्याची संभावना जास्त असते. रातराणीच्या गंधाकडे सर्प आकर्षित होतात, हे खरे नाही. पण केवड्याच्या बेटात सर्प आढळतात. कारण तिथे गारवा आणि लपण असते. प्रत्येक झाडाची पानं, फुलं, रंग, गंध वेगळा असतो. पण सगळेच प्राणवायू देत राहतात. आज कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व किती आहे, ते सगळ्यांनाच कळून चुकले आहे. पण मुक्तहस्ते ऑक्सिजन वाटणाऱ्या वनराईला आपण अद्यापही पुरतं जाणलं नाही. कधीकाळी जंगलव्याप्त असणाऱ्या भूमीवरून आता जंगल कमी कमी होऊ लागले आहे. तरीही झाडांशी, वेलींशी आपले अविभाज्य नाते आहे. यासंदर्भात कवी नलेश पाटील एका कवितेत म्हणतात,
            ह्या हिरव्या वस्तीमध्ये
            हे प्राणवायूचे घर
            मज इथे निवारा मिळतो
            अन् इथेच हिरवा सूर

            माझ्या हातांच्या रेषा
            पानात उमटल्या कशा
            पानातून कुठे निघाल्या
            त्या शोधीत हिरव्या दिशा?
एकंदर काय, तर आपला भविष्यकाळ हा प्राणवायूचे घर असणाऱ्या हिरवाईशी घट्टपणे जोडला गेला आहे, हेच खरे!

                  डॉ. श्यामसुंदर मिरजकर
           कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी.
                        ९४२१२१२३५२

टिप्पण्या

  1. Ashwini Mane-खुपच छान लिहिलत सर 👍🏻

    उत्तर द्याहटवा
  2. सर लेख माहिती पूर्ण व सुंदर झाला आहे

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर... झाडं निसर्ग वाचताना देह भान विसरते, झाडं पावसाचं अनुमान देतात, झाडं बोलतात, आपण ते ऐकत नाही. त्यांची भाषा आम्ही विसरलो आहोत, पण ती सोपी आहे, त्यासाठी त्यांच्याजवळ जायला हवं, झाडं आनंदाने वाचायला हवं... आवडला

    उत्तर द्याहटवा
  4. छान लिहिलंय..झाडांबद्दलची निरीक्षणे महत्वाची..👍

    उत्तर द्याहटवा
  5. डॉ.मिरजकर सर, खूपच सुंदर ललित लेख आहे. झाड हे सजीव घटक असूनही अव्यक्त असते परंतु आपल्या पर्यावरणीय व मानवी जीवनासंबंधीच्या चिंतनातून अभिव्यक्त झालेली झाडाची व्यक्त प्रतिमा लाजवाब ठरलेली आहे ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी प्राणवायू देणाऱ्या झाडाचा चोळामोळा करून झाड वाचण्याची मानवाची अघोरी कल्पना हास्यास्पद ठरते. लेखातील दातलणे क्रियापदाची नवनिर्मिती कौतुकास्पद वाटली. खूप खूप लिहा सर !पुढील अशाच सुंदर लेखासाठी शुभेच्छा !
    महेशकुमार सोनावणे , बारामती

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)