पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ : नागनाथअण्णा नायकवडी

       

पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ : नागनाथअण्णा

         भारतीयांच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ इंग्रज घालवणे आणि त्याठिकाणी एतद्देशीयांना बसविणे इतका मर्यादित कधीच नव्हता. तर हा देश इथल्या  कष्टकरी- श्रमजीवी-दलित-वंचित स्त्रीशूद्राच्या कल्याणाचा काळजीवाहक व्हावा, अशी प्रखर जाणीव इतिहासातील काही लढवय्या नायकांना होती. त्यांपैकी एक म्हणजे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी होय. बालपणापासून ज्यांचे नाव आम्ही भाषणांमधून ऐकायचो किंवा वृत्तपत्रात वाचायचो त्यांना जवळून अनुभवण्याचा योग वाळवा येथे २० ते २२ जानेवारी, १९९६ रोजी झालेल्या चौथ्या दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनात आला. महाराष्ट्रातील कर्ते कार्यकर्ते आणि डावे विद्रोही आंबेडकरवादी विचारवंत एका मंचावर येण्याचा हा प्रसंग होता. अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण होते ते. त्यावेळी मी रुकडी येथे प्राध्यापक होतो. आम्ही आवर्जून वाळव्यात आलो. जबरदस्त उत्साहात चाललेली ती वैचारिक घुसळण पाहिली. अनेक लेखक विचारवंतांना प्रथमच पाहिले. ऐकले. भरभरून चर्चा केली. पुस्तकांची खरेदी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाकरी, भरली वांगी, दही-खर्डा असा अस्सल शेतकरी कष्टकऱ्यांचा मेनू पुण्या-मुंबईतील लोकांना नाकावरील घाम पुसत खाताना पाहून हरखून गेलो. इतरत्र साखर कारखाना म्हणजे टोलेजंग इमारती, संचालकांचा डामडौल आणि दबून गेलेले शेतकरी-कामगार असेच चित्र दिसायचे. वाळव्यात मात्र सर्वत्र साधेपणा आणि गुणवत्तेचा आग्रह होता. ऊसाला सर्वात जास्त भाव देणारा, सामान्य सभासदांना संचालक बनवून निर्णय प्रकियेत घेणारा हा साखर कारखाना शेतकरी बहुजनांशी वैचारिक बांधिलकी जपणारा होता. या कारखान्यात कोणी साखरसम्राट नव्हता हे विशेष!
        मी मूळचा इचलकरंजीचा. कामगार जीवनातून पुढे आलेला. थोडी आंबेडकरी चळवळीची, बामसेफच्या कार्याची पार्श्वभूमी असणारा. परंतु आपण वैचारिक पातळीवर शेतकरी कष्टकरी दलित वंचित आदिवासी यांच्या सोबतच आहोत, असले पाहिजे, याची प्रखर जाणीव करून देणारे ते साहित्य संमेलन होते. अण्णांचा करारी बाणा आणि नेटके नियोजन यामुळे ते यशस्वी झालेच, परंतु पुढे कित्येक दिवस त्याची सर्वत्र चर्चा होत राहिली. साहित्याच्या प्रांतात नाहीरे वर्गाचा आवाज बुलंद होत राहिला. पुढे माझे लेखन, वाचन, चिंतन याच पद्धतीने होत राहिले.
      यादरम्यानच आम्ही बामसेफमध्ये सक्रिय होतो. एकदा कोल्हापूरात बामसेफच्या राज्य अधिवेशनाचे नियोजन केले होते. मुस्लीम बोर्डिंगचा हॉल कार्यक्रमासाठी ठरवला होता. उद्घाटनासाठी आम्ही नागनाथअण्णांना बोलविले होते. प्रमुख वक्त्यांमध्ये ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. वेळ सकाळी साडे नऊची ठरविली होती. परंतु कार्यकर्ते जमणे, कार्यक्रमाची तयारी करणे, याला थोडा वेळ लागणार होता. अकरापर्यंत सुरू करता येईल, असे गृहीत धरले होते. निमंत्रित मान्यवरही थोडे उशिरा येतात हा अनुभव गाठीशी होता. परंतु नागनाथअण्णा अगदी ठरलेल्या वेळी सभागृहात पोचले आणि आमची धावपळ सुरू झाली. स्टेज तयार करणे, बॅनर लावणे, खुर्च्या मांडणे, अशी लगबग सुरू असतानाच अण्णा आले. डॉ. विनोद पवार, डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ. रवींद्र श्रावस्ती, प्रा. प्रभाकर निसर्गंध, शांत्ताप्पा बनसोडे, धनंजय झाकर्डे आदी कार्यकर्ते झटत होते. आम्हाला आता नेमके काय करायचे ते सुचेना. अण्णा सभागृहात बाजूलाच एका खुर्चीवर शांतपणे बसून राहिले आणि आम्हाला आमचे काम चालू ठेवायला सांगितले. वक्तशीरपणाचा अण्णांचा गुण ऐकून होतो. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र त्यादिवशी आला. त्यांनी त्यावेळी केलेले उद्घाटनाचे भाषण हे छोटे, परंतु अत्यंत मौलिक होते. ते म्हणाले, "आम्ही इंग्रजांशी लढलो. परंतु तेव्हा आपल्याच लोकांशी झगडावे लागेल, असे वाटले नव्हते. ब्राह्मणवादी संघटना आणि भांडवलदार यांचे साटेलोटे आहे. त्यांनी जाणीवपूर्वक बहुजन समाजाला अज्ञानात ठेवले आहे. आपल्याला जास्त शक्ती आपल्या समाजाला जागे करण्यातच खर्च करावी लागेल. शत्रूशी लढण्यामध्ये जास्त शक्ती खर्चण्यात अर्थ नाही." त्यांच्या विचारांचा धागा पकडूच पुढील भाषणे होत गेली. अधिवेशन यशस्वी झाले.
          तिसरा महत्त्वाचा प्रसंग घडला तो विटा येथे. आमचे मित्र प्रा.एकनाथ पाटील एकदा सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी गेले. तेव्हा त्या व्याख्यानात त्यांनी शिवाजी महाराजांचा रामदासांशी काहीही संबंध नाही, असे विधान केले होते. त्यावर विट्यातील शिवप्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, भारतीय सनातन संस्था अशा सगळ्या ब्राह्मणवादी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी बळवंत कॉलेजवर मोर्चा काढला. प्रा. एकनाथ पाटील यांनी माफी मागावी, त्यांना नोकरीतून काढावे, अशा मागण्या सुरू केल्या. त्यांच्या राहत्या घरावर रात्री अपरात्री दगडफेक करण्यात आली. विट्यात फिरू देणार नाही. तुकडे करू. फाडून टाकू, असे जाहीरपणे बोलले गेले. तासिका तत्त्वावर असणारे एकनाथ पाटील पत्नीसह एका भयंकर प्रसंगाला सामोरे जात होते. परंतु त्यांनी आपली भूमिका सोडली नाही. तेव्हा पुरोगामी भूमिका असलेल्या समविचारी संघटनांच्या विट्यातील कार्यकर्त्यांना भेटून सगळी मी वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर एकनाथ पाटलांच्या समर्थनात मुख्य चौकात आम्ही आयोजित केलेल्या जाहीर सभेत वाळव्याहून अण्णांचे कार्यकर्ते ट्रक भरून आले. अण्णा स्वतः स्टेजवर होते. ते इतकेच म्हणाले "१९४८ मध्ये फक्त घरं जाळली. चूकच झाली. आता जर एकनाथ पाटलांना कोणी हात लावला तर माझ्याशी गाठ आहे." हे भाषण ब्राह्मणवादी संघटनांचे नेते कार्यकर्ते दुरून ऐकतच होते. मात्रा बरोबर लागू पडली आणि तो प्रसंग निभावला. पुरोगामी भूमिका घेणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहायचे असते, याचा वस्तुपाठ त्यावेळी अण्णांनी सर्वांना घालून दिला.
        पुढे आम्ही नाग-नालंदा प्रकाशन ही संस्था सुरू केली. बंधू त्र्यंबकेश्वर पुस्तक प्रकाशन व वितरण या दोन्ही जबाबदाऱ्या पार पडू लागले. या काळात अनेक वेळेला नागनाथ अण्णांशी संबंध येत गेला. पुढे नागनाथ अण्णांचे चरित्र व कार्य स्पष्ट करणाऱ्या 'क्रांतिवीर' या पुस्तकाच्या शेकडो प्रती आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात विक्री केल्या. त्यानिमित्ताने वैभव नायकवडी (काका) व सौ. नंदिनी नायकवडी (काकी) यांच्याशी संबंध येत गेला. नाग-नालंदा प्रकाशन ही पुरोगामी विचारांची जोपासना करणारी, परिवर्तनवादी चळवळीला बळ देणारी प्रकाशन संस्था आहे. त्यामुळे या संस्थेला पाठबळ दिले पाहिजे, अशी भूमिका नेहमीच नायकवडी परिवाराने घेतली. पुरोगामी भूमिकेतून काम करत असताना अण्णांच्या रूपाने एक भक्कम आधार कायम पाठीशी आहे, असेच आम्हाला वाटत राहिले.
    पुढे अण्णांचे कार्यकर्ते जयवंत अहिर (मामा) यांनी लिहिलेली दोन पुस्तके आम्ही प्रकाशित केली. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 'क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी : एका लढवय्या क्रांतिमातेचा इतिहास' आणि 'क्रांतिवीर नागनाथअण्णाचे शिलेदार : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी खंडू दाजी शेळके' ही दोन पुस्तके म्हणजे नागनाथ अण्णा यांच्या कार्याला केलेले अभिवादन असेच म्हटले पाहिजे. आज नागनाथअण्णा, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एन. डी. पाटील अशी आभाळाएवढी माणसं आपल्यामध्ये नाहीत, याचे मनस्वी दुःख होते. कारण ते इतिहासाचे नायक होते. त्यांनी इतिहास पाहिला, घडविला आणि नव्या पिढीला सांगितला देखील. त्यांचा तोच वसा वारसा घेऊन आणि त्यांच्या कार्यातून बळ घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. त्यांच्या धगधगत्या अग्निकुंडासारख्या रसरशीत जीवनकार्यास मनःपूर्वक अभिवादन!

                -   डॉ. श्यामसुंदर मिरजकर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)