संत निरंतर जागविती

*संत निरंतर जागविती*

      वारकरी चळवळीचे अध्वर्यू म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव महाराज (इ.स.१२७० ते १३५०) होय. पारंपरिक उपासना, पूजाअर्चा यांच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी ईश्वराचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी अनेक वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण, पुराणिक, हरिदास यांच्याशी चर्चा केली. परंतु या ब्रह्मवृंदांपैकी कोणीही नामदेवांचे समाधान केले नाही. मग ते आपल्या मनाचा उपदेश स्वीकारून पांडुरंगाला शरण गेले आणि त्यांनी नव्या भक्तिमार्गाचे प्रवर्तन केले. वेदशास्त्रपुराणादी संस्कृत ग्रंथ हे ठरावीकांची मक्तेदारी बनून गेले होते. सर्व समाजाला उपासनेचे स्वातंत्र्य देण्याइतकी उदारता वेद वाङ्मयात नव्हती. त्यामुळेच नामदेवांनी श्री विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून नव्या भक्तिमार्गाचे प्रवर्तन केले. देव आकाराला आल्यानंतर प्रथम त्याला लाभते ते नाम! म्हणून नामसंकीर्तन हेच भक्तीचे साधन, असे त्यांनी ठरविले.
       'देव आकारला नामरूपा आला।
      म्हणोनि स्थापिला नामवेदीं।।
      नामापरता मंत्र नाहीं हो आणिक।
      सांगती ते मूर्ख ज्ञानहीन।।' ( अ. क्र. ६८०)
अशा शब्दांत त्यांनी आपले तत्त्वज्ञान उद्घोषिले. संत सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखामेळा,जनाबाई असे आपले समविचारी सवंगडी त्यांनी जमविले. अनेक जातीतून आलेले सदाचारी सत्पुरुष त्यांच्यासोबत ही नामसंकीर्तनाची भक्ती करू लागले. शुद्ध आचरण हे या संतांचे वैशिष्ट्य होते. या संत मंडळात थोड्या उशिराने प्रवेशिलेल्या ज्ञानदेवादी भावंडांनी या संप्रदायाला तात्त्विक आधार दिला आणि नवे प्रवर्तन घडले.
        हिताचिया गोष्टी सांगू एकमेकां।
        शोक मोह दुःख निरसूं तेणें।।
        एकमेका करूं सदा सावधान।
        नामी अनुसंधान तुटीं नेदूं।। (१९१५)
असा दृढनिश्चय करून ही संत मंडळी कृतिशील बनली. आपल्या आजूबाजूला असलेल्या व अज्ञान अंधकारात बुडून गेलेल्या बहुजन समाजाला जागे करण्याचे, योग्य दिशा दाखविण्याचे, आत्मविश्वासाने उभे करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य या संतांनी केले.
    आम्ही परीट चोखट। शुद्ध केले नटखट।
    बोध साबण लाऊनी ठायीं। डाग उडविला पाही।।(१७६८)
असे म्हणत ही संत मंडळी समाजाला कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून बाहेर काढू लागली आणि सदाचार संपन्न असा नवा वारकरी संप्रदाय त्यांनी घडविला. संत समागम म्हणजे नित्य नवा दिस जागृतीचा, असे घडत असते. म्हणून तर संत तुकाराम म्हणतात, 'काय वाणू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती।' तुकोबांनी नामदेवांना गुरुस्थानी मानले होते, हे लक्षात घेतले, तर हे निरंतर जागविणे नामदेवांच्या स्वभावधर्मातच होते, हे आपल्या लक्षात येईल. म्हणूनच 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।' असा दृढ संकल्प त्यांनी केलेला दिसतो. 'आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।।' असे म्हणत त्यांनी शेकडो जातीत विभाजित झालेल्या बहुजन समाजाला एकत्र केले. 'सर्वांभूतीं समदृष्टी। हेचि भक्ति गोमटी।।' (१९९९) असे त्यांनी ठणकावून सांगितले. भेद करणारे वेद त्यांनी बाजूला सारले.
    'न पढावे वेद, नको शास्त्रबोध।
    नामाचे प्रबंध पाठ करा।।' (१९८२)
अशा शब्दांत त्यांनी आपले नवप्रवर्तन जाहीर केले. या नव्या वारकरी धर्मामध्ये पूर्वपरंपरेने चालत आलेल्या अनेक गोष्टींना नकार दिला गेला होता.
     'न लगे करावे यज्ञयाग। न लगे आणिक मंत्रलाग।
     एक सेविलिया पांडुरंग। अनंत तीर्थे घडतील।।(१९५१)
अशा पद्धतीचा दृढ विश्वास त्यांनी भाविकांना दिला. या मार्गावरून चालताना दोनच गोष्टी महत्त्वाच्या मानल्या. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध आचरण होय. कायावाचामने परमेश्वराची उपासना, ही दुसरी गोष्ट होय. म्हणूनच त्यांनी एका हिंदी अभंगात 'हरी नांव सकल जीवन में क्रांती।' (२१०८) असे म्हटले आहे. संत हे हरीचे डिंगर आहेत. पंढरीचे वीर वारीकर आहेत. जगाचा उद्धार करणे, हे त्यांचे कार्य आहे, असे नामदेवांनी म्हटले आहे. 'ब्रह्ममूर्ति संत जगीं अवतरले। उद्धरावया आले दीनजनां।। (८२८) अशा शब्दांत नामदेवांनी संतांचे कार्य नमूद केले आहे. या वारकरी संतांनी वेदशास्त्रपुराण यातील कर्मकांडे व कथा बाजू सारल्या आहेत आणि नवा मार्ग अनुसरला आहे. 'पुराण व्युत्पत्ति न लगती त्या श्रुती। हरिनाम पंथी मुनीं गेले।। (७७४) अशा शब्दांत नामदेव संतांच्या नव्या मार्गक्रमणेचा गौरव करतात.
        तत्पूर्वी लोक दानधर्म, व्रत-उद्यापने, तीर्थाटन अशा अनेक भ्रामक गोष्टींमध्ये अडकलेले होते. वारकरी संप्रदायात दानधर्माला अजिबात थारा नाही. देवाला तुळशीदळाशिवाय अन्य काहीही लागत नाही. शुद्ध भक्तिभाव हीच देवाची अपेक्षा! परंतु ब्राह्मण पुरोहितांनी विविध विधी, उपासना व दानधर्म यांचे पुन्हा पुन्हा महत्त्व सांगून सर्वसामान्यांचे जिणे नको नको करून सोडले होते. त्याबद्दल संत नामदेव म्हणतात,
     'काय आम्हापाशीं आहे धन वित्त। दान तें उचित देऊं काय।
    देतां घेतां आम्हां पुरे पुरे जालें। संगतीं त्यागिलें भिवोनियां।।
    काय वाणूं गुण भिकारपणाची। होसी पंढरीची नामनौका।।
    नामा म्हणे पुढें दाखवी मारग। आम्ही तुज मागें येऊं सुखें।। (१६२९)
अर्थात या भटजी पुरोहितांनी वेगवेगळ्या कारणांनी इतक्या वेळेला दक्षिणा मागितली की सामान्य माणसाला पुरे पुरे झाले. आता घाबरून त्यांची संगतच सोडली. कारण त्यांची लक्षणे भिकारपणाची होती. आता नामरूपी नौका आम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे, असे नामदेव म्हणतात.
       त्याचबरोबर तीर्थाटन करणे, अनेक देव देवतांच्या ठिकाणांना भेट देणे, हेही वारकऱ्यांना मान्य नाही. कारण तीर्थक्षेत्राला भेट दिल्याने पाप जाते ही कल्पनाच वारकरी अमान्य करतात.
     'काय करुनी तीर्थाटन। मनी भरले अवगुण।
     मन संकल्पाची पापे। नवजती तीर्थाचिया बापें।।' (१८१४)
असे नामदेवांचे म्हणणे आहे. मग हे पाप जाणार तरी कसे? तर 'पाप जाय अनुतापे।' असे नामदेव म्हणतात. जर एखाद्या चुकीच्या गोष्टीबद्दल तुम्हाला मनापासून दुःख होत असेल, पश्चाताप होत असेल, तरच तुमचे पाप नाहीसे होऊ शकेल, अन्यथा कोणत्याही तीर्थात, कोणत्याही पर्वणीच्या काळात बुडी मारली, तरी पाप नाहीसे होऊ शकत नाही, असे ते म्हणतात. त्याचबरोबर या पृथ्वीवर असंख्य तीर्थक्षेत्रे आहेत. ती सर्व एकदा फिरायचे, असे ठरवले तरीसुद्धा, आहे हा जन्म पुरणार नाही, असे नामदेव म्हणतात.
     तीर्थे हिंडिजे तरी भूमि नवखंड।
     आयुष्य उदंड नाही मज।। (अप्रकाशित अभंग ५१३)
नऊ खंड पृथ्वीवर पसरलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी देणे शक्य नाही, म्हणून फक्त पंढरीचीच वाट आपण धरावी, असे नामदेवांना वाटते. 'सांडूनि पंढरिची वारी, मोक्ष मागती ते भिकारी।।' अशा शब्दांत पंढरीचे माहात्म्य ते वर्णन करतात.
      पंढरपूर हे सगळ्यांसाठी मुक्तद्वार आहे. सर्व स्त्रीपुरुष, अबालवृद्ध यांच्यासाठी हा देव, हे मंदिर खुले आहे. येथे कसलेही बंधन नाही. आडकाठी नाही. म्हणूनच नामदेव म्हणतात, 'न लगे गुरु मंत्र, न लगे जपतप। उघडे स्वरूप, विटेवरी।।' (२०२४). विठ्ठलभक्ती करताना गुरुचीसुद्धा आवश्यकता नाही, अशा शब्दांत सहज सोपा वारकरी मार्ग नामदेवांनी सांगितला आहे. या मार्गावर चालताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नाकाराव्यात याच्याही स्पष्ट सूचना नामदेवांनी दिलेल्या दिसतात.
      'परदारा परनिंदा परधन पर पीडन।
      सांडूनी भजन हरीचे करा।। (१८६७)
अशा शब्दांत त्यांनी काय काय त्याज्य आहे, ते सांगितले आहे. समाजात भक्तिमार्ग सांगणारे सगळेच साधू नसतात, तर अनेक भोंदूही साधूपणाचा वेश धारण करतात. त्यांची कठोर शब्दांत खरडपट्टी काढण्याचे काम नामदेवांनी केले आहे.
    काय आसन घालुन। मुखीं नाहीं नारायण।।
    टिळे टोपी माळा दावी। भोळ्या भाविकांसी गोवी।। (१७८८)
म्हणजेच कुठेतरी पद्मासन वगैरे घालून बसायचे, परमेश्वराचे नाम मुखी न घेता कपाळाला टिळा, डोक्यावर टोपी, गळ्यात माळा असे बाह्यलक्षण दाखवायचे आणि भोळ्या भाविकांना लुबाडायचे, असे हे भोंदू करत राहतात. त्यांचे वर्तन शुद्ध नसते.
     'गोसावीपणाचा दाखविती वेष।
     नाहीं निजध्यास हरिनामीं।।
     वरी वरी अार्त दाविती झगमग।
     अंतरी तो संग विषयाचा।। (१७९५)
अशी त्यांची स्थिती असते. वरवर भगवी कपडे आणि साधूचा परिवेश धारण करणारे हे लोक मनातून मात्र विषयलोभी असतात. स्त्रीलोभी असतात. त्यांच्यापासून सावधपणे दूर राहणेच योग्य, असे नामदेव सुचवितात.
     दावी जडीबुटी जारण मारण।
     नागवें हिंडणें काय काज।।
     दावी उग्र तप केले उपवास।
     फिरतांहि देश काय लाज।। (१८०१)
काही साधूंचे जथ्थे देशाच्या विविध भागात फिरत राहतात. जडीबुटी, जारण-मारण अशा काही गोष्टी ते लोकांना सांगतात. उग्र तप केले, उपवास केला, असे सांगतात. काही साधू नग्न हिंडतात. त्यांना लाजही वाटत नाही. अशा शब्दांत संत नामदेव या भोंदू साधूंचा निषेध करतात. भक्तीमध्ये मन शुद्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शक्य तितके इतरांचे कल्याण करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अांतरिक शक्तीचा धाक दाखविणे, इतरांचे नुकसान करण्याचे भय घालणे साधुपणाला शोभत नाही. संत नामदेव म्हणतात, 'शुद्ध करी मन, समता धरी ध्यान। तरिच भवबंधन तुटेल रे।' (१८१२)
        संत नामदेवांनी बालपणीच श्री विठ्ठलाला साक्षात नैवेद्य भरविला, स्वतःच्या हाताने जेवू घातले, अशा चमत्काराच्या कथा अनेक कीर्तनकार, प्रवचनकार सांगत असतात. याच्या अगदी उलट, परमेश्वर दगडाच्या मूर्तीत नाही, असे अत्यंत ठामपणे नामदेवांनी आपल्या अभंगातून मांडले आहे. ते कोणी सांगत नाही. संत नामदेव म्हणतात,
     पाषाणाचा देव बोलेचि ना कधीं।
     हरी भवव्याधि केंवी घडे।।
     दगडाची मूर्ति मानिला ईश्वर।
     परि तो साचार देव भिन्न।।
     दगडाचा देव इच्छा पुरवीत।
     तरि कां भंगत आघातानें।।
     पाषाण देवाची करिती जे भक्ति।
     सर्वस्वा मुकती मूढपणें।।
     प्रस्तराचा देव बोलत भक्तांते।
     सांगते ऐकते मूर्ख दोघे।।
     ऐशांचे माहात्म्य जे कां वर्णिताती।
     आणि म्हणविती तेणे भक्त।।
     परंतु ते नर पामर जाणावे।
     त्यांचे नायकावे बोल कांनीं।। (१३६९)
येथे नामदेवांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत असे म्हटले आहे की, दगडाचा देव भक्तांशी बोलतो, त्यांची संकटे दूर करतो, असे म्हणणारे लोक खोटं बोलतात. असा दगडाचा देव जर लोकांच्या इच्छा पूर्ण करीत असेल, तर एखाद्या आघाताने त्याचे तुकडे का होतात? दगडाचा देव बोलतो, असे सांगणारे व ऐकणारे दोघेही मूर्ख आहेत. ते भक्त नाहीत, तर पामर आहेत. त्यांचे बोल खरे मानू नयेत. ऐकू नयेत. अशा शब्दांत नामदेवांनी मूर्ती पूजेचे औडंबर नाकारले आहे. दुसऱ्या अभंगात ते असे म्हणतात की,
     देव दाखवी ऐसा नाही गुरु
     जेथें जाय तेथें दगड शेंदरू।
     देव दगडाचा बोलेल कैंचा।
     कोणे काळी त्यास फुटेल वाचा।।
     देव देव करितां शिणले माझें मन।
     जेथें जाय तेथें पूजा पाषाण।।
     नामा तोचि देव हृदयीं पाहे।
     नामा केशवाचे न सोडी पाय।। (४६६)
देव दाखवेल असा गुरू नाही. जिकडेतिकडे शेंदूर माखलेले दगड आहेत. अशा कठोर शब्दांत नामदेवांनी आजूबाजूचे वास्तव मांडले आहे. जर देव शोधायचाच असेल, तर तो दगडात न शोधता स्वतःच्या अंत:करणात शोधावा, कारण माणसाच्या शुद्ध अंत:करणातच चांगल्या भावना निर्माण होतात. इतरांच्या भल्याचा विचार जन्मतो. दुसऱ्या एका अभंगात नामदेव असे म्हणतात,
        नाना धातूंची प्रतिमा केली।
        षौडशोपचारें पूजिली।
        दुकळीं विकुनि खादली।
        ते काय अार्त पुरविती।। (१८३७)
वेगवेगळ्या धातूंच्या मूर्ती लोक दुष्काळात विकून टाकतात. त्या पैशातून अन्न घेऊन खातात. अशा या मूर्ती लोकांच्या इच्छा कशा पूर्ण करतील, असा प्रश्न नामदेव उपस्थित करतात. म्हणजेच संत नामदेवांचा सगळा भर हा शुद्ध आचरणावर आहे.
       न धरावी चाड मान सन्मानाची।
       आवडी भक्तीची रूढवावी।। (१८६९)
अशा शब्दांत त्यांनी भक्ती रूढ करण्याचा उपदेश केला आहे. हे करताना 'शुद्ध आचरण न सांडावे' असा दंडक घालून दिला आहे. आपल्या वेगळ्या विचारांचा प्रचार प्रसार करताना जर कोणी त्रास दिला, निंदा केली, तर ती सहन करावी, असे सांगताना नामदेव म्हणतात,
      निंदिल हे जन सुखे निंदू द्यावें।
      सज्जनीं क्षोभावे नये बापा।।
      निंदा स्तुति ज्याला समान पैं जाली।
      त्याची स्थिती आली समाधिसी।।
      शत्रु मित्र ज्याला होती समानत्वें।
      तोचि पैं देवातें आवडला।। (१८७८)
लोकांनी केलेली टीका, जननिंदा या गोष्टींमुळे सज्जनांनी संतापू नये. उलट शत्रू व मित्र सर्वांशी समान वर्तन करावे, असा उपदेश नामदेव येथे करतात. 'अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदी भरीन तिन्ही लोक।।' असा त्यांचा दृढ विश्वास आहे. येथे संत नामदेव संसारापासून विन्मुख झालेले दिसत नाहीत. प्रत्यक्ष त्यांच्या चरित्राचा विचार केला तर असे दिसेल की, त्यांना चार मुले व एक मुलगी होती. या चार मुलांचे लग्न झाले. चार सुना आल्या. म्हणजेच त्यांनी स्वतःचा संसार त्यागला नाही. फक्त ते संसारात गुंतले नाहीत. अडकून पडले नाहीत. 'संसारी असावे, असुनी नसावे। कीर्तन करावे, वेळो वेळा।।'अशा शब्दांत त्यांनी संसारापासून मनाने अलिप्त व्हायला सांगितले आहे. त्याचबरोबर संसार करताना प्रामाणिकपणे करावा, हिमतीने करावा, स्वतःच्या बळावर करावा, असेही त्यांनी सांगितलेले आहे.
      अगा येऊनिया संसारा।
      नवजावें आणिकांच्या द्वारा।।
      इष्ट मित्र सज्जन सोयरा।
      बंधु आदि करून।।
      नाम विक्रयो न करावा।
      दान प्रतिग्रहो न घ्यावा।।
      कष्टें करुनि मेळवावा।
     तोचि ग्रास आपुला।।
अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी कष्ट करण्याला, श्रमाला महत्त्व दिले आहे. दान वगैरे मागून फुकट खाणे धिक्कारले आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
      खरे तर, माणसाचा देह हा क्षणभंगुर आहे. माणूस आज आहे, उद्या नाही. नामदेवांच्या शब्दांत सांगायचे तर 'शरीर काळाचें भातुकें।' (१९११) आहे. म्हणजेच शरीर हे काळाचे खाद्य आहे. आणि 'जंववरी संपत्ति तंववरी हे सखे।' (१८५७) हे आजचे वास्तव आहे. 'अंतकाळ वेळीं तुझें नव्हे कोण्ही। मी माझें म्हणवूनि भुललासी।। (१८७१) अशा शब्दांत नामदेव आपल्याला सावध करू पाहतात. आपण संसारात इतके गुंतलेले असतो, की मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी, इतर आप्तस्वकीयांसाठी नीती-अनितीने खूप काही कमवत राहतो. परंतु 'हे माझे, हे माझे' हा आपला भ्रम असतो.
         थोडक्यात, गेली साडेसातशे वर्षे समाजाला अखंड जागविणारे संत म्हणजे संतश्रेष्ठ नामदेवराय होय. त्यांनी फक्त भक्ती आणि मुक्तीचा मार्ग दाखविला असे म्हणता येणार नाही, तर त्यांनी सर्व स्त्री-पुरुषांच्या मनी ज्ञानदीप प्रज्वलित केला. विवेकाचा विचार जागृत केला. काय करावे काय टाळावे, हे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळेच त्यांचे काळाच्या कसोटीवर चिरंजीव ठरलेले हे शब्द आजही कथा-कीर्तनांमधून 'जागल्या' होऊन नाचत आहेत. तुमच्या आमच्या मनात नवा शुद्धाचरणाचा मार्ग दाखवीत आहेत. पत्रकार आणि प्रसार माध्यमे हे आपल्या समकाळात जागल्याची भूमिका पार पाडतात, तर संत निरंतर समाजाला जागविण्याचे कार्य करत राहतात. म्हणूनच ते वंदनीय व अनुकरणीय ठरतात.

                   *डॉ.श्यामसुंदर मिरजकर*
            कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी.
                       ९४२१२१२३५२


(संतांचा जागर - संपादक प्रा. रवींद्र पाटील, पद्मरत्न प्रकाशन, इचलकरंजी या पुस्तकातून प्रकाशित) 

टिप्पण्या

  1. सहज सोप्या शब्दात पुस्तकाचे सार उलगडून दाखवले. खूप सुंदर 💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. ब्राह्मण म्हणून बोंबा मारणारे भरपूर त्यातील हे एक दुसरं काय,नामदेवांनी कुठेही आशा टिपणी ब्राह्मण लोकांवर केल्या नाहीत ,समाज प्रबोधन म्हणजे टीका करणे नव्हे स्वतः सुधारा कोणीही बिनाकलेच नाही,हेच जणू हुशार,त्यावेळची पिढी यांचे दृष्टीने काय होती विचार करून पहा ,स्वतःला विचारवंत समजणारी ही मंडळी तशी कु विचाराचीच म्हणावी लागेलं कारण याना जळी,स्थळी,काष्टी,पाषाणी ब्राह्मण दिसतो,समाज प्रबोधन करताना दुसऱ्याच्या जातीवर टीका करताना याना काहीच वाटत नाही हेच खरं दुर्दैव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. माझ्या लेखावरील या प्रतिक्रियेचा मला आनंदच आहे. वाचक कोणकोणत्या नजरेतून लेख वाचतात याचा हा एक नमुना म्हणावा लागेल. संतश्रेष्ठ नामदेवांचे कार्य, त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी हा लेख आहे. कुठल्या जातीवर टीका करणे हा हेतू नाही. मात्र प्रस्तुत प्रतिसादकाने तसे गृहीत धरले आहे. अभ्यासपूर्वक आणि अभंगांचा आधार घेऊन केलेली मांडणी एका झटक्यात उडवून लावणे हे नवे नाही. एखादा शिक्का मारून लेखन कोपऱ्यात टाकायचे ही जुनीच खोड आहे.
      इथे मी नम्रपणे काही गोष्टी सांगू इच्छितो, की उपरोक्त लेखात दिलेले सगळे संदर्भ हे श्रीनामदेव गाथेमधीलच आहेत. संपूर्ण श्रीनामदेव गाथा वाचण्याचे कष्ट कोणी घेत नाही. त्यामुळे असे वाटू शकते की नामदेवांनी असे काही लिहिलेलेच नसावे. परंतु येथे दोन गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. एक, सगळ्या वारकरी संतांनी भक्तीचा नवा मार्ग का सांगितला? दोन, सगळ्या वारकरी संतांचा तत्कालीन सनातन्यांकडून छळ का झाला? या दोन प्रश्नांची उत्तरे शोधली तर आपणास वारकरी संतांची वैचारिक लढाई कोणाशी होती हे स्पष्ट होईल. नवे काही मांडताना जुने खोडून काढणे, नाकारणे क्रमप्राप्त ठरते. आज संतांचा गौरव करावा वाटतो, परंतु संतांचेच शब्द पचत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माझी भूमिका संतांचे मूळ विचार लोकांपर्यंत पोहोचविणे इतकीच आहे.

      हटवा
  3. परनिंदा करू नये सांगितलंय,विठ्ठल भक्ती सांगितलीय तरी यांनी स्वतःची मतं नामदेवांचे विचार म्हणून प्रकट करणं हे फार निंदनीय आहे,स्वधर्मा बद्दल अभिमान नसणे हे काही उचित वाटत नाही

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ही प्रतिक्रिया देखील वरील प्रतिसादकाचीच असावी असे वाटते. परनिंदा करू नये हे अगदी बरोबर आहे. परंतु वस्तुस्थिती मांडताना विशिष्ट प्रवृत्ती विरुद्ध लिहावे लागले, तर मात्र नाईलाज होतो. दोष दाखविणे आणि निंदा करणे यामध्ये मूलभूत फरक आहे. प्रस्तुत लेखात कोणाची निंदा आली आहे, असे मला वाटत नाही. मात्र विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पद्धतीने वर्तन करणाऱ्या प्रवृत्तींवर टीका जरूर आलेली आहे. आपण याकडे कोणत्या नजरेने पाहणार त्यानुसार बोध होईल. दुसरा मुद्दा असा उपस्थित केला गेला आहे की स्वधर्माबद्दल अभिमान नसणे हे काही उचित वाटत नाही! मी प्रस्तुत लेखात असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त धर्माच्या नावावर अन्याय करणारे काही घडत असेल, दुसऱ्याला कमी लेखणारे, त्याचे माणूसपण हिरावणारे काहीतरी लादले जात असेल, तर त्याचा अभिमान कसा बाळगायचा? व्यक्तिशः मला संत विचार आवडतो म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तो मांडतो आहे. संतांनी सांगितलेला धर्म हाच खरा धर्म आहे, असे मला वाटते.

      हटवा
  4. डॉ.चंद्रकांत कांबळे,वाई१४ जानेवारी, २०२३ रोजी १०:१६ AM

    डॉ.श्यामसुंदर मिरजकर हे जसे संवेदनशील कवी आहेत, तद्वतच ते विचारवंतही आहेत.संतश्रेष्ठ नामदेवांचे विचार त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहेत.तत्कालीन काळातील अठरापगड जातींच्या संतांना बरोबर घेऊन त्यांनी वारकरी संप्रदाय देशभर पोहोचविला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)