भाषांतरमीमांसा आणि तिचे उपयोजन

भाषांतरमीमांसा आणि तिचे उपयोजन


Criticisim of translation quality should be grounded on thorough analysis and description. Some critics prefer to eschew value judgements, prefer not to proclaim one translation better than another (Hatim and Mason 1990b: 1)

      भाषांतर ही मूलतः द्वैभाषिक प्रक्रिया आहे. बऱ्याच वेळेला भाषांतर आणि अनुवाद हे दोन शब्द एकाच अर्थाने वापरलेले आढळतात. वस्तूतः, या दोन भिन्न संज्ञा आहेत. अनुवाद ही व्यापक संज्ञा असून भाषांतर हे अनुवादाचे एक अभिन्न अंग आहे. संस्कृत साहित्यात अनुवाद हा शब्द फार पूर्वीपासून वापरला जातो. या संज्ञेचा मूळ अर्थ पाठोपाठ उच्चारणे, असा आहे. न्याय सूत्राच्या दुसऱ्या अध्यायातील प्रथम आह्निकम् मध्ये 'विधिविहितस्य अनुवचनम् अनुवादः।' १.६६ असे सूत्र येते. वैदिकांनी वैध म्हणून मान्यता दिलेल्या अनुवचनांचा अनुवाद केला जावा, असे येथे म्हटले गेले आहे. इथे अनुवाद याचा अर्थ पाठोपाठ म्हणणे, विश्लेषण करणे, अन्वय लावणे, स्पष्टीकरण किंवा विस्तार करणे, असा अभिप्रेत आहे. 'पूर्वसिद्ध मजकुराचे स्पष्टीकरण विवरण अथवा विस्तार म्हणजे अनुवाद होय.' [१] या संज्ञेमध्ये पाठांतर, पुनरावृत्ती, गद्य किंवा पद्य रूपांतर, भाष्य, विश्लेषणात्मक टीका या सर्वांचा समावेश होतो. हा अनुवाद एकभाषिक असू शकतो किंवा भिन्नभाषिकही असू शकतो. म्हणजेच गीता या लघुग्रंथावर शांकरभाष्यही आढळते आणि ज्ञानेश्वरीही लिहिली जाते. ही एकभाषिक आणि भिन्नभाषिक अनुवादाची उदाहरणे आहेत. रामायण, महाभारत किंवा विविध पुराणांवर आधारित विविध भारतीय भाषांमधून निर्माण झालेले काव्यग्रंथ हे अनुवादाचेच उदाहरण आहे.
        एका भाषेतील संहितेच्या भावार्थाचे शब्दशः दुसऱ्या भाषेमध्ये केले जाणारे सर्जन म्हणजे भाषांतर होय. डॉ. कल्याण काळे यांच्या मते, "मूळ कृतीचा स्थुलाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या कौशल्यापेक्षा तिचा शब्दशः अर्थ तिच्या शैली घटकांसह दुसऱ्या भाषेत उतरवण्याचे कौशल्य अधिक सूक्ष्म असून भाषांतरमीमांसेमध्ये याचाच प्रामुख्याने विचार असतो." [2]
        रूपांतर आणि भाषांतर या दोन भिन्न संज्ञा असून त्यांचा समावेश भिन्न भाषिक अनुवादामध्ये होतो. भाषांतर ही आशयरूपनिष्ठ अशी प्रतिसंहिता असते. तर रूपांतरामध्ये मूळ संहितेचा सारांश, विस्तार, स्पष्टीकरण यांचा समावेश होतो. कधी कधी रूपांतरामध्ये मूळ संहितेचा आकृतिबंध बदलला जातो. म्हणजे महाकाव्याचे रूपांतर कादंबरीमध्ये होऊ शकते. कथा किंवा नाटकातही होऊ शकते. महाभारताच्या कथानकांवर बसलेल्या कथा, कादंबऱ्या, नाटके, कविता यांचा या संदर्भात विचार करता येईल.

भाषांतर प्रक्रिया
      कोणत्याही एका भाषेतील प्रभावी व भावलेली संहिता (लेखन) दुसऱ्या भाषेत आशय व शैलीसह नेणे म्हणजेच प्रतिसंहिता निर्माण करणे होय. हेच भाषांतर आहे. ही प्रक्रिया कधी स्वयंस्फूर्तीने तर कधी इतर व्यक्ती, संस्था यांच्या मागणीनुसार घडते. कधी ती व्यावहारिक, व्यावसायिक गरजही असते. या भाषांतर प्रक्रियेची व भाषांतरित संहितेची चिकित्सा ही भाषांतरमीमांसेमध्ये केली जाते. भाषांतरमीमांसेचे मूलतः तीन प्रकार केले जातात.

१. औपपत्तिक भाषांतरमीमांसा
        भाषांतर प्रक्रियेच्या सैद्धांतिक पक्षाची मांडणी अौपपत्तिक भाषांतरमीमांसेत होते. आशय ज्या मूळ भाषेत असतो ती स्रोतभाषा होय आणि आशय ज्या दुसऱ्या भाषेत न्यायचा असतो ती लक्ष्यभाषा होय. मुळात भाषा आणि तिने स्वीकारलेली लिपी म्हणजे एक प्रकारची चिह्नव्यवस्था असते. एका विशिष्ट समूहाने ती चिह्नव्यवस्था मान्य केलेली असते. वापरलेली असते. आणि अशी चिह्नव्यवस्था वापरून ललित व ललितेतर साहित्याची निर्मितीही केलेली असते. एका भाषेची चिह्नव्यवस्था दुसऱ्या भाषेच्या चिह्नव्यवस्थेशी कधीच तंतोतंत जुळत नाही. यालाच भाषेची सापेक्षता, असे म्हटले जाते. त्यामुळेच एका भाषेत स्त्रीलिंगी असणारे शब्द दुसऱ्या भाषेत पुल्लिंगी असू शकतात. एका भाषिक समूहाच्या अनुभवावरून त्या भाषेची समृद्धी ठरत असते. भूप्रदेश, हवामान, व्यवसाय, शिक्षण अशा अनेक गोष्टींनी व्यक्तीचे अनुभवविश्व भारित केलेले असते. त्यामुळे त्यानुसारच त्या व्यक्तीचा भाषिक अवकाश कमी अधिक प्रमाणात समृद्ध झालेला असतो. या सर्वांचा तपशीलात जाऊन केलेला विचार अौपत्तिक भाषांतरमीमांसेत येतो.
     स्रोतभाषा व लक्ष्यभाषा यांचे स्वरूप, त्यांचा परस्पर संबंध, त्यांचा परस्परांवरील प्रभाव, त्या दोन्ही भाषांचे सामर्थ्य आणि मर्यादा, स्थळकाळानुसार त्या भाषांमध्ये आढळणारे भेद, त्या भाषिक समूहांमध्ये आढळणारे सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिक संकेत व त्यांचा भाषेवर झालेला परिणाम, यांचा अभ्यास अौपत्तिक भाषांतरमीमांसेत येतो. भाषांतराचे प्रकार, भाषांतर आणि रूपांतर यामधील भेद, भाषांतर आणि माध्यमांतर अशा विविध घटकांचा विचार येथे केला जाऊ शकतो. मुळात व्यक्ती आपल्या अनुभवांची पुनर्मांडणी व तिचे चिह्निकरण भाषेच्या माध्यमातून करत असते. ते मूळ अनुभवाशी तंतोतंत जुळणारे असतेच असे नाही. त्यामुळेच बऱ्याच वेळेला व्यक्तीला 'मला हे नीटपणे शब्दात मांडता येत नाही', असे म्हणावे लागते. त्या भाषेच्या मर्यादाच असतात. या मर्यादांसह सिद्ध झालेला मजकूर व त्यात गठित झालेला अनुभव दुसऱ्या भाषेत नेणे हे सोपे नसते. ही सर्व प्रक्रिया कशी चालते आणि त्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात, या सर्वांचा विचार औपपत्तिक भाषांतरमीमांसेत होतो.

२. उपयोजित भाषांतरमीमांसा
         उपयोजित भाषांतरमीमांसेत प्रत्यक्ष भाषांतर कार्याचा विचार केला जातो. प्रत्येक भाषा ही स्वायत्त व सेंद्रिय संघटना असते. भाषांची कुळे असतात आणि परस्परांशी विशिष्ट नातेसंबंधही असतो. एकाच भाषा कुळातील दोन भिन्न भाषांमध्ये केली जाणारी भाषांतर प्रक्रिया ही अधिक सहज स्वाभाविक होते. सोपी ठरते. याउलट भिन्न भाषा कुळातील भाषांमध्ये केले जाणारे भाषांतर हे कठीण, वेळ खाऊ आणि समाज-सांस्कृतिक संदर्भाचा सूक्ष्म विचार करून करावे लागते. यासाठी दोन भाषांचा तौलनिक अभ्यास केला जाऊ शकतो.
        स्रोतभाषा आणि लक्ष्यभाषा यांच्यातील भौगोलिक, सांस्कृतिक व कालविशिष्ट अंतर किती, यानुसार भाषांतर प्रक्रियेची सुलभता व जटिलता ठरत असते. स्रोतभाषेतील एखाद्या संहितेची लक्ष्यभाषेत अनेक भाषांतरे होत असतात. अशा भाषांतरांचा तौलनिक अभ्यासही केला जाऊ शकतो. मूळ संहितेतील अनुभवविश्वाशी तादात्म्य व एकरूपता साधणारा अनुभव भाषांतरित प्रतिसंहिता देते काय, याचा विचार करून अनेक भाषांतरांचा तौलनिक अभ्यास केला जाऊ शकतो.
       भाषांतरकार भाषांतरासाठी कोणती भाषा निवडतो यावरही भाषांतर कार्याचे व भाषांतरित कृतीचे मोल ठरत असते. परभाषेतून मातृभाषेत एखादी संहिता आणणे सोपे असते, मात्र मातृभाषेतून परभाषेत संहिता स्थलांतरित करणे तितकेच कठीण असते. लक्ष्यभाषा ही आपल्या भाषिक परिसराशी संलग्नित असणारी द्वितीय भाषा आहे की वापरात नसलेली अभिजात भाषा आहे (उदा.संस्कृत) की एखादी परकीय भाषा आहे, यावर भाषांतर कार्याचे काठिण्य ठरत असते. स्रोतभाषा व लक्ष्यभाषा यातील साम्य जितके जास्त तितकी सुलभता व व्यत्यास जितका जास्त तितकी कठीणता आढळते. भाषांतरकाराची या दोन भिन्न भाषांमधील सहजता किती प्रमाणात आहे, यावरही त्याच्या भाषांतरकार्याचे सौकर्य अवलंबून असते.
       तसेच भाषांतरित संहिता कोणत्या प्रकारची आहे, त्यानुसारही भाषांतर कार्याचे काठीण्य ठरत असते. उदाहरणार्थ, शास्त्रीय ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, वैचारिक लेखन किंवा ललित साहित्यकृती यांच्या भाषांतराचे स्तर वेगळे असतात. हेतू वेगळे असतात. त्यासाठी भाषांतरकाराजवळ असावी लागणारी भाषिक सक्षमता वेगळी असते. या विविध प्रकारच्या भाषांतरात येणाऱ्या अडचणी वेगवेगळ्या असतात. त्यावर भाषांतरकाराने कोणता मार्ग काढला, कशी मात केली, याचा अभ्यास लक्षणीय ठरतो.

३. अन्य विद्याशाखीय भाषांतरमीमांसा
        अन्य विद्याशाखीय भाषांतरमीमांसेत भाषांतर प्रक्रिया, तिच्यावर परिणाम करणारे घटक आणि अडचणी यांचा विचार केला जात नाही, तर  भाषांतराच्या परिणामाचा विचार केला जातो. एकूण भाषांतरकार्य कोणत्या काळात होते, कोणत्या हेतूने होते, भाषांतर कार्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था कोणत्या, भाषांतरित प्रतिसंहितांचे परिणाम काय होतात, भाषांतरित प्रतिसंहितांचा लक्ष्यभाषेतील मूळ संहितांवर कोणता प्रभाव पडतो, यांचा अभ्यास अन्य विद्याशाखीय भाषांतरमीमांसेत केला जातो. भाषांतरित प्रतिसंहिता ही फक्त आशय किंवा अनुभव यांचे स्थलांतर करण्यापुरती मर्यादित नसते, तर त्या प्रतिसंहितेचे सखोल व दूरगामी परिणाम त्या भाषिक समुदायांवर पडतात. उदाहरणार्थ, बायबलचे मराठी भाषांतर पंडिता रमाबाई यांनी केले आणि त्याचा दूरगामी सखोल प्रभाव ख्रिस्ती धर्म अनुसरणाऱ्या मराठी लोकांवर पडला.
         भाषांतर कार्यावर राजकीय प्रणाली किंवा विशिष्ट विचारधारा यांचाही मोठा प्रभाव असतो. १८२० ते १८७५ या भाषांतरयुगात संस्कृत संहितांचे मराठी अनुवाद मोठ्या प्रमाणात झाले. तसेच इंग्रजी संहितांचे भाषांतरही झाले. याचे मुख्य कारण राज्यकर्त्या इंग्रजांचे भाषांतराला प्रोत्साहन देण्याचे धोरण होय. त्याचवेळी परकीय संस्कृती, विचारधारा व धर्म लादला जातो आहे, या जाणिवेने अस्वस्थ झालेला सुशिक्षित प्रतिभावंतांचा एक वर्ग 'आमच्या धर्म संस्कृतीतही तितकेच दर्जेदार वाङ्मय आहे', हे दर्शविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यातून ही भाषांतरे घडली आहेत.
         महाराष्ट्राच्या नजीक असणाऱ्या गुजराती साहित्याचा मराठीत अनुवाद कमी प्रमाणात झाला. उलट महाराष्ट्रापासून दूर असणाऱ्या बंगाली साहित्याचा अनुवाद मोठ्या प्रमाणे झाला. पाश्चात्य भाषांमध्ये इंग्रजीतून जेवढ्या मोठ्या प्रमाणात मराठीत भाषांतरे झाली, तितक्या मोठ्या प्रमाणात अन्य विदेशी भाषांमधून झालेली नाहीत. या सगळ्यांचा कार्यकारणभाव शोधणे हेही अन्य विद्याशाखीय भाषांतरमीमांसेमध्ये येते.
       भाषांतरित साहित्य हे लक्ष्यभाषेतील लोकसमूहांची सौंदर्यदृष्टी, वैचारिकता व मूल्यदृष्टी घडवीत असते. मराठीत झालेला वसाहतवादी दृष्टिकोनाचा विकास हा या भाषांतरित साहित्याच्या प्रभावाचा एक परिणाम आहे. याचा अभ्यासही या मीमांसेत केला जातो. अन्य विद्याशाखीय भाषांतरमीमांसेत भाषांतरित साहित्याचा वाङ्मय इतिहासही येतो. विसाव्या शतकात महाराष्ट्रात मार्क्सवादी विचारधारेने प्रभावित असणाऱ्या विद्वान लोकांची संख्या जास्त होती. त्यामुळे रशियन साहित्याचे अनुवाद मोठ्या प्रमाणात झाले. तसेच मार्क्सवादी विचारधारेतील महत्त्वाचे ग्रंथ, साहित्यकृती यांचे भाषांतरही मोठ्या प्रमाणात झाले. भाषांतरकार्यावर अशा विविध घटकांचा पडणारा प्रभाव व दबाव अन्य विद्याशाखीय भाषांतरमीमांसेत तपासला जातो. हा एक प्रकारे भाषांतरकार्याचा समाज-सांस्कृतिक अभ्यास ठरतो.

भाषांतराचे मूल्यमापन
       भाषांतराचे मूल्यमापन म्हणजे मूळ संहिता व प्रतिसंहिता यांचा आशय व भाषाशैली या दृष्टीने केलेला तौलनिक अभ्यास होय. हे मूल्यमापन मूळ संहितेच्या प्रकारावर अवलंबून असते. शास्त्रीय माहिती/लेख/ग्रंथ यांचे भाषांतर हे आशयनिष्ठ असते. त्यामध्ये अनेक संकल्पना व पारिभाषिक शब्द असतात. मूळ संहितेत एकच नेमका अर्थ देण्याची क्षमता असते. त्यामुळे प्रतिसंहितेतही तेच अपेक्षित असते. मूळ संहितेचा आशय नेमक्या अर्थासह प्रतिसंहितेत येणे अपेक्षित असते. त्यामुळे शास्त्रीय साहित्याच्या भाषांतरात आशयाला मोठे महत्त्व येते, भाषाशैली दुय्यम ठरते.
        धार्मिक ग्रंथ हे आशय व भाव या दोन्ही गोष्टींशी निगडित असतात. धार्मिक ग्रंथांबद्दल अनुयायांच्या भावना तीव्र असतात. ते ग्रंथ हे श्रद्धास्थान असते. त्यामुळे एकतर धार्मिक ग्रंथांच्या भाषांतराला विरोधच असतो. कारण मूळ संहितेला मंत्राक्षरांचा दर्जा मिळालेला असतो. ते मंत्र सामर्थ्य भाषांतरित प्रतिसंहितेत येणार नाही, असे भाविकांना वाटते. तरीही जर भाषांतर केले गेले, तर आशय आणि मूळ भाषाशैली यांच्याशी जास्तीत जास्त एकरूपता दाखवणारी प्रतिसंहिता अपेक्षित असते. धार्मिक साहित्यात विशिष्ट संज्ञा, संकल्पना आलेल्या असतात. त्या नेमकेपणाने समजून घेणे व भाषांतरित करणे गरजेचे ठरते. त्यामुळे संहितागत आशय व भाषाशैली या दोन्ही पातळीवर धार्मिक ग्रंथाच्या भाषांतराचे मूल्यमापन होते.
       वैचारिक साहित्याचे भाषांतर मोठ्या प्रमाणात केले जाते. यामध्ये आशयाला अनन्यसाधारण महत्त्व असते. शैली दुय्यम ठरते. मूळ लेखकाला अभिप्रेत असणारा आशय व अर्थ प्रतिसंहितेत प्रतिबिंबित होणे अपेक्षित असते. तो काटेकोरपणे आलेला आहे का, हे तपासणे गरजेचे ठरते. उदाहरणार्थ, महात्मा फुलेंचे लेखन हिंदीमध्ये भाषांतरित झालेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ इंग्रजी लेखन मराठीत भाषांतरित झालेले आहे. या दोन्ही प्रकारच्या भाषांतरात आशयनिष्ठा महत्त्वाची ठरते. डॉ. आंबेडकरांचे इंग्रजी साहित्य मराठीत तंतोतंत भाषांतरित झालेले नाही, असे मला अभ्यासांती जाणवले आहे. वैचारिक साहित्याच्या भाषांतराचे मूल्यमापन आशयनिष्ठ असते. काही वेळेला अज्ञान, खोडसाळपणा, कुप्रवृत्ती यामुळे भाषांतरित प्रतिसंहिते मधील आशयात फरक पडलेला आढळतो.
        ललित साहित्यकृतींचे भाषांतर हे सगळ्यात कठीण काम असते. त्यातही कवितेचे भाषांतर अधिक कठीण असते. ग्रामीण बोली किंवा विशिष्ट समूहनिष्ठ बोली भाषांतरित करणे अवघड असते. ललित साहित्याच्या भाषांतराचे मूल्यमापन आशय व शैली या दोन्ही पातळीवर केले जाते. मूळ साहित्यकृतीतील आशय नेमकेपणाने भाषांतरात उतरला पाहिजे. त्याचबरोबर मूळ भाषा शैलीला जवळ जाणारी भाषाशैली भाषांतरित साहित्यकृतीत आली पाहिजे. काही वेळेला 'प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर' असाही प्रकार आढळतो. मात्र तिथे भाषांतरकाराने मूळ साहित्यकृतीशी प्रतारणा केलेली आढळते. अर्थात भाषांतराचे मूल्यमापन करणाऱ्या व्यक्तीला दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे अवगत असाव्या लागतात. दोन्ही भाषेतील संहिता समोर ठेवून शब्दशः वाक्यशः तुलना करावी लागते. काही वेळेला भाषांतरात अर्थ नेमका उतरलेला असतो, परंतु मूळ संहितेचा परिणाम व प्रभाव भाषांतरात हरवलेला असतो. याही पातळीवर मूल्यमापन करून भाषांतराची सरसनीरसता तपासावी लागते. अर्थात भाषांतराचे मूल्यमापन ही व्यक्तिनिष्ठ चिकित्सा आहे. मूल्यमापन करणाऱ्या व्यक्तीचा प्राधान्यक्रम जसा असेल, त्यावरून तो आपला अनुकूल प्रतिकूल अभिप्राय देईल.
       इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की भाषांतराचे मूल्यमापन म्हणजे भाषांतराची समीक्षा नव्हे. समीक्षेमध्ये ज्याप्रमाणे साहित्यकृती मधून अविष्कृत झालेली आशयसूत्रे, कथानक, जीवनदर्शन, व्यक्तिचित्रण, वातावरण निर्मिती, भाषाशैली यांचे विविध दृष्टिकोनातून मूल्यांकन केले जाते, ते भाषांतराच्या मूल्यमापनात अभिप्रेत नसते.
        थोडक्यात, भाषांतरमीमांसा हा व्यापक विचारव्यूह आहे. प्रत्यक्ष भाषांतर प्रक्रिया, दोन भिन्न भाषांचे स्वरूप, भाषांतरकाराचे योगदान व प्रभुत्व, भाषांतराचे समाज-सांस्कृतिक व राजकीय परिणाम अशा सर्वांचा उहापोह भाषांतरमीमांसेत केला जाऊ शकतो. परभाषेतील चांगल्या दर्जेदार संहिता, साहित्यकृती स्वभाषेत आणताना किंवा स्वभाषेतील चांगल्या दर्जेदार संहिता, साहित्यकृती परभाषेत भाषांतरित करताना अत्यंत जबाबदारीने काम करण्याची गरज असते. दिवसेंदिवस भाषांतरित पुस्तकांना विविध कारणांनी लोकप्रियता मिळत आहे. मात्र भाषांतराची विश्वासार्हता, दर्जा व गुणवत्ता सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते किती प्रमाणात होते आहे, याचा शोध भाषांतरमीमांसा घेऊ शकते.

संदर्भ ग्रंथ
१. भाषांतरमीमांसा - संपा. डॉ. कल्याण काळे डॉ.अंजली सोमण
२. साहित्याची भाषा - डॉ. भालचंद्र नेमाडे

                        डॉ. श्यामसुंदर मिरजकर
               कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी.
               दूरभाष : ९४२१२१२३५२

टिप्पण्या

  1. छान ! विषयाचा व्यासंग चांगला आहे .

    उत्तर द्याहटवा
  2. अत्यंत महत्त्वपूर्ण लेख आपण लिहिलेला आहे भाषांतराच्या विषयी साकल्याने विचार करायला लावणारा असा हा लेख आहे

    उत्तर द्याहटवा
  3. भाषांतर, अनुवाद या विषयावरचा अतिशय महत्त्वपूर्ण लेख.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)