परिसा भागवतांचे परिवर्तन
परिसा भागवतांचे परिवर्तन : भक्तिसंघर्ष युगाची नांदी
परिसा भागवत! अनेक गूढ प्रश्नांचे मोहोळ उभे करणारे वारकरी संत. मूळचे ब्राह्मण. ज्ञानाचा गर्व आणि अहंकार बाळगणारे. नामदेवांची शूद्र म्हणून अवहेलना करणारे. तुझे पूर्वज माझ्या पायाशी, असे म्हणणारे. पुढे हेच परिसा नामदेवाचे शिष्य झाले. तीव्र विरोध ते पक्का अनुयायी हे महापरिवर्तन कसे घडले, याचेच नवल वाटावे. हे परिवर्तन एका रात्रीत घडलेले नाही. एका भेटीत घडलेले नाही. त्याच्यासाठी दीर्घ संवाद झालेला आहे. अनेक घटना प्रसंग घडून गेलेले आहेत. त्याचे काही संदर्भ परिसा भागवतांच्या अभंगातच सापडतात आणि त्यातून या परिवर्तनाची पृष्ठभूमी कळू लागते.
भागवत हे मूळचे कर्नाटकच्या समुद्र किनारपट्टीच्या भागात राहणारे लोक. भागवत लावणे म्हणजे भक्तीच्या प्रचार प्रसारार्थ पौराणिक कथांवर बेतलेले नाट्य सादर करणे. दोन किंवा अधिक लोकांकडून हे विधिनाट्य सादर केले जायचे. याच लोकांनी नंतर भागवत हे आडनाव धारण केले. त्यांच्यापैकीच कुणीतरी एक भागवत पंढरपुरी आले आणि लोकांना रामकथा ऐकवून भक्तीचा उपदेश करू लागले. हेच परीसा भागवत!
भागवत हा एक ग्रंथही आहे आणि संप्रदाय ही आहे. हा वैदिक परंपरेहून भिन्न भक्तिसंप्रदाय आहे. कारण यामध्ये मंत्र नाही, यज्ञयाग नाही, अनुष्ठान नाही. शुद्ध भावाने, एकविध भावाने भक्ती करणे एवढेच येथे अभिप्रेत आहे. विश्वकोशातील नोंदीत डॉ. आ. ह. साळुंखे लिहितात, "भागवत धर्म भक्तिप्रधान आहे. ईश्वरभक्तीनेच मोक्ष मिळतो, किंबहुना ज्ञानापेक्षा भक्ती ही श्रेष्ठ आहे, असे या धर्माने मानले आहे. अनंत असा ईश्वर आपल्या प्रकृतीपासून जगाची निर्मिती करतो. तो अनेक वेळा जगाच्या कल्याणासाठी अवतारांच्या रूपाने प्रकट होतो. नारायण, विष्णू, कृष्ण, वासुदेव इ. नावांनी तो ओळखला जातो. वासुदेव (परमात्मा), संकर्षण (जीवात्मा), अनिरुद्ध (अहंकार) आणि प्रद्युम्न (मन वा बुद्धी) हे त्याचे चार व्यूह मानले आहेत. या धर्मात अहिंसेला प्राधान्य असून भूतदया, सत्यवचन, परोपकार, आई-वडिलांची सेवा इ. नैतिक मूल्यांना अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. संत आणि गुरू यांच्याविषयी आदर बाळगावा, असे हा धर्म सांगतो."
या पार्श्वभूमीवर आपण परिसा भागवतांना समजून घेतले पाहिजे. परिसा म्हणजे ऐका. भागवत ऐका. भक्तीचे गुह्य ऐका, असे म्हणणारे हे भागवत असावेत. परंपरेने ते हे काम करत आहेत. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने भक्तीचे मर्म कळले आहे का? की त्यांचे सगळे कथन, निरूपण हे अर्थेविन पाठांतर आहे, हाच खरा प्रश्न आहे. या परिसांच्या दिखाऊ ज्ञानाच्या फुग्याला प्रश्नांची टाचणी लावून फोडण्याचे काम नामदेवांनी केले. जी रामायणाची कथा परिसा सांगत होते, त्याच कथेच्या अनुषंगाने नामदेवांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे परिसा भागवत अस्वस्थ झाले. शिंपी या खालच्या समजल्या जाणाऱ्या शूद्र जातीतील एका सामान्य व्यक्तीने चार लोकात ब्राह्मणाला प्रश्न विचारून निरुत्तरित करणे म्हणजे केवढा मोठा अपमान! खुद्द परिसा भागवतांना हा अपमान सलतो, डाचतो. म्हणून ते नामदेवांची तक्रार रुक्मिणी मातेकडे करतात. त्यातूनच पुढील सगळे परिवर्तनाचे नाट्य उभे राहते.
श्री नामदेव गाथेमध्ये परिसा भागवताचे १९ अभंग आहेत. त्यांपैकी १३-१४ अभंगांची एक मालिकाच रचली आहे. त्यामधून परिसांच्या वृत्तिपरिवर्तनाचे नाट्य साकारते. हे नाट्य वास्तवात जसे घडले असेल, तसे साकारलेले नाही, तर वारकऱ्यांचे आवडते मिथक इथेही गुंफले गेले आहे. श्री विठ्ठल किंवा रखुमाई हे संतांशी बोलतात हे वारकरी मिथक आहे. जे जनमानसात रुजवायचे, ते आपल्या आराध्य दैवतांच्या मुखातून सांगायचे ही एक वारकरी कथनशैली आहे. ही अभंगमालिका एकाच वेळी तत्कालीन समाजवास्तव, धर्मसंकेत आणि वारकऱ्यांनी आरंभलेले परिवर्तन या सगळ्यांची नोंद करते. कोणताही कनिष्ठ वर्णीय पुरुष कितीही ज्ञानी किंवा अधिकारी असला तरी ब्राह्मणांचा गुरू होऊ शकत नाही, हा तत्कालीन धर्मदंडक होता. हा नियम फक्त अापद्धर्म म्हणूनच मोडला जाऊ शकत होता. अन्यथा हा धर्मदंडक मोडणाऱ्यांना धर्मसभेसमोर अपराधी म्हणून उभे करणे व त्यांना शिक्षा देणे अनिवार्य होते. (जे पुढे आपणास तुकोबांच्या चरित्रात पहावयास मिळते.) संत नामदेवादी संतमंडळी आणि परिसा भागवत यांनाही हे माहीत असावे. म्हणूनच उपरोक्त अभंग मालिकेत त्यांनी अद्भुत नाट्य रचले आहे.
प्रारंभी वर्णाश्रम व्यवस्था अभिमानाने अनुसरणारे परिसा भागवत स्वतःला श्रेष्ठ आणि नामदेवांना तुच्छ लेखतात. त्यांना स्वतःच्या स्थानाचा व ज्ञानाचा अहंकार आहे. म्हणूनच ते स्पष्ट शब्दांत म्हणतात,
जरी तूं हरिदास जालासी ।
तरी याती हीनची।।
पुढे ते म्हणतात, "तू काय पाहिले आहेस? वेदशास्त्र तुला माहीतही नाही. फक्त 'मी अनुभवले' इतकेच सांगतो आहेस. खरे तर तू ठाईचा वासनिक म्हणजेच स्वतःचे इच्छित पूर्ण करणारा आहेस. तू प्रश्न विचारून मला मौनाचा टिळा लावला आहेस. तिथे तुझे इतर अनुयायी/पाईक काय करतील? तू कुटीलपणाने हजारो वैष्णवांच्यामध्ये आपले (भजन/कीर्तनाचे) प्रदर्शन मांडतोस, तेव्हा आपोआपच ते लोक भुलतात. असा तू इतरांना कवटाळणारा आहेस. असे जरी असले तरी 'तुझे पूर्वज माझे पायी होते' हे लक्षात ठेव."
याला प्रतिसाद म्हणून नामदेवांचे बोलणे उपरोध व उपहासाने भरलेले आहे. नामदेव म्हणतात,"इतके दिवस शोधत होतो, परंतु मला ही व्यवस्था उमगली नाही. माझे पूर्वज तुझ्या पायी राहतात, तर मलाच का वेगळे धरलेले आहे? मलाही हे चरणतीर्थ मिळू दे. जिथे माझे पूर्वज आहेत, अशा तुझ्या पायी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य दंडवत घालतात. आणि त्यांचे दोष दूर होतात. अशा पवित्र स्थानाची महती कळाल्यावर मी कशासाठी इकडे तिकडे हिंडीन. तुझे चरण धरून राहतो."
परंतु हा उपरोध परिसा भागवतांस समजत नाही. ते आपली पत्नी कमळजा हिला मोठ्या उत्साहाने आत्मप्रौढी मिरवत 'नामा मला शरण आला', असे सांगतात.
आम्ही साक्षात विष्णुदास। त्यानें म्हणवावे विप्रदास।।
ऐंसे असावे प्रत्यक्ष। विष्णुदास कां म्हणवी।।
असा त्यांचा प्रश्न आहे. असे जरी असले तरी कमळजा त्यांना नामदेवाची महती सांगते. गर्व व अहंकार सोडून नामदेवांना अनुसरा म्हणजे हरी भेटेल, असे तिचे सांगणे आहे. तरी परिसा हा सल्ला लगेच मान्य करीत नाहीत. ते रुक्मिणीमातेकडे जाऊन आपले गाऱ्हाणे सांगतात. नामदेव प्रश्न विचारून माझा अपमान करतो, म्हणून मला प्रत्यक्ष लंकापुरी पहायची आहे, असे ते म्हणतात. रुक्मिणीमाता त्यांची विनंती मान्य करून त्यांना लंकापुरी सोडते. तेथील अलौकिक सौंदर्य पाहत फिरत असताना ते बिभीषणाच्या घरी जातात. तर तिथे नामदेव कीर्तन करीत असतात.
शरण जे गेले माझ्या पंढरीनाथा।
नाहीं भय चिंता त्यांस कांहीं।।
असे ते सांगत असतात. तेव्हा मनात आश्चर्य करीत परिसा मागे फिरतात. येथे, जिथे भक्ती नाही, तिथे भक्तीचा प्रसार करण्याची नामदेवांची वृत्ती दिसून येते.
नंतर पुन्हा नामदेव परिसांना लंकेबद्दल विचारतात. तेव्हा परिसा तपशीलवार वर्णन करू लागतात. त्यांना लंकेचे वैभव दिसते, परंतु बिभीषणाची वृत्ती दिसत नाही. शास्त्राचे पांडित्य कळते, परंतु भक्तीची अनुभूती होत नाही. अंतरीचा मळ गेल्याशिवाय सकळ ब्रह्मरूप दिसणार नाही, त्यासाठी संतापायी लीन व्हावे लागेल, हे वचन ऐकताच परिसांचा अभिमान गळून जातो आणि ते नामदेवांच्या पायी लीन होतात.
येथे जरी परिसांना नामदेवांची महती कळली असली, तरी त्यांना ते सहजासहजी मान्य होत नाही. ते पुन्हा रुक्मिणीमातेकडे जातात आणि पांडुरंगाची भेट घडविण्याबद्दल विनवणी करतात. परंतु रुक्मिणी म्हणते, "तो अधिकार मला नाही. तो अधिकार फक्त संतांनाच असल्यामुळे तू दुसरे काहीही मनात न धरता नामदेवांना लोटांगण घाल.
तूं नाम्या विनवी निरभिमान होई।
तो दाखवील सोई देवाजीची।।
इथे अत्यंत कौशल्याने कथा गुंफलेली दिसते. साक्षात रुक्मिणीदेवीने सांगितल्यामुळे ब्राह्मण परिसा भागवत शूद्र नामदेवाचा शिष्य बनतो. जरी हे वर्तन वैदिक धर्मपरंपरे विरोधी असले, तरी ते पातक ठरू नये, यासाठी रचलेले हे मिथक आहे.
त्यानंतर एका दीर्घ अभंगात परिसा नामदेवांची स्तुती करतात. हा अभंग म्हणजे त्या दोघांचा संवाद आहे. इथे 'तुम्ही जातीचे ब्राह्मण, मी आहे शिंपी' असे म्हणत नामदेव स्वतःकडे न्यूनत्व घेण्याची माव रचतात. परंतु परिसा ते मान्य करीत नाहीत. "माझ्या मागील बोलण्याने तू दुखावला असशील. ज्याप्रमाणे पूर्वी अहिल्येची शिळा झाली होती, तसाच मी पाषाण झालो आहे. तू तुझ्या पदस्पर्शाने माझा उद्धार कर," अशी पूर्णतः उलटी भूमिका परिसा घेतात. तेव्हा नामदेव भुजंग चालीने तेथून पळ काढतात, परंतु परिसा त्यांची पाठ सोडत नाहीत.
या अभंगात वारकरी संप्रदायाचे पुढारपण करणाऱ्या तीन संतांचा उल्लेख पुढील प्रमाणे आलेला दिसतो,
ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानीं नामदेव।
भक्ति चांगदेव पुढारेले।।
हे फार महत्त्वाचे आहे. कारण वारकरी ही सामूहिक कृती असणारी भक्तिचळवळ आहे, याची स्पष्ट नोंद इथे दिसते.
पुढे प्रत्यक्ष वारकरी संप्रदायात आल्यावर नामदेवांची महती परसोबास अनुभवास येते. ते संपूर्णतः नामदेवांना शरण जातात. त्यामुळेच नामदेव म्हणजे साक्षात विठ्ठल असेच त्यांना वाटू लागते.
तूंच तूं विठ्ठल तूंच तूं विठ्ठल।।
हाचि सत्य बोल जाण आम्हां।।
तुवां पदें केलीं राऊळे सांगितली।
येरी कवित्वें केलीं आपल्या मतें ।।
हे ते स्पष्टपणे नोंदवितात. अहंकारामुळे श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचा भाव मनी होता. आता समत्व दृष्टीने पाहता देव आणि भक्त एकरूप झाल्याचे जाणवते. इतकेच नव्हे तर नामदेवांचे नाम घेताच महापातक जळते आणि मुक्ती प्राप्त होते, असेही परिसा म्हणतात.
या अभंगमालिकेतील शेवटचा अभंग फार महत्त्वाचा आहे. परिसा नामदेवांना उद्देशून म्हणतात, "जे तुम्ही गावे ते आम्ही अंतरी धारण करतो. म्हणून स्वभावात भिन्नता येत नाही. आम्ही-तुम्ही वेगळे नाही, असे जाणवते. अशा खेळीमेळीत दिवस जातात. जो हे जाणतो त्याला हे चुकीचे वाटत नाही. यामध्ये कसली अपकीर्ती आली आहे?"
याचा एक अर्थ असा होतो की त्या काळात परसोबांनी नामदेवांना अनुसरणे ही एक प्रकारची अपकीर्ती होती. ही वार्ता वैदिकांच्या दृष्टीने दोघांनाही अपराधी ठरविणारी होती. असे असले तरी, हे एक महापरिवर्तन घडले. परिसा भागवतांनी शिष्यत्व स्वीकारण्यापूर्वी नामदेव ख्यातकीर्त होतेच. जनाबाई-चोखोबा असे स्वतःला नामदेवांचे शिष्य म्हणविणारे संत घडत होते. परंतु एका उच्च वर्णीय वेदशास्त्र पंडित पुराणिकाने नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारावे, हे अभूतपूर्व होते. वारकरी परंपरेचा स्वीकार समाजाच्या सर्व स्तरातून होऊ लागला याची ही नांदी होती. एक नवे समतेचे तत्त्वज्ञान पंढरपूरच्या वाळवंटात आकारास येत होते. त्याची भक्कम पायाभरणी परसोबांच्या संतमेळ्यातील आगमनाने झाली. परंतु पुढे हे गुरुत्व नामदेवांना आणि त्यांच्या परिवाराला अनेक अग्निदिव्यात ढकलणारे ठरले, हे मात्र निश्चित!
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणी
दूरभाष : ९४२१२१२३५२
फ़ार सुन्दर लेख ।।
उत्तर द्याहटवासंशोधनपूर्ण ।।
प्रत्यक वाक्या ला संदर्भ आहे।।
फारच सुंदर।।
खूप अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे.सर धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख !!!
उत्तर द्याहटवाखूपच सखोल व सविस्तर माहिती मिळाली, मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा
उत्तर द्याहटवा