#जिहाल-ए-मस्कीं मकुन-ब-रन्जिश (लेख)

https://youtu.be/QYiTtuwJzTQ?si=QmKkYIuR6go7JjAI

*#जिहाल-ए-मस्कीं मकुन-ब-रन्जिश*
         गुलजार साहेबांच्या अनेक गाण्यांचे गारुड आजही मनावर बसलेले आहे. भावनांच्या सूक्ष्मछटा अत्यंत नजाकतीने शब्दांत पकडणारा हा कवी कितीतरी पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. 'गुलामी' (१९८५) या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले एक गाणे आजही वेगळीच आनंदोर्मी देऊन जाते. खरे तर या गाण्यातील पहिल्या दोन ओळी बिलकुल कळत नाहीत. कारण त्या फारसी भाषेमध्ये आहेत. परंतु अर्थशोध घेता घेता आपणाला त्या शब्दांच्या मधुर भावछटांपर्यंत पोहोचता येते. लेखक दिग्दर्शक जे.पी. सिप्पी यांचा हा चित्रपट जातिभेद आणि सरंजामशाही या देशातल्या महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा. हा चित्रपट राजस्थानच्या वाळवंटी भागात चित्रित झालेला. धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, नसरुद्दीन शाह, स्मिता पाटील, कुलभूषण खरबंदा, रीना रॉय, अनिता राज असे नावाजलेले कलाकार या चित्रपटामध्ये भेटतात. 
          गावातील उच्चवर्णीय ठाकूर आणि हलके समजले जाणारे चौधरी जाट यांच्या मूल्यात्मक संघर्षाची ही कथा. त्यामधील एक गाणे मनात घर करून बसले आहे. कमजात लोकांसाठी असणाऱ्या विहिरीत एक जनावर पडून मेले आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी विषारी बनते. ते पिऊन याच लोकांमधील मास्टरजी मरतो आणि त्याची तरुण मुलगी तुलसी हतबल दुःखी व निराधार होते. योगायोगाने तिची भेट सैन्यातून परत आलेल्या जावर म्हणजे मिथुन चक्रवर्तीशी होते. तो रहात असलेल्या रेवासा गावी तुलसीचा मामाही रहात असतो. तिला मामाच्या गावी सोडण्यासाठी त्याला सांगितले जाते. त्या पहिल्या भेटीतच तो तिच्याकडे आकर्षित होतो. त्या वेळचे हे गाणे आहे. 

     जिहाल-ए-मस्कीं मकुन-ब-रन्जिश 
     बहाल-ए-हिजरा बेचारा दिल है  

        सहजासहजी न कळणाऱ्या या दोन ओळी. परंतु लताजींनी त्या अशा अार्ततेने म्हटलेल्या आहेत की हृदयाच्या ठाव घ्यावा. सोबत शब्बीर कुमारचा आश्वासक आणि समंजस प्रेमभाव व्यक्त करणारा स्वर. यामुळे गाण्याचा प्रभाव अंत:करणात खोल खोल उतरत जातो. मुळात या दोन ओळी गुलजारजींनी चौदाव्या शतकातील कवी अमीर खुसरो यांच्या कवितेवरून बेतलेल्या आहेत आणि त्या अर्थपूर्णही आहेत. जरी तुलसी दुःखी व निराधार असली तरी जावरने तिच्याकडे दयेने पाहू नये, असे तिला वाटते. तिची ही भावना एका लोककलावंत स्त्रीच्या तोंडून व्यक्त होते. ती म्हणते, जिहाल-ए-मस्कीं म्हणजे (माझ्या) अति गरीब/दीनवाण्या झालेल्या अवस्थेकडे मकुन-ब-रन्जिश म्हणजे दया भावनेने किंवा नाराजगीने बघू नकोस. कारण बहाल-ए-हिजरा म्हणजे (जवळच्या व्यक्तीच्या) विरहाच्या दुःखाने माझी अवस्था बेहाल झालेली आहे. माझी हृदय स्थिती केविलवाणी झाली आहे.  
        प्रेम हे कधीही दयेतून किंवा उपकार भावनेतून केले जाऊ नये. ती एक उत्स्फूर्त प्रतिसादात्मक कृती असते. प्रेम ही एक सन्माननीय व अनमोल भेट असते. प्रेमाचे ते सौंदर्य जपले गेले पाहिजे. म्हणूनच तिच्या लाचार दीनवाण्या स्थितीबद्दल दया वाटून आलेले प्रेम तिला नको आहे, तर एक स्वतंत्र सन्माननीय व्यक्ती म्हणून तिच्याकडे पाहिले जावे, असे तिला वाटते. अर्थात जावरही तिला तसाच प्रतिसाद देतोय. त्यामुळेच, जी हृदयाची धडकन ऐकू येते ती नेमकी कुणाची? स्वतःची की त्याची? असा प्रश्न तिला पडतो. जरी स्वतःच्याच हृदयाचे ठोके वाढलेले असले तरी ते हृदय आता तिचे राहिलेले नाही. (किंवा उलटपक्षी त्याचे हृदयही आता त्याचे राहिलेले नाही.) त्यामुळेच 
          सुनाई देती है जिसकी धड़कन
          तुम्हारा दिल या हमारा दिल है
अशा ओळी पुढे येतात. तो तिच्या इच्छेचा आदर करतो. प्रेम भरल्या नजरेने तिच्याकडे पाहतो आणि तिला विश्वास पटता क्षणीच ती त्याच्या बाजूस येऊन बसते. त्यामुळे ती संध्याकाळ अधिकच रंगवैभवी होते. मन आनंदाने थोडे खुलून येते आणि आतमध्ये लपलेल्या दुःखामुळे भावविभोरही (ग़मगीन) होते. 
     वो आके पहलू में ऐसे बैठे 
     के शाम रंगीन हो गई है 
     जरा जरा सी खिली तबीयत 
     जरा सी ग़मगीन हो गई है  
एकाच वेळी मनासारखे काही मिळाल्याचा आनंद आणि कुटुंबातील जवळच्या माणसाच्या मृत्यूचे दुःख असे दोन्ही भाव एकमेकात मिसळून जातात. नव्या आनंदात जुन्या दुःखाची एक छटा मिसळलेली असते. अशावेळी तिला वाटते, 
           कभी कभी शाम ऐसे ढलती है 
           जैसे घूँघट उतर रहा है 
     त्याला तिची ही भावव्यथा कळते. म्हणूनच तो म्हणतो, 
           तुम्हारे सीने से उठता धुआँ 
           हमारे दिल से गुजर रहा है 
    संध्याकाळ ढळता ढळता दुःखाचा पडदा गळून पडलेला आहे आणि तिच्या हृदयावरील वेदनेचा ढग त्याच्याही हृदयावरून पुढे सरकतो आहे. त्याच्या या मनस्वी आत्मीयतेमुळे ती आनंदून जाते. तिच्याकडे सन्मानपूर्वक प्रेमभावनेने पाहणाऱ्या त्याच्या नजरेत नजर मिळविल्यानंतर आपोआपच तिची नजर खाली जाते. त्याला प्रश्न पडतो की हे प्रेमातले लाजणे आहे की अपराधी भावनेने नजर खाली झुकवणे आहे. नेमके काय आहे बरे? ती म्हणते, तुझ्या पापण्यांवरून दवबिंदू ओघळून माझ्या डोळ्यात येऊन थांबले आहेत. 
     ये शर्म है या हया है, क्या है? 
     नजर उठाते ही झुक गयी है 
     तुम्हारी पलकों से गिरके शबनम 
     हमारी आँखों में रुक गयी है 

     अवघ्या सोळा ओळींच्या या गीतातून गुलजारजींनी प्रेमभावनेच्या सूक्ष्म छटा अतिशय नजाकतीने व्यक्त केल्या आहेत. प्रारंभी मेंडोलीनच्या तारा छेडणे आणि बासरीचा स्वर प्रेमभावनेची तरलता व्यक्त करताे. कल्याणजी-आनंदजींचे संगीत आणि लता-शब्बीर कुमार यांचा स्वरसाज एका समंजस प्रेमभावनेला परिपूर्ण बनवितो. 
        १९८८-८९च्या दरम्यान कधीतरी 'गुलामी' हा चित्रपट पाहण्यात आला होता. 'कोई शक' म्हणणारा त्यातला मिथुन चक्रवर्ती कायमच मनात बसला आणि त्याचे अनिता राज बरोबरचे वरील गाणे लक्षात राहिले होते. परंतु त्याचा अर्थ उमगत नव्हता. आता नव्याने हे गाणे ऐकताना आणि त्याचे शब्दभाव शोधताना या सगळ्या चित्रपटाचा आणि गाण्याचा एक वेगळाच अन्वयार्थ पुढे आला. 

गाणे पाहण्यासाठी लिंक : 

https://youtu.be/QYiTtuwJzTQ?si=zsRb9WpYBxuJznpy

                       डॉ. श्यामसुंदर मिरजकर
                          ९४२१२१२३५२

टिप्पण्या

  1. अप्रतिम....सर...अशी अजून काही जुनी गीते घेऊन या ब्लॉगवर.....

    उत्तर द्याहटवा
  2. छान,प्रेमळ..अर्थपूर्ण..हृदयस्पर्शी..गीत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूपचं सुंदर गाण्यातील प्रत्येक शब्दातील अर्थ व भावना यांचा संगम जुळवून आणणारा अप्रतिम लेख

      हटवा
    2. खूप सुंदर...!
      ही सुद्धा समीक्षा आहे...

      हटवा
  3. Very good nice explation and sow more others this tipes old songs as it as possible
    Thanks so much
    your friend G S Swami.

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम सर,

    आपल्या लेखा मूळे आज मला ही या ओळींचा अर्थ समजला......
    या ओळींचा अर्थ माहित नसताना ही या अजरामर गीताने कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य गाजवले आहे.
    आपल्या विश्लेषण ही त्यास साजेसेच आहे...

    उत्तर द्याहटवा
  5. प्रा श्रीराम मोहिते२९ ऑगस्ट, २०२३ रोजी ७:१७ PM

    हे गाणं खूपदा ऐकलंय. पण आपल्या या खूपच सुंदर विश्लेषणामधून त्यातले निराळेच पदर उलगडले.अप्रतिम आस्वादक विवेचन. मनःपूर्वक धन्यवाद सर.

    उत्तर द्याहटवा
  6. माझे खूप आवडते गाणे...👌

    उत्तर द्याहटवा
  7. संजीवकुमार गुरव नांदणी२९ ऑगस्ट, २०२३ रोजी ७:२१ PM

    🧤🧤🧤💐👌👍 अप्रतिम , अल्पाक्षर रमणीयत्व

    उत्तर द्याहटवा
  8. मस्तच लिहलय सर

    उत्तर द्याहटवा
  9. झकास
    कोई शक 😍

    उत्तर द्याहटवा
  10. छान लिहिलंय, लता मंगेशकर छानच पण या गाण्यात शब्बीर कुमार पण आवडून गेला..

    उत्तर द्याहटवा
  11. खूप छान सर आजपर्यंत गाण्याच्या छटा ,लकेर छान आहे म्हणून आवडायचे पण तुमच्यामुळे त्या गाण्यातील सूक्ष्म भाव समजले.
    धन्यवाद सर 🙏
    अशा च जुन्या गाण्याबद्दल माहिती लिहा .🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)