संत तुकारामांचे आधुनिक भाष्यकार
संत तुकारामांचे आधुनिक भाष्यकार
वारकरी ही एक जीवनप्रणाली आहे. संत हे या जीवनप्रणालीचे शिल्पकार आणि संत तुकाराम हे या जीवन प्रणालीचे संस्कृतिपुरुष! व्यक्तीला स्थळ काळाच्या मर्यादा असतात, परंतु त्याने निर्माण केलेले साहित्य आणि त्याचे जीवितकार्य या मर्यादा पार करून सर्वदूर पसरलेले असते. संत तुकारामांनी अनुभवप्रामाण्य स्वीकारून भक्तीच्या प्रांतात जे अलौकिक कार्य केले त्यामुळे उत्तरोत्तर महाराष्ट्राचा लोकधर्म घडत गेला. महाराष्ट्राची संस्कृती वारकरी संप्रदायाने व्यापलेले असल्यामुळे या संप्रदायातील कळस असणारे तुकोबा अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरक राहिले आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवितकार्याचा विविधांगी आढावा घेणारे अभ्यासक हे एक प्रकारे तुकोबांच्या विचारपरंपरेतील टाळकरी आहेत. त्यांनी तुकोबांच्या जीवितकार्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. तुकोबांच्या कार्याचे आयाम स्पष्ट केले. तुकोबांची वैचारिक भूमिका, मांडणी आणि स्पष्टोक्ती यांचा नव्याने परिचय करून दिला. म्हणूनच काही मोजक्याच महत्त्वपूर्ण अभ्यासकांचा ग्रंथपरिचय प्रस्तुत लेखात करून देण्यात येत आहे.
तुकोबांच्या अभंगवाणीचे मर्म शोधण्याचे काम प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी खऱ्या अर्थाने केले. पुणे प्रार्थना समाज अंतर्गत 'तुकाराम चर्चा मंडळ' स्थापन झाले होते. प्रो. वा. ब. पटवर्धन हे या मंडळाचे चिटणीस होते. प्रत्येक आठवड्याला शुक्रवारी भरणाऱ्या बैठकीत तुकोबांच्या अभंगांचे अन्वयार्थ लावले जात. त्यावेळी झालेल्या चर्चेची टिपणे पटवर्धन काढत. त्याला त्यांचे कनिष्ठ सहकारी प्रो. गणेश हरी केळकर यांची मदत होत असे. १९०१ ते १९१४ या काळात चाललेली ही चर्चा पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली. या चर्चेतून निघालेले सार आणि त्या टिपणांच्या आधारे प्रा. गणेश हरी केळकर व प्रा.वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी संपादन करून ‘तुकारामांच्या अभंगांची चर्चा’ हे दोन खंड तयार केले. माधव रामचंद्र जोशी यांनी हे खंड १९२७ मध्ये प्रकाशित केले. हे दोन्ही खंड दुर्मीळ झाल्यामुळे, त्यांचे महत्त्व ओळखून दिल्लीच्या साहित्य अकादमीने हे दोन्ही खंड फेब्रुवारी २००९ मध्ये पुनःप्रकाशित केले आहेत. ही संत तुकारामांच्या विचारविश्वाची पहिली महत्त्वपूर्ण चर्चा म्हणावी लागेल.
कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे लिखित 'पुन्हा तुकाराम'(१९९०) हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे मराठी कवितेच्या केंद्रस्थानी संत तुकाराम आहेत, हे दिलीप चित्रे यांनी अत्यंत जोरकसपणे या ग्रंथातून मांडले. तेराव्या शतकातील संत नामदेव आणि सतराव्या शतकातील संत तुकाराम हे दोघेही महाकवी आहेत. गेली अनेक शतके मराठीचे भरण पोषण करण्याचे काम संत तुकारामांच्या अभंगवाणीने केले आहे. महाराष्ट्राची वाङ्मयीन संस्कृती आणि मूल्य संस्कृती घडविण्याचे काम संत तुकारामांची अभंगवाणी करते.
संस्कृत व इंग्रजी वर भिस्त ठेवून समीक्षा लिहिणाऱ्या अभ्यासकांनी संत तुकारामांना दुर्लक्षित केले किंवा स्वतःच्या मांडणीच्या सोयीने दुय्यम स्थान दिले वस्तूत: संत तुकाराम हे मराठी साहित्य व्यवहार व संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहेत याची जाणीव ठेवून संपूर्ण साहित्य संस्कृतीचा लेखाजोखा मांडला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन दिलीप चित्रे यांनी केले आहे. त्यांची ही मांडणी म्हणजे संत तुकारामांचे समग्र आकलन नव्हे, तर तुकारामांचे कवित्व केंद्रस्थानी ठेवून घेतलेला शोध आहे. कवी असण्याची लख्ख जाणीव तुकारामांना झाली, माणूसपण त्यांनी अधोरेखित केले. भक्ती, ईश्वर भेटीची तळमळ, ज्ञानप्राप्ती, संतत्व प्राप्ती, ब्रह्मानंदाचा अनुभव, केवळ अस्तित्व भावना आणि त्याचे विसर्जन अशा टप्प्यांनी तुकारामांचा प्रवास झाला, असे येथे नोंदविले गेले आहे. त्यासाठी तुकारामांचे निवडक अभंग घेतले असून त्याच्या अनुरोधाने भाष्य केलेले दिसते.
या पुस्तकाला असणारी दीर्घ प्रस्तावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण या प्रस्तावनेत लेखकाने अभ्यासक व समीक्षकांनी संत तुकारामांचे मूल्यमापन करताना केलेला पक्षपातीपणा व अन्याय दाखवून दिला आहे. त्याचे परिमार्जन कसे करावे हेही स्पष्ट केले आहे. याबद्दल चित्रे लिहितात, "तुकोबांची कविता इंग्रजी अनुवादाच्या रूपाने पुनः संघटित करताना मी जरी अडीचशे अभंग निवडले असले तरी त्यांचा क्रम लावताना मी तुकोबांच्या अस्तित्वाचे 'अवतार' पुढील क्रमाने पाहिले: कवी असणे; माणूस असणे; भक्त असणे; तडफडत असणे; संत असणे; ज्ञानी असणे; दिक्कालात असणे; ब्रह्मानंदी असणे; संपूर्णपणे असणे; असण्याला निरोप देत असणे. तुकोबांची सबंध गाथासुद्धा ह्याच दहा पैलूंमध्ये मला प्रकाशताना दिसते. हे पैलू एकमेकांना जडलेले किंवा मुळात एकसंधच आहेत. किंवा ते पैलू नाहीतच. जो कवी आहे तोच माणूस आहे, भक्त आहे, तडफडत आहे, संत आहे, ज्ञानी आहे, स्वत:च्या देशकाळात स्वत:ला पाहणारा आहे, ब्रह्मानंदात मग्न आहे, मुक्त आणि स्वयंपूर्ण आहे, आणि तोच अस्तित्वाचा निरोप घेऊन अनाद्यनंत अनस्तित्वाकडे जाणारा, कधी न परतणारा यात्री आहे. ह्या पैलूंना क्रम नाही."
तुकारामांचे सगळे लेखन म्हणजे साक्षात त्यांनी घेतलेला अनुभव आहे. त्यांनी अज्ञानातून आत्मज्ञान मिळवले, संसार भोगताना त्यातल्या अनिवार्य आणि अकल्पितपणे वाट्याला आलेल्या यातना अनुभवल्या, जन्ममरणाच्या चक्राच्या कल्पनेने ते क्रमशः भांबावून, भयभीत होऊन आणि स्तंभित होऊन गेले. मग त्यांनी भक्ती मार्गाची निवड केली, असे दिलीप चित्रे यांना वाटते.
"वारकरी हा संप्रदाय आग्रही, आक्रमक, व्यक्तिकेंद्रित नसून समावेशक सहिष्णुता जोपासणारा आहे. हिंदू धर्माचे पूर्णपणे मराठी, ब्राम्हणनिरपेक्ष आणि ब्राम्हणेतर रूप असेही त्याचे वर्णन करता येईल, वारकरी धर्म हा स्वयंप्रेरणेने व्यक्तीने स्वीकारलेला मार्ग आहे. त्याचे कोणतेही कठोर लिखित विधी किंवा नियम नाहीत. त्यात प्रवेश देणारे किंवा नाकारणारे कोणीही अधिकारी नाहीत......आधुनिक मराठी जनमानसाची जडणघडण, आपल्या नीतिकल्पना, आपली सामाजिक जाणीव, आपली वाङ्मयाची संकल्पना इत्यादी अनेक गोष्टींचा पाया वारकरी परंपरेत सापडेल, महाराष्ट्राचे लोकजीवन संपूर्णपणे, समावेशकपणे प्रतिबिंबित करणारा वारकरी परंपरा हा एक आरसाच आहे. तुकोबांच्या गाथेत ह्या परंपरेचे सर्वांत परिपक्व, व्यापक आणि आधुनिकतेला जास्तीत जास्त जवळचे रूप आढळते." असे दिलीप चित्रे यांचे प्रतिपादन आहे. एकंदर 'पुन्हा तुकाराम' या पुस्तकामध्ये वारकरी संप्रदायाचे त्यांच्या भक्तिमार्गाचे आणि संत तुकारामांच्या जीवनकार्याचे नवे आकलन आलेले दिसते. या पुस्तकामुळे संत तुकारामांकडे पाहण्याचा सुशिक्षित वर्गाचा व विद्यापीठीय विद्वानांचा दृष्टिकोन बदलून गेला. तुकारामांचे मराठी कवितेच्या इतिहासातील श्रेष्ठत्व सर्वमान्य झाले.
साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्माते या ग्रंथमालेसाठी डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी 'तुकाराम'(१९९४) हे पुस्तक मुळात इंग्रजीतून लिहिले. त्याचे मराठी भाषांतर चंद्रकांत पाटील यांनी केले. या पुस्तकांमध्ये भालचंद्र नेमाडे यांनी संत तुकारामांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला आहे. मानवी जीवनाविषयीच्या अपार करुणामय अविष्कारामुळे संत तुकाराम हे श्रेष्ठ दर्जाचे कवी ठरतात, असे लेखकाने नमूद केले आहे. संत तुकारामांच्या जीवनकार्याची सामाजिक-धार्मिक पार्श्वभूमी, त्यांचे लौकिक जीवन यांचा परिचय लेखकाने दोन प्रकरणांमधून करून दिलेला आहे. सनातनी वैदिक परंपरेचे वर्चस्व आणि इस्लामचे आक्रमण या दोन्हीला समर्थपणे तोंड देत वारकरी संप्रदायाने स्वतःची वेगळी परंपरा निर्माण केली. त्याचा कळस संत तुकारामांनी रचला. खेडोपाडी राहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासकांपर्यंत सर्वांनाच संत तुकारामांच्या अभंगांनी मोहिनी घातली. त्यामुळे त्यांचे अभंग आजही लोकप्रिय व ताजे टवटवीत आहेत, हे लेखकाने स्पष्ट केले आहे. तुकारामांच्या असामान्य कर्तृत्वाचा परिचय प्रस्तुत ग्रंथातून होतो.
भालचंद्र नेमाडे म्हणतात, "वारकऱ्यांच्या आंदोलनाकडे केवळ धार्मिक आंदोलन म्हणून बघणे चुकीचे आहे. कारण या आंदोलनातील नेत्यांचा प्रमुख उद्देश फोफावत चाललेल्या दुष्ट सामाजिक प्रवृत्तींचे उन्मूलन करणे हा होता. त्यांनी जीवनाच्या ऐहिक आणि अध्यात्मिक अशा दोन्हीही बाजूंसाठी उपयुक्त अशी आचारसंहिता प्रशंसली."
संत तुकारामांचे चरित्र महिपती, संत बहिणाबाई, संशोधक वा.सी. बेंद्रे यांच्या लेखनाच्या आधारे भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेले आहे. यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे संत तुकाराम हे भोळसट पलायनवादी किंवा व्यापार उदीम करण्यास अपात्र होते, हा गैरसमज भालचंद्र नेमाडे यांनी खोडून काढलेला आहे. संत तुकाराम १७ वर्षांचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा झालेला मृत्यू, थोरला भाऊ सावजी याच्या पत्नीचा मृत्यू आणि सावजीने घरदार सोडून संन्यस्त होणे, नंतर पहिली पत्नी रखुमा व मुलगा संताजी याचा झालेला मृत्यू, त्यामुळे अल्पवयातच खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी यामुळे तुकाराम विचलित होणे स्वाभाविक होते. व्यवहाराचा फारसा अनुभव नसल्यामुळे आणि मूळ वृत्ती परोपकारी असल्यामुळे व्यापार-उदिमात झालेली फसवणूक, लबाडी यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली. या दरम्यानच त्यांच्या मनात अांतर्बाह्य संघर्ष सुरू झाला आणि त्यांनी नवी मांडणी सुरू केली. हा संत तुकारामांनी उभा केलेला संघर्ष होता. विद्रोह होता, अशी मांडणी नेमाडे यांनी केली आहे. 'मंत्रगीता' हा ग्रंथ संत तुकारामांनीच लिहिला असे डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी गृहीत धरले आहे. त्यामुळेच तुकारामांना सनातनी मंडळींकडून त्रास सोसावा लागला, असे म्हटले आहे. मुळात 'मंत्रगीता' ग्रंथाचे कर्तृत्व तुकारामांकडे जात नाही, हे आता सर्वमान्य झाले आहे.
'तुकाराम : कवी आणि संत' हे या पुस्तकातील महत्त्वाचे प्रकरण आहे. यामध्ये तुकारामांची अभंगगाथा निर्माण करण्यात त्रिंबक कासार आणि सर अलेक्झांडर ग्रांट यांनी केलेले बहुमोल कार्य नेमाडेंनी नोंदविलेले आहे. संत तुकाराम आपल्या अभंगामधून धार्मिकतेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात सामाजिक व दार्शनिक आशय व्यक्त करतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण येथे नोंदविले आहे. तुकोबांच्या अभंगातील अनेक अवतरणे देऊन तुकोबांचे तत्त्वचिंतन, सामाजिक भान, मानवी वृत्तीप्रवृत्ती व भावनांचे दर्शन या सगळ्या गोष्टी तुकारामांच्या अभंगवाणीतून दिसतात. तुकारामांच्या कवितेची भाषा एकाच वेळी साधी सोपी आणि वैश्विक मानवी मूल्ये व्यक्त करणारी आहे, हेही भालचंद्र नेमाडे यांनी नोंदविलेले आहे. हे पुस्तक मुळात इंग्रजीतून लिहिल्यामुळे संत तुकारामांचे कार्यकर्तृत्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी मोठी मदत झाली आहे.
पुढे 'विद्रोही तुकाराम'(१९९७) हे डॉ. आ.ह.साळुंखे लिखित पुस्तक बहुचर्चित ठरले आहे. एकाच वेळी या पुस्तकाच्या समर्थनात आणि विरोधात अनेक व्यक्ती व संघटना कार्यरत राहिल्या. संत तुकारामांचे पूर्वसुरींनी रेखाटलेले चित्र संपूर्णतः बदलण्याचे श्रेय या पुस्तकाला जाते. अन्यायाविरुद्ध लढणारा या अर्थाने विद्रोही हे विशेषण डॉ. साळुंखे यांनी वापरले आहे. संत तुकारामांचा संपूर्ण जीवन संघर्ष हा पक्षपाती अन्यायी विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध लढण्यात गेला, असा या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय आहे.
पहिल्याच प्रकरणात संत तुकारामांचे धगधगत्या निखाऱ्यासारखे आणि डौलदार सिंहासारखे असणारे व्यक्तिमत्त्व मांडले आहे. इंद्रायणीच्या डोहात सावकारकीची कर्जखते बुडविणे आणि आपल्या कर्जदारांना कर्जमुक्त करणे ही संत तुकारामांच्या जीवनातील अत्यंत क्रांतिकारक घटना आहे. येथे संत तुकाराम स्वतः डी-क्लास होतात आणि नंतरच त्यांचा प्रवास संतत्वाच्या दिशेने सुरू होतो, असे नमूद करण्यात आले आहे. हा त्यांच्या जीवितकार्याचा प्रारंभबिंदू आहे.
संत तुकारामांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वेदश्रेष्ठत्व नाकारून ब्राह्मण पंडितांना उघडपणे दिलेले आव्हान होय. तुकोबांनी भक्तिमार्गाचा उद्घोष करताना अनेक अभंग लिहिले. त्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे पाठांतराचे कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांवर टीका केली. 'पोट पोसावया तोंडे बडबडी' किंवा 'विद्या अल्प परि गर्वशिरोमणी' अशा शब्दांत त्यांचा धिक्कार केला. वेदांचा तो अर्थ आम्हासचि ठावा येरांनी वहावा भार माथा, असे ठणकावून सांगितले. अन्यायी परंपरे विरुद्ध निर्भयपणे शड्डू ठोकला, आदी गोष्टींचा उहापोह तिसऱ्या प्रकरणात करण्यात आला आहे.
चौथे प्रकरणात 'यातिकुळ येथे असे अप्रमाण' असे म्हणून भक्तीचे क्षेत्र हे सर्वांसाठी खुले असल्याची घोषणा केली. स्त्रिया, अस्पृश्य इतकेच नव्हे तर वेश्याही या भक्तिमार्गात येऊ शकतात, असे सांगितले. स्वतः कुणबी आहे, याचा आनंद तुकारामांनी व्यक्त केला आहे. नसता दंभ भावनेने मी मरून गेलो असतो, असेही म्हटले आहे. उंचनीच काही नेणे भगवंत, असेही त्यांनी म्हटले आहे.
भेदाभेद, श्रेष्ठत्व कल्पना, पवित्र-अपवित्र विचार, अंधश्रद्धा या सर्वांवर संत तुकारामांनी आपल्या अभंगातून घाव घातले आहेत. त्याचा स्वतंत्र ऊहापोह 'काय बा करिशी सोवळे ओवळे' या पाचव्या प्रकरणास करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मोक्षपद, रिद्धी सिद्धी, चमत्कार या सगळ्या गोष्टींना तुकारामांनी नकार दिला आहे. याउलट भक्तिमार्ग अनुसरून सुखाने संसार करावा, असे तुकारामांचे सांगणे आहे. 'भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे।' असे तुकोबा म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी।' असेही म्हणतात. त्यांच्या या भूमिकेचा उहापोह पाचव्या प्रकरणात आला आहे.
त्याच्याही पुढे जाऊन संत तुकारामांनी प्रत्यक्ष परमेश्वराला प्रश्न विचारले आहेत. देवाचे वर्तन नैतिकतेच्या कसोटीवर तपासून पाहिले आहे. प्रसंगी 'देव आहे एेसी वदवावी वाणी नाही ऐसे मनी अनुभवावे।' असेही म्हटले आहे. रंजल्या गांजल्यांना मदत करतो तोच साधू, तोच देव, अशी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. येथे तुकारामांचे प्रागतिक व प्रयत्नवादी विचार दिसून येतात. या सगळ्यांचा आढावा घेऊन डॉ. साळुंखे यांनी तुकारामांची डोळस बुद्धिवादी मांडणी पुढे आणली आहे.
सातव्या प्रकरणात तत्कालीन ब्रह्मवृंदाने तुकारामांना न्यायालयात खेचणे आणि शिक्षा करणे याची तपशीलवार मांडणी केली आहे. संत तुकारामांवर कोणते आरोप करण्यात आले? त्याला धर्मग्रंथांचा कसा आधार घेण्यात आला? कोणती शिक्षा देण्यात आली? असे करण्यामागील प्रस्थापितांचा हेतू काय होता? हे सगळे या प्रकरणात नोंदविले आहे. संत तुकाराम वैदिक परंपरेच्या विरोधात आणि ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या संदर्भात सतत मांडणी करत असल्यामुळे हा प्रसंग त्यांच्यावर ओढविला असे डॉ. साळुंखे यांनी सिद्ध केले आहे.
'मरणा आधी राहिलो मरोनी' हे या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे प्रकरण आहे. यामध्ये संत तुकारामांच्या नाहीशा होण्याची साधार चिकित्सा करण्यात आली आहे. संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले हे सत्य नसून त्यांचा घात करण्यात आला, हे अनेक तर्क देऊन डॉ. साळुंखे यांनी मांडले आहे. संत तुकारामांचे धुळवडीच्या दिवशी नाहीसे होणे, संत तुकारामांचा सर्वात मोठा विरोधक रामेश्वर भट्ट यांनी ते सदैव वैकुंठाला गेले त्याचे सांगणे, त्यांच्या नाहीसे होण्यानंतर दोन-तीन पत्रे, घोंगडी व टाळ सापडणे, मृत्यू बाबतचे प्रक्षिप्त अभंग तयार केले जाणे आणि मृत्यू पश्चात तुकोबांच्या कुटुंबाला कायमचे घरदार सोडावे लागणे, त्यांची संपत्ती मंबाजी सारख्या विरोधकाच्या ताब्यात जाणे, या सगळ्या वस्तुस्थितीचा विचार करून डॉ. साळुंखे यांनी विरोधकांनी तुकोबांचा घातपात केल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या या संपूर्ण मांडणीला काही अभ्यासकांनी विरोध केला. परंतु ही मांडणी खूप मोठ्या प्रमाणात स्वीकारली गेली. संत तुकारामांचे लढाऊ संघर्षशील व्यक्तिमत्त्व पुढे आले. त्यांनी समानता, बंधुभाव अशी मूल्ये जोपासण्यासाठी अविरत संघर्ष केला, हे या ग्रंथाद्वारे सिद्ध करण्यात आले आहे.
'सर्वात्मभावी तुकाराम'(२००२) हे डॉ. अनिल गवळी लिखित पुस्तक म्हणजे त्यांनी पीएच.डी. पदवी करिता सादर केलेल्या प्रबंधाचे ग्रंथरूप आहे. यामध्ये त्यांनी संत तुकारामांच्या अभंगवाणीतून अभिव्यक्त होणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलेला आहे. या ग्रंथामध्ये एकूण आठ प्रकरणे व तीन परिशिष्टे असून संत तुकारामांच्या सांसारिक, कवी, तत्त्वचिंतक, समाजमनस्क अशा विविध पैलूंचा शोध घेण्यात आलेला आहे.
या पुस्तकांमध्ये पूर्वसुरी संशोधकांनी मांडलेल्या अनेक मतांचा प्रतिवाद करण्यात आलेला आहे. महिपती ताहराबादकर लिखित 'भक्त लीलामृत' ग्रंथातील ओवीबद्ध तुकाराम चरित्र अतिरंजित असल्याचा निर्वाळा देण्यात आलेला आहे. संत साहित्याचे अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी संत तुकारामांची भक्तिभावना ही वैराग्यातून निर्माण झाली असल्याचे नोंदविले होते. तर डॉ. रा. द. रानडे यांनी 'मराठी संतवाङ्मयातील परमार्थमार्ग' या ग्रंथात तुकारामांच्या परमार्थिक जीवनाचा आलेख मांडलेला होता. त्यांनी साधक दशा, जीवात्म्याची घनघोर अंधकारमय रात्र आणि स्वानुभव उद्गार अशा संत तुकारामांच्या जीवनातील तीन पायऱ्या दाखवलेल्या होत्या. त्याला पर्याय म्हणून डॉ. अनिल गवळी यांनी निश्चय, व्याकुळता अथवा अार्तता आणि सर्वात्मभावी साक्षात्कार अशा तीन पायऱ्या दाखवलेल्या आहेत. तर डॉ. शं. दा. पेंडसे यांनी 'साक्षात्कारी संत तुकाराम' या ग्रंथात संत तुकारामांची साधकावस्था, साक्षात्कार व सिद्धावस्था असा विकास क्रम दिलेला होता. याच धर्तीवर डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी साधक, शंकित व सिद्ध अशा तीन अवस्था मांडलेल्या होत्या. या सर्व मांडणीला प्रश्नांकित करण्याचे काम डॉ. अनिल गवळी यांनी केलेले आहे. डॉ. रा.द.रानडे यांनी स्वीकारलेली 'डार्क नाईट ऑफ द सोल' ही संकल्पना सुसो या जर्मन साक्षात्कारी संतावरून घेतलेली आहे. सुसो ईश्वर प्राप्तीसाठी देह दंडनाचा मार्ग अवलंबित होता. तसे संत तुकारामांनी बिलकुल केलेले नाही. ईश्वर प्राप्ती होत नाही म्हणून आलेली निराशा संत तुकारामांच्या जीवनात जाणवत नसून अत्यंत तीव्र व आर्त व्याकुळता जाणवते. या पुस्तकात संत तुकारामांच्या व्यक्तिमत्त्वाचा विविधांगी शोध घेण्यात आलेला असून तो मुळातून वाचावा असाच आहे.
'समग्र तुकाराम दर्शन'(२००८) हा डॉ. किशोर सानप लिखित ग्रंथ संत तुकारामांचे विविध अंगी आकलन करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा १५८ लेखांचा संग्रह आहे. या ग्रंथाला डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. स्वतःची भूमिका स्पष्ट करताना डॉ. किशोर सानप म्हणतात, "संत तुकाराम हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय. वीस वर्षांपासून तुकारामाने मला एवढं व्यापून टाकलं आहे की मी जसजसा तुकारामाच्या गाथेत घुसलो तसतसं तुकारामाचं एक निराळंच विराट दर्शन मला व्हायला लागलं ... मग 'समग्र तुकाराम दर्शन' घडवावे असे ठरविले. कारण तुकाराम युगदष्टे होते. संत तुकारामाने जीवनाची शाश्वत सत्ये सांगितली. जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले. संसार आणि पारमाथिर्क तत्त्वज्ञान यांची सांगड घालण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला ... या ग्रंथात १५८ लेख असून त्यांचा परस्परांशी जैविक संबंध आहे ... मी तुकोबांकडे तटस्थ आणि पारदर्शक दृष्टीने पाहिले आहे. अनेकांच्या मतमतांतरांचे खंडनमंडन करीत मी तुकोबांचे समग्र दर्शन घडविले आहे. तुकोबा विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ संत होते. त्याच दृष्टिकोनातून मी तुकोबांचे दर्शन त्यांच्या अभंगांचे दाखले देत घडवले आहे."
प्रारंभीच्या काही लेखांमध्ये दिलीप चित्रे, डॉ. आ.ह.साळुंखे, डॉ. सदानंद मोरे यांच्या संत तुकारामांविषयीच्या मांडणीची चिकित्सा केली आहे. या लेखकांचे निष्कर्ष योग्य अभ्यासपद्धती न वापरल्यामुळे एकांगी, पूर्वग्रह असणारे व अपर्याप्त ठरले आहेत, असे सानपांना वाटते. एकूणच वि. ल. भावे, वि.का.राजवाडे यांच्यापासूनची अभ्यासाची परंपरा पुन्हा तपासली पाहिजे आणि वस्तुनिष्ठ, विवेकनिष्ठ व विज्ञाननिष्ठ भूमिका स्वीकारून पुनर्मांडणी केली पाहिजे, असे लेखकाचे मत आहे.
तुकोबांच्या लौकिक जीवनाबद्दल असणारे प्रवाद, दंतकथा यांचाही चिकित्सक धांडोळा काही लेखांमध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या कौटुंबिक जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबांचे कुलदैवत, बोल्होबा आंबिले, तुका म्हणे मायबापे, तुकोबांची पहिली पत्नी रुखमा, जिजाबाईंची तुकोबानिष्ठा हे लेख या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तुकोबांची गुरूपरंपरा, बहिणाबाईंनी कथन केलेली आदिपरंपरा, चैतन्य परंपरा की भक्ती परंपरा? या लेखांमधून तुकोबांची परंपरा निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
याशिवाय तुकोबांची वेद विषयक भूमिका, मंबाजी व रामेश्वर भट्ट आदी ब्राह्मणांकडून झालेला विरोध, तुकारामांना दिवाणात खेचणे आणि अभंग गाथा इंद्रायणीत बुडविणे आदी प्रसंग, यांचाही उहापोह अनेक लेखांमधून झालेला दिसतो. ब्राह्मण्या विरुद्धची तुकोबांची भूमिका रोखठोकपणे मांडलेली आहे. कीर्तनविषयक आचारसंहिता, सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग, आर्त भक्ती, भक्ती तो कठीण या लेखांमधून भक्तिमार्गाचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व चित्रित करण्यात आलेले आहे. याशिवाय संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा परस्पर स्नेहसंबंध काही लेखांमधून मांडलेला दिसतो. त्यासोबतच संत तुकाराम व रामदास यांचा तौलिक विचारही केलेला आढळतो.
महाकवी श्रेष्ठ यासम हाच, तुकोबा आणि आधुनिक मराठी कविता, तुकोबांची भाषा कोणती?, तुकोबांचे बोलणे आणि भावकाव्य अशा लेखांमधून तुकारामांचा कवी म्हणून असलेला आवाका स्पष्ट करण्यात आलेला आहे. मराठी कवितेला तुकारामांचे फार मोठे योगदान आहे, हे डॉ. किशोर सानप स्पष्ट करतात.
तुकोबांच्या कवितेतील जननिष्ठा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची आदी लेखांमधून तुकोबांचा उपदेशवाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे. एकंदर हा ग्रंथ म्हणजे संत तुकारामांच्या कार्याची महाचर्चा आहे. जरी हे लेखन एक सलग नसले तरी या मांडणीमध्ये एकसूत्रता आहे. त्यामधून संत तुकारामांच्या जीवनकार्याकडे पाहण्याचे नवे आयाम पुढे येतात. या ग्रंथाला भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार २००९ प्राप्त झालेला आहे.
'तुकाराम दर्शन'(२०१४) हा डॉ. सदानंद मोरे लिखित ग्रंथ निर्विवादपणे संत तुकारामांच्या कार्यकर्तृत्वाचा अभिनव लेखाजोखा आहे. संत तुकारामांचे वारकरी परंपरेच्या आदिस्थानापासून आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण समाजपुरुषांशी असणारे नाते अधोरेखित करण्याचे कार्य येथे घडले आहे. डॉ. सदानंद मोरे यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, "महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे तुकारामकेंद्रित पुनलेखन असे तुराराम दर्शनचे थोडक्यात वर्णन करता येते. मराठी संस्कृतीवरील तुकोबांचा प्रभाव लक्षात घेता तुकोबांना महाराष्ट्राचे संस्कृतिपुरुष म्हणता येईल हा या ग्रंथाचा एका शब्दातील निष्कर्ष आहे. पण म्हणजे नेमके काय ?
तुकोबांचा प्रभाव त्यांच्या समकालीनांवर तर पडला होताच, पण तो त्यांच्याबरोबर संपला नाही. तुकारामकालापासून तो आजपर्यंत महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तीवर त्याचप्रमाणे संस्थांवरसुद्धा तुकोबांचा प्रभाव पडतच राहिला आहे. इतका की या व्यक्तींनी व संस्थांनी तुकोबांना जे प्रतिसाद दिले त्या प्रतिसादांची पद्धतशीर मांडणी केली तरी त्यातून महाराष्ट्राचा एक इतिहास साकार होतो. अशाप्रकारच्या इतिहासाची गरजच काय असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर हे आहे की एरवी ज्या बाबी नजरेतून निसटलेल्या असतात त्यांच्याकडे या प्रकारच्या संशोधनातून लक्ष जाते. या अर्थाने मी तुकोबांना 'मराठी संस्कृतीच्या टेहळणीचा बुरुज' असे म्हटले आहे."
'साप्ताहिक सकाळ' मध्ये डॉ. सदानंद मोरे यांनी १०८ लेखांची प्रदीर्घ मालिका लिहिली होती. त्यामध्ये काही लेखांची भर घालून ११३ लेखांचा समावेश या ग्रंथात करण्यात आलेला आहे. या ग्रंथाला प्रा. राम बापट यांची विवेचक प्रस्तावना लाभली आहे.
या लेखमालेचा प्रारंभ तुकोबा आणि मराठी संस्कृती यांचा परस्पर संबंध शोधण्याच्या बिंदूपासून झालेला आहे. तुकोबांचे संत ज्ञानदेवांशी असणारे भावात्मक नाते, बंधू कान्होबा, पत्नी जिजाई, प्रारंभीचा विरोधक आणि नंतरचा अनुयायी रामेश्वर भट्ट, कट्टर विरोधक मंबाजी, समकालीन अनघडशा, शेख महंमद, शिष्या बहिणाबाई, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेकांशी तुकोबांचे जैविक नाते आहे. तुकोबांचा या सर्वांवरील प्रभाव लेखकाने स्पष्ट केलेला आहे. त्यासोबतच देहुगाव आणि वारकरी परंपरा याची अत्यंत अधिकृत मांडणी या लेखांमधून आलेली आहे.
संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने कळस आहेत. पारंपरिक भक्तिमार्गी सांप्रदायिकांना त्यांचे श्रेष्ठत्व अंत:करणापासून मान्य आहे. परंतु त्याचवेळी बुद्धिजीवी संशोधक, अभ्यासक, सुधारक यांना देखील तुकोबांचे अनन्यसाधारण श्रेष्ठत्व ज्ञात आहे. त्यामुळेच काळाच्या प्रत्येक टप्प्यावर तुकोबांची महती गाणारे आणि त्यांच्या अलौकिक कार्याचा परिचय इतरांना करून देणारे तुकोबांचे अनुयायी उभे राहिले. यामध्ये पंडित परंपरेतील मोरोपंत, शाहिरी परंपरेतील होनाजी बाळा आणि सगनभाऊ यांचा आढावा घेण्यात आलेला आहे. कचेश्वर ब्रह्मे यांचा वृत्तांत तर एका वेगळ्याच वास्तवाची प्रचिती देतो.
सर अलेक्झांडर ग्रँट यांनी संत तुकारामांच्या गाथेचे शिस्तबद्ध व पद्धतीशास्त्रानुसार संपादन व्हावे यासाठी केलेले प्रयत्न आणि शंकर पांडुरंग पंडित यांनी त्याची केलेली अंमलबजावणी याबाबतची हकीकत एका लेखात तपशीलाने मांडली आहे. ती मुळातून वाचलेली बरी!
परमहंस सभा, प्रार्थना सभा आणि सत्यशोधक समाज या तीन सामाजिक संस्थांच्या प्रेरणास्थानी संत तुकाराम आहेत. इतकेच नव्हे तर राजर्षी शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड अशा समाजभान जागवणाऱ्या राजकुलीन महामानवांनाही तुकोबांच्या अभंगांनी प्रेरणा दिली आहे. न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, महर्षी शिंदे असे समाजधुरीण तुकोबांची गाथा हृदयाशी धरून पुढे चालले आहेत. मर्ढेकर, दि. पु चित्रे, अरुण कोलटकर, र. वा. दिघे असे अनेक साहित्यिक तुकोबांच्या आशयाने आणि शैलीने समृद्ध झाले आहेत. या सर्वांचा धांडोळा प्रस्तुत लेखमालेतून घेण्यात आलेला आहे.
एकंदर डॉ. सदानंद मोरे यांचे 'तुकाराम दर्शन' म्हणजे तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून झालेल्या महाराष्ट्र संस्कृतीच्या जडणघडणीचा विशाल पट आहे. मुळात तुकोबांचे वंशज असल्यामुळे घरातूनच मिळालेले वारकरी संस्कार आणि त्याला विद्यापीठीय विद्याव्यासंगाची जोड यामुळे हे लेखन अत्यंत वरच्या दर्जाचे झालेले आहे. खरी महाराष्ट्र संस्कृती आणि वारकरी धर्म समजून घेण्यासाठी हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ वाचल्याशिवाय तरणोपाय नाही.
थोडक्यात वा.ब.पटवर्धन, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, आ. ह. साळुंखे, किशोर सानप, सदानंद मोरे यांनी तुकाराम दर्शनाचा पैस अधिक विस्तृत आणि व्यापक केला आहे. तो समजून घेणे म्हणजेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची सहिष्णु संस्कृती आत्मसात करणे होय. वारकऱ्यांची जीवननिष्ठा तुकारामांना प्रमाणभूत मानल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, हेच या अभ्यासाचे फलित आहे.
खूपचं छान अगदी नेमक्या शब्दांत भाष्य करणारा लेख.
उत्तर द्याहटवाकेलेले लिखा खुप अभ्यास व मेहनत घेवुन केले आहे.......
उत्तर द्याहटवासंत समजुन घेण्यासाठी....संतत्वच अंगी ठसावे लागेल......ते सोडुन केलेले प्रयत्न माणसाला थकवा आणतील.
सर, अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
उत्तर द्याहटवासविस्तर आणि अभ्यासपूर्ण लेख. यातले तीन-चार ग्रंथ मी वाचले आहेत आणि त्यांनी माझ्या विचारांवर सखोल परिवर्तन होण्या इतका प्रभाव पाडलेला आहे. तुमचा हा लेख माननीय झाला आहे. काय वाचावे याचे मार्गदर्शन तुकोबांच्या अभ्यासकांना यातून मिळू शकेल...
उत्तर द्याहटवाअतिशय सुन्दर लेख।।
उत्तर द्याहटवासर खुप महत्वपूर्ण लेख
उत्तर द्याहटवा