'आपला मानूस', विवेक बेळे आणि राज्यघटना
'आपला मानूस', विवेक बेळे आणि राज्यघटना
सत्य आणि कल्पित यांच्या दरम्यान एक आभासी जग उभे करणारे माध्यम म्हणून चित्रपटाकडे पाहता येते. दोन तासांची करमणूक या हेतूने चित्रपटगृहात पाय ठेवलेल्या माणसाला हे चित्रपटाचे गारुड कमी-अधिक प्रमाणात झपाटून टाकते. चित्रपटात वापरल्या गेलेल्या त्रिमितीय चित्रचौकटी (frames) आपली अमिट छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडतात. त्यामुळेच काही वेळेस चित्रपट हे लेखक, दिग्दर्शकाचे समकालावरील सटीक भाषण ठरते. कथानकातील एखादी व्यक्तिरेखा जे भाष्य करते, तेही पुन्हा लेखकाचेच एक व्हर्जन असते.
'आपला मानूस' (2018) हा सतीश राजवाडे दिग्दर्शित नाट्यचित्रपट! त्रिकोणी कुटुंबातील वृद्ध बाप, मुलगा व सून यांची ही कथा आहे. एक छोटा नातू आहे, परंतु तो वसतिगृहात राहतो. मुलगा वकील, सून प्राध्यापिका. दोघेही कामधंद्यासाठी बाहेर. घरात एकटेपणाला कंटाळलेला, थोडी हेळसांड झालेला म्हातारा. त्याची ही कथा. इथे मला चित्रपटाचे आशयसूत्र, कथानक, व्यक्तिरेखा छायाचित्रण याबद्दल काही बोलायचे नाही. तर चित्रपटातील तीन राजकीय संदर्भावर संदर्भावर मी भाष्य करणार आहे.
हा चित्रपट बेतला आहे विवेक बेळे यांच्या 'काटकोन त्रिकोण' या नाटकावर. चित्रपटाची कथा-पटकथा-संवादही विवेक बेळे यांनीच लिहिले आहेत. लो बजेट चित्रपट, मोजक्या व्यक्तिरेखा, प्रत्यक्ष कृतीला असणारा चिंचोळा अवकाश, यामुळे चित्रपटाची मुख्य मदार कथा-पटकथा-संवाद यावर आहे. त्यामुळे तर्काचा व्यूह रचणारे, संघर्ष निर्माण करणारे संवाद हा चित्रपटाचा गाभा.तर असा हा चित्रपट लिहिताना लेखक विवेक बेळे यांनी आपल्या पात्रांच्या मुखातून तीन ऐतिहासिक व्यक्ती व घटनांवर विशिष्ट भाष्य(comment) केले आहे. त्या भाष्याचे सूचकार्थ आपण तपासणार आहोत.
22 जून या तारखेशी निगडीत पहिला संदर्भ आहे. वकील असलेल्या राहुल गोखलेची चौकशी करायला सीनियर इन्स्पेक्टर मारुती नागरगोजे आलेला आहे. राहुल एका घडलेल्या घटनेची तारीख सांगतो 22 जून. तेव्हा मारुती नागरगोजे म्हणतो, "म्हणजे आपल्या चाफेकर बंधूंनी रँडला ठोकला, तीच तारीख की." या संवादात लेखकाने चाफेकर बंधूंबद्दल आदर व्यक्त केला आहे. तो योग्य म्हणता येईल. लेखकाचा कल सशस्त्र क्रांतिकारकांना गौरविण्याचा दिसतो.
दुसऱ्या एका संवादात हाच सीनियर इन्स्पेक्टर मारुती नागरगोजे म्हणतो, "आपल्याला जमल तेवढाच चांगुलपणा दाखवावा. आपण काय गांधी नाही." लेखकाने या वाक्यात एक हलकासा नकार पेरला आहे. गांधीजी पददलितांबद्दल म्हणजेच अस्पृश्य, मुस्लिम, स्त्रिया यांच्या बद्दल सहानुभूती दाखवायचे. त्याबद्दलची नापसंती, नकारात्मक भावना या संवादात येते.
तिसरा प्रसंग चित्रपटाच्या मध्यात आहे. इन्स्पेक्टर नागरगोजे हा वकील राहुल गोखलेला प्रश्न विचारून त्याच्याकडून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाचे संवाद असे आहेत,
राहुल : तुम्हाला घटना ठाऊक आहे का? नागरगोजे : बाबासाहेबांची ना? माहिताहे की.
अभ्यासालाच आहे.
राहुल : त्यात असं नमूद केलंय की, शंभर
गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण
एकाही निरपराधास शिक्षा होता
कामा नये.
नागरगोजे : एका निरपराध माणसासाठी 100
गुन्हेगारांना सोडायचं, हेच मला पटत
नाही.
इथे पटकथा-संवाद लेखक विवेक बेळे यांनी जाणीवपूर्वक राज्यघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रेक्षकांचे प्रतिकूल मत होईल, असे संवाद लिहिले आहेत. खरे तर, कथा-पटकथा लेखन किंवा चित्रपट दिग्दर्शन करण्याचा म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. तोच अधिकार वापरून विवेक बेळे हे राज्यघटना व घटनाकार डॉ. आंबेडकरांविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवीत आहेत. एका अर्थाने बदनामी करत आहेत. कथा-पटकथा-संवाद लिहिताना चांगला अभ्यास व पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे. ते इथे दिसत नाही. लेखक एक वकील आणि एक इन्स्पेक्टर यांच्यामधील संवाद दाखवतो. त्यामुळे जबाबदार पदावर असलेली माणसे एक विधान करत आहेत, असे दृश्य प्रेक्षकांना दिसू लागते. मात्र प्रत्यक्षातील विधान हे बेजबाबदारपणे लिहिलेले आहे. वरील विधान हे यापूर्वी काही ठिकाणी येऊन गेले आहे. मात्र लेखक त्याला राज्यघटना व डॉ. आंबेडकरांशी जोडून एक भ्रम निर्माण करतो. राज्यघटना आणि डॉ. आंबेडकर हे अतूट समीकरण सर्वमान्य झाले आहे. परंतु या संवादात लेखक प्रेक्षकांच्या मनावर हे बिंबवू पाहतोय की, डॉ. आंबेडकरांनी घटनेत काही तरी चुकीचे लिहिले आहे. 'शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये,' हे वाक्य राज्यघटनेत कुठेही आलेले नाही. त्या आशयाचे दुसरे कोणतेही वाक्य घटनेत आलेले नाही. राज्यघटनेत भाग-6 (राज्य), प्रकरण-4 मध्ये कलम 214 ते 237 पर्यंत न्यायालये, न्यायाधीशांच्या नियुक्त्या, कक्षा, वेतन या संदर्भात तरतुदी आल्या आहेत.
पुन्हा पुन्हा वापरल्या गेलेल्या वरील विधानाचे मूळ आपणास ब्रिटिश कायदाविषयक विचारात आढळते. वरील अर्थाचे विधान सर्वप्रथम विल्यम ब्लॅकस्टोन याने केलेले आढळते. त्याचे 'कॉमेंट्रीज ऑन द लॉज ऑफ इंग्लंड' (इ.स.१७६६) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. विल्यम ब्लॅकस्टोन हा प्रसिद्ध कायदेपंडित, न्यायाधीश आणि राजकारणी होता. त्याचे मूळ विधान असे आहे, "It is better that ten guilty persons escape than one innocent suffer." त्याच्या या विधानाला Blackstone's Ratio असे म्हटले जाते. त्याच्या या विधानाला ब्रिटिश कायद्यातील नीतिवचन म्हणून मान्यता आहे.
भारतीय संदर्भात विचार करायचा झाला, तर प्रारंभी भारतातील न्यायव्यवस्था इंग्लंडच्या न्यायव्यवस्थेवर पोसली होती. त्यामुळे आपोआपच वरील नीतितत्त्व भारतात लागू झाले. अद्यापही हे नीतितत्त्व बाजूस सारण्यात आलेले नाही. Low of criminal jurisprudence मध्ये या विधानाला महत्त्व देण्यात आले आहे. मात्र अनेक कायदेपंडितांनी या विधानावर आक्षेप नोंदविला आहे.
वस्तुस्थिती अशाप्रकारची असताना विवेक बेळे आणि सतीश राजवाडे चुकीचे तथ्य आपल्या चित्रपटातून का मांडत आहेत? यामुळे लोकांचा गैरसमज होतो. लोकांमध्ये भ्रम निर्माण होतो. राज्यघटना आणि डॉ. आंबेडकर यांच्या संदर्भात अनादर निर्माण होऊ शकतो. असेच या लेखक-दिग्दर्शकांना करायचे आहे काय? वस्तुतः चित्रपटातील तीनही राजकीय संदर्भांचा मुख्य कथानकाशी काहीही संबंध नाही. असे असताना लेखक-दिग्दर्शक अशी घोडचूक कशी काय करतो? भ्रम निर्माण करणे, बुद्धिभेद करणे, आणि सत्याची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने मांडणे हे आता राजकारणात सर्रास घडू लागले आहे. लेखक आणि दिग्दर्शक हेही याच रांगेत उभे आहेत काय? या जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीबद्दल लेखकाचा कसा सन्मान करावा, हेच कळत नाही.
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
कला वाणिज्य महाविद्यालय, मायणी.
👌मस्त सर
उत्तर द्याहटवामुळात भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल पूर्वग्रहदूषित भूमिका घेऊन वावरणारे भरपूर आहेत. हे सगळे काही वेळा जाणीवपूर्वक तर काही वेळा नेणिवेच्या पातळीवर होत असते. राजवाडे आणि बेळे याचे शिकार आहेत.
उत्तर द्याहटवाअतिशय महत्त्वपूर्ण विचार.. डोळ्यात अंजन घालणारे !!
उत्तर द्याहटवाआपलं म्हणणं रास्त आहे. काही चुकीचे शब्द / संज्ञा समाज सर्रास वापरात असतो. त्या मागे आपले/समाजाचे अज्ञान लपलेले असते. मला वाटतं हा लेखकही/ नाटककार अज्ञानाचा बळी असावा. मात्र नाटककारांनी हे शब्दप्रयोजन जाणीवपूर्वक वापरले असेलतर प्रकरण गंभीर आहे.
उत्तर द्याहटवाजेव्हा एखाद्या कलाकृती निर्मिती होते. तेव्हा त्यामध्ये मांडली जाणारी मतं अभ्यासपूर्ण असली पाहिजेत. आणि जर तसे झाले नसेल तर जागृत प्रेक्षक आणि समीक्षकांनी त्याची जाणीव करून देणे रास्त आहे. आणि हेच आपण आपल्या लिखाणातून अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहे...
उत्तर द्याहटवाहे जाणिवेच्या किंवा नेणिवेच्या पातळीवर घडले आहे .हे पटत नाही .आपण सांगितलेल्या तिन्ही प्रसंगात एक समान धागा आहे .तो एका विशिष्ट विचारसरणीचा भाग आहे .लेखक आणि दिग्दर्शक त्याचे प्रचारक असले पाहिजेत .द्वेषावर आधारित विचारधारा किती खोलवर रुजली गेली असावी ?
उत्तर द्याहटवासरजी ! छान पद्धति ने मूल्यांकन केले आहे.लोक चांगल्या गोष्टीचा कसा दुरुपयोग करतात याचे वास्तव मांडले आहे.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लेख
उत्तर द्याहटवाKhup atishay sundar lekhan...
उत्तर द्याहटवाSir.