माणसासारखा माणूस असूनही: प्रज्ञा दया पवार

माणसासारखा माणूस असूनही: विषमतेच्या मुळाशी जाणारी कविता
------------------------------------------------------
माणसासारखा माणूस असूनही
=====================
त्याला काढायचीय तिची नग्न धिंड
करायचंय तिला विद्रूप
चाबकाने फोडून काढायचंय
भरचौकात
उकळत्या तेलात हात घालायला लावून
पाहायचीय तिची सत्त्वपरीक्षा कठोर
शहानिशा करायचीय त्याला
तिच्या पाकुळलेल्या देहामनाची
सतत सिद्ध करायचंय पौरुषत्व 
विधिरचिताच्या अधिकारानं
त्याला आपसूकच प्राप्त झालेलं

...तरीही हात चोळत तो बसलाय शांत
आतल्या आत उकळत
त्याने घरात लटकावल्यात
महामानवांच्या तसबिरी
यच्चयावत क्रांतिकारी
अर्थात त्याची स्वप्रतिमा आहे
अतिशय सुसंस्कृत सालस
पुरोगामी पुरुषाची

ती वाचू शकते
त्याने डोळ्यांच्या बाहुलीआड
महत्प्रयासाने दडवलेली नृशंस हिंसा,
जाणू शकते
त्याचं दुःख अपार

पुरुष असल्याची
त्याला मोजावी लागतेय जबर किंमत
माणसासारखा माणूस असूनही!
                                    -प्रज्ञा दया पवार

       अंतस्थ (1993), उत्कट जीवघेण्या धगीवर (2002), मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा (2007), आरपार लयीत प्राणांतिक (2009), दृश्यांचा ढोबळ समुद्र (2013) या कविता संग्रहांमधून प्रज्ञा दया पवार यांची कविता आपल्या पुढे आली आहे. समकालीन वास्तवावर भेदक भाष्य करण्याचे सामर्थ्य असणारी कवयित्री म्हणून प्रज्ञा दया पवार यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. समाजात पावलोपावली विविध प्रकारचे शोषण कधी उघड उघड, तर कधी छुपेपणाने सुरू असते. आजूबाजूला अनेक मुखवटाधारी माणसे सभ्यतेच्या बुरखा पांघरून वावरत असतात. परंतु त्यांच्या आत एक अत्यंत हिंस्र विकृत व्यक्ती दडलेली असते. कवयित्री अशा लोकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे आपल्या भेदक शब्दांनी काढून टाकते. प्रखर कडवे भाष्य करते. त्याचवेळी व्यवस्थेच्या बळी असलेल्या सर्वांविषयी ती सहानुभूती बाळगते. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने अशाच पद्धतीने एक वेगळा दृष्टिकोण मांडला आहे.
       कवितागत 'ती' त्याच्याबद्दल काही भाष्य करत आहे. हा 'तो' कदाचित तिचा पती आहे, प्रियकर आहे, मित्र आहे किंवा नातेसंबंध नसलेला कोणताही पुरुष आहे. त्या पुरुषाचे समाजात उघडपणे दिसणारे बाह्य रूप आणि त्याच्या अंत:स्थ असणारी विकृत भावना यामुळे खरे तर त्याची घुसमट होत आहे. कवयित्री नेमकेपणाने त्यावर बोट ठेवते. तो कसा आहे, तर  मुळात हिंस्र व अमानवी वर्तन करणारा आहे. त्याला खरे तर आतून असे वाटते की, आपण पुरुष आहोत. निसर्गाने किंवा विधिरचित्याने आपणास जन्मजात श्रेष्ठत्व, उच्च स्थान बहाल केले आहे. या श्रेष्ठत्वाला नाकारणारी, आव्हान देणारी 'ती' त्याच्या दृष्टीने गुन्हेगार आहे. पुरुषांचा स्वामित्वभाव नाकारणारी 'ती' त्याला शिक्षेस पात्र वाटते. म्हणून तो तिला मध्ययुगातील अमानुष शिक्षा देऊ इच्छितो. परंतु वर्तमान समाजजीवनात त्याला उघडपणे असे करता येत नाही. म्हणून त्याच्या या भावना मनातच दबून राहतात. मुळात तिचा गुन्हा काय असावा? तर ती त्याचे जन्मजात श्रेष्ठत्व नाकारत असेल, ती त्याचे स्वामित्व झुगारत असेल, ती स्वतःला स्वतंत्र व मुक्त माणूस समजत असेल, त्यामुळे ती स्वतःच्या भावभावना व विचारांना महत्त्व देऊन त्यानुसार जगत असेल. हे स्वतंत्र व सार्वभौम जगणे म्हणजे एक प्रकारे त्याच्या श्रेष्ठत्वाला स्वामित्वाला आव्हान आहे. म्हणून तो तिला क्रूर शिक्षा देऊ इच्छितो.

       या शिक्षा कोणत्या आहेत, तर त्याला तिची सर्वांसमोर नग्न धिंड काढायची आहे किंवा तिला विद्रूप करायचे आहे किंवा तिला भरचौकात चाबकाने फोडून काढायचे आहे किंवा तिला उकळत्या तेलात हात घालायला लावून तिची सत्त्वपरीक्षा पाहायची आहे.

         तिचा गुन्हा काय, तर तिचे  देह-मन  पाकुळले आहे. म्हणजेच विशिष्ट भावनेने द्रवले आहे, पाझरले आहे किंवा विशिष्ट भावनेकडे आकर्षित झाले आहे. त्या तथाकथित पुरोगामी पुरुषाला वाटते माझ्या परवानगीशिवाय असे घडलेच कसे? तिच्या देह-मनात पाझरणाऱ्या, निर्माण होणाऱ्या सगळ्या भावनांचा निमित्तकारण मीच असायला पाहिजे. असे न होता, परस्परच तिचा देह, तिचे मन कसे पाकुळते? यामध्ये निश्चितच काही चुकीचे आहे, अनुचित आहे, पाप आहे. म्हणून ती अपराधी आहे, शिक्षेस पात्र आहे. तेव्हा जन्मजात मिळालेले श्रेष्ठत्व, प्राप्त झालेला विशेषाधिकार वापरून तो तिला भयंकर शिक्षा देऊ इच्छितो. (ज्या पद्धतीने जमदग्नीने रेणुकेला शिक्षा दिली होती, तसेच काहीसे इथे घडू पाहते आहे.)

       अर्थात आजचे समकालीन वर्तमान वेगळे आहे. आज सर्वत्र स्त्री-पुरुष समानता अध्याहृत आहे. स्त्रीचे स्वातंत्र्य तत्त्व म्हणून मान्य केले आहे. तिच्या स्वातंत्र्याला मुक्त अवकाश देणे प्रत्येक सुजाण नागरिकाला बंधनकारक आहे. म्हणून तो त्याच्या मनात असलेल्या मध्ययुगीन कठोर शिक्षा तिला देऊ शकत नाही. या शिक्षा कशा आहेत, तेही पाहणे गरजेचे आहे. तिचा देह विद्रूप करणे; तिला लज्जास्पद वाटेल, अवमानित वाटेल अशा पद्धतीने सर्वांसमोर सादर करणे; तिला गुन्हेगार ठरवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणे, हे या शिक्षेमध्ये अंतर्भूत आहे. परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की, तो तिच्याविरुद्ध काहीही करू शकत नाही. म्हणूनच तो मनातल्या मनात  क्रुद्ध झाला आहे. उकळतो आहे. परंतु वरकरणी शांत बसलाय. त्याच्या शांत बसण्याचे दुसरेही एक कारण आहे, ते म्हणजे त्याने स्वतः धारण केलेला मुखवटा. तो मुखवटा आहे अतिशय सुसंस्कृत, सालस, पुरोगामी पुरुषाचा. एकदा का तुम्ही स्वतःला पुरोगामी किंवा सुसंस्कृत किंवा समानता मानणारे असे घोषित केले की तुम्हाला तुमच्याच प्रतिमेला तडा जाईल, असे वागता येत नाही. म्हणून तो हात चोळत बसलाय. मनातून खदखदतोय, पण मनातील राग, संताप त्याला व्यक्त करता येत नाही. तिला मात्र त्याचे आतून खदखदणे जाणवते. कारण ती त्याचे डोळे वाचते. त्याने डोळ्यांच्या बाहुलीआड खूप प्रयत्नपूर्वक नृशंस हिंसा दडवली आहे. तिला असे वाटते की, त्याची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्याला खूप दुःख होतंय. अपार दुःख होतंय. कारण तो आजच्या वर्तमान परिस्थितीपुढे हतबल आहे. कदाचित त्याने धारण केलेल्या मुखवट्याचाही तो दबाव आहे. त्याच्या वाट्याला हे असे दुःख का आले? त्याच्या दुःखाला जबाबदार कोण? कदाचित कोणीतरी असे म्हणेल की तिच्यामुळे तो दुःखी आहे. तर तसे ते नाही. ती स्वतंत्रपणे जगू पाहते. जीवनाचा अनुभव घेऊ पाहते. अनेक भावना तिच्या मनात पाझरतात. यात गैर ते काय! पण त्याचे परंपरावादी मन ते मान्य करत नाही. वरकरणी त्याने स्वतःला कितीही पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी आतून तो टाकाऊ परंपरेला घट्ट धरून आहे. म्हणूनच त्याला तिला दुय्यम ठरवायचे आहे. तिच्या देह-मनावर माझे अधिराज्य आहे, हे बिंबवायचे आहे.

       खरे तर आज काळ असा आला आहे की, त्याने स्वतःच विशेषाधिकारांचे विसर्जन करावे. स्वतःला फार श्रेष्ठ समजू नये. आपली सहचारिणी असणारी स्त्री ही नेहमी परावलंबीच असावी, अशी भावना मनाच्या कोपऱ्यातसुद्धा शिल्लक ठेवू नये. उलट तिचे मुक्त स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी एक चांगला अवकाश  उपलब्ध करून द्यावा. परंतु असे घडत नाही. तो स्वतःला पुरुष समजतो. परंतु माणूस समजत नाही. तो तिला स्त्री म्हणतो, पण माणूस म्हणत नाही. माणूस ही मध्यम समतल अवस्था आहे. तो स्वतःला या अवस्थेपेक्षा वर कल्पितो, तर तिला या समतल अवस्थेपेक्षा खाली ठेवू पाहतो. त्यामुळे त्याच्या वाट्याला आजचे दुःख येते. जर त्याने स्वत:वर परंपरेने लादलेले श्रेष्ठत्वाचे भ्रामक वलय नाकारले आणि निकोप निरपेक्ष भावनेने इतरांकडे पाहिले, तर त्याला आज हतबल वाटणार नाही. असाहाय्य वाटणार नाही. अंत:करणात दुःखाची खदखद घेऊन हात चोळत बसावे लागणार नाही. उलट आपल्या आजूबाजूला मुक्त स्वातंत्र्य अनुभवणाऱ्या व्यक्ती असतील, तर आपलेही जीवन आनंदाने भरून जाऊ शकते. या सुखाला पारखा होण्याचे कारण त्याने स्वत: स्वीकारलेला दृष्टिकोण, स्वीकारलेले विषमतेचे तत्त्वज्ञान, स्वीकारलेले परंपरेचे जोखड आहे, हे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट होते.

          कवयित्री या कवितेतून पुरुषांना माणूस होण्याचे आवाहन करत आहे. स्त्रीला तिचे मुक्त स्वातंत्र्य कधी संघर्षातून, तर कधी नाईलाजाने  मिळत जाईलच, परंतु अशा प्रत्येक वेळी अहम् गंडाने ग्रासलेल्या पुरुषाची अवस्था केविलवाणी होत आहे. त्यालाच पुरुष असण्याची जबर किंमत मोजावी लागत आहे, असे कवयित्री म्हणते.

       येथे मला रायनर मारिया रिल्के या ॲस्ट्रोजर्मन कवीच्या पत्रातील काही भाग उद्धृत करावा असे वाटते. 14 मे, 1904 रोजी आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात रिल्के म्हणतो, "प्रेम करणं उत्तम; कारण प्रेम अशक्यप्राय असतं. एका जिवानं दुसऱ्या जिवावर प्रेम करणं, ही मला वाटतं सर्वात कठीण चढण असते." म्हणूनच रिल्के प्रेमाला मानवाची अग्निपरीक्षा म्हणतो. त्यासाठी मानवाला आत्मशोध करावा लागतो. स्वतःला न ओळखणारे तरुण-तरुणी एकमेकांना काय ओळखणार, असा त्याचा प्रश्न आहे. म्हणूनच तो पुढे म्हणतो, "...आणि मी मघाशी जे प्रेमाबद्दल बोलत होतो, ते प्रेम फक्त दोन 'माणसां'मध्येच होऊ शकतं. पुरुषानं प्रथम 'माणूसपद' प्राप्त करायला हवं. स्त्रीनं प्रथम 'माणूसपद' प्राप्त करायला हवं. मगच ही दोन माणसं, ज्यांना स्वत्वाची जाणीव झालेली आहे, ती परस्परांच्या स्वत्वाचा आदर करू शकतात. ती क्षमता त्यांच्यात आलेली असते. आणि म्हणूनच ती प्रेमाला 'लायक' होतात."

       कवयित्री प्रज्ञा दया पवार ज्या गोष्टीचे सूचन करत आहे, ते रिल्केने फार पूर्वी नेमकेपणाने सांगितले आहे. त्याही अगोदर भगवान बुद्धांनी असे सांगितले आहे की, 'जे जसे आहे, ते तसे आहे, असे जाणा. जे जसे नाही, ते तसे नाही, असे जाणा.' म्हणजेच पुरुष हाही माणूस आहे, स्त्री हीही माणूस आहे, हे नेमकेपणाने जाणले, तर पुरुषांना अपार दुःखाला सामोरे जावे लागणार नाही."

संदर्भ
१. रिल्केची दहा पत्रे - अनिल कुसुरकर, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, प्रथमावृत्ती 10 मे, 2004, पृ. 43-45.

                                    डॉ श्यामसुंदर मिरजकर
                    कला-वाणिज्य महाविद्यालय, मायणी. 

टिप्पण्या

  1. खूपच मार्मिक आणि वास्तववादी विचार .

    उत्तर द्याहटवा
  2. कवितेचे समीक्षण उत्तम. रीलके आणि बुद्ध यांचा संदर्भ अप्रतिम आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. कवितेचे खूप छान विश्लेषण केले आहे. अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  4. सर.प्रज्ञा पवाराच्या कविता अंतस्थ व्यक्त होतात .फक्त शोसीत गावकुसाबाहेरच्या
    स्त्रीची ही व्यथा दुःख॔ नाही तर समस्त स्त्री वर्गाचं फारच वास्तव पवार कवितेत व्यक्त करतात .आणि आपल्या अभ्यासनीय विश्लेषणा संदभाॅत तर
    काय लिहावे .फारच सुंदर.सर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद
      कृपया प्रतिक्रिया नोंदविल्यानंतर खालील बाजूस आपला ईमेलही नोंदवावा. म्हणजे प्रतिक्रिया कुणी दिली ते कळेल. 🙏

      हटवा
  5. उत्तम विश्लेषण !!
    रिल्के व बुद्ध यांचे संदर्भ अतिशय उचित !!
    वाचकांची प्रगल्भता वाढविणारा समीक्षा लेख
    अभिनंदन सर !!

    उत्तर द्याहटवा
  6. विश्लेषणात्मक वर्णन दादा

    उत्तर द्याहटवा
  7. स्त्री पुरुष समानतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न खूप छान वाटला.

    उत्तर द्याहटवा
  8. स्त्री पुरुष समानतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न खूप छान वाटला.





    उत्तर द्याहटवा
  9. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे काव्य आणि त्याचे विश्लेषन...

    यावर एक पूर्वी वाचलेलं काव्य आठवलं... कवयित्रीचे त्यावर नाव नव्हते त्यामुळे त्या कवयित्रीचा उल्लेख नाही करता येत.

    बाई शिकली म्हणून शहाणी झाली नाही.
    ती शहाणीच होती आधीपासून. आजही आहे.

    उंबरठ्याच्या आत गुलाम असली तरी सलामाची मानकरी होती ती, आजही आहे.
    कसदार लेखन दिल्याबद्दल अंतकरणापासून धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  10. सर,
    तुमच्या ब्लॉगला आज प्रथमच भेट दिली. खूप छान वाटल. गाणी आवडतात. कविताही आवडतात. मात्र माझ्यासारख्या विज्ञानात फिरू इच्छिणाऱ्याला त्या अशा कोणीतरी उलगडून सांगाव्या लागतात. खूच छान वाटले,, तुमचा लेख वाचून. मी क्वचितच कवितांच्या पुस्तकांना हातात घेतो. मासिक, साप्ताहिकातील कविता तर क्वचितच वाचतो. मात्र तुम्ही केलेले विवेचन वाचून कविता समजून घ्यायला आपणही शिकावे असे वाटू लागले. तत्कालीन परिस्थितीवर केलेले काव्य पटकन लक्षात येते. मात्र त्रिकाली भरलेल्या प्रश्नावरील काव्य गंभिर वाटून आमच्यासारखे दुर्लक्ष करतात. मात्र आता वाचेन. तुमच्या लेखामुळे असे वाटायला लागले की कवितजवळही आपण रेगाळावे. शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद सर. कवयित्री दया पवार यांच्याबद्दल खूप वेळा ऐकले आहे. आज त्यांच्या कवितेची करून दिलेली ओळख त्यांच्या कविता वाचण्यासाठभ् पुरेशी आहे. पुनश्च: धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मनपूर्वक धन्यवाद सर!
      एखाद्या कवितेवरील असे टिपण वाचल्यानंतर अधिक कविता वाचाव्यात असे वाटणे ही चांगली गोष्ट आहे. कवितेचे बोट धरले तर जीवन आनंददायी होते याचा अनुभव आपण घ्यावा!

      हटवा
  11. अप्रतिम विश्लेषण सर.
    अभिनंदन
    आपण दिलेला रिल्के आणि बुद्धाचा संदर्भ अगदी संयुक्त आहे. प्रेम हाच आहे मानवी अस्तित्वाचा आधार. आणि प्रेम दोन माणसांत होते म्हणून पुरुषाने आधी माणूस व्हायला हवेच आणि स्त्रीलाही त्याच माणुसपणाच्या दृष्टीने पहायला हवे. आपली ही मांडणी या कवितेला नवा आयाम देणारी आहे.
    अभिनंदन सर.

    उत्तर द्याहटवा
  12. छान!!! पीढ्यानपीढ्याच्या पुरुषसत्ताक पद्धतीवर अत्यंत समर्पक विवेचन

    उत्तर द्याहटवा
  13. खूपच अर्थपूर्ण कविता, आणि त्याचे अप्रतिम, नेमक्या शब्दात केलेले विश्लेषण खोल आतपर्यंत पोहोचनारे.संदर्भ सुद्धा अगदी नेमके.अजुन अशा प्रकारच्या लिखानाची वाट पहात आहोत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल धन्यवाद डॉ सविता मोहिते मॅडम. चांगली कविता नेहमीच अर्थांची अनेक वलये निर्माण करते. अशा कवितेला भिडताना, अनुभवताना एक वेगळाच आनंद लाभतो. तो मी फक्त आपणाशी वाटून घेतो आहे इतकेच! 🙏

      हटवा
  14. प्रतिम विश्लेषण आहे सर,
    पूरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे नेमक्या शब्दात तसेच रिल्के यांच्या लिखाणाचा आणि तथागत बुद्ध यांनी सांगितलेले उपदेश आजही समाजमनाला किती उपयुक्त आहेत हे संदर्भ खोलवर परिणाम करतात
    खुपच छान...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)