कुंडीतली माती

 
कुंडीतली माती 
       सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरत असताना त्याचं लक्ष एका कुंडीतल्या रोपाकडे गेलं. तो अचंब्याने थांबला. कौतुकाने न्याहाळू लागला. दोन छानसे गुलाब फुलले होते. 'इतक्या दिवसात कधी लक्षातच आलं नाही, या रोपाचं अस्तित्व!' तो स्वतःशीच म्हणाला. इतक्यात त्या घराच्या मालकाने आवाज दिला, "काय हो काय बघताय? काय पाहिजे तुम्हाला?" आवाजात थोडा कठोरपणा होता आणि स्वामित्वाची भाषा.          
       "काही नाही, सहजच रेंगाळलो. खूप चांगलं आहे रोप. चांगली फुलं आलीत त्याला. हेच जर जमिनीवर सुपीक मातीत असतं तर अजून फुललं असतं." तो सहजपणे उत्तरला. 
       "काही नको. कशाला हवीत जास्तीची फुलं आणि टवटवी.  जास्त वाढलं रोप तर काटेही बोचतील येता जाता. त्यापेक्षा छोटं आहे तेच बरं. घराची शोभा वाढली की पुष्कळ झालं. असं व्हायचं की झाड आमचं अन् फुलांवर डोळा शेजाऱ्यांचा. नकोच ती कटकट," मालक म्हणाला.  या उत्तराने  पांथस्थ  हसला  अन्  रोपाकडे  एक कटाक्ष टाकून आपल्या वाटेने निघून गेला. 
       कुंडीतील रोप या संवादावर विचार करू लागलं. 'पांथस्थ म्हणतोय ते खरं असेल का? माती बदलली की इतका फरक पडेल? माझ्या फांद्या, पानं, फुलं वाढत जातील? मला स्वतःलाच  खरं वाटत नाही. माझ्या क्षमतेइतकी मी फुलले आहे की. यापेक्षा जास्त फुलणं कसं शक्य आहे?' 
      पांथस्थ येता जाता त्या फूलझाडाकडे पाहायचा. त्याच्या नजरेत स्नेह असायचा. जणू त्याची नजर सांगत राहायची अजूनही छान फुलू शकते हे रोप. पण या विचाराच्या पलीकडे काही घडत नव्हतं. 
       एकदा घराचा मालक म्हणाला, "चार दिवस बाहेर चाललोय. जमलं तर पाणी टाका रोपाला. चार दिवसात काय रोप मरत नाही म्हणा. आजच भरपूर पाणी पाजलंय सकाळी सकाळी."
       दुसऱ्या दिवशी पांथस्थ  आठवणीने कुंडीतल्या रोपाजवळ गेला. त्याने आपला हात त्याच्या पानांवरून फिरविला. त्या स्पर्शाने रोप अंगभर शहारलं. एक वेगळीच सुखसंवेदना त्याला जाणवली. पांथस्थाने मातीत मुळाशी तर पाणी घातलेच पण सगळ्या पानांनाही न्हावू घातलं. पान पान चिंब झालं. नवा तजेला आला. 
       तिसऱ्या दिवशी रोपाची टवटवी थोडी वाढली. पाणी घालायला आलेल्या पांथस्थाला रोप म्हणालं, "खरंच का हो माती बदलली की फुलं जास्त लागतील?" 
       "जरूर," पांथस्थ म्हणाला. "तजेला वाढलाय आज पानांचा. प्रसन्न वाटतंय बघताना," तो पुढे म्हणाला. 
       "काल तुम्ही चांगलं चिंब केलं ना, म्हणून!" रोप उत्तरलं.
       "रोजच पाणी पाजतो ना मालक?" त्याने विचारलं. 
       "हो पाजतो. पण त्या पाणी देण्याला उपकाराचा दर्प असतो. त्यानं पाणी पाजायचं कर्तव्य केलं. तेवढ्यातच मी फुलायचं, अशी अपेक्षा असते. दुसऱ्याची जबाबदारी मी पेलतो. असा अभिमान असतो," थोड्याशा उदास स्वरात रोप उत्तरलं. 
       थोड्या वेळाने ते म्हणाले, "पण कालचा अनुभव वेगळा होता. तुम्ही स्पर्शातून बोलत होता. जणू स्वतःचंच एखादं काम करतोय, या भावनेनं तुम्ही पाणी दिलं. ती जीवनधारा पानापानांपर्यंत पोहोचली, असं वाटलं काल," 
       पांथस्थांने हसून रोपाच्या पानांना कुरवाळले. फांदीवरुन हात फिरवताना एकदोन काटे बोचले. पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हलकासा पाण्याचा शिडकावा पानांवर केला. साचलेल्या धुळीचा थर उडवून लावला. 
       पांथस्थ जाऊ लागला, तेव्हा रोप म्हणालं, "खरोखरी मला अजून वाढता, फुलता येईल का? माझी इच्छा आहे तशी..."
       "कुंडीतील जागा बदलून जमिनीत मुळं रोवल्याशिवाय ते शक्य नाही. घुसमट होते मुळांची एवढ्याशा जागेत. मग फांद्या पानंही खुरटतात. नीट प्रकाशही मिळत नाही इथे. बघू काही करता येते का!" असे म्हणत तो निघून गेला. 
       नंतरच्या दिवशी पहाटेपासूनच रोप पांथस्थाची वाट पाहू लागलं. त्याचं मन अधीर झालं. पण पांथस्थ नेहमीच्या वेळेपर्यंतही आला नाही. 'आज येत नाही की काय? उगीचच आपण दुसऱ्याच्या भरवशावर बसतो," असं म्हणत रोप स्वतःवर चरफडू लागलं. त्याला पांथस्थाचा थोडा रागही आला. 
       इतक्यात पांथस्थ आला. त्याच्यासोबत एक पिशवी होती. एक खुरपं होतं. जवळ येऊन त्याने पानांवरून हात फिरवला. एक सुखद शिरशिरी अंगभर पसरली. "आज आपण थोडी माती बदलूया. मी आणलीय थोडी सुपीक माती. थोडं खतही आणलंय," तो म्हणाला. रोपानं पानांची थरथर दाखवून त्याला संमती दिली. ते या नव्या अनुभवाला उत्सुक होतं.
       "खरंतर मी तुला मोकळ्या जमिनीतच लावलं असतं. पण तुझ्या मालकाला ते आवडणार नाही," असे म्हणत तो कामाला लागला. जुनी माती ढिली करताना मूळं तुटतील थोडी. थोडा त्रासही होईल. पण नंतर सगळं ठीक होईल," तो समजावणीच्या स्वरात म्हणाला. त्याने हळूहळू अगोदरची माती मोकळी केली. थोडी मुळे तुटली, पण त्याला नाईलाज होता. तसं ते गरजेचं होतं. नव्या मातीत नवी मुळं रुजली तरच वाढ चांगली होणार होती. थोडी जुनी माती तशीच ठेवून त्याने नवी माती घातली. थोडं खतही घातलं. वरून ओबडधोबड वाटणारी ही माती सुपीक होती. शेवटी वर जुन्या मातीचा थर दिला. पुरेसं पाणी घालून तो निघाला. जाता जाता त्याने योग्य सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवली. आता फांद्या वाढल्या तरी कशाला तटणार नाहीत, असा विचार करत तो निघून गेला. 
      ठरलेल्या मुदतीपेक्षा दोन दिवस उशिरा मालक परतला. त्याने पाहिलं, रोप नेहमीपेक्षा अधिक टवटवीत आणि सतेज दिसत होतं. एक तिसरी कळी जोमानं अंकुरत होती. रोप आनंदाच्या, तृप्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या भावनेनं ओथंबलं होतं. पांथस्थाने दिलेल्या थोड्याशा पाण्याने इतकी जादू कशी झाली, या विचारात ते गुंतून गेलं. रोप पांथस्थाच्या प्रेमळ नजरेची वाट पाहू लागलं.

                                    श्यामसुंदर मिरजकर
                                              मायणी

टिप्पण्या

  1. रोपाच्या आत्मकथनातून बंधमुक्त जीवनाच आनंद काय आहे,हे कळतय. मानवी जीवनात पदोपदी चाकोरीबध्द, परंपरागत जीवन जगणारी माणसं दिसतात. छान कथा आहे. मन लावून वन टाईम वाचली.

    उत्तर द्याहटवा
  2. खरचं कथासंग्रह काढा अतिशय सुंदर संकल्पना

    उत्तर द्याहटवा
  3. सर ,
    अतिशय सुंदर असा ललित लेख . समीक्षेइतकीच किंबहुना काकणभर अधिक ललितात तुमची लेखणी रमणार हे निश्चित .

    उत्तर द्याहटवा
  4. खुप छान आहे वाचत असताना पुढे अजुन काय आहे याची उत्सुकता खुप वाटली
    ते रोपट समोर दिसत आहे असे वाटले मला

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बहुतेक तुम्ही पोस्ट लिहिल्या नंतर खाली ईमेल टाकला नसावा. त्यामुळे आपले नाव दिसत नाही. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 👏

      हटवा
  5. अतिशय सुंदर भाष्य केले आहे. डॉ. जगदिशचंद्र बोस या भौतिकशास्त्रज्ञाने वनस्पतीनांही जीव असतो, भावना असतात आणि संवेदनाही हे प्रयोगातून सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग पुढे अनेक कारणासाठी झाला. झाडे बोलतात हे अनेकदा मलाही जाणवते. काही झाडाजवळ तसे काहीच कारण नसताना मला जावेसे वाटते तेंव्हा त्याला काहीतरी हवे असते असे अनेकदा अनुभवले आहे. आपण अतिशय छोटा कथानकाचा भाग मोठा संदेश देणारा बनवला आहे. झाडांना रोपाना स्पर्श केल्यानंतर ती प्रतिसाद देतात. त्यांचेही इतर सजीवाप्रमाणेच आहे. विज्ञान अशा लेखनाबरोबर गुंफले किंवा लोकांनी यातील विज्ञानही जाणून घेतले तर निसर्ग वाचवणे, सौंदर्य वाढवणे सहज शक्य आहे. अतिशय सुंदर लेख…

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद सर!
      साहित्याचा पर्यावरणाशी जवळचा संबंध आहे. तुकोबांनी 'वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे।' म्हटले ते उगाच नाही.

      हटवा
  6. छान कथा, वनस्पती शास्त्रज्ञ बोस यांंची आठवण झाली.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)