आषाढी कार्तिकी विसरू नका मज

आषाढी कार्तिकी विसरुं नका मज 

       वैशाख वणवा संपता संपता शेतीची मशागत सुरू होते. रान नांगरून तयार केले जाते. तापलेल्या भुईला पावसाची ओढ असते. ज्येष्ठात पेरणीची लगबग आणि पाऊस सुरू होतो. आषाढात बाळकोळपण होते. पीक तरारतं. वीत दीड वीत वर येतं. कामाची धांदल थांबते. त्याच वेळी महाराष्ट्र-कर्नाटकच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या श्री विठ्ठलाच्या वीर वारीकरांना आषाढी वारीचे वेध लागतात. माणसांची जमवाजमव, साधनांची जुळवाजुळव सुरू होते. नव्या चैतन्याने लोक भारतात. लोकसखा विठ्ठलाच्या भेटीची आस मनामनात दुणावते. 'चल ग सखे चल ग सखे पंढरीला' अशी साद एकमेकींना घातली जाते. आणि अंतराचा, मुक्कामांचा अंदाज घेत एक एक दिंडी पंढरीच्या दिशेने निघू लागते. 'जय जय राम कृष्ण हरी', या नामघोषात संतांचा गौरव करत एका लयीत पावलं उचलली जातात. टाळ-मृदंगाचा नाद घुमू लागतो. 'माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी', म्हणत लेकुरवाळ्या विठ्ठलाच्या भेटीला वारकरी धावू लागतात. 
       महाराष्ट्रात प्रतिवर्षी दिसणारे हे चित्र. दरवर्षी लाखो भाविक चालत पंढरीच्या दिशेने निघतात. ना कुणाचे बोलावणे, ना सांगावा. पण जिवीच्या जीवलगाला भेटण्याची अार्त ओढ मना मनात दाटते. आणि म्हातारपणामुळे थकलेली पावलेही नव्या उमेदीने पुढे होतात. मग प्रश्न पडतो, का बरं हे लोक या भेटीला आतुर होतात? कोणी सुरू केली वारी? कधीपासून? 
       इ. स. ५१६ च्या ताम्रपटात पांडरंगपल्ली असा उल्लेख असणारे हे खेडे होते. इ.स.१२३७ च्या शिलालेखात याच खेड्याचा उल्लेख महाग्राम असा झालेला दिसतो. म्हणजे ६व्या शतकापासून १३व्या शतकापर्यंत पंढरपूरचा विकास होत गेला. इ. स. १२७० च्या शिलालेखात मंदिराला दिलेल्या देणग्या आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी नंतर काल्याचा दिवस साधून दिलेल्या दिसतात. वारकरी संप्रदायाचे प्रथम संत नामदेवांचा जन्म इ.स.१२७०चा. याचा अर्थ इतकाच की नामदेव, ज्ञानदेव आदी संतांच्या अगोदर पासून पंढरपूरात वारी सुरू होती. तिचा थेट संबंध मेंढपाळ धनगरांच्या येरजारीशी होता. माणदेशात वसलेले पंढरपूर हे कमी पावसाचे ठिकाण. कोकणात गेलेले मेंढपाळ पाऊस सुरू होताच देशावर परततात. मग आषाढी वारी सुरू होते. तर पूर्वेकडच्या परतीचा मान्सूनला तोंड देत तिकडे गेलेले लोक दिवाळीच्या दरम्यान परततात. तेव्हा कार्तिक वारी सुरू होते. अर्थात पंढरपूर, श्रीविठ्ठल, वारी या गोष्टी संतांच्या आधीपासून चालत आल्या असल्या, तरी या उपासनेला खरे सांप्रदायिक रूप दिले ते संतांनीच. नामदेवांनी विठ्ठलाला बसवंत करून त्याच्याभोवती भजन कीर्तनाचा खेळ मांडला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीविठ्ठल बनले आहे. कारण संतांनी देवाला सखा सांगाती, मायबाप केले. अनेक अभंगातून विठ्ठलाला साजिवंत केले. भक्ती सुखाला भाळून हा पंढरपुरी अवतार घेता झाला, असे संतांनी म्हटले. असा हा विठ्ठल भावाचा भुकेला आणि भक्त वेल्हाळ झाला तर काय नवल! म्हणूनच संत नामदेवांच्या अभंगात सर्वप्रथम आपणास विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले भक्त आणि भक्ताच्या भेटीसाठी आसुसलेला देव, असे चित्र दिसू लागते. भक्तांना जितकी पंढरपुरात जाऊन मायबाप विठ्ठलाला भेटण्याची ओढ आहे, तितकीच ओढ, आतुरता विठ्ठलाच्या मनात देखील आहे. म्हणूनच नामदेवांच्या अभंगाद्वारे हा विठ्ठल असे म्हणतो की,
      आषाढी कार्तिकी विसरूं नका मज|
      सांगतसे गूज पांडुरंग||
      पतितपावन मी तो आहे खरा| 
      तुमचेनि बरा दिसतसे||
      तुम्ही जाता गांवा हुरहुर माझे जिवा|
      भेटाल केधवा मजलागी||
      धावुनिया देव गळा घाली मिठी|
      स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे||
      तिन्ही त्रिभुवनीं मज नाही कोणी|
      म्हणे चक्रपाणि नामयासी||

        येथे विठ्ठल स्वतःच मनीचे हितगुज सांगताना असे म्हणतो की, आषाढी-कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका. मी पतितपावन आहे खरा, परंतु तुमच्यामुळेच मला हे बिरूद शोभून दिसते. तुम्ही स्वतःच्या गावी गेला की माझ्या मनाला हुरहूर लागते. असे म्हणत नामदेवाच्या गळ्यात पडून देव स्वतः हुंदके देत म्हणतो, तिन्ही त्रिभुवनी मला कोणी नाही. असा लडिवाळ व भक्तवेल्हाळ देव दुसरा कोणी नाही. म्हणूनच सगळ्या वारकऱ्यांची अशी मान्यता आहे की पालखी सोहळा सुरू झाला, दिंड्या निघू लागल्या की देव मंदिरातून बाहेर पडतो. दिंड्यांमधल्या कथा कीर्तनात रंगून जातो. पंढरीच्या वाटेवर चालणारे वारकरी संत सज्जन होऊन जातात. 'नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे', हा जनाबाईचा उपदेश प्रमाण मानून वारकरी चालत राहतात. मग
        'संतभार पंढरींत| कीर्तनाचा गजर होत||
        तेथे असे देव उभा| जैसी समचरणांची शोभा|
हा जनाबाईचा अनुभव सर्वांना येऊ लागतो. चालण्याचा, कीर्तनात रंगण्याचा, उड्या मारण्याचा, फुगडी खेळण्याचा शीण होत नाही. उलट माहेरी गेल्यावर सासुरवाशिणीच्या मनावरील भार हलका होतो, जगायला नवी उमेद, नवे बळ मिळते, तसे होते. 'देव पहावया गेलो, देव होऊनि ठेलो', अशी अनुभूती घेऊन, तृप्त समाधानी मनाने वारकरी घरी परततो. त्याच्या जीवनाला भक्तीची नवी झळाळी आलेली असते. घराघरात विठ्ठलनामाचा गजर घुमू लागतो. 

                            डॉ. श्यामसुंदर मिरजकर 
                   कला-वाणिज्य महाविद्यालय, मायणी

(कृपया, आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवा. तसेच अभिप्रायाखाली आपले नाव, गाव लिहा किंवा खाली असणाऱ्या बॉक्स मध्ये ईमेल नोंदवा. त्यामुळे प्रतिक्रिया कोणाची हे समजून येईल.) 

टिप्पण्या

  1. वारकरी संप्रदायाची महती ल इतिहास वारकरी पंरपंरा योग्य शब्दांत मांडणी आपण केली .अतिशय अभ्यासपूर्ण असं लेखन असतं असेचं लेखन आपल्या हातून व्हावे.हिच सदिच्छा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वारकरी आणि त्याची तळमळ आपण योग्य शब्दात वर्णन केली. प्रासादिक भाषेत लिखित आहे, आपण वैचारिक वारी करता, खुप खूप धन्यवाद

      हटवा
  2. पंढरपूरचं सुरुवातीला नाव काय होतं, याचा शिलालेख, ताम्रपटाधारे घेतलेला अभ्यासपूर्ण वेध, पंढरपूरच्या आषाढी - कार्तिकी वारीची सुरुवात कशी,कुठून व केंव्हा झाली, भक्ताची वारील जाण्याची लगबग आणि पंढरीचा विठ्ठल, वारकरी संत आणि विठ्ठलभक्त यांचा एकसंघटित मेळा कसा आहे यावर अभ्यासू चिंतन
    -डॉ.दत्ता पाटील, गडहिंग्लज,

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मन:पूर्वक धन्यवाद सर!🙏🤝

      हटवा
    2. खूप छान लेख झाला आहे वारकऱ्यांच्या मनातील तळमळ आणि एकूणच त्याचं भावजीवन नेमक्या शब्दात आपण मांडलेला आहात तुमच्या लेखणीला सलाम

      हटवा
  3. वारीबद्दल मला माहित नसलेली माहिती वाचून आनंद झाला. भक्ती मे शक्ती है।विठूराया सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोच.लोक ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता सहभागी होता. वाटेत जागोजागी मनोभावे अन्नदान होते. वारीच्या काळात महाराष्ट्र एक अनोखे चैतन्य संचारलेले असते. सर खूप छान लेख.
    चंद्रकांत निकम.जि.प.शाळा, म्हासुर्णे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद चंद्रकांत! तीर्थ, क्षेत्र, देव आणि भक्त या सर्वांचा सुंदर मिलाफ वारीमध्ये होतो. संत संगतीचे सुख लाभते. म्हणून वारी हा आनंद सोहळा असतो! 🙏

      हटवा
  4. अतिशय भावपूर्ण लिखाण, आपल्या सह आम्हालाही वारी घडवून आणली आपण. ही अशा लिखानाची सुरवात ठरो.हा प्रवास असाच चालू राहून वारी पूर्ण होइ पर्यन्त सर्वाना आपण भक्ति रसात भिजवून टाकाल याची खात्री वाटते. मनपूर्वक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद डॉ सविता मोहिते मॅडम !लवकरच वारी संदर्भातील दुसरा लेख आपणास वाचण्यास मिळेल.🙏

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)