न संपलेला माणूस (कविता)
न संपलेला माणूस
-१-
बातमी शहरभर धुक्यासारखी पसरली
डॉक्टर गेले
कुणीतरी गोळ्या झाडल्या त्यांच्यावर.
सर्वत्र सन्नाटा
मग कुजबुज.....चर्चा.
ज्योती म्हणाली,
"आज रक्षाबंधन नाही.
गेलं पाहिजे मला साताऱ्याला कार्यकर्त्यांसोबत."
एक उत्तेजित गृहस्थ म्हणाले,
''सारखी सारखी टीका करायची आमच्या धर्मावर
किती सहन करायचं?
पापाचा घडा भरला होता त्यांचा
मुक्ती मिळेल त्यांना धर्मरक्षकाच्या हातून मृत्यू म्हणजे
बाकीच्यांनी शहाणं व्हावं आता.''
कार्यकर्ते जमून होते एकत्र
राख पांघरून धुमसत होते आतल्या आत.
-२-
तीन छोट्या मुली खेळत होत्या
मध्येच एक म्हणाली,
''डॉक्टर मेले.....म्हणजे मारले त्यांना कुणीतरी
म्हणजे मला असं म्हणायचंय की
त्यांना मरायचं नव्हतं, तरी ते मेले
त्यांच्या अनेक इच्छा बाकी असतीलच ना!
मग ते आता भूत होतील की काय?''
''छट्'' दुसरी उसळून म्हणाली,
''डॉक्टर कधीच भूत होणार नाहीत.''
"कशावरून? तुला कुणी सांगितलं?" पहिलीनं विचारलं.
"मला डॉक्टरांनी सांगितलंय
घरी आले तेव्हा,
माणूस मेल्यावर कधीच भूत होत नसतं
त्या लोकांच्या समजुती आहेत, बेटा!"
तिसरी म्हणाली,
"हो, मला पण सांगितलंय
भूतबित काही नसतं म्हणून...!"
दुसरी म्हणाली,
"तुला ग कधी भेटले?
ओळख तरी आहे का तुमची?"
तिसरी उत्तरली,
"पुस्तकं आहेत ना पण आमच्याकडे त्यांची
त्यात त्यांनी हेच सांगितलंय
ओळखते मी डॉक्टरांना खूप दिवसांपासून..."
-३-
कपाटामधील त्यांच्या पुस्तकांवरून नजर फिरवताना
विस्कटत गेली नरेंद्र दाभोळकर ही अक्षरे
"तिमिरातून तेजाकडे प्रवास करताना
हा बाप माणूस कायम सोबत असेल"
मी स्वतःशीच म्हणालो
अक्षरांचे दिवे करून
नव्या वाटा धुंडाळण्यासाठी चालू लागलो
- श्यामसुंदर मिरजकर
Chhan kavita...
उत्तर द्याहटवाPrakashachya vatevar ghevun janara manus...
अन्वर, तुम्ही काम केलेले आहे डॉक्टरांसोबत. अनुभवले आहे त्यांना. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी ते धडपडायचे.खरं आहे!
हटवाछान. डॉक्टर कायमच स्मरणात राहतील. त्यांनी पेटवलेली अंधश्रद्धेविरुद्धची मशाल कायम तेवत ठेवायलाच हवी
उत्तर द्याहटवापत्रकारितेच्या माध्यमातून तुम्हीही विवेकाची मशाल हाती घेतलेली आहेच
हटवासर डॉ.नरेंद्र दाभोलकरांवरील कविता अतिशय सुंदर झाली आहे.डॉक्टरांच्या स्मृतींबरोबर चळ्वळी साठी नवे बळ देणारी कविता आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रा!
हटवा'तिमीरातून तेजाकडे'नेणा-या डाॅक्टरांच्या स्मृती जागृत करणारी आपली कविता आहे. डाॅक्टरांना शत शत प्रणाम !🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाआपल्या साहित्यातून डॉ कायम आपल्यात आहेत ही भावना कवितेतून उत्कटतेने चित्रित झाली आहे. लहान मुलीच्या भावना व त्यातील तेजाळलेपन डॉ दाभोलकारांच्या कामाची पोचपावती होय एक मोठा विषय अगदी सहजपणे आपण मांडलाय
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुतार सर! हे तेजाळलेपण आपण वाटत राहूया
हटवा'तिमीरातून तेजाकडे' नेणा-या डाॅक्टरांच्या स्मृती जागृत करणारी आपली कविता आहे. डाॅक्टरांच्या स्मृतीला शत शत नमन !🙏🙏🙏
उत्तर द्याहटवासर,
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहिली आहात कविता, खरे तर डॉ. दाभोलकर हे शरीर मारेकऱ्यांनी मारले, पण त्यांचे विचार असे तुमच्या आमच्या मनात कायम जिवंत आहेत, ते विचारच आपल्या सर्वांना काम करण्यास प्रेरणा देतात.
खरं आहे धन्यवाद!
हटवाविवेकाचा आवाज बुलंद करूया
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर कविता...
उत्तर द्याहटवाअक्षरांचे दिवे शब्दप्रयोग आवडला.
उत्तर द्याहटवास्मृतिशेष डॉक्टरांना
उत्तर द्याहटवाअभिवादन
फारच छान आणि परीणामकारक कविता...
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर कविता आहे सर, डॉक्टरांचे विचार जनमानसात तेवत ठेवण्यास ही कविता सर्वानाच मार्गदर्शक ठरेल.
उत्तर द्याहटवाडॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना शतशः नमन
उत्तम कविता . दाभोळकर व्यक्ती नसून विचार असल्याचे सिद्ध होतेय .
उत्तर द्याहटवामानवी उत्क्रांती तील एक अग्रगण्य मार्गदर्शक म्हणजे डॉ. दाभोळकर जी🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप छान झालीय कवित.
उत्तर द्याहटवाविचार करायला लावते.
खूप छान कविता. आपल्या प्रत्येकाच्या आत उजळत असलेले सर जाणवत राहिले...
उत्तर द्याहटवाविचारप्रवर्तक कविता
उत्तर द्याहटवासात आठ वर्षे त्यांच्या संपर्कात ऐन तारुण्यात होतो
उत्तर द्याहटवा.सेबीची साप्ताहिक चर्चा आणि मिटींगमधील त्यांनी केलेले संस्कार आजही जपतोय .त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात नरू भाऊ वर्ग कायम अबाधित राहतील .खरोखरच ते एक न संपणारे व्यक्तिमत्त्व होते .आपली कविता खूपच छान आहे .
मनःपूर्वक धन्यवाद!
हटवाडॉक्टरांचे विचार आणि आचार यांचे स्मरण या निमित्ताने झाले. खूप आशयघन कविता.
उत्तर द्याहटवामाणसाला मारून विचार संपत नाहीत. उलट विचार अधिक घट्ट होतात हे संत तुकाराम यांच्या पासून महात्मा गांधींपासूनन ते डॉ.दाभोलकर यांच्या पर्यंत पुन्हापुन्हा सिद्ध झाले आहे आणि सिद्ध होत राहील. विचार कधीच मरत नाहीत. दाभोलकर नाहीत पण त्यांचे विचार अमर आहेत.
उत्तर द्याहटवाडॉ महेश गायकवाड सर आपण त्यांना अनुभवले आहे त्यांचे साथी आहोत डॉक्टर आजही इथे तिथे भेटतच राहतात
हटवाडाॅ. मिरजकर सर डाॅ.दाभोलकर सरांचे विचार संपणारे नाहीत. हे आपण सहज साध्या संवाद शैलीतून दाखवले आहे. सुंदर आशय संपन्न कविता झाली आहे. आपले अभिनंदन !
उत्तर द्याहटवाडॉक्टरसाहेबांचे विचार न संपणारे आहेत ,त्याच्या साहित्यातून ते आजही मार्गदर्शन करीत आहेत.एक सहज सुंदर,मौल्यवान कविता.
उत्तर द्याहटवाहि घटना होऊन तीन ते चार वर्षे झाली मारेकऱ्यांना अजून शिक्षा झाली नाही उध्दवा अजब तुझे सरकार.व्यक्ति मरते पण विचार मरत.नाहीत हे सांगणारी अतिशय बोलकी कविता
उत्तर द्याहटवाडॉ. दाभोलकर यांना विनम्र अभिवादन. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य अत्यंत समर्पक शब्दात आपण मांडले आहे. छान कविता लिहिली आहे. आजच्या तिमिरातून प्रकाशाकडे जाण्यासाठी 'अक्षरांचे दिवे'च उपयोगी पडतील हे नक्की.
उत्तर द्याहटवाशामराव कविता आवडली!
उत्तर द्याहटवातुझ्या लेखनीला सलाम!
माधव पाटील
डाॅक्टरांनी सदैव निसर्ग आणि विज्ञान यांचे अनुसरण केले. जे वैज्ञानिक निकषांवर टिकून राहते त्यासंच त्यांनी सत्य मानले. या व्यक्तिने कधीही कोणाचाच दुःस्वास वा तिरस्कार केला नाही. त्यांनी सदैव समोरच्या व्यक्तीच्या विचारांचा आदर केला. आपला विचार त्यांनी कधीही समोरच्यावर लादला नाही वा त्याने स्वीकारावा म्हणून कधीही आग्रह केला नाही.आपल्या व्याख्यानातून ते सत्य व भ्रम यातील फरक समजावून सांगत असत. अत्यंत ओघवती व सोपी भाषा, मार्मिक पण चपखल दृष्टांत आणि संवादी विवेचन ही त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्ये असत. परिवर्तन हे मनाने स्वीकारल्याशिवाय होऊ शकत नाही या मतावर ते ठाम होते. आणि त्याबाबतचे आपले मतही ते तितक्याच ठामपणेच मांडत होते. अशावेळी ते कसल्याही प्रकारची भिती बाळगत नसत. डाॅक्टरांचा विचार मूलभूत होता. तो रूजला तर अनेकांची अडचण झाली असती. या अविचारातून डाॅक्टरांना संपविण्याचा प्रयत्न झाला.मात्र झाले उलटेच. डाॅक्टरांना त्यांच्या कार्यकाळात जे काम करता आले नाही, त्यांचे अर्थात शाश्वत विचार समाजात जितक्या प्रमाणात पेरता आले नाहीत तितके कार्य डाॅक्टरांच्या पश्चात झाले आहे व पुढेही होतच राहील हे आता मान्य करावं लागेल. खरंतर डाॅक्टर आत्मा, स्वर्ग, नरक इ. गोष्टी मानतच नव्हते त्यामुळे आज हे पाहून त्यांच्या आत्म्यास समाधान वा आनंद होत असेल असे म्हणणे म्हणजे डाॅक्टर खरचं मेले असे म्हटल्यासारखे होईल. मुळात डाॅक्टर व्यक्ती नसून विचार होते याची प्रतिची गेल्या सात वर्षांपासून तीव्रतेने जाणवते आहे. हे त्यांचे विचारांचे अनुसरण करणारे वा समजून घेणारे तर मान्यच करतील तथापि त्यांच्या विचारांना संपविण्याच्या नादात त्यांना संपवू पाहणारे व स्वतःच आत्मक्लेशाच्या ज्वालेत करपून जाणारांनाही स्वीकारावा लागेल.
उत्तर द्याहटवाश्याम मिरजकर यांच्या कवितेचा वाच्यार्थ प्रथमदर्शनीच वैचारिकतेचा प्रत्यय देणारा वाटत असला तरी या कवितेचा भावार्थ आकलनाला खूपच सुलभ वाटतो. तीन मुलींच्या प्रतिमांतून कविने डाॅक्टरांच्या समग्र विचारांची गुंतागुंत उलगडून दाखविण्याची किमया साधली आहे. त्याबरोबरच लहानपण हे बौद्धिक कमकुवत पणाचे व्यासपीठ नसून ते शाश्वत विचार आकलनाचाही उत्तम विचार मंच असतो. हे कळण्याची नितांत गरज असणा-या व्यवस्थेला या माध्यमातून कविने जोरदार तमाच्या मारला आहे. एकूणच डाॅक्टर व त्यांचे विचार चिरंजीव आहेत हे सांगण्याचा कविचा उद्देश येथे सर्वांगीण सफल झाला आहे असे मला वाटते.
धन्यवाद!- डाॅ.अशोक शिंदे.
डॉ. अशोक शिंदे सर, आपण सविस्तर डॉक्टरांचे स्मरण केले ते फार बरे झाले. डॉक्टर त्यांच्या कामातून चिरंजीव झाले आहेतच. माझा प्रयत्न त्यांना कवितेतूनही जिवंत करण्याचा होता. तो यशस्वी झाला आहे असे वाटते. धन्यवाद!
हटवाडॉ. दाभोलकर यांना विनम्र अभिवादन. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य अत्यंत समर्पक शब्दात आपण मांडले आहे. छान कविता लिहिली आहे. आजच्या तिमिरातून प्रकाशाकडे जाण्यासाठी 'अक्षरांचे दिवे'च उपयोगी पडतील हे नक्की.
उत्तर द्याहटवाडॉ.दाभोळकर हत्त्या आणि त्यासंदर्भातील विचारप्रवर्तक मांडणी या अनुषंगाने कविता अशायगर्भ तर आहेच;पण पात्रांच्या संवादात्मक पातळीवर वाचकाला विचार करायला लावणारे कवितेतील नाट्य कवितेच्या आकृतीबंदाचे महत्त्व सिद्ध करते.
उत्तर द्याहटवा