संत नामदेवांची अभंगवाणी आणि संवैधानिक मूल्ये (लेख)
वारकरी संप्रदायाचे प्रथम संत, आद्य अभंगकार, वारकरी कीर्तनाचे उद्गाते संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म २६ ऑक्टोबर, १२७० चा! 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' म्हणत त्यांनी दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू आणि उत्तरेकडील गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब या प्रांतांची यात्रा केली. आंतरभारती एकतेचा पाया रचला. 'आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म' अशी घोषणा करत नवा काल सुसंगत आचारधर्म, संप्रदाय स्थापन केला. या लोकोत्तर राष्ट्रीय संतांची तिथीप्रमाणे येणारी ७५० वी जयंती योगायोगाने संविधान दिनी म्हणजे २६ नोव्हेंबर, २०२० रोजी येत आहे.
आदर्श मानवी मूल्यांची जपणूक, लोकाभिमुख शासन प्रशासनाची निर्मिती व सार्वभौम एकात्म राष्ट्रभावनेचा विकास करणारा महाग्रंथ म्हणजे भारतीय संविधान! जी राष्ट्रनिर्माणाची तत्त्वे आणि जे मूलभूत अधिकार संविधानाने स्थापित केले, त्यांचा उद्घोष संत नामदेवांच्या अभंगवाणीत आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात सातशे वर्षांपूर्वी पहावयास मिळतो, तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.
मुळात वर्णाश्रम धर्माने आणि हेमाद्री पंडिताच्या 'चतुर्वर्गचिंतामणी' सारख्या ग्रंथात एका वर्षात करावयाच्या सुमारे बाराशे व्रतांच्या कर्मकांडाने सामान्य स्त्री-पुरुषांची केलेली कोंडी फोडायचे काम वारकरी संप्रदायाने केले. 'वेदशास्त्रवचन चुकल्या अवचिता, गोसावी जी होता दंडावया' अशी त्या काळाची परिस्थिती असताना 'नको योग याग, नको शास्त्रबोध, नामाचे प्रबंध, पाठ करा।।' असा सर्वजणसुलभ उपासना मार्ग सांगणारे संत नामदेव होते. ज्या काळात सगळे अध्यात्म संस्कृत भाषेत होते, त्याकाळात मराठी या लोकभाषेत आग्रहाने अध्यात्मविद्या देण्याचे कार्य संत नामदेव, संत ज्ञानदेवांनी केले. स्वतःचे परंपरेपेक्षा वेगळे असणारे विचार धाडसाने आणि आग्रहपूर्वक मांडले. प्रसंगी त्याची किंमतही मोजली. ज्याला संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले आहे, त्याचा उत्तम अविष्कार आपणास नामदेवादी वारकरी संतांच्या अभंगवाणीत दिसतो. संविधानाच्या प्रास्ताविकात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, उपासना आणि श्रद्धा यांचे स्वातंत्र्य सांगितले आहे. संत नामदेव, ज्ञानदेव, तुकारामांनी त्यांच्या काळात या गोष्टींचा जोरदार पुरस्कार केला होता. 'हिताच्या गोष्टी सांगू एकमेका, शोक मोह दुःख निरसू तेणे। एकमेका करू सदा सावधान नामी अनुसंधान सुटी नेदूं।।' ही नामदेवांची धारणा होती. 'सर्वांभूती समदृष्टी हेचि भक्ती गोमटी। ' असे त्यांचे सांगणे होते. 'शुद्ध करी मन, समता धरी ध्यान, तरीच बंधन तुटेल रे।' असा त्यांचा आग्रह होता.
संविधानाने जो सामाजिक समतेचा विचार सांगितला आहे, त्याचे आचरण संतांनी स्वतः केले होते. म्हणूनच शिंपी, सोनार, माळी, कुंभार, महार, कुणबी, ब्राह्मण आणि स्त्रिया यांना या वारकरी संप्रदायात 'संधीची समानता' होती. नामदेवांनी दासी असणाऱ्या जनाबाईला मार्गदर्शन करून संत होण्याइतका अधिकार प्राप्त करून दिला होता. देवाशी भांडणारी, देवाला शिव्या देणारी बंडखोर कीर्तनकार जनाबाई स्वतःला 'नामयाची दासी जनी' म्हणविते. भक्तीचा दोर गळ्यात टाकून मी पंढरीचा चोर धरला आहे, असे म्हणते. 'हातामध्ये टाळ, खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी? ' असा प्रश्न विचारत भक्तीच्या मार्गावरून चालू लागते. तेव्हा भारतीय संविधानाने सांगितलेले स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व पंढरपूरच्या महाप्रांगणात शेकडो वर्षांपूर्वीच रुजलेले दिसू लागते. त्यामुळेच आज हजारो स्त्री-पुरुष मोठ्या विश्वासाने वारीतून चालत जाताना दिसतात.
संत नामदेवांनी अंत्यज, अस्पृश्य गणलेल्या चोखामेळाला वारकरी संप्रदायात घेणे, शिष्य म्हणून स्वीकारणे आणि संत म्हणून सर्वांनी त्यांना मान्यता देणे, ही अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. 'अस्पृश्यता नष्ट करणे' हे मूलभूत तत्त्व संविधानाने अंगीकृत केले आहे. मात्र या तत्त्वाचा वस्तुपाठ संत नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी घालून दिला आहे. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा ।।' म्हणणारे चोखामेळा समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात. परंतु याच चोखोबांचे मंगळवेढा येथे गावकुस बांधताना दरड अंगावर कोसळून निर्वाण होते. दगडमाती खाली गाडलेल्या अस्पृश्याचा मृतदेह कोण वर काढणार? कोण त्याचे अंत्यसंस्कार करणार? पण जेव्हा नामदेवांना हे समजते तेव्हा ते स्वतः तिथे जातात. चोखोबांच्या अस्थी शोधून पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात या संताची समाधी उभी करतात. एका सुप्रसिद्ध मंदिराच्या दारात अस्पृश्य गणलेल्या संताची समाधी हे क्रांतिकारक पाऊल म्हणावे लागेल. भारतीय संविधान कायद्यासमोर सर्व समान असे सांगते. सर्वांना समान न्याय आणि संरक्षण सांगते. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारे भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही देते. परंतु असा आदर्श व्यवहार संतांनी त्यांच्या काळात केला होता, याची आपणास नोंद घ्यावी लागेल. 'जाती नाही त्याची कायसी पंगती' असे ज्या काळाचे सामाजिक वास्तव होते, त्या काळात शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, स्त्रिया यांना आत्मविश्वास देण्याचे कार्य नामदेवांनी केले. प्रसंगी संन्याशाची पोरं म्हणून धर्मसभेने ज्यांचे ब्राह्मणत्व नाकारले, चांडाळ संबोधले, त्या ज्ञानेश्वरादी भावंडांनाही आपलेसे केले. त्यांच्या प्रज्ञेला, प्रतिभेला प्रतिष्ठित केले. 'नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।' असे सांगून या ग्रंथाला वारकरी संप्रदायाचा आधारग्रंथ बनविले. हे नामदेवांचे वर्तन द्रष्ट्या समाजपुरुषाचे होते.
संत नामदेवांना आपण स्वीकारलेल्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व ज्ञात होते. म्हणून त्यांनी स्वतः अभंगवाणी लिहिली. इतर संतांना लिहायला लावली. त्याचे सामुदायिक भजन सुरू केले. अभंगांचा अर्थ सामान्य भाविकांना नेमकेपणाने कळावा म्हणून वारकरी कीर्तन सुरू केले. वारकर्यांचा आचारधर्म स्पष्ट केला. शुद्ध आचरणाला महत्त्व दिले. 'परदारा परनिंदा परधन परपीडन। सांडूनी भजन हरीचे करा।।' असे सांगितले. ही तत्त्वे भारतीय संविधानालाही अभिप्रेत आहेत. आजही बहुसंख्य वारकऱ्यांचा आचारधर्म हाच आहे.
संत नामदेवांनी सख्यभक्तीचे नवे साधन रूढ केले. परमेश्वराला सखा केले. कधी त्याला मातृरूपात पाहिले. त्याच्याशी लटिके भांडण केले. जवळीक साधली. हे करता करता भक्तीने भगवंताला वश्य करता येते, हे लोकांच्या मनीमानसी बिंबविले. इतर कर्मकांड, अंधश्रद्धा, भक्तीचा बाजार आणि ते भरविणारे मध्यस्थ भटजी पुरोहित यांनाही नाकारले. 'ब्रह्म जाणाति स ब्राह्मण:।' असे म्हणून स्वतःचे श्रेष्ठत्व मिरविणाऱ्या, टिळा टोपी घालून सोंग दाखविणाऱ्या, चावळी वटवट करणाऱ्यांना बाजूस सारले. भारतीय संविधानाने श्रद्धा मान्य केली आहे, पण अंधश्रद्धा नाकारली आहे. संत नामदेवांनीही कर्मकांडाला नकार देऊन डोळस श्रद्धेची मांडणी केली आहे.
संत नामदेवांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण व उत्तर भारतात पाच तीर्थयात्रा केल्या. पहिली तीर्थयात्रा संत ज्ञानदेवांच्या आग्रहाने उत्तरेत केली. यानिमित्ताने या संतद्वयात झालेली चर्चा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीच्या उत्थानाचा सुवर्णबिंदू होता. ते संतांची दृष्टी अधिक व्यापक करणे होते. भक्तिमार्गाची सुस्पष्ट मांडणी या काळात झाली. पुढे नामदेवांनी पुन्हापुन्हा भारतभ्रमण करून आपल्या नव्या भक्तिमार्गाचा प्रचार-प्रसार केला. ते दीर्घकाळ पंजाबमधील घुमान येथे राहिले. त्यांनी उत्तरेत निर्गुण मताची पायाभरणी केली. पुढे संत नामदेवांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शीख धर्माची स्थापना झाली. आजही पंजाबी माणूस 'बाबा नामदेवजी महाराज' म्हणून नामदेवरायांसमोर नतमस्तक होतो. त्यांच्या 'गुरुग्रंथसाहिब' मध्ये संत नामदेवांची ६१ पदे आदरपूर्वक समाविष्ट आहेत. संत कबीर, संत नरसी मेहता अशा संतकवींवर नामदेवांचा मोठा प्रभाव आढळतो. पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, जम्मू , गुुजरात अशा सगळ्या उत्तर भारतात संत नामदेव या एकमेव वारकरी संताची हजारो मंदिरे आढळतात. हा त्यांचा राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला प्रभाव होय.
भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयास भारतभर मुक्तसंचाराचे, कुठेही निवासाचे, स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. संतश्रेष्ठ नामदेवांनी मुस्लीम राजवटी सत्तेवर असताना असे स्वातंत्र्य मिळविले आहे. आपल्या विचार, वाणी व कृतीने शेकडो वर्षे सर्व भारतीयांच्या मनात आदराचे स्थान मिळविले आहे. त्यांच्या या कार्याचा आजच्या संदर्भात पुनरुच्चार होणे, ही काळाची गरज आहे.
- डॉ. श्यामसुंदर मिरजकर
अप्रतिम लेख
उत्तर द्याहटवाखूप सुंदर , अभ्यासपूर्ण आणि नेमकी मांडणी केली आहे सर आपण !
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद
हटवालेख आवडला.चिंतनीय आहे
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख आहे
उत्तर द्याहटवालेख छान उतरला आहे संत नामदेवांच्या कार्याचा आजच्या परिस्थितीशी छान संबंध लावला आहे संशोधनपर आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाडॉ.लेखाची मांडणी खूप सुयोग्य झाली आहे. सविधन आणि संत नामदेव यांचे विचार वेगळे नाहीत हे आपण सप्रमाण सिद्ध केले आहे. हेमाड पंडित याच्या ग्रंथात 2000व्रते सांगितली आहेत,तेवढी दुरुस्ती करावी. बाकी लेख अती सुंदर. मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवादुरुस्ती सुचविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
हटवाखूप अभ्यासपूर्ण लेख.संविधान आणि संत नामदेव यांचे विचार यातील साम्य समर्पक आहेत. मनापासून अभिनंदन,डॉ. हा लेख प्रसिद्ध करावा.💐💐💐💐💐👌🏻
उत्तर द्याहटवाछान मांडणी.अभिनंदन
उत्तर द्याहटवाGreat initiative and exceptional work👍👍👍
उत्तर द्याहटवाया लेखामध्ये खूप छान लिहिलेला आहे स्त्री आणि पुरुष समानता या बाबत खूप छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवादिलेल्या संदर्भाने लेख वाचनीय... धन्यवाद
उत्तर द्याहटवाकालसुसंगत मांडणी. असे असंख्य पैलू घेऊन मांडणी करणे गरजेचे होऊन बसले आहे. धन्यवाद सर!
उत्तर द्याहटवाधन्यवाद डॉक्टर
हटवाछान
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती, संकलन केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा 🌷💐⚘🥀
उत्तर द्याहटवाशुद्ध करी मन, समता धरी ध्यान, तरीच बंधन तुटेल रेl या वाक्यातून समतेचे मूल्य अंगी बनवण्याचे सूत्र सांगणाऱ्या संत नामदेवावरील आपला लेख अतिशय सुंदर लेख आहे. मला सुदैवाने त्यांच्या जन्मस्थळाला भेट देण्याचे भाग्य लाभले. संविधान आणि संत साहित्य वारकरी परंपरा खूप छान पद्धतीने शब्दांकित झाली आहे. मनापासून धन्यवाद. नामदेव सिरसी गावाची आठवण करून दिली....
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद सर🙏🙏🙏
हटवाफारच सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख आहे सर
उत्तर द्याहटवाअतिशय महत्वाची माहिती देणारा आणि वारकरी मूल्यांवर प्रकाश टाकणारा अप्रतिम लेख.
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख, चालु जीवनाशी सुसंगत आहे.
उत्तर द्याहटवाअतिशय चिंतनीय लेख
उत्तर द्याहटवा'हातामध्ये टाळ, खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी? त्याकाळी असे धाडसी विधान करणारी स्त्री शिष्या तयार करणे खरेच केव्हढे अवघड काम होते आज आपण स्त्री पुरुष समानतेचे ढिढोरे पिटतो पण आहे का समानता आत्मपरीक्षण करावे लागेल.
उत्तर द्याहटवासंत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज खरोखर ग्रेट होते 🙏🏻
संविधान आणि संतसाहित्य यांची सांगड छान घातली आहे
उत्तर द्याहटवा