गोष्टी वेल्हाळ अण्णा (लेख)
गोष्टी वेल्हाळ अण्णा
आम्हाला आठवी किंवा नववीच्या वर्गात इंग्रजीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर एक धडा होता. त्यातलं पहिलंच वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं. Anna, the elder brother...! त्या कर्मवीरांना आम्ही फक्त पुस्तकातूनच वाचलं आहे. परंतु आम्ही कर्मवीरांचे शिक्षणप्रेम आणि त्याग आमच्या अण्णांच्या म्हणजेच प्रा. सदानंद श्रावस्ती सरांच्या व्यक्तिमत्त्वात अनुभवला आहे.
इयत्ता नववीच्या वर्गात असताना माझी रवींद्र कल्लाप्पा शिंगे या मुलाशी मैत्री मैत्री कल्लाप्पा शिंगे या मुलाशी मैत्री मैत्री जमली. आमच्या गुरू क्लासेस मधला तो सर्वात हुशार विद्यार्थी. मी अभ्यासात कच्चा. 'ढ' या श्रेणीत बसणारा, तर रवींद्र सगळीकडे अव्वल. सुंदर हस्ताक्षर, प्रभावी संभाषण कौशल्य, वक्तृत्व-काव्यलेखन-काव्यवाचन स्पर्धांमध्ये बक्षिसांचा मानकरी तोच आणि अभ्यासातही प्रथम! शेकडो अद्भुत पिसांचे वैभव मिरवणाऱ्या मोरासारखा तो रुबाबदार. त्याला या सगळ्या गोष्टी कशा जमतात, हा सगळ्या मुला-मुलींना पडलेला प्रश्न! एकदा त्याच्या घरी गेलो. तिथे अण्णांची भेट झाली. मग मी मनात समजून गेलो, बहरलेल्या फुलझाडाला खतपाणी देणारा कुशल माळी अण्णांच्या रूपाने या घरात वावरत आहे.
अण्णा म्हणजे अत्यंत परिश्रमी शिक्षक! डी.एड. होऊन ते नोकरीत लागले. पण पुढे मोठ्या जिद्दीने त्यांनी एम. ए. बी. एड. पूर्ण केले. हा त्यांनी त्यांच्या कृतीने आमच्यासमोर घालून दिलेला आदर्श. सगळ्या कुटुंबावर, भावंडांवर मायेचा, प्रेमाचा वर्षाव करणारे अण्णा आम्ही पाहिले. शाळेतून घरी येताना बाजारातून शेलका भाजीपाला आणि भरगच्च खाद्यपदार्थ आणावे तर ते त्या अण्णांनीच. दुसऱ्यांना खाऊ घालण्यात त्यांना विलक्षण समाधान मिळत असलं पाहिजे.
चोखंदळपणा हा त्यांचा महत्त्वाचा गुण! रवीचे कपडे, चप्पल, बूट अशा सगळ्याच गोष्टी आम्हाला हेवा वाटावा अशा. पण त्यामागची खरी निवड असायची अण्णांचीच. चांगल्या दर्जाच्या वस्तू निवडाव्यात आणि योग्य दरात त्या खरेदी कराव्यात याचे प्रशिक्षण त्यांनी आम्हाला दिलं. मी काही वेळेला माझे कपडे, बूट, खरेदीसाठी अण्णांना घेऊन गेलो होतो, ते मला आजही आठवतंय. त्यांच्या या चोखंदळपणामुळे मी काही काळ काळ कॉलेजात मिरवू शकलो.
अण्णा एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून करायचे. ती म्हणजे, शाळेतून येताना नवीन महत्त्वाची पुस्तके घरी आणायचे. त्या वाचनाचे संस्कार सगळ्या घरावर झालेले. सगळ्यांची ज्ञानलालसा त्यांनी जागी केली. अवांतर वाचनाने रवी समृद्ध झाला. आम्ही एखादे पुस्तक वाचायला नेले आणि आम्हालाही त्याची गोडी लागली.
घडलेल्या सगळ्या घटना प्रसंगांचे तपशिलवार वर्णन ही अण्णांची खासियतच! एखाद्या विषयावर त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या की 2-3 तास कसे संपायचे कळायचेच नाही. मनुष्य स्वभावाचे अनेक कंगोरे ते टिपायचे. वर्णन करायचे. शाळेत, समाजात चालणारे डावपेच, राजकारण ते रंगवून सांगायचे. त्यामुळे आसपासच्या माणसांकडे शोधक नजरेने पाहण्याची सवय लागली.
निरपेक्ष आणि निर्व्याज प्रेम हे अण्णांचे एक वेगळे वैशिष्ट्य! रवींद्र हा त्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ. पण अण्णांनी त्याच्यावर जो विश्वास दाखवला, जे प्रेम केले त्याला तोड नाही. रवीचे प्रत्येक यश हा स्वतःचा, कुटुंबाचा अभिमान असे मानून त्यांनी प्रोत्साहन दिले. एम.बी.बी.एस.आणि एम.डी.(मेडिसीन) याची किंमत काय आहे, हे आज आम्हाला कळतंय. परंतु अण्णांनी खूप अगोदर या गोष्टी जाणल्या होत्या. थोरले असण्याची थोर जबाबदारी त्यांनी आनंदाने पेलली. आज मी माझ्या छोट्या भावाला जो आधार जे प्रोत्साहन देतोय, त्याचे बीज अण्णांनी आपल्या वर्तनाने माझ्यामध्ये पेरले होते.
अतोनात कष्ट हाही अण्णांचा एक गुण. कुटुंब मोठे. तेव्हा घरखर्चाला आधार म्हणून त्यांनी जळाऊ लाकडाची वखार काढली. ट्रकने लाकूड यायचे. बहुतेक सगळे बाभूळ, लिंब, जांभळीचे असायचे. अण्णा रोज सकाळ-संध्याकाळ मोठी कुऱ्हाड घेऊन लाकडं फोडायचे. घामाने निथळायचे. पण कधी चिडचिड व्यक्त केली नाही. तसाच प्रकार शेतीच्या बाबतीत. त्यांच्या वडिलांनी म्हणजे दादांनी दुसऱ्याचे शेत करायाला घेतले होते. घरात दोन-तीन दुभती जनावरे सांभाळली होती. पण दादांना वयोमानानुसार ते झेपायचे नाही. अशा वेळी अण्णा शेतात जायचे. भांगलण-खुरपण करून तण पालापाचोळा बाजूला करायचे. दोन माणसांना पेलणार नाही एवढा वैरणीचा बिंडा घरी घेऊन यायचे. त्यावेळी ते शिक्षक आहेत, असे वाटायचेच नाही. मी त्यांना एकदा विचारलं. तर ते म्हणाले, "अंगातली रग अशी कामाची जिरलेली चांगली असत्या शामा! म्हणजे मग वाईट वंगळा घडत नाही."
आता अण्णा प्रदीर्घ सेवेतून मोकळे होत आहेत. कुटुंबाच्या अनेक चढ-उताराला त्यांनी धीराने तोंड दिले आणि नेकीने आपले कर्तव्य बजावले. कामात कसूर ही गोष्ट त्यांच्या रक्तात नव्हती. कुटुंबाच्या या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचे सामाजिक कार्य मागे पडले. वाचन आणि चर्चा या महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांना फारसा वेळ मिळाला नाही. आता नव्या उमेदीने ते या कार्यात स्वतःला वाहून घेतील, असे वाटते.
वारणानगरला स्वतःचे क्लासेस चालवणारी माझी धाकटी बहीण गीतांजली त्यांच्या क्लासची विद्यार्थिनी होती. ती एकदा म्हणाली, "शिंगे सर मनापासून शिकवायचे. तो आदर्श माझ्यापुढे आहे. त्यांची हातोटी फार वेगळी होती." शाळेच्या चार भिंतीत बंद असणारी ही हातोटी आता समाजासाठी खुली होईल, अशी आशा आहे. त्यांच्या या नव्या पर्वाला मनःपूर्वक शुभेच्छा!
- श्यामसुंदर मिरजकर
वाचत असताना भूतकाळात डोकावून पहात आहोत असे वाटते
उत्तर द्याहटवाखरे आहे. असे शिक्षक गावागावातून असायचे.. त्यांना विसरता येत नाही. त्यांचा वसा चालवणे म्हणजेच त्यांचा गौरव करणे...��
उत्तर द्याहटवाडॉक्टरच्या जडणघडणीची कल्पना आली... खूप छान वाटले. खरेतर अनोळखी व्यक्तीचे नेमके चित्र मोजक्या शब्दात तुम्ही उभा केले आहे. सुंदर लेख...
उत्तर द्याहटवा