ग्रामीण मुलांचे भावविश्व चित्रित करणारी कविता : थुईथुई आभाळ
ग्रामीण मुलांचे भावविश्व चित्रित करणारी कविता : थुईथुई आभाळ
लहान मुलांचे भावविश्व हे अद्भुतरम्यतेने भरलेलं असतं. एका अनोख्या कल्पनेच्या विश्वात ते वावरतात. आपल्या सभोवताली दिसणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विसंगती त्यांना जाणवतात आणि ते निखळ हसत राहतात. त्यांच्या मनोभूमीत निर्माण होणाऱ्या कल्पना इतक्या विलक्षण वेगळ्या असतात की त्या ऐकून आपणही थक्क होतो. त्यांचं कार्टून प्रेम हा त्याचा पुरावा आहे. बालसाहित्य लिहिणाऱ्या लेखक-कवींना याचे नेमके भान असावे लागते.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या कवी गोविंद पाटील यांना हे बालमानस अचूक सापडले आहे. गेली अनेक वर्षे उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी या परिसरात अनेक कार्यक्रम राबविले आहेत. रमिजा जमादार सारख्या अनेक बाल साहित्यिकांना घडविले आहे. 'गावकीर्तन', 'उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता', 'धूळधाण' हे त्यांचे काव्यसंग्रह अगोदरच प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. 'थुई थुई आभाळ' हा गोविंद पाटील यांचा पहिलाच बालकवितासंग्रह. सांगलीच्या सृजन प्रकाशाने तो प्रकाशित केला आहे. हा संग्रह जितका गोविंद पाटील यांचा आहे, तितकाच चित्रकार पुंडलिक वझे यांचा देखील आहे. कारण प्रत्येक कवितेला अत्यंत आकर्षक चित्रांची साथ सोबत मिळाली आहे. त्यामुळे ही कविता मुलांकडून वाचली जाणार आहे. त्याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून अनुभवली जाणार आहे. या संग्रहात एकूण ५६ कविता आहेत. बोबडे बोल बोलणाऱ्या बालकांपासून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्व वयाच्या मुलांचे भावविश्व या कवितेत आलेले आहे. विशेषतः ग्रामीण बालमानस या कवितेत अचूकपणे पकडले आहे, हे या कवितेचे वेगळेपण होय.
बालक्या सोनूची
दंमत मोटी...
चित्लं काढतान्
फोल्ली पाटी...
अशा बोबड्या बोलांनी ही कविता सुरू होते. खेळता खेळता मुलं चांदोमामाशी संवाद साधतात किंवा कधी एकमेकांशी भांडतात. त्यालाही येथे शब्दरूप मिळालेले दिसते. मुंग्यांनी मेलेले झुरळ उचलून नेणे, या छोट्या घटनेची कविता होते. या सगळ्या संग्रहात टोलापूर हे काल्पनिक गाव येते आणि या गावात बदक चिखलात पाय फसू नयेत म्हणून बाटा चप्पल विकत घेते. तर कधी बाळाला घास भरवताना आई नवी बोलगाणी म्हणते.
आजूबाजूच्या परिसरातील दृश्य टिपणे हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
नारळीच्या झाडावर
खारू करते खालीवर...
हळूच मग डल्ला मारते
पिकलेल्या पपईवर...
अशा पद्धतीने खारुताईचे नेमके वर्णन आलेले आढळते. अतिशयोक्तीचे एक अत्यंत सुंदर उदाहरण 'चमत्कार' या कवितेत आलेले आहे.
एक सरडा दूध घेऊन
टोलापूरला आला
टँकरला धडकला
नि टँकर उलटा झाला
असा भला मोठा टँकर उलटवणारा हा सरडा सांडलेल्या दुधाची वाटही अडवितो आणि तिकडून मुंगूस येताच अख्खा टँकर पिऊन टाकतो. अशी ही कल्पनारम्यता आहे. यामधील लहान मुलाला, 'सदानकदा पाण्यात राहणाऱ्या मासोळीला सर्दी कशी होत नाही?' असा प्रश्न पडतो. तसेच 'मित्र माझे' कवितेत मोर मोबाईलवर बोलत बसलेला दिसतो. ढगांचे विविध आकार हेही बालमनाला आनंद देतात. कधी त्यामध्ये मोर दिसतो. कधी साप दिसतो. कधी हत्ती, घोडा, भारताचा नकाशा असे सगळे आकार आकाशात दिसू लागतात.
देश असतो सर्वांसाठी
सुखाने राहण्याची सुरक्षित जागा
असा संदेशही ही कविता देते. 'जीऊ आजोबा' कवितेत आजी-आजोबा शेतात विविध भाज्या पिकवतात आणि नातू त्यांना मदत करतो. श्रेयस या छोट्या मुलाला आई नाही, हे कळाल्यावर शाळेतील बाईच आई होतात.
खेकड्याच्या बिळात शेपटी घालून खेकडा बाहेर काढणारा कोल्हा आपल्या मुलांना त्याचे ट्रेनिंग देतो. असा हा कोल्होबा गुरुजी टोलापूरच्या शाळेत शिक्षक होतो. तर दुसऱ्या बाजूला टोलापूरच्या चौकात बगळा पोलीस झालेला दिसतो. या कवितेच्या माध्यमातून कवीने
अंगणात लावा चेरीबर्ड
पक्षी येथील हजार भर
असा संदेश दिलेला दिसतो. या चेरीच्या झाडावर चिऊ, काऊ, कोकीळ, राखी धनेश असे पक्षी आलेले दिसतात. घरात दादा, ताई, बाबा, आई काय काय करतात याचे निरीक्षण 'असं कसं' या कवितेत आलेले आहे.
आईच्या कामाला सुट्टी कधीच नाही
स्वयंपाक घर सांभाळणं सोपी गोष्ट नाही
असे हे लहानग्या मुलाचे निरीक्षण आहे. 'बाप लेक' कवितेत शेतीच्या कामाला हातभार लावणारा लहान बाळ येतो. 'कॅप्टन लिओ आजोबा' हे तर एक कथाकाव्यच आहे. संकट काळात प्रवाशांना वाचवणारा लिओ स्वतः मात्र जहाज सोडत नाही. याचे प्रभावी चित्र आले आहे. 'कल्पनेच्या दुनियेत' या कवितेत मुलांना गंमतशीर वाटणाऱ्या अभिनव कल्पना आल्या आहेत.
वांग्याच्या झाडाला
लागली ढब्बू मिरची
चहा पिताना सकाळी
कपात पडली खुर्ची
अशी ही कविता आहे. शहरी मुलांना माहीत नसलेला वासराचा जन्म 'नवीन वासरू' या कवितेत आलेला आहे. गोठ्यातील गाईला कळा सुरू होणे, तिची उठबस आणि वासरू जन्मणे या सगळ्याचे अचूक वर्णन आले आहे. 'आमच्या शेतात' कवितेत शेतकरी अनेक पिकं घेतो. परंतु पाखरं त्यावर डल्ला मारतात. तरीही शेतकरी पिकवणे सोडत नाही.
तरी बी बाबा पिकवत जाई
बाजारात कोणी विचारत नाही
हे दैन्य बालकवितेत येणे हे महत्त्वपूर्ण मानले पाहिजे.
एकंदर, ही बालकविता ग्रामीण भागातील बालमानस चित्रित करते. बदलत्या काळाशी स्वतःला जोडून घेते. बदलत्या काळानुसार खेडोपाडी आधुनिक साधने, इंग्रजी शब्द पोहोचलेले आहेत. त्यांचाही वापर कवितेत होतो. त्यासोबतच अस्सल कृषिसंस्कृतीतील शब्द, शेतकरी कुटुंबाचे जगणे-वागणे या कवितेत आलेले दिसते. म्हणून या कवितेचे स्वागत केले पाहिजे.
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
मायणी ९४२१२१२३५२
छान.
उत्तर द्याहटवाKhup chan aahe sir
उत्तर द्याहटवाभारीच परीक्षण
उत्तर द्याहटवासर्वांग दर परीक्षण
उत्तर द्याहटवाव्वा
उत्तर द्याहटवाआपल्या संग्रहाचे रसग्रहण वाचले आता संग्रह वाचण्याची इंच्छा आहे . आपणास हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवाहे पुस्तक परीक्षण फार कसदार झालेले आहे. 'थुई थुई आभाळ' या गोविंद पाटील यांच्या पुस्तकाबद्दल गोडवा वाढवणारे आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान परीक्षण. 'थुई थुई आभाळ' सारख्या आणखी सुंदर काव्यकृतींची निर्मिती घडो, अशी गोविंद पाटील सरांना शुभेच्छा!!
उत्तर द्याहटवासुंदर आणि यथार्थ पुस्तक परिचय
उत्तर द्याहटवा