पावळण : स्त्रीत्वाचे दाहक अनुभवविश्व घेऊन येणारी कविता



पावळण : स्त्रीत्वाचे दाहक जीवनानुभव
        मराठी कवितेत आपल्या सातत्यपूर्ण लेखनाने कवयित्री रामकली पावसकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हंबर (१९८५), ओले अथांग श्वास (२००८), सांजसावल्या (२०१५) या तीन काव्यसंग्रहा नंतर पावळण (२०१९) हा डिंपल प्रकाशनाकडून आलेला संग्रह आहे. यामध्ये एकूण ५२ कविता आहेत. आत्मस्वर लाभलेली कवयित्री कधी स्वतःचा, तर कधी स्वतःभोवती विविध नातेसंबंधात असणाऱ्या माणसांचा शोध घेते. या कविता म्हणजे व्यक्ती-समष्टीचा संवाद आहे. संग्रहाच्या पूर्वार्धात स्वतःचे अनुभवविश्व कवयित्री मांडत जाते.
            तू डोळे मिटून असतोस
            तेव्हा पापण्याआड तुला
            मीच दिसते की
            घनघोर अंधार...!

            तुझा नि:स्तब्ध चेहरा
            मी निरखीत राहते
            तेव्हा चेहऱ्याअाडचा तू
            मला एक कोडे वाटतोस...!
अशा शब्दात कवयित्री आपल्या सहचराची नोंद करते. ती जशी त्याच्याशी अगदी आतून जोडली आहे, तशीच त्याच्याशिवायही जगणे शिकते आहे. कधीकाळी त्याचे उत्स्फूर्त भेटणे कदाचित आता हरवले आहे. म्हणून
        आताशा गजरा माळणं
        सोडून दिलं आहे तिनं
        दर संध्याकाळला...

        भरून येणाऱ्या आठवांनीच
        ती नुसती नुसती
        पालवते.. फुलारते...
        आणि नसानसांतल्या
        व्रणांनी सुगंधित होते...!
असे कवयित्री म्हणते. फुले माळण्याऐवजी काही सुखद स्मृतींनी तिचा देहच फुलतो, हे तिला महत्त्वाचे वाटते. कधी कधी स्वतःलाच समजावताना ती म्हणते,
       मनातली वादळं
      सांगू नको कुणाही...
      भुईची ही वावटळ...
      आज आहे उद्या नाही...

      काही कविता रूपकात्मक आशय घेऊन पुढे येतात. निसर्ग प्रतिमांच्या माध्यमातून बोलत राहतात.
       पाखरांना भरोसा राहिला नाही...
       कोणत्याच झाडांवर घरटी बांधायला...
       ती आभाळातच गिरक्या घेतात...
      आणि नाहीच जमलं तर...
      सरळ कड्यावरून कोसळतात...
अशा शब्दांत माणसाच्या गैरविश्वासी जगण्याचे चित्र येते.
      कवयित्रीच्या मनात तिच्या आई-वडिलांचे घर कायमस्वरूपी गोंदले आहे. या घराशी असणारे नाते आपुलकीने, जिव्हाळ्याने भरलेले आहे. ते व्यक्त करणारी एक कविता फार अर्थपूर्ण आहे.
         आई म्हणायची...
         मी गेले तरी
         माहेरी येत रहा..
         बापातच मला पहात रहा
         लेकीसाठी सदा
         दार उघडं राहिलं
         माहेराचे...
आईच्या सांगण्यानुसार ती माहेरी जात राहते. बापाच्या काळजात माय पाहते. ठणठणीत कायेचा बाप आतून झुरत राहतो. एक दिवस अंधारात मिटून जातो. तेव्हा तिला प्रश्न पडतो, आई नाही बाप नाही, आता माहेरी कुणासाठी जाऊ? आईबापाच्या माघारी माहेरचा दरवाजा उघडा असला काय, नसला काय दोन्ही सारखेच. कारण आपुलकीची ती उब पुन्हा मिळेल, याची शाश्वती नसते.
       काव्यसंग्रहाच्या उत्तरार्धात आजूबाजूला असणाऱ्या स्त्रियांचे दाहक अनुभवविश्व ग्रामीण बोलीत कवितेतून प्रकटते. माळावर उतरणारी पालं आणि त्यांचे उघड्यावरचे जीवन, हे कवितेचा विषय होते. तर कधी सासुरवाशीन गर्भवती स्त्रीला दिवस भरले तरी रानावनात कष्टावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरात जळणकाटूक आणायला गेलेली ही स्त्री रानातली काळी माती खाते. भर पावसात घरी परतते तेव्हा सासू तिला घरातही घेत नाही. तो अनुभव व्यक्त करताना ती म्हणते,
         पावसाला ह्यो जोर चढल्याला
         पोटात कालवा वाढल्याला...
         आन् काय सांगू बाई तुमास्नी
         काय सांगू
         म्हणाल आक्रीत सांगतीया काय
        पण खरंच लक्ष्मीशपथ सांगते
        सुटली म्हणा
        पावळणीखाली जलम दिला
       पोराला म्या तसल्या मधराती
नारायण सुर्वेंची आठवण करून देणारी ही त्याच तोडीची कविता आहे. रानात काम करून परतणाऱ्या स्त्रीला थोडा उशीर झाला तरी नवऱ्याला संशय वाटतो. तो तिला जोखत राहतो. तिला खोदून विचारतो. त्याचे वर्णन करताना कवयित्री लिहिते,
        तो चुलीच्या उजेडात
        एकदा जाळाकडं
        एकदा तिच्या फिस्कटल्या
        कुंकवाकडं बघत राहतो...
        बघत राहतो...
कधी या कवितेतील एखादी विधवा स्वतःचे आणि मुलाचे पोट भरण्यासाठी नको ते काम करते. देह विकते. त्याचेही चित्रण येथे आलेले दिसते.
       एकंदर ही कविता स्त्रियांच्या विविधांगी अनुभवांना शब्दरूप देते. या कवितेत लोकपरंपरेची लय भिनलेली आहे. त्यामुळेच अनेक कवितांमधून काही ओळी पुनरुक्त होत जातात. कधी त्यामुळे कविता आशयघन होते, तर कधी कधी कवितेची लय बिघडते. ही कविता सच्च्या अनुभवविश्वामुळे लक्षणीय ठरेल, अशी आहे.
                             पावळण (काव्यसंग्रह)
                             रामकली पावसकर
                             डिंपल प्रकाशन
                             १ मे, २०१९
----------------+------++++++--------+++---
                   श्यामसुंदर मिरजकर
                कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी   
                चलभाष : ९४२१२१२३५२



टिप्पण्या

  1. फ़ार अप्रतिम परीक्षण।।

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान कवितेचा लेखा जोखा मांडला आहे.त्यांचा हा काव्यसंग्रह बहुतेक मी वाचला आहे.कारण माहेराविषयी त्यांनी लिहिलेलु कविता मला आवडली होती खूप.बाकी कविता विसरून गेले होते.खूप खूप आभार . पुन्हा त्या विश्वात घेऊन गेलात तुम्ही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)