संत निरंतर जागविती

* संत निरंतर जागविती * वारकरी चळवळीचे अध्वर्यू म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव महाराज (इ.स.१२७० ते १३५०) होय. पारंपरिक उपासना, पूजाअर्चा यांच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी ईश्वराचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी अनेक वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण, पुराणिक, हरिदास यांच्याशी चर्चा केली. परंतु या ब्रह्मवृंदांपैकी कोणीही नामदेवांचे समाधान केले नाही. मग ते आपल्या मनाचा उपदेश स्वीकारून पांडुरंगाला शरण गेले आणि त्यांनी नव्या भक्तिमार्गाचे प्रवर्तन केले. वेदशास्त्रपुराणादी संस्कृत ग्रंथ हे ठरावीकांची मक्तेदारी बनून गेले होते. सर्व समाजाला उपासनेचे स्वातंत्र्य देण्याइतकी उदारता वेद वाङ्मयात नव्हती. त्यामुळेच नामदेवांनी श्री विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून नव्या भक्तिमार्गाचे प्रवर्तन केले. देव आकाराला आल्यानंतर प्रथम त्याला लाभते ते नाम! म्हणून नामसंकीर्तन हेच भक्तीचे साधन, असे त्यांनी ठरविले. 'देव आकारला नामरूपा आला। म्हणोनि स्थापिला नामवेदीं।। नामापरता मं...