संत बहेणाबाई : वैराग्य विवेकाचा ज्ञानदीप
*संत बहेणाबाई : वैराग्य विवेकाचा ज्ञानदीप*
प्रपंचाच्या खडतर मार्गावरून वाटचाल करत वारकरी संप्रदायातील विवेकदीप शोधणाऱ्या संत कवयित्री म्हणून बहेणाबाई यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संत तुकाराम हे या संप्रदायाचे कळस असतील, तर बहेणाबाई त्यावरील फडकती ध्वजा आहे. ब्राह्मण परिवारात झालेला जन्म. अगदी बालपणी म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेला विवाह, तोही तीस वर्षांच्या एका बिजवराशी. पती म्हणजे साक्षात जमदग्नीचा अवतार. शीघ्रकोपी. घरची अत्यंत गरिबी. भिक्षुकी करून उदरनिर्वाह चाललेला. असे असले तरी वर्णजाती अभिमान आणि पुरुषी वर्चस्वभावना ओतप्रोत भरलेली. रोजचा दिवस म्हणजे अग्निदिव्य, असे प्राक्तन असताना बहेणाच्या मनी अध्यात्माची तीव्र ओढ जागते. कथा प्रवचनात तिचे मन रमते. ती देवलसी आहे, असे सगळे म्हणतात. भजन कीर्तनात दंगणारी, सात्त्विक आचरण करणारी, मनाने हळवी, प्रांजळ आणि भावनाशील असणारी बहेणाबाई भक्तीचे खरे वर्म शोधू लागते. तिला ते सापडते कोल्हापुरात जयराम स्वामी यांच्या कीर्तनात. जयराम स्वामींनी आपल्या कीर्तनात तुकोबांची महती गायलेली असते. त्यांची वचने उद्धृत केलेली असतात. त्याच वेळी बहेणाबाईला आपला मार्गदाता, मुक्तिदाता सद्गुरु संत तुकारामांच्या रूपात दिसू लागतो.
वैदिक परंपरेत स्त्री ही शूद्राप्रमाणे असल्यामुळे तिला धर्मकार्यात नगण्य स्थान होते. तिला प्रश्न विचारण्याचा, ब्रह्मज्ञान जाणण्याचा अधिकारच नव्हता. सेवा हाच तिचा धर्म, तेच मुक्तीचे साधन, असे सांगितले गेले होते. या पार्श्वभूमीवर संत तुकोबा आणि त्यांचा वारकरी धर्म 'या रे या रे लहान थोर, याती भलते नारीनर।' असे म्हणत सर्व जातींमधील स्त्री-पुरुषांना खुले आमंत्रण देत होते. भक्तीचा रस सर्वांसाठी मुक्तहस्ते वाटत होते. बहेणाबाईच्या मनी मानसी हा विचार दृढ झाला. तुकोबा हेच आपले खरे मार्गदर्शक, हे निश्चित झाले.
तत्पूर्वी बहेणाबाईचा जन्म देवगाव (ता.कन्नड, जि. औरंगाबाद) येथील जानकी व आऊदेव कुलकर्णी यांच्या पोटी शके १५५० मध्ये झालेला. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी लग्न होऊन ती शिऊरच्या गंगाधर पाठक यांची पत्नी झाली. वयाच्या सातव्या वर्षापासून या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी तीर्थाटन करावे लागले. या दरम्यान पंढरपूरला गेले असताना सर्वात प्रथम विठ्ठलाने तिला मोहविले. 'जीव जावो परी, पंढरीचे स्थळ, न सोडावे जळ, ऐसे वाटे।' अशी तिची स्थिती झाली. मात्र या ठिकाणी फक्त पाचच दिवस ते कुटुंब राहिले. तेथून शनिशिंगणापूर येथे ते सहपरिवार आले. मात्र ते ब्राह्मणांचे गाव नव्हते. तेथे कोरान्न भिक्षा मागावी लागे. त्यामुळे ब्राह्मणांचे गावी जाऊन राहण्याचा निश्चय पतीने केला. रहिमतपूर या गावी हे कुटुंब सुमारे दोन वर्षे राहिले. नंतर कोल्हापुरात वास केला.
हिरंभट (हेरंबभट) या वेदांती यजुर्वेदी ब्राह्मणाच्या आश्रयाला ते राहिले. तिथेच जयराम स्वामींच्या कथा कीर्तनाचा लाभ झाला. या कोल्हापुरात हिरंभट्टाला दान म्हणून मिळालेले गाय वासरू बहेणाबाईला मिळाले. त्या वासराला तिचा इतका लळा लागला की ते सतत बहेणाबाईच्या मागे मागे फिरू लागले. त्याची कोल्हापुरात खूप चर्चा झाली. टिंगल टवाळीही झाली. त्यामुळे तिच्या पतीला अपमान वाटू लागला. त्याने रागाच्या भरात बहेणाला बेदम मारहाण केली. पाय बांधून घरात टाकले. ही वार्ता जयराम स्वामींच्या कानावर गेल्यावर ते स्वतः घरी आले. तिच्या नवऱ्याची कान उघडणी करताना म्हणाले,
योगभ्रष्ट इची साधने बळकट। तू रे ईस कष्ट करू नको।।
स्वधर्मेची तुझी करील हे सेवा। उद्धरील जीवा आपुलिया।।
तुझे काही पदरी पूर्वील सुकृत। तेणे हा सांगात प्राप्त झाला।।
या शब्दांचा गंगाधर पाठकावर काही काळच परिणाम झाला. मात्र जेव्हा बहेणाबाईने तुकोबांचा छंद घेतला, तेव्हा त्याचे मन पुन्हा उद्विग्न झाले. एका बाजूला बहेणाबाईच्या मनाची अवस्था अशी झाली की,
जयाचिया पदे होतसे विश्रांती। त्याची देहाकृति विठ्ठलची।।
विठ्ठलासी तया नाही भेदभाव। ऐसे माझे मन साक्ष आहे।।
पांडुरंग तुका पांडुरंग तुका। वेगळीक देखा केवी होय।।
कलियुगी बौद्ध रूप धरी हरी। तुकोबा शरीरी प्रवेशला।।
असे बहेणाबाईला वाटत होते. तर पतीची भावना वेगळीच होती.
भ्रतार म्हणतसे आम्ही की ब्राह्मण। वेदाचे पठण सदा करू।।
कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी। बिघडली पत्नी काय करू।।
कैचा जयराम कैचा पांडुरंग। माझा झाला भंग आश्रमाचा।।
आम्ही काय जाणो नाम हरिकथा। भक्ति हे तत्त्वता नसे स्वप्नी।।
कैचे संतसाधू कैची भावभक्ती। भिक्षुकाचे पंगति वसो सदा।।
बहेणि म्हणे ऐसे चित्तात भ्रतारे। चिंतोनी निर्धारे विचारिले।।
गंगाधर पाठकाच्या मनात उलट सुलट विचार येऊ लागले. आपण पत्नीचा त्याग करावा, असे त्याने ठरविले. कारण अनेक लोक तिला नमस्कार करतात. तिच्या शब्दाला महत्त्व देतात. तिच्यासमोर मी क्षुल्लक व नीच ठरू लागलो आहे. तिला गोसावी म्हणतात आणि मी मूर्ख ब्राह्मण ठरलो आहे, असे वाटून त्याने तिचा त्याग करायचे ठरविले. परंतु बहेणाबाईने या प्रसंगाला निर्धाराने तोंड दिले. जरी लोक देवलसी म्हणत असले, तरी आपल्या अंगात देव येत नाही. आपण त्याचे औडंबर माजवत नाही, हे तिला ठाऊक होते. म्हणून पत्निधर्म नीट सांभाळून अध्यात्म मार्गावर वाटचाल करायची, असे तिने ठरवले.
स्वधर्म आपुला रक्षूनिया मने। शास्त्राच्या श्रवणे देव साधू।।
भ्रताराची सेवा तोचि आम्हा देव। भ्रतार स्वयमेव परब्रह्म।।
तीर्थ भ्रताराचे सर्वतीर्थ जाण। तया तीर्थावीण निरर्थक।।
भ्रतारवचनासी उल्लंघीन जरी। पापे माझ्या शिरी पृथिवीची।।
असे तिला वाटू लागले. 'प्राणेविण देह काय पावे शोभा। रात्रीविण प्रभा चंद्राचिये।। भ्रतार तो जीव देह मी आपण। भ्रतार कल्याण सर्व माझे।।' अशी तिची भावना झाली. पतीने वैराग्य घेतला, तर आपण जीव द्यावा, असे तिने ठरविले. स्वप्नातील तुकोबांचे दर्शन आणि दगडाचा विठ्ठल यांच्यासाठी प्रत्यक्ष पती परमेश्वराचे सुख का दवडावे? त्यापेक्षा पती सेवा करून दोन्ही कुळांचा उद्धार करावा, असे तिला वाटू लागले. मात्र या दरम्यान तिच्या पतीला सतत सात दिवस ज्वराचा त्रास झाला. तो काही केल्या कमी होईना. तेव्हा पांडुरंग आणि तुकोबा यांची निंदा केल्याचा पश्चाताप त्याला झाला. मगच हा ज्वर उतरला. तिथून पुढे त्या दोघांनी देहूस जाण्याचा निर्णय घेतला. तिथेही अनंत अडचणींना तोंड देत त्यांना दिवस कंठावे लागले. मंबाजीने राहायला जागा दिली नाही. स्वतःचे शिष्यत्व पत्करायला सांगितले. तो म्हणाला,
नाही गुरुसेवा घडली जोवरी। हस्त हा शिरी सद्गुरूचा।।
तोवरी तो गुरु कासयाचा खरा। शूद्राच्या अांतरा ज्ञान कैचे।।
स्वप्नेचा अनुग्रह गुरु केला शूद्र। तोही बळीभद्र ज्ञानहीन।।
तुम्हास वाळीन ब्राह्मणाचे पंक्ती। तुम्ही गुरुभक्ती नका सांगू।।
बहेणी म्हणे ऐसे मंबाजी बोलीला। द्वेषही मांडिला तेच क्षणी।।
पुढे त्याने बहेणाबाईची गाय लपवली. गाईला मारहाण केली. हे कुटुंब ब्राह्मण नव्हे, तर सोनार आहे, असेही म्हटले. पुण्यात राहणाऱ्या अप्पाजी गोसावी यांच्याकडे तुकोबांची तक्रार केली. तरीही बहेणाबाईने तुकोबांना आपले गुरु मानले. त्यांच्या आनंदओवरीत ती राहिली. तुकोबाच्या संगतीत तिला लेखनाची प्रेरणा झाली. तुकोबांची संगत म्हणजे अनिर्वचनीय आनंदसोहळा होता. त्याचे वर्णन करताना बहेणाबाई लिहिते,
ते सुख सांगता वाचे पडे मौन। जाणता ते धन्य गुरुभक्त।।
झालासे आनंद इंद्रियांचे द्वारी। बैसले शेजारी चैतन्याचे।।
घट हा बुडावा जैसा डोहा आत। न फुटता ओतप्रोत पाणी।।
बहिणी म्हणे तैसे झाले माझे मना। तुकाराम खुणा ओळखी त्या।।
तुकारामांच्या भेटीने अहम् पण निघून गेले. संसार दुःखाचे ओझे उतरले. कृतकृत्य वाटू लागले. जन्म सफल झाल्याचा अनुभव तिला आला. त्यानंतर तिने विपुल अभंग रचना केली.
*आत्मचरित्राचे अभंग*
मराठीत आत्मचरित्र लिहिणारी पहिली संत कवयित्री म्हणून बहेणाबाईचाच उल्लेख करावा लागेल. अनेकांनी आत्मपर अभंग लिहिले आहेत. मात्र त्यामध्ये लौकिक जीवनचरित्राचा भाग फारच थोडा असतो. बहेणाबाईने स्वतःचे अल्पच परंतु तपशीलवार आत्मचरित्र दोन भागात रेखाटले आहे. पहिल्या भागात बालपणापासून तुकोबांच्या भेटीपर्यंतचा जीवनपट येतो, तर दुसऱ्या भागात निर्यानाचे अभंग येतात. जवळजवळ शंभर अभंगांमधून हा चरित्र भाग आलेला आहे. यामध्ये जन्म, विवाह, गृहत्याग करून केलेले स्थलांतर, हालाखीचा संसार, संतापी पतीचा त्रास, त्रिविध तापाने व्याकूळ होणे, कथा कीर्तनाची आवड, जयराम स्वामींचे कृपादान, गोवत्स संगतीचे सुख, पातिव्रत्याच्या दृढ संकल्प, पंढरी व देहू मधील रहिवास, मंबाजीने दिलेला त्रास, तुकोबांच्या सहवासाचा आनंद या सगळ्या गोष्टींचे वर्णन येते. तसेच मृत्यूसमयीचा पुत्र विठ्ठला बरोबरचा संवाद आलेला दिसतो.
बहेणाबाईचे वर्तन इतके सात्त्विक आहे, की कुणी एक ब्राह्मण तिच्या पतीची समजूत काढताना म्हणतो, 'स्वधर्मा विरहित वर्तेल हे जरी। तरी तिचा करी त्याग वेड्या।। हे आहे विरक्त निश्चये हरिभक्त। तुवाही निश्चित व्हावे तैसे।।' त्यामुळेच तिचा पती गंगाधर वैदिक क्रियाकर्माचा हट्टाग्रह सोडून देतो आणि तुकोबांची भक्ती अनुसरतो. देहू मधील भक्तिमार्गाचे वर्णन करताना बहेणाबाई लिहिते, 'देवळात कथा सर्वकाळ होत। श्रवण करीत दिन रात्री।। तुकोबाची कथा वेदांतील अर्थ। पावे माझे चित्त समाधान।।' जरी देहूत तुकोबा संगतीचा आनंद असला, तरी मंबाजीचा छळवाद सुरूच होता. त्यामुळे दुःखाच्या असंख्य लाटा तिला पचवाव्या लागत होत्या. याच दरम्यान तिला मुलगी काशीबाई झाली व नंतर मुलगा विठ्ठल झाला, असे दिसते. निर्यानाच्या अभंगात विठ्ठलाशी मांडलेला संवाद आढळतो. त्यावेळी बहेणाबाईने पूर्वीचे बारा जन्म स्मरून सांगितले आहेत.
*मन:पर अभंग*
बहेणाबाईने २० अभंगांमधून स्वतःच्या मनाशी संवाद साधला आहे. स्वतःच्या मनाला समजाविताना ती म्हणते, 'शास्त्र वेद नाना दर्शना वरिष्ठ। सद्गुरु हा श्रेष्ठ बहुतापरी।। बहेणी म्हणे स्वामी सद्गुरूची कृपा। दाखविला सोपा मार्ग मना।।' सद्गुरुने मार्ग दाखविल्यानंतर आपोआपच षडविकार नष्ट होतात. विवेक जागा होतो. वर्तन सुधारते. त्यामुळेच बहेणाबाई लिहिते 'विवेक वैराग्य सापडले मज। आता मना तुज कोण पुसे। धरुनी आणीन करीन ध्यानस्थ। होईल तो अस्त इंद्रियांचा।।' विवेकाचा संग लाभला की पातक आपोआपच नष्ट होते. म्हणूनच बहेणाबाई लिहिते, 'आम्ही तो निर्हेत साक्ष ऐसी येत। भोगामाजी चित्त क्षणु नाही।। आता मना येथे काय तुझे चाले। निर्हेत पाऊले विठ्ठलाची।।'
*भक्तिपर अभंग*
अबालवृद्धांना स्त्रीशूद्रातिशूद्रांना मिळालेले महत्त्वाचे साधन म्हणजे भक्ती होय. वैदिक परंपरेनुसार स्त्रिया या अध्यात्माच्या मार्गावरील धोंड होत. त्यांना अध्यात्माचा अधिकार नव्हता. त्या शूद्राप्रमाणे वंचित होत्या. त्यांना मनाचे समाधान करेल असा मार्गदाता सापडत नव्हता. बहेणाबाई लिहिते,
जेथे पुसो जावे तेथे अभिमान। आपुलेचि ज्ञान प्रतिष्ठी तो।।
जाणोनि अंतरी न सांगती कोणी। कोणाचे वचनी स्थिर राहो।।
लय हे लक्षण सांगती धारणा। नाना उपासना नाना मंत्र।।
एक ते सांगती पंचमुद्रा जप। एवं खटाटोप अासनाचा।।
एक ते सांगती तीर्थे तपे व्रत। एक ते अनंत पूजाविधी।।
बहेणी म्हणे आता नव्हे स्थिर मन। जेथे तेथे गुण अविद्येचा।।
अशावेळी तुकोबा भेटले 'न लगती वेद, शास्त्राचे पठण। परमार्थाची खूण वेगळीच।' हे तिला कळाले वारकरी भक्तिमार्ग बहेणाबाईला गवसला आणि एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला. वैदिक ब्राह्मण ज्या मोक्षप्राप्तीसाठी अनेक क्रिया करतात, तो मोक्ष भक्तीने सहज साध्य होतो, हे कळाल्यावर बहेणाबाईला मनस्वी आनंद झाला. त्यांनी भक्तिमार्गाचे सुख आपल्या अभंगातून सांगितले. वेगळेपण सांगितले. 'भक्ती हे कारण साधन वरिष्ठ। रोकडे वैकुंठ हाती वसे।। स्थिर करी चित्त प्रेम अखंडित। पावसी अच्युतपद पाहे।।' असे बहेणाबाई सांगू लागली. चित्तशुद्धी करणे, आदर्श आचरण करणे, मन निर्विकल्प करणे गरजेचे होते. अशा वेळी बहेणाबाई सांगू लागली 'नामसंकीर्तन सर्वकाळ जया। भक्तिवंत तया म्हणो आम्ही। क्षण एक नाही नामेविण वाचा। सोस हा भक्तीचा सर्वकाळ।। बहेणी म्हणे भक्ती खरी मोक्षदाती। पाहिजे संगती संत सेवा।।'
संत संगतीचे महत्त्व बहेणाबाईला प्रकर्षाने जाणवले. कारण अंगी कळवळा असणारे हे संत भवसागरात बुडणाऱ्या अनेकांना वाचवत होते. नवा मार्ग दाखवत होते. 'संत संगतीचा महिमा अद्भुत। होती ज्ञानवंत सत्त्वगुणी।। या लागी सेवावे संतांचे चरण। स्थिर होय मन एक क्षणे।।' याचा तिला प्रत्यय आला. हे संत प्रपंचात असूनही प्रपंचापलीकडे घेऊन जातात. त्यांचा संग म्हणजे चंदनाचा संग होय. संतगौरव करताना बहेणाबाई लिहिते,
दुसरियाचे दुःखे शिणे ज्याचे चित्त। तोची एक संत ओळखावा।।
तयासी पुसता हरील तो शीण। दुःख घे हिरोन रोकडेची।।
परोपकार जया आलासे विभागी। शांती हे सर्वांगी डोलतसे।।
बहेणी म्हणे नाही आपुले पारिखे। वर्ततो विवेके ज्ञानदृष्टी।।
अशा संतांच्या संगतीत गेल्यावर देहभान हरपते. 'आनंदी आनंद गोविंदी गोविंद। भोगू परमानंद बाईयांनो' असा अनुभव घेता येतो. म्हणून सर्वांनी भक्तिमार्ग धरला पाहिजे, असे संत बहिणाबाई सांगते. अर्थात हा भक्तिमार्ग पंढरपुरात पोहोचणारा आहे. ती म्हणते,
चालता पाऊल पंढरीच्या वाटे। ब्रह्मसुख भेटे रोकडेची।।
दिंडी ध्वजा भार चालती अपार। मृदंग गंभीर स्वरश्रुती।।
हमामा हुंबली घालिती परवडी। होउनी उघडी विष्णुदास।।
बहेणी म्हणे ऐसा आनंद वाटेचा। कोण तो दैवाचा देखे डोळा।।
जो भाग्यवंत असेल तोच पंढरीच्या वाटेवर हा सुख सोहळा पाहील. नाचत खेळत पंढरीत जाणाऱ्या दिंड्या तेव्हापासून चालत आलेल्या आहेत. त्याचे दर्शन बहेणाबाई घडवते. याशिवाय बहेणाबाईंनी अनुतापपर अभंग (२०), तुळसी माहात्म्य(१०), ज्ञानपर अभंग (५०), वज्रसूचीवर भाष्य करणारे अभंग (४०), संतसंगतीचे महत्त्व अधोरेखित करणारे अभंग, टोणप्याचे अभंग, मनाचे अभंग, तत्त्वचर्चा, उपदेश, निंदक, हरिभक्त, पंढरी गौरव, कृष्ण गौरव, पतिव्रता धर्म, ज्ञानपर अभंग, हिंदी पदे असे विपुल अभंग लिहिले आहेत. पाळणा, पिंगा, फुगडी, वासुदेव, झिम्पा, हमामा, हुंबरी, खेळिया, भारूड, सौरी, मुंढा, श्रोता गाणे, डफ गाणे, सोंग, नवल, श्लोक, आरत्या, ओव्या अशा अनेक प्रकारच्या रचना केलेल्या आहेत.
त्यांचे तीन अभंग वारकरी संप्रदायात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. 'संतकृपा जाली इमारत फळा आली' या अभंगात त्यांनी वारकरी संप्रदायाचा विकासक्रम सांगितला आहे. अर्थात हा अभंग तुकोबांच्या एका अभंगाचा अनुवाद आहे. तर 'विठो माझा लेकुरवाळा। संगे लेकुरांचा पाळा।। तुकोबा तो कडियेवरी। नामा करांगुळी धरी।।' या अभंगात भक्तवत्सल विठोबाचे रूप चित्रित केले आहे. याशिवाय 'संतनामावली' मध्ये सगळ्या संत परंपरेचा आलेख मांडला आहे. म्हणून तो महत्त्वपूर्ण आहे.
'आकारले ते ते ब्रह्मचि सर्वही। मनामाजी पाही विवेकाने।।' असे म्हणणाऱ्या बहिणाबाईंचे सुमारे ७२५ अभंग आज उपलब्ध आहेत. तुकोबांच्या निर्वाणानंतर दीर्घकाळ बहिणाबाईंच्या लेखणीने मौन धारण केले होते. ते म्हणूनही बोलके आहे. खरे तर इतके जिवंत आत्मवृत्त लिहिणाऱ्या बहेणाबाईने परमगुरू तुकोबांच्या अंतकाळाविषयी काहीतरी लिहिले असावे. परंतु ते आज उपलब्ध नाही. तरी 'जयासी स्वहित करणे असे मनी। तेणे द्यावी जनी पाठी जगा।।' हा तिचा सल्ला आजही महत्त्वपूर्ण आहे. जगाकडे पाठ करून स्वहिताच्या मार्गावरून चालणे वाटते तितके सोपे नाही. फार मोठे बळ अंगी धारण करून, लोकनिंदा पचवून या मार्गावरून चालावे लागते. बहेणाबाईंनी पतीचे मनपरिवर्तन करून पती व पुत्रासह हा मार्ग चोखाळला. सगळ्या संतांनी हा खडतर प्रवास केला. म्हणूनच आज तुम्हा आम्हासाठी वारकरी भक्तिमार्ग प्रशस्त झालेला आहे.
*डॉ. श्यामसुंदर मिरजकर*
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
ता. खटाव, जि. सातारा ४१५ १०२
दूरभाष : ९४२१२१२३५२
(ज्ञानबातुकाराम वार्षिक अंक १ जानेवारी, २०२३ मधून प्रकाशित झालेला लेख)
खूप छान सर. अभिनंदन
उत्तर द्याहटवाVery good sir .
उत्तर द्याहटवाअतिशय अभ्यासपूर्ण आणि वाचनिय लेख, बहिणाबाईंचा पुर्ण जीवनपट सुंदर, सुबक शब्दात मांडला आहे. तुमच्या लेखणीला सलाम, अभिनंदन आणि शुभेच्छा
उत्तर द्याहटवासविस्तर छान लेख... माहितीपूर्ण.. अभ्यापूर्ण
उत्तर द्याहटवा