कागदावर न लिहिलेल्या कविता
"काढून ठेवा तुमचा पेन. तुरुंगात त्याचा काहीही उपयोग नाही.
सुटलाच कधी तर देऊ परत किंवा तुमच्या कुटुंबीयांना देऊ, तुमच्या नंतर",
तुरुंगाधिकार्यानं सांगितलं.
तुरुंगात कवीने पेन वापरलाच नाही; कविता मात्र लिहिल्या-
बुचाच्या फुलांच्या देठांनी.
भटारखान्याजवळच्या बुचाला खूप फुलं यायची. सगळ्या कैद्यांनी कंठस्थ केल्या त्या कागदांवर न लिहिलेल्या,
पेनाने न लिहिलेल्या कविता.
कधी कधी शिपाई आणि क्वचितच पण तुरुंगाधिकारीही गुणगुणायचे त्या कविता
प्रेयसीला लिहिल्यासारख्या भासणार्या पण स्वातंत्र्यदेवतेसाठी लिहिलेल्या कविता.
एक दिवस, एक कैदी सुटला, तुरुंगाबाहेर पडला
आणि त्याच्यासोबतच बाहेर पडल्या त्या कविता.
हवेत अत्तर मिसळून जावे तशा मिसळून गेल्या कविता.
ढगांचा टिपूसही नसलेले आभाळ झाल्या कविता.
समुद्राच्या ओढीने धावत निघालेल्या नद्या झाल्या कविता.
दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा काळोख झाल्या कविता.
दऱ्या-खोऱ्यांतून निनादणारे गाणे झाल्या कविता.
इतकी वर्षे उलटून गेलीत पण अजूनही आपण गातच आहोत तुरुंगातल्या कविता
- गणेश कनाटे
(यान्नीस रित्सोस या ग्रीक कवीची आठवण आली म्हणून आणि फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांना विसरू शकत नाही म्हणून)
'सेक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे', या पहिल्याच काव्यसंग्रहाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले कवी म्हणून गणेश वामन कनाटे सुपरिचित आहेत. 'कागदावर न लिहिलेल्या कविता' ही प्रस्तुत संग्रहातील एक अत्यंत महत्त्वाची कविता आहे. साहित्यनिर्मिती ही सच्च्या साहित्यिक कलावंताची अत्यंत जबाबदारीने केलेली कृती असते. साहित्य म्हणजे घटकाभराची करमणूक नव्हे, तर साहित्य म्हणजे एक जीवनधारणा आहे. समाज आणि संस्कृतीच्या उत्थान-पतनाची गाथा आहे. काल सुसंगत जीवनमूल्यांची नवी मांडणी आहे. सर्व चराचरांच्या आणि पृथ्वीगोलाच्या हितरक्षणाची आणि आनंदमय जीवनाची मानवीय भूमिका साहित्यिक घेतो. म्हणूनच सर्व काळात राजव्यवस्था साहित्यिकाकडे संशयाने पाहते किंवा त्यांना चुचकारून स्वतःच्या गोटात घेण्याचा प्रयत्न करते.
शासनव्यवस्था जसजशी हुकूमशाहीकडे झुकते तसतसे कलावंतांचे स्वातंत्र्य आक्रसत जाते. त्याने केलेली साहित्य निर्मिती संशयाच्या सुईखाली तपासली जाते. नवनवे निर्बंध, अघोषित सेन्सॉरशिप लागू होते. मग साहित्यिकांना त्यांच्या साहित्य निर्मितीच्या प्रमादाबद्दल बंदीवासातही जावे लागते. या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहायला लावणारी ही कविता आहे.
यान्नीस रित्सोस व फ़ैज़ अहमद फ़ैज़ हे दोन कवी व्यवस्था परिवर्तनाची भूमिका घेऊन केलेल्या लेखनामुळे प्रसिद्ध आहेत. एक ग्रीक आणि दुसरा पाकिस्तानी आहे. त्याबद्दल त्यांना बंदीवासाला सामोरे जावे लागले. दोघांनाही लेनिन शांतता पुरस्कार मिळालेला होता. दोघांनीही तुरुंगात कविता लिहिल्या आणि त्या सर्वसामान्य जनतेच्या भावना व्यक्त करणाऱ्या होत्या. म्हणून ते लोकप्रियही ठरले. त्यांची आठवण प्रस्तुत कविता लिहिताना गणेश कनाटे यांना होणे हे महत्त्वपूर्ण आहे.
आज आपल्या भोवतालची परिस्थिती थोड्याफार फरकाने अशीच आहे. जणू काही अदृश्य तुरुंगात कोंडले आहे लेखक कवींना. आणि सक्त पहारा बसवलाय त्यांच्या शब्दांवर. त्यांच्या लेखणीतून उमटलेले एकही अक्षर विद्रोहाचा स्वर बनून घुसू नये रसिकांच्या काळजात म्हणून खबरदारी घेतली जात आहे, अपरंपार. अशा या बंदिवासात कवीचा पेनच काढून घेतला जातोय. जशी बंदी लादली गेली होती तुकोबांना. आता तुरुंगात या पेनची गरजच नाही अन् उपयोगही नाही, असे दरडावले जात आहे. सुटलाच यदाकदाचित या बंदिवासातून तर मिळेल पुन्हा हे पेन. किंवा देऊ नंतर तुमच्या कुटुंबीयांना तुमची आठवण म्हणून, असेही सांगितले जात आहे. स्वतंत्र भूमिका घेऊन लिहिणाऱ्या कवीवरील बंदी उठणे अशक्यच आहे. त्याने समझोता केला, शब्दांची धार बोथट केली, तरच मिळेल पेन परत असा छुपा संदेश आहे, या धमकावूनीच्या स्वरात.
तरीही हा कवी लिहितोय कविता बुचाच्या फुलांच्या देठांनी. बुचाचे उंचच उंच वाढणारे कणखर झाड आणि दोन अडीच इंच लांबीचा त्याचा देठ नाजूक असतो. साबणाच्या फेसाचे फुगे करून उडविण्यासाठी लहान मुले ही सुगंधी फुले वापरतात. या नाजूक फुलांचा वापर करून कवीने लिहिल्या आहेत कविता. ज्या वर वर पाहता प्रेमाचा स्वर व्यक्त करणाऱ्या वाटतात. म्हणूनच कदाचित त्या सगळ्या कैद्यांनी आणि क्वचित काही तुरुंगाधिकाऱ्यांनी देखील कंठस्थ केल्या आहेत. वरवर पाहता प्रेयसीला लिहिल्यासारख्या परंतु स्वातंत्र्यदेवतेला आवाहन करणाऱ्या या कविता बंदीवासातून सुटलेल्या कैद्यांच्या मार्फत पोहोचल्या आहेत तुरुंगाबाहेर जनसामान्यांपर्यंत. हवेत अत्तर मिसळून जावे, तसा या कवितांचा दरवळ पसरला आहे सर्वत्र. त्या आशादायक आभाळ झाल्या, अवखळ उत्साही जीवनदायीनी नद्या झाल्या, दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार दोहोंचाही स्वर बनल्या या कविता. दऱ्याखोऱ्यातून निनादणारे गाणे झाल्या. कडे कपारीत राहणाऱ्यांच्या स्वप्नांचा स्वर झाल्या या कविता. खूप वर्षे उलटून गेली तरीही जिवंत राहिल्या. अनेकांच्या ओठावर आत्मस्वर बनल्या या कविता.
कवी गणेश कनाटे यांनी नकळतपणे कवीची अस्सल इतिहासदत्त जबाबदारी आणि कवितेचे जनसामान्याशी असणारे अभंग नाते, यावर प्रकाशझोत टाकला आहे. कवितेतील प्रत्येक ओळ अर्थसंपृक्त आहेच, त्याबरोबरच ती कवितेच्या गाभ्याचे चिरंतन आश्वासक स्थानही व्यक्त करते. म्हणून या कवितेचे मोल महत्त्वाचे आहे.
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
९४२१२१२३५२
उत्कृष्ट असा ठेवा सर्वांसाठी खुला केला 👌🏻
उत्तर द्याहटवाखूपच छान !
उत्तर द्याहटवाखूप सुदंर 👌
उत्तर द्याहटवा