पर्यावरण जाणिवा विकसित करणारी बालकादंबरी
पर्यावरण जाणिवा विकसित करणारी बालकादंबरी
'एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' ही नामदेव माळी लिखित बालकादंबरी अफलातून आहे. मोठ्याने आरवणारा कोंबडा गब्रू आणि त्याच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून सांगणारे वृद्ध जोडपे यांच्या संघर्षाभोवती ही कादंबरी फिरते. खेड्यातून शहरात राहायला आलेली आजी तिच्याबरोबर कोंबड्याही घेऊन येते. त्यामध्ये गब्रू हा रुबाबदार व आक्रमक कोंबडाही असतो. त्याचे मोठ्याने आरवणे कॉलनीतील शेजारच्या वृद्ध दांपत्याला त्रासदायक वाटते. त्यातून नवा प्रश्न निर्माण होतो. दिवसेंदिवस शहरांमधून संवेदनशीलता हरवत चालली आहे. प्रत्येकाला दुसऱ्याचा त्रास नको आहे. परंतु आपल्या सवयींमुळे/वागण्यामुळे इतरांना त्रास होतो, याची किंचितही जाणीव त्यांना नसते. अशा पार्श्वभूमीवर निसर्ग संवेदना, भूतदया, मानवता, जगण्याचे व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करत ही कादंबरी पुढे जाते.
गौरव हा छोटा मुलगा आणि त्याचे सृजन कट्ट्यावरील मित्रमंडळ गब्रू कोंबड्याच्या बाजूने उभे राहतात. त्याला पर्यावरणवादी व्यक्ती, संघटना साथ देतात आणि अनेक पातळ्यांवर नाट्य निर्माण करत ही कादंबरी पुढे जाते. हे सगळे करताना लोककथा, लोकगीतांपासून, गुगलच्या माध्यमातून पुढे आलेल्या अद्ययावत माहितीपर्यंत अनेक गोष्टी कादंबरीत येतात. ही कादंबरी आजूबाजूच्या अनेक प्रश्नांना स्पर्श करत पुढे जाते. माणसाने निर्माण केलेले अनेक पातळ्यांवरील प्रदूषण, धार्मिक विद्वेष, विविध शासकीय विभाग आणि त्यांची कामाची पद्धती, धोक्यात येऊ लागलेली पशुपक्ष्यांची जीवसृष्टी या सगळ्यांवर कादंबरीत भाष्य येते. शेवटी मुले नातवंडे परदेशात गेल्यामुळे एकाकी झालेल्या वृद्धांचा प्रश्नही समोर येतो.
लेखकाने स्वप्नदृश्याच्या माध्यमातून फॅण्टसीचा वापर करत पक्ष्यांच्या दुनियेतही सफर घडवून आणली आहे. ही कादंबरी मनोरंजनाच्या सोबतच प्रबोधनही करते. अनेक मूल्यसंस्कार वाचकांवर करण्यात ती यशस्वी होते. विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय, जगण्याचा हक्क अशा संवैधानिक मूल्यांचा सहज परिचय या कादंबरीतून घडतो. प्राणी पक्ष्यांच्या नैसर्गिक जीवनमानाची शास्त्रीय माहिती मिळते. तसेच माणसांच्या मनातील प्राणी पक्षिविषयक अंधश्रद्धा, तसेच चुकीच्या प्रथा परंपरांमुळे घेतला जाणारा त्यांचा बळी यावरही ही कादंबरी बोट ठेवते. म्हणूनच कुमार वयातील सर्व मुलामुलींनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे. एका अतिशय वेगळ्या आशयसूत्राभोवती फिरणारी ही उत्कंठावर्धक कादंबरी आहे. बोलीभाषेतील अनेक नवे शब्द, म्हणी, लोकगीते व लोककथा यामुळे या कादंबरीने भाषिक संपन्नता साधली आहे. ज्येष्ठ लेखक नामदेव माळी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
साधना प्रकाशन
किंमत १२५₹
खूप छान
उत्तर द्याहटवाChhan 👍
उत्तर द्याहटवावा! एका नवीन मुद्द्यातून मांडलेल्या विषयाने खरच् उत्कंठा वाढवली....खूप छान.👌🏼
उत्तर द्याहटवाछान.
उत्तर द्याहटवासर्व साधारण कोणत्या वयोगट साठी योग्य आहे???
उत्तर द्याहटवा