ना जिया लागे ना...
ना जिया लागे ना...
प्रेम म्हणजे अद्भुत जीवनरस! अखंड वाहता. प्रवाही. निर्झरासारखा झुळझुळणारा. त्याचा मंद स्वर जीवनसंगीत बनून राहतो. जगण्याला नवी उमेद, नवी ऊर्जा देतो. प्रेम परिसासारखे असत नाही. एकदा परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला आणि त्याचे सोने झाले, की मग परिसाचे कामच संपले. असे प्रेमाच्या बाबतीत असत नाही. प्रेम निरंतर हवे हवेसे असते. ते नित्यनूतन असते. समंजस आणि प्रगाढ प्रेमाची गोडी दिवसेंदिवस अधिक मधुर होत जाते.
या प्रेमाच्या अनेक तऱ्हा असतात. अनेक छटा असतात. ते कधी भांडणातून, कधी रुसण्यातून, कधी विरहातूनही व्यक्त होते. सहचराचा अल्पकालीन विरह देखील कधी कधी असह्य होतो. मन कुठेच लागत नाही. देह कामात गुंतलेला आणि मन बावरे झालेले, अशी अवस्था होते. अनामिक हुरहुर जीवाला लागून राहते. अस्वस्थता आणि अधीरता यांनी मन व्याकूळ होते. नजर पुन्हा पुन्हा येणाऱ्या वाटेकडे लागून राहते.
कवी गुलजार यांनी ही भावस्थिती एका गाण्यात नेमकी पकडली आहे. 'आनंद' (१९७१) चित्रपटातील हे गाणे सुमिता संन्याल या अभिनेत्री वर चित्रित झाले आहे. सलील चौधरींचे संगीत आणि लता मंगेशकर यांचा तरल स्वर यामुळे त्या भावनेची आर्तता काळजापर्यंत पोहोचते.
ना जिया लागे ना
तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना
जीना भूले थे कहाँ याद नहीं
तुझको पाया है जहाँ
साँस फिर आई वहीं
ज़िन्दगी तेरे सिवा हाय भाये ना
का बरे, त्याच्या नसण्यामुळे मन कुठेच लागत नाही? काय हरवते नेमके? कशाची कमतरता जाणवते? याचे कारण असे की तो जीवनात येण्यापूर्वी जगणे भावहीन होते. जणू यंत्रवत, भावनाशून्य. इतर अनेक व्याप आणि कामांच्या जबाबदारींमध्ये प्रेमभाव कुठेतरी खोल तळाशी गेला होता. त्यामुळेच असेल कदाचित, पण आनंदाने जगायचे विसरूनच गेले होते. मात्र त्याच्या अवचित येण्याने मनात कुठेतरी खोलवर असणारा सुप्त प्रेमभाव जागा झाला. तरारून वर आला. जसे अनुकूल वातावरण मिळताच बीजाचे लवलवत्या हिरव्या कोंबात आणि पुन्हा हिरव्याकंच रोपात रूपांतर व्हावे, तसे झाले. एक रसरशीत कोवळा मनभावन फुलोरा फुलून यावा, तसे काहीसे प्रेमभावनेच्या स्पर्शाने झाले. कधीतरी जीवनात तो आला, नव्हे त्याच्या रूपाने प्रेमच आले आणि खऱ्या अर्थाने जगणे सुरू झाले. त्यामुळेच आता त्याचा अल्पकाळचा विरह देखील सहन होत नाही. जीवन त्याच्याशिवाय सुखकर वाटत नाही, भावत नाही.
ना जिया लागे ना
पिया तेरी बावरी से रहा जाए ना
तुम अगर जाओ कभी जाओ कहीं
वक़्त से कहना ज़रा
वो ठहर जाए वहीं
वो घडी वहीं रहे ना जाए ना
पुन्हा पुन्हा एकच गोष्ट म्हणावीशी वाटते, तुझ्याशिवाय मन कुठेच लागत नाही. हे प्रियवर तू जवळ नसल्यामुळे चंचल मन झालेल्या या बावरीला राहवत नाही. म्हणून तुला कधी कुठे जायचे असेल तर काळाला जरा सांगून ठेव की त्याने तिथेच थांबावे. पुढे जाऊ नये. म्हणजे माझ्या मनाची कातर अवस्था होणार नाही. तू दीर्घकाळ दूर गेलास आणि काळ थांबलेला असेल, तर मला असे वाटणारच नाही, की फार काळ आपला दुरावा झालेला आहे. म्हणून या विरहकालात काळानेच स्तब्ध झाले पाहिजे. त्याने आपली गती रोखून धरली पाहिजे.
ना जिया लागे ना
तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना
'ना' हा एक अक्षरी शब्द! नकार व्यक्त करणारा. परंतु लताजींनी हा शब्द इतक्या नजाकतीने गायला आहे, की थक्क व्हावे. त्याच्या जवळ नसल्याने व्यापून राहिलेली घनव्याकूळता या एका शब्दातून व्यक्त होते. प्रेम समरसून जगणाऱ्या जीवांना विरह काळ अस्वस्थ करतो. पुन्हा उत्कट ओढ लावतो. ती त्या वेळची तगमग अस्वस्थ करणारी असते, हेच खरे!
लताजींचा मुलायम आवाज या गीताला अधिक काव्यात्म बनवितो. 'ना मोनो लागे ना' हे या गाण्याचे बंगाली व्हर्जन लताजींनीच गायले आहे. पण music composition मध्ये थोडा बदल आहे. हिंदी आवृत्तीतील सतार अधिक प्रवाही वाटते. या गाण्याचा राग मालगुंजी आहे. मध्यरात्री नंतरचा हा राग पुनर्मिलनाच्या प्रारंभिक जाणिवेला स्वरबद्ध करतो. त्यामुळेच तो वापरला असावा.
हृषिकेश मुखर्जींनी 'आनंद'च्या रूपाने एक माईल स्टोन सिनेमा दिला. गुलजारजींनीच या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. वरील गाणे ऐकताना गुलजारजींनी 'घर' चित्रपटासाठी लिहिलेले 'तेरे बिना जिया जाये ना' हे युगलगीत आठवत राहते. तेही कधीतरी ऐकायला हवे.
गाणे ऐकण्यासाठी खालील लिंक कॉपी करा
https://youtu.be/hdX_sQr19Yo?si=Vww3NrNgg3Zu5uSy
उत्कृष्ठ भावानुवाद
उत्तर द्याहटवाभावार्थ खूप छान पद्धतीने सांगितला आहे.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिले आहे श्याम! कसं तुला हे सर्व सुचतं! कमाल आहे श्याम! 👌👌👍👍
उत्तर द्याहटवाखूप सुंदर सर👌🙏
उत्तर द्याहटवा👌प्रतिक्षा प्रेम की मजबूत कडी हैं..प्रतिक्षा मतलब बैचनी.. बैचनी मतलब आस..आस मतलब प्रतिक्षा!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद सविता जी!
हटवा👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान .
उत्तर द्याहटवा👌👌 छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवाChan lihla aahes Shyam
उत्तर द्याहटवाKhupach sunder aahe....💐💐💐👌👌🙏😊
उत्तर द्याहटवा