इस मोड़ से जाते हैं...
इस मोड़ से जाते हैं...
'आंधी' (१९७५) हा गुलज़ारजीनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला चित्रपट जीवनाच्या अकल्पित प्रवासाबद्दल खूप काही सांगून जातो. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या मुख्य भूमिका असलेेला हा चित्रपट. या चित्रपटातील गाणी त्या काळात गाजली होती. त्यामधील मनात घर केलेले एक गाणे म्हणजे 'इस मोड़ से जाते हैं...'
मानवी जीवन अनेक चढउतारांनी भरलेले आणि अनेक वाटा-वळणे असलेले असते. कधी कधी जीवनात असे वळण येते की, त्यामुळे पुढचा रस्ताच बदलून जातो. आणि जो रस्ता आपण निवडतो तो आपल्याला संकल्पित मुक्कामापर्यंत घेऊन जातोच असे नाही. तरीही चालणे थांबवता येत नाही. ज्या रस्त्यावरून आपण चालतो तो रस्ता नाकारता येत नाही.
जीवनातील वळणबिंदूपासून पुढे जाताना धीम्या गतीने स्वतःच्या तंद्रीत पुढे जाणारा एक रस्ता लागतो. त्याच वेळी वेगात धावणाऱ्या दुसऱ्या वाटाही लागतात. कोणत्या रस्त्यावरून जायचे ते आपल्यालाच ठरवायचे असते. धीम्या गतीने जाताना जीवनाचा आनंद घेता येतो. हवे तिथे थांबता येते. रस्त्याचा आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. कदाचित मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल, पण जीवनप्रवासाचाही एक आनंद असतो. तो घेता येईल. याउलट वेगाने जाताना आजूबाजूला काय आहे, याकडे लक्षही जात नाही. ठरलेल्या मुक्कामापर्यंत लवकरात लवकर पोहोचणे हेच उद्दिष्ट राहते. अशा वेगवान वाटांवर आपल्यासाठी कोणी थांबत नाही, कुणासाठी आपण थांबत नाही. मात्र ज्यावेळी आपण मुक्कामापर्यंत पोहोचतो तेव्हा एकटेच असतो. जीवनप्रवासाचा आनंद सोबतीला नसतो.
इस मोड़ से जाते हैं
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज़ कदम राहें
पत्थर की हवेली को, शीशे के घरोंदों में
तिनकों के नशेमन तक, इस मोड़ से जाते हैं
इस मोड़ से ...
या वळणावरून पुढे जाताना काय वाट्याला येऊ शकते? कदाचित ही वाट एका चिरेबंदी हवेलीपर्यंत पोहोचू शकते, की जिथे बाहेरच्यांना आत डोकावता येत नाही. आतल्या व्यक्तींना बाहेरची मोकळी हवा मिळत नाही. आत बाहेरून अभेद्य बंदिस्तपणा. तेथील नाती सुद्धा चिरेबंदी हवेली प्रमाणे बाहेरून मजबूत दिसणारी, आतून मात्र शुष्क, कोरडी अन् निष्प्राण. त्यातून सुटका कठीण. कडेकोट बंदिस्तपणा आणि सरंजामी वृत्ती मुळे एक घुसमट वाट्याला येऊ शकते.
याच वळणावरून पुढे गेल्यानंतर एक काचमहल भेटू शकते. अशा महालातून/घरातून कदाचित बाहेर पाहता येते, परंतु तिथेही एक बंदिस्तपणा आहे. बाहेरची हवा आत येऊ शकत नाही आणि त्यामुळे आतल्या व्यक्तीचा श्वास कोंडतो.
या वळणावरून पुढे जात असताना काडी काडी जमा करून निर्माण केलेले घरटेही भेटू शकते. म्हणजेच मोठ्या मेहनतीने एक एक वीट रचत आपल्या कल्पनेतला निवारा 'नशेमन' उभा करता येतो. इथे मोकळी हवा असते. कसलीही तटबंदी नसते, बंधने नसतात. फक्त अडचण हीच असते की एखादा वादळवारा (म्हणजेच आँधी) आल्यानंतर हा निवारा लवकरच उध्वस्त होऊ शकतो. जिथे सुरक्षितता व बंदिस्तपणा आहे, तिथे आनंद नाही आणि जिथे आनंद आहे, तिथे शाश्वती नाही, असा हा जीवनाचा प्रवास!
आँधी की तरह उड़कर, इक राह गुज़रती है
शरमाती हुई कोई कदमों से उतरती है
इन रेशमी राहों में, इक राह तो वो होगी
तुम तक जो पहुँचती है, इस मोड़ से जाती है
इस मोड़ से...
या वळणावर वादळवाऱ्यासारखी एक वाट सुसाट पुढे निघून जाते. तर एखादी लाजरीबुजरी वाट जणू आपल्या पायांवरून खाली उतरून सामोरी येते. अशा रेशमी मुलायम वाटांमध्ये तुझ्यापर्यंत पोहोचणारी एक वाट लपलेली असेल, असेही वाटत राहते.
इक दूर से आती है, पास आ के पलटती है
इक राह अकेली सी, रुकती है ना चलती है
ये सोच के बैठी हूँ, इक राह तो वो होगी
तुम तक जो पहुँचती है, इस मोड़ से जाती है
इस मोड़ से ...
कधीकधी एखादी वाट (व्यक्ती) अनावर ओढ लागून वेगात जवळ येते, मात्र जवळ आल्यावर अचानक वळण घेऊन दूर निघून जाते. (दुसरी) एक वाट मात्र थांबतही नाही, अन् पुढे जातही नाही. नुसतीच थबकते. अशा वळणबिंदूवर क्षणभर थांबून मी असा विचार करते, की एक तरी अशी वाट असेल, जी नक्की तुझ्यापर्यंत पोहोचेल. त्याच वाटेची आस मनात घेऊन जगणे सुरू असते.
हे गाणे ऐकत असताना मला नेहमी रॉबर्ट फ्रॉस्टच्या The Road Not Taken कवितेची आठवण येते. जो रस्ता निवडला त्यामुळे आजचे वर्तमान जीवन वाट्याला आले. कदाचित दुसरा निवडला असता तर फरक पडला असता, असे वैश्विक सत्य मांडणारी ही कविता. गुलजारजींनी हा भाव अत्यंत सूचकपणे हळुवार शब्दांत मांडला आहे. एखादे वादळ यावे आणि मुक्त आनंदाने चिवचिवणारे घरटे उद्ध्वस्त व्हावे, तसे काहीसे झाल्याची भावना गाण्यात चित्रित होते. चित्रपटात नायिका आरतीने राजकारणात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ती यशस्वीही झाली. परंतु हसते-खेळते घर उद्ध्वस्त झाले. एक समंजस प्रेमभावनेची जाणीव या चित्रपटातून पुढे येते, ते फार महत्त्वाचे वाटते.
चित्रपटात शेवटी संजीव कुमारच्या तोंडी असणारे दोन संवाद फार महत्त्वाचे वाटतात. पतीने आपल्या पत्नीच्या यशाचा अभिमान बाळगावा. तिला करिअर करू द्यावे, तिला यशस्वी पाहण्यात गर्व बाळगावा, असा संदेश देणारी ही वाक्ये आहेत. चित्रपटात निवडणूक लढविणारी आरती कदाचित हरणार असे वातावरण झालेले असते. त्याचवेळी ती संसारात परत येण्याची इच्छा व्यक्त करते. तेव्हा जे.के. म्हणतो, "तुम्हारी हार मेरी जीत नहीं हो सकती। मैं तुम्हें हारा देखना नहीं चाहता। ना घर में, ना बाहर। जो भी करो यकीन और विश्वास के साथ करना।"
तर पुढे निवडणूक जिंकून ती हेलिकॉप्टरने दिल्लीला जाण्यासाठी निघते. तेव्हा जे.के. म्हणतो, "तुम्हारा जाना जरूरी है, मैं समझता हूँ। जो काम शुरू किया है उसे पूरा करो। मैं हमेशा तुम्हें कामयाब देखना चाहता हूँ। हमेशा।" हा समंजस स्वीकार आजही दुर्मीळ आहे.
या गाण्यात हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी, ज़रीन दारूवाला यांचे सरोद आणि जयराम आचार्य यांचे सतारवादन यांनी वेगळीच खुमारी आणली आहे. राहुल देव बर्मन यांचे संगीत गुलजारजींच्या शब्दांना अधिक अर्थवत्ता देते. त्यामुळेच हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. रसिकांना हे गाणे स्वतःच्या अनुभवांशी नाते सांगणारे वाटू लागते.
गाणे पाहण्यासाठी लिंक
https://youtu.be/STOM6NZfcrs?si=mD7Tprd4fn-32dhE
अत्यंत तरल, तरीही काहीसा गूढ, अनाकलनीय वाटणारा,हळुवार प्रेमभाव गुलजारजींनी जसा शब्दांत लीलया पकडलाय, तसाच तो तितक्याच सहजपणे तुम्ही उलगडलाय.ही खूप मोठी कसरत सहजपणे व्यक्त केली आहे.खरोखर तुम्ही कवितेचे सच्चे समीक्षक आहात. तुम्हाला सलाम! 🙏🌹🌹
उत्तर द्याहटवाअप्रतीम
उत्तर द्याहटवाफ़ार सुन्दर एका कवी ने सुंदर कविते ची केलेली सुन्दर समीक्षा।।
उत्तर द्याहटवातुमची समीक्षा परत परत वाचल्यावर गाण्यातील भाव त्याचा अर्थ समजला खुप छान
उत्तर द्याहटवाअत्यंत मार्मिक भाष्य
उत्तर द्याहटवागुलजार यांची कविता भावनेला स्पर्श करताना जीवनातील सत्य -कटू वास्तवांना ती तितक्याच समर्थपणे भिडते आणि मनातील तरल भावना झंकारत जातात. हा अनुभव आपल्या उत्कट, भाव भावनातून व्यक्त करताना वाचकांना/ श्रोत्यांना मंत्रमुग्ध ही करतात आणि बेचैन ही करतात ही अनोखी अदाकारी त्याच्या कवितांचा अविभाज्य भाग बनतो तेव्हा ती कविता आपल्या अंतकरणात कोरली जाते आणि त्या कवितेत आपण स्वतः ला विसरून जातो.ही किमया गुलजार च्या शब्दात ,भावभावनात सदैव ओसंडून वाहत असते.याचा प्रत्यय् आपण"इस मोड पर(आँधी)"मध्ये नजाकतीने शब्दबद्ध केला आहे त्याबद्दल आपणास आपल्या प्रतिभेस आणि व्यासंगाना मानाचा मुजरा!
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाजुबेर मुल्ला यांची टिप्पणी काय होती? मी पाहिली नाही. हटवली देखील नाही.
हटवाकवी शाहनवाज सर
हटवासविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद! जुने चित्रपट, गाणी याबद्दल सगळ्यांच्या मनात काही आठवणी असतात. त्या सर्वांनी जरूर शेअर केल्या पाहिजेत.
सर
उत्तर द्याहटवाहे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. हा सिनेमा मी खूप वेळा पाहिला आहे. राजकारणात करिअर करणारी स्त्री आणि त्यामुळे कुटुंबाची वाताहत असं आकलन झाला होत. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतला आहे, असे मी ऐकले होते. स्त्रीने आपल्या घराकडेच प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे, असा संदेश हा चित्रपट देऊ इच्छितो, असा अर्थबोध माझा होता.
आज तुम्ही जे या गाण्याचे रसग्रहण आणि त्या गाण्यातील भावार्थ मांडला आहे, त्यामुळे या गाण्याचा नेमका अर्थबोध आज मला होत आहे.
"तुम्हारे हार में मेरी जीत नहि हो सकती", किंवा "मैं तुम्हे हारता नही देख सकता", ही वाक्य प्रत्येक स्त्री अपेक्षित करीत असते. पुरुष आपल्या पत्नीचे यश पचवू शकत नाही, या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचे आहे.
आपण खूप छान पद्धतीने या गाण्याचे भावविश्व उलगडून दाखवले आहे, त्यामुळे हे गाणं अजून हृदया जवळ आलं आहे. आपले मनापासून अभिनंदन आणि आभार. आपल्या प्रतिभेस अभिवादन!
🙏🏻🌹🙏🏻
हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पतीसोबतच्या नातेसंबंधावर आधारित असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात हा चित्रपट राजकारणी तारकेश्वरी सिन्हा आणि इंदिरा गांधी यांच्यापासून प्रेरित होता.
हटवागुलजार यांच्या भाव-कवितेतील हळुवारपणा नेमक्या शब्दात व्यक्त करणारा अप्रतिम लेख.
उत्तर द्याहटवाअभिनंदन!