मेरी आवाज़ ही पहचान है


मेरी आवाज़ ही पहचान है


      मानवी जीवन म्हणजे अकल्पित वास्तवाचा पसारा. जे आज आहे ते कायम असेलच असे नाही. जे हवे असते ते मिळेलच असेही नाही. सगळ्याच गोष्टी अनित्य. सतत बदलणाऱ्या. जे हवेसे असते ते आपल्या नजरेसमोरून हरवून जाते. जे समोर येते ते सहजपणे स्वीकारता येत नाही. हाच काळाचा नियम आहे.
     आयुष्य नेहमीच माणसाशी खेळ खेळत असते. ते कधी कधी आवडत्या व्यक्तींना लपवून ठेवते आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तींचा प्रवेश होतो. खरे तर एका व्यक्तीची जागा दुसरी व्यक्ती कधीच घेऊ शकत नाही. काहीतरी उणेदुणे असतेच. तरीही एक तडजोड म्हणून, आयुष्याने आपल्यासमोर ठेवलेला पर्याय म्हणून, जे वाट्याला आले ते स्वीकारावे लागते. मग सुरू होतो नव्यामध्ये जुने शोधण्याचा खेळ. आधाअधुरा. पूर्णत्वाचे समाधान कधीच न देणारा. भूतकाळाची पडछाया नेहमीच वर्तमानावर पडलेली असते. त्या सावल्या मनभर रेंगाळतात. हृदयाशी घट्ट बिलगून बसतात. त्याच वेळी दुसरा आश्वासक स्वरही कानावर पडत असतो. जीवनाचा प्रवाह कधीच एका ठिकाणी थांबत नाही. म्हणूनच नव्याला स्वीकारावे लागते. त्याच वेळी कानावर काही जुने ओळखीचे शब्द ऐकू येऊ लागतात,

नाम गुम जाएगा
चेहरा ये बदल जाएगा
मेरी आवाज़ ही पहचान है
गर याद रहे...

किनारा (१९७६) या गुलज़ारजींनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील त्यांचेच हे गाणे आजही अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. राहुल देव बर्मन यांचे संगीत आणि लता मंगेशकर व भूपेंद्र सिंग यांचा स्वरसाज. चित्रपटात कवी चंदन (धर्मेंद्र) याने लिहिलेले हे गाणे त्याच्या अपघाती मृत्यूनंतर आरतीला (हेमामालिनी) आठवत राहते. चंदनच्या प्रेमात आकंठ बुडालेली आरती त्याच्या अकल्पित मृत्यूने मोडून पडते. सैरभैर आणि उदास होते. त्याच वेळी इंदर (जितेंद्र)शी तिची भेट होते. इंदरच्या गाडीने चंदनच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चंदनचा मृत्यू झालेला असतो. इंदरच्या सहवासात आरतीला बरे वाटते, परंतु स्वतःच्या भूतकाळापासून ती मुक्त होत नाही. तिला पुन्हा पुन्हा चंदनची आठवण होते. वियोगाच्या दुःखात ती बुडून जाते. या पार्श्वभूमीवर चंदनने लिहिलेले वरील गाणे ती गाऊ लागते. हे चित्रिकरण केले आहे एका भग्न राजमहालाच्या पार्श्वभूमीवर. कारण भूतकाळ हाही असाच भग्नावशेषासारखा असतो. 

नाम गुम जाएगा
चेहरा ये बदल जाएगा
मेरी आवाज़ ही पहचान है
गर याद रहे...

     कदाचित नाव हरवून जाईल. चेहरा बदलेल, ओळखेनासा होईल. अशा वेळी केवळ कवीचा आवाज (म्हणजेच त्याचे शब्द) हीच त्याची खरी ओळख असेल. (याचा दुसरा अर्थ असा की कवीला स्वतःचा आवाज, आत्मस्वर असायला हवा.) तो पुढे लिहितो,

वक्त के सितम कम हसीं नहीं
आज है यहाँ कल कहीं नहीं
वक्त से परे अगर मिल गए कहीं
मेरी आवाज़ ही...

      काळाने दिलेले घाव काही कमी सुंदर नाहीत. (प्रेमात मिळालेले दुःख ही गोड वाटणारी हुरहूर असते!) आज आपण इथे आहोत, उद्या कदाचित कुठेच नसू. या काळाच्या कक्षेबाहेर जर भेट झाली तर तेव्हा मात्र माझा आवाज (माझी कविता) हीच माझी एकमेव ओळख असेल.

जो गुज़र गई कल की बात थी
उम्र तो नहीं एक रात थी
रात का सिरा अगर फिर मिले कहीं
मेरी आवाज़ ही... 


       जे (जीवनातून) निघून गेले आहे, ती कालची गोष्ट होती. तो भूतकाळ होता. जे गेले ते आयुष्य नव्हे, तर जणू रात्री पडलेले एक स्वप्न होते! त्या रात्रीमधील अत्युच्च बिंदू/उत्कट क्षण पुन्हा अनुभवता आला, तर त्यावेळीही माझा आवाज, माझे शब्द हीच माझी ओळख असेल.

दिन ढले जहाँ रात पास हो
ज़िन्दगी की लौ ऊँची कर चलो
याद आए गर कभी जी उदास हो
मेरी आवाज़ ही...

      जेव्हा दिवस मावळत असतो, मार्गदर्शक सूर्य (मित्र/साथी) अस्ताला जातो, तेव्हा नक्कीच अंधारी रात्र जवळ आलेली असते. जीवनातील या अंधाऱ्या काळात दुःख, वेदना, निराशा, अन्याय वाट्याला येऊ शकतो. अशावेळी गरज असते जीवनज्योत अधिक देदीप्यमान करण्याची. जीवनातील असोशी, धग कायम राखण्याची. या प्रतिकूल काळात जुन्या आठवणी जाग्या झाल्या, तर मन उदास होऊन जाते. अशा वेळीही माझा आवाज, माझे शब्द हीच माझी खरी ओळख असेल.
         या अप्रतिम गाण्यातील दोन ओळी नेहमीच प्रेरक राहिलेल्या आहेत. 'मेरी आवाज़ ही पहचान है।' ही पहिली ओळ. तुम्ही निर्माण केलेली कलाकृती, चांगले कार्य हीच तुमची खरी ओळख असते. अर्थात जर इतरांच्या लक्षात राहिले तर!
       'ज़िन्दगी की लौ ऊँची कर चलो!' ही दुसरी महत्त्वाची ओळ. काही प्रतिकूल काळात जगण्याची तीव्र इच्छा टिकवून ठेवणे हीच बाब महत्त्वाची ठरते. जेव्हा जवळचा साथी/मार्गदर्शक हरवतो, तेव्हा स्वतःच स्वतःला सावरावे लागते. 'अत्त दीप भव्।' हे बुद्धांचे वचन स्वीकारावे लागते.
       सहचराचा अचानक झालेला मृत्यू (किंवा अचानक जीवनातून निघून जाणे/बदलणे) ही प्रचंड वेदनादायक, निराशेच्या गर्तेत घेऊन जाणारी घटना असते. परंतु जीवनातील कटू सत्य म्हणून तेही स्वीकारावे लागते. जीवन अनित्य आहे, हा बुद्धांचा उपदेश इथे आठवतो. त्याचवेळी प्रियजनांचा मृत्यू अकस्मात होऊ शकतो हेही स्वीकारावे लागते. त्यातून पुढे पुढे वाहणारी एक जीवनधारा प्रवाहित होत असते. ती स्वीकारावी लागते. नवे सोबती भेटू शकतात. त्यांचे हसून स्वागत करावे लागते.
       जीवनाचा मोठा आघात सोसून मोडून गेलेल्या, निराश झालेल्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, अनुकंपा वाटणे साहजिक आहे. परंतु ती अनुकंपा म्हणजे प्रेम नव्हे. तिच्या दुःखद अवस्थेला आपण जबाबदार आहाेत, अशी बोचरी जाणीव म्हणजेही प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे उत्कट आपलेपण! कोणत्याही अटी-शर्तीं शिवाय आलेले. चित्रपटात श्रीराम लागूंच्या तोंडी आंधळ्या झालेल्या आरती बद्दल इंदरला उद्देशून एक वाक्य आहे. "अगर प्यार करते हो उस लड़की से तो बेशक जान पर खेल जाओ। मैं रोकुंगा नहीं। मैं हर कदम पर तुम्हारे साथ हूँ। लेकिन अगर खुद को दोषी महसूस कर रहे हो, या रहम आता है उस लड़की पर, तो खुदा के लिए इस रास्ते से हट जाओ। ना खुद जी सकोगे ना उसे जीने दोगे। अगर जाओ उसे मिलने तो इसलिए मत जाना कि वो अंधी है। अगर प्यार करते हो तो इसलिए रुकना भी नहीं कि वो अंधी है।" हे जमले पाहिजे. जगता आले पाहिजे. समोरच्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्वीकारता आले पाहिजे. तर ते प्रेम! असे निखळ जगणे शिकविणारे हे गीत म्हणूनच अवीट आहे. सतार, बासरी आणि जलतरंंगाचे संयोजन मनाची व्याकूळ आणि चंचल अवस्था दर्शविते. ते लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. 

गाणे पाहण्यासाठी खालील लिंक कॉपी करा 
https://youtu.be/6hE2NUPewB8?si=1Rryk_4Nt-F9NsE7
      

टिप्पण्या

  1. अप्रतिम लेख आहे
    गीत संपूर्ण अर्थासहित वाचकाला भावते आहे.
    आपले लेखन खूप सुंदर आहे
    लिहिते रहा. शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. संजय हेगडे आटपाडी२० ऑक्टोबर, २०२३ रोजी १:०० AM

    🙏 खूप सुंदर सर🙏

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर👌प्यार मैं कोई शर्त नही..

    उत्तर द्याहटवा
  4. डॉ विनोद गायकवाड बेळगाव२० ऑक्टोबर, २०२३ रोजी १:०५ AM

    फार सुंदर आहे

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर गीताप्रमाणेच भावार्थही सुंदर. जीवाला चटका लावणारे......पण आहे तसा स्वीकार करायला लावणारे.....
    छानच!!

    उत्तर द्याहटवा
  6. आसावरी काकडे, पुणे२० ऑक्टोबर, २०२३ रोजी २:५९ AM

    छान लिहिले आहे... आवडतं गाणं.. हा सिनेमा पाहिला होता... त्यामुळे लेख विशेष आवडला....

    उत्तर द्याहटवा
  7. गीताचे अप्रतिम विश्लेषण केले आहे. खूप खूप छान .👌👌👍👍मेरी आवाज ही पहचान है | या गीताचा भावार्थ खूप विस्तृत व सुंदर लिहिला आहे. या गीतातून खूप काही जीवनातील सत्य समजून घेता येते. श्याम खूप खूप लिहीत जा. धन्यवाद 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  8. डॉ सुजय पाटील, कोल्हापूर२० ऑक्टोबर, २०२३ रोजी ९:१८ AM

    👍 खूपच छान!
    ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यात हा सिनेमा रविवारी संध्याकाळी लागला होता. त्यावेळी आम्ही शालेय मध्ये होतो. त्यावेळच्या दिवसांची आठवण झाली.

    उत्तर द्याहटवा
  9. रणजीत ऐवळे आटपाडी२० ऑक्टोबर, २०२३ रोजी ५:२३ PM

    अतिशय सुंदर वर्णन 👌👌👌🌹🌹🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  10. गुलजार यांनी किनारा या चित्रपटामध्ये 'नाम गुम जायेगा' या गीतातून जीवनात येणारे दाहक प्रसंगाना सामोरे जाऊन त्याचा स्वीकार करावा लागतो या प्रसंगामध्ये जीवाची होणारी घालमेल अस्वस्थता याचे भान ठेवून जगावे लागते.जीवन प्रवाही असल्याने तीच अवस्था कायम राहत नाही.असा सकारात्मक दृष्टीकोन या गीतामधून गुलजार जी यांनी दिला आहे.या गीतातील आशय आपण आपल्या शब्दशैलीतून उत्कृष्टपणे मांडलेला आहे व या गीताची उंची वाढविलेली आहे. काव्यावर व शब्दावर अधिष्ठान असल्यामुळेच अशा प्रकारचे मनातील भावभावनांचे लेखन तितक्याच समर्थपणे आपणाकडून सातत्याने होत आहे.त्याबद्दल अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  11. ‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे’ गुलजार यांच्या रचना समजून घ्यायच्या तर त्यांच्या गीतांमधील ही सांकेतिकता कळावी लागेल.'ते'म्हणतात माझ्या ओळींचे शब्दशः अर्थ घेऊ नका.गालिबसारखे गुलजार यांचेही काव्य ‘या तो आप समझे या खुदा समझे’ असेच म्हणावे लागेल.गालिबप्रमाणेच गुलजार यांच्या प्रतिमा सांकेतिक असल्यामुळेच की काय कुणास ठाऊक, पण अगदी वेगळ्या असतात.
    तुम्हीसुद्धा त्यांच्या या गीतरचनांचे एक एक पदर अगदी सहज सोप्या भाषेत उलगडून दाखवले आहेत... अप्रतिम.... 👌🏻

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)