हज़ार राहें

हज़ार राहें


       चित्रपटामध्ये काही गाणी स्वतंत्र असतात, तर काही गाणी घटना प्रसंगांवर बेतलेली (Theme song) असतात. अशा गाण्यांमध्ये चित्रपटाचा सार सामावलेला असतो. 'थोडी सी बेवफाई' या चित्रपटात गुलजारजींनी लिहिलेले एक गीत अशाच धाटणीचे आहे.
        प्रेम आणि अहंकार या गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. काही वेळेला चुकीच्या गोष्टीसाठी केलेला हट्ट देखील प्रेमभावनेला धक्का पोहोचवतो. खरे तर प्रेमात पडल्यानंतर परस्परांच्या स्वभावातले दोष कमी व्हायला हवेत. दोन जिवलगांनी आपल्याला नको वाटणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी हळुवारपणाने परस्परांना सांगायला हव्यात. आणि त्या कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्नही करायला हवा. काही वेळेला पती-पत्नीच्या प्रेमात बाधक ठरते ते माहेरचे चुकीच्या गोष्टीसाठी दिले गेलेले पाठबळ. राग, गैरसमज, ताठा या गोष्टींमुळे एकमेकांवर प्रेम असूनही दोन प्रेमी जीव एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. त्यामुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो.
       'थोड़ी सी बेवफाई' (१९८०) हा चित्रपट देखील अशाच गृहकलहावर बेतलेला आहे. श्रीमंता घरची मुलगी तुलनेने गरीब कुटुंबात सून म्हणून येते. घरातील सासू-नणंदा यांच्याशी तिचे मन जुळत नाही. त्यामुळे छोट्या-मोठ्या तक्रारी होत राहतात. तशातच भर पडते ती गैरसमजाची. आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीबरोबर हॉटेलमध्ये हास्यविनोद करत काहीतरी खाताना पाहिले जाते. त्यामुळे पती-पत्नीचे नातेच धोक्यात येते. नवऱ्याची बाजू/वस्तुस्थिती ऐकूनही न घेता श्रीमंता घरची ही मुलगी नवऱ्याला कोर्टात खेचते. त्याच्यापासून वेगळे राहण्याचे ठरवते आणि दोन वर्षांच्या मुलाचा ताबा स्वतःकडे घेते. खरे तर गैरसमज दूर करता आले असते. थोडी माघार घेऊन परस्परांना समजून घेता आले असते. परंतु तसे घडत नाही. पतीचा स्वाभिमान दुखावला जातो. तोही मागे हटत नाही. आणि प्रेमात पडून लग्न केलेले जोडीदार दीर्घकाळ एकमेकांपासून विभक्त होतात. या पार्श्वभूमीवर काळीज वेधणारे हे गाणे सुरू होते.

किशोर:
हज़ार राहें, मुड़के देखीं
कहीं से कोई सदा ना आई

      पर्याय म्हणून हजारो वाटा समोर आहेत, परंतु मागे वळून पहावे वाटते. मात्र कुठूनही प्रतिसाद/ हाक येत नाही. (पत्नी पासून विभक्त राहणाऱ्या पतीची (राजेश खन्ना) ही अवस्था आहे.)

लता:
बड़ी वफ़ा से, निभाई तुमने
हमारी थोड़ी सी बेवफ़ाई ...

       विभक्त राहूनही जोडलेले असणे हे अत्यंत निष्ठापूर्वक त्याने निभावलेले आहे. कारण प्रेम म्हणजे सुखदुःखात नेहमी सोबत राहण्याचा इरादा! तो ते पाळतोय. ती (शबाना आझमी) मात्र हे एकत्र जोडले राहण्याचे वचन पाळत नाही. म्हणून ही थोडीशी बेवफाई घडते.

कि: जहाँ से तुम मोड़ मुड़ गये थे - २
वो मोड़ अब भी वही खड़े हैं

     तो म्हणतो, ज्या वळणबिंदूपासून तू विरुद्ध दिशेला वळली होतीस, तो वळणबिंदू अजूनही तिथेच प्रतीक्षेत उभा आहे. कधीतरी ती परत येईल अशी वेडी आशा त्याला आहे.

ल: हम अपने पैरों में जाने कितने - २
भंवर लपेटे हुए खड़े हैं

      तिने वेगळा मार्ग निवडला खरा, परंतु ती जीवनातल्या नव्या भोवऱ्यांमध्ये फसत गेली. हे भोवरे तिला खोल पाण्यात खेचत गेले.

कि: कहीं किसी रोज़ यूं भी होता
हमारी हालत तुम्हारी होती

      अंत:करणात प्रेमाची नितांत आवश्यकता असताना, त्या प्रेमाशिवाय खंबीरपणे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलत रहावे लागते. अशी जीवाची तगमग होण्याची अवस्था कधीतरी तुझीही व्हायला हवी होती, असे त्याला वाटत राहते.

ल: जो रातें हमने गुज़ारी मरके
वो रात तुमने गुज़ारी होतीं

       खरे तर तिची अवस्था सुद्धा वेगळी नाही. दिवस कामात कसातरी निघून जातो, परंतु रात्र संपता संपत नाही. एकटेपणाची खोल जीवघेणी जाणीव रात्रीच्या प्रहरात उफाळून वर येते. ज्या अनेक रात्री मी विरहात, भावनाशून्य अवस्थेत काढल्या, तशा निष्प्राण अवस्थेतील रात्रींना तूही सामोरे जायला हवे होतेस. 

कि: उन्हें ये ज़िद थी के हम बुलाते
हमें ये उम्मीद वो पुकारें

       मनोमन दोघांना एकमेकांसोबतच राहायचे होते. परंतु स्वाभिमान आडवा येत होता. प्रथम कोणी माघार घ्यायची? कोणी पहिल्यांदा हाक मारायची? हा प्रश्न होता. तिची जिद्द होती की त्याने बोलवावे, त्याची अपेक्षा होती की तिने साद घालावी.

ल: है नाम होंठों में अब भी लेकिन
आवाज़ में पड़ गई दरारें

       त्याचे नाव (नेहमीच आणि) आताही तिच्या ओठावर आहे. परंतु तिचा आवाज कातर झाला आहे. कदाचित नात्यांमध्ये पडलेली भेग त्या आवाजात देखील आहे. म्हणूनच ओठातून त्याच्या नावाचा शब्द फुटत नाही. त्याला साद घातली जात नाही.
        किशोर आणि लताच्या आवाजातील हे गाणे ऐकताना जीव व्याकूळ होतो.
       अंत:करणात परस्परांबद्दल प्रेमभाव असतानाही अहंकार आणि जिद्द त्यांना एकत्र येऊ देत नाहीत. अनेक दिवस, रात्री, महिने, वर्षे निघून जातात. तारुण्याचा बहर वाया जातो आणि खूप उशिरा जाग येते. तेव्हा वाटते, चुकलेच आपले. थोडा अहंकार बाजूला ठेवून पुढाकार घ्यायला हवा होता. मनापासून साद घालायला हवी होती. मग कोणत्याही शृंखला एकत्र येण्यापासून रोखू शकल्या नसत्या. परंतु या गैरसमज आणि अहंकाराच्या खेळात बारा वर्षे, एक तप निघून जाते. केवळ एकमेकांसोबत घालवलेल्या आठवणींमध्ये मन बुडून जाते. हजार वाटा खुणावत राहतात. परंतु त्यापैकी एकही आपल्यासाठी आहे, असे वाटत नाही. कारण ज्यांच्या सोबतीने प्रवास करायचा ते सोबत नसतील, तर समोरच्या वाटेचा उपयोगच काय?


सदा=प्रतिध्वनी, हाक
दरार=फट, वस्तूमध्ये गेलेली भेग

गाणे ऐकण्यासाठी खालील लिंक कॉपी करा
https://youtu.be/t1O9anHPo_Y?si=2KVG9n_-b8O9AQg6

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)