हेचि दान दे गा देवा...
वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक समता आणि अाध्यात्मिक लोकशाहीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बंडखोर प्रयोग होय. तेराव्या शतकात संत नामदेव-ज्ञानदेवांसह अनेक संतांनी स्वतःचे जीवन संकटात घालून भक्तीची पताका उंच धरली. 'यारे यारे लहान थोर। याती भलते नारी नर।।' असे म्हणत स्त्री शूद्रातिशूद्रांना भक्तीचा मार्ग खुला केला आणि नव्या परंपरेला सुरुवात झाली. या संत नामदेव-ज्ञानदेव कृत भक्तिमार्गाची पाऊलवाट प्रशस्त करण्याचे कार्य नंतरच्या संतमांदियाळीने केले. त्यामुळेच 'ज्ञानेशाचा एका, कबीराचा शेखा आणि नामदेवाचा तुका' असे आदराने म्हटले जाऊ लागले. म्हणजेच संतांनी वारकरी संप्रदायाची एक दीर्घ परंपरा घडविली, टिकविली आणि पिढ्यान् पिढ्या कष्टकरी भावभोळ्या जनसामान्यांच्या मनात रुजविली.
'नामदेवे केले स्वप्ना माजि जागे। सवे पांडुरंगे येऊनिया।।' असे तुकोबांनी स्वतःच लिहून ठेवले आहे. याचा अर्थ असा की संतांची पूर्वकालीन मांदियाळी उत्तरकालीन संतांना घडवीत होती. भिन्न कालखंडातील या संतांमध्ये विचारांचे एक सूत्र होते. आपल्या भक्तिपरंपरेचा रास्त अभिमान होता. 'उजळावया आलो वाटा। खरा खोटा निवाडा।।'(शासकीय गाथा अभंग क्र.३१८) असे म्हणत संत तुकारामांनी आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. 'अधिकार तैसा करू उपदेश। साहे ओझे त्यास ते ची द्यावे।।' (अभंग क्र.३३१५) ही संतांची भूमिका आहे.
संत नामदेवांनी बोधरूपी साबण लावून खट नट शुद्ध करण्याची भूमिका घेतली होती. 'ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले। उद्धरावया आले दीनजनां।।' ही संत नामदेवांची भूमिका होती. त्यामुळेच सर्व संतमांदियाळी रंजल्या गांजल्या जीवांचा कैवार घेऊ लागली. त्यांना भक्तिप्रेमाचा नवा मार्ग दाखवू लागली. त्यांनी आपले आराध्य दैवत घडविले आणि त्याच्या भक्तीची विशिष्ट पद्धतीही रूढ केली. ते करत असताना सर्वसामान्य स्त्री-पुरुष शूद्रातिशूद्रांना जे निर्बंध होते ते धुडकावले. भेदाभेद करणारे सर्व संकेत बाजूला सारले. 'नाही यातिकूळ उंच नीच भेद। भाव एक शुद्ध पाहातसे।।' अशी घोषणा केली. त्यामुळे पंढरीच्या वाळवंटात भक्तीचा महामेळा जमला. या भक्तांच्या भावनांना अभंगातून स्थान मिळाले. प्रत्यक्ष श्री विठ्ठलाशी सुखसंवाद सुरू झाला. त्याच्याशी लटके भांडण केले. मनीच्या अार्त इच्छा सांगितल्या. लाहो घेतला. आणि कधी कधी सलगीने मागणेही केले. अर्थात हे मागणे फक्त स्वतःसाठी नव्हते, तर सगळ्या समाजाच्या हितासाठी होते. त्यामुळेच जसे संत नामदेवांनी 'आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा...' हे पसायदान लिहिले, ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितले, तसेच तुकोबांनी 'हेचि दान देगा देवा...' म्हणत एक स्वतंत्र मागणे मागितले आहे. त्यांचे हे पसायदान नव्या जीवनमूल्यांचा निर्देश करणारे आणि कोणती मूल्ये स्वीकारायची, कोणती नाकारायची याचा विवेक जपणारे आहे. म्हणूनच ही तुकोबांची वाणी आजही मार्गदर्शक आहे.
*संत तुकोबांचे मागणे*
वारकरी संतांचे वैशिष्ट्यपूर्ण तत्त्वज्ञान म्हणजे चिद्विलासवाद होय. हे संपूर्ण जग म्हणजे ईश्वरी तत्त्वाचा रम्य असा विलास आहे. या विश्वातील प्रत्येक घटकात, चराचरात परमेश्वरी तत्त्व केंद्रीभूत आहे. त्यामुळे हे जग मिथ्या नाही. आजूबाजूची माणसे आणि त्यांचा व्यवहार मिथ्या नाही. फक्त माणसाने या संसारात अडकावयाचे नाही. 'संसारी असावे, असोनी नसावे', असे धोरण ठेवून मार्गक्रमणा करायची आहे. त्यामुळेच सगळे संत संसारी आहेत. 'अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक।।' ही त्यांची प्रतिज्ञा आहे. तुकोबा सुद्धा याच मताचे आहेत. त्यामुळेच त्यांचे मागणे वैदिक परंपरेपेक्षा वेगळे आहे. वैदिक परंपरेत वेद वाङ्मय प्रमाण आहे. वर्णाश्रम धर्म सांभाळणे कर्तव्य आहे आणि मोक्षप्राप्ती हे अंतिम साध्य आहे. हे करीत असताना शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 'ब्रह्म सत्य जगद् मिथ्या।' ही धारणा वैदिकांनी जोपासली आहे. स्त्रिया या अध्यात्माच्या मार्गातील धोंड समजल्या गेल्या आहेत. म्हणूनच वैदिक परंपरेत भेदाभेद, उच्चनीचता आणि विधिनिषेध यांचे प्रचंड प्राबल्य आहे. संतांनी ते बाजूस सारले. 'गाळुनिया भेद। प्रमाण तो ऐसा वेद।।' अशा स्पष्ट शब्दात तुकोबांनी आपली भूमिका सांगितली आहे. 'मुखी वदो वेदनीती करू संती केले ते।' अशी आपली कार्यप्रणाली ठरविली आहे. त्यामुळे त्यांचे सगळे जगणे वागणे पारदर्शक आणि सर्वांच्या हिताचे ठरले. तसेच या संतांचे मागणे देखील अभिनव वाटावे असेच होते. तुकोबांनी एका स्वतंत्र अभंगात आपले हे मागणे खालील प्रमाणे नोंदविले आहे.
हें चि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी। हे चि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि संपदा। संतसंग देईं सदा ॥३॥
तुका ह्मणे गर्भवासी। सुखें घालावें आह्मांसी ॥४॥(२३०६)
सगळ्या वारकरी संतांना वैदिकांनी एक प्रश्न विचारला, तो असा की वेदनीती नाकारण्याचा किंवा वैदिक परंपरेला प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही तर वैदिक परंपरेनुसार शूद्र आहात. हा प्रश्न तत्त्वतः खरा असला तरी संतांचे यावरील उत्तर महत्त्वाचे आहे. संतांना हा अधिकार शुद्ध आचरणाने आणि विवेकाने प्राप्त झालेला होता. संतांना विठ्ठल संगतीचे परमसुख लाभले आणि देवच आमचा पक्षधर असल्यामुळे आम्ही विवेकबुद्धीने काही प्रश्न विचारू शकतो, निर्णय करू शकतो, ही संतांची भूमिका आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी मध्ये,
'चंद्र तेथे चंद्रिका। शंभू तेथे अंबिका।
संत तेथे विवेका। असणे की जे।। (१८.१६३२)'
असे म्हटले आहे. संत आणि विवेक या अभिन्न गोष्टी आहेत. म्हणूनच संतांचे संपूर्ण जगणे वागणे विवेकी आहे. संत सगळ्या जगाला भ्रामक फसव्या गोष्टींपासून दूर होण्यास सांगत आहेत. 'नको वेद मंत्र, नको शास्त्र बोध, नामाचे प्रबंध, पाठ करा।' असा स्पष्ट संदेश देत आहेत. त्यामुळेच संतांची विचार करण्याची पद्धती, त्यांनी देवाशी साधलेली सलगी आणि त्यांचे देवाकडे असणारे मागणे हे मूलतः वेगळे आहे.
प्रस्तुत अभंगात संत तुकोबाराय विठ्ठलाकडे असे मागणे मागत आहेत की, "हे देवा, आम्हाला असे दान दे की तुझा विसर होऊ नये. आम्ही सदोदित तुझे गुण गाऊ. हेच माझे संचित म्हणून मला जोडायचे आहे. आम्हाला मुक्ती आणि इतर लौकिक संपदेची गरज नाही. तर सतत संतसंगती घडावी इतकीच अपेक्षा आहे. या सुखासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा तू जन्माला घालावेस, अशी आमची इच्छा आहे"
इथे तुकोबांना देव म्हणजे कोण अपेक्षित आहे? पंढरपुरात किंवा इतर कोणत्या मंदिरात असणारी विठ्ठल मूर्ती म्हणजे देव काय? याचा विचार करावा लागेल. देव म्हणजे देवाची प्रतिमा, असे संतांनी कधीही मानलेले नाही. याउलट देव म्हणून काही 'गुणांचा' पुरस्कार केलेला आहे. ज्याच्या अंगी हे गुण असतील तो देव, अशी सर्वसाधारण मान्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या एका अभंगात तुकोबा म्हणतात,
'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा।।'
तर अन्य एका अभंगात तुकोबा असे म्हणतात
'अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव। प्रतिमा तो देव कैसा नव्हे।।
नाहीं भाव तया सांगावें तें किती। अपुलाल्या मती पाषांडिया।।
जया भावें सत बोलिले वचन। नाही अनुमोदन शाब्दिकांसि।।
तुका म्हणे संतीं भाव केला बळी। न कळता खळीं दूषिला देव।। (३०८)
येथे तुकोबा अवघे विश्व ब्रह्मरूप असल्याचे मानतात. फक्त ते पाहण्यासाठी निर्मळ भाव पाहिजे. संतांच्या या बोलण्याला शाब्दिकांचे म्हणजेच शब्दप्रामाण्य मानणाऱ्या वैदिकांचे अनुमोदन नाही. तरीही संतांनी आपला भाव बलवंत करून भक्ती आरंभली आहे आणि इतरांनी त्यांना/त्यांच्या देवाला दोष दिला आहे.
'असे नांदतु हा हरी सर्वजीवीं।'(१११३) असे म्हणणारे तुकोबा आहेत. 'आडलिया जना होसी साहाकारी। आंधळिया करीं काठी तूं चि।। आडिले गांजिले पीडिले संसारी। त्यांचा तू कैवारी नारायणा।। (२७९५) ही तुकोबांची धारणा आहे. म्हणजेच हा देव सर्व जीवांमध्ये नांदतो आणि अडल्या नडल्या, रंजल्या गांजल्या माणसांना साह्यकारी होतो. हेच या देवाचे प्रमुख लक्षण आहे. 'उंच निंच कांही नेणे हा भगवंत।(२८२०) या भावनेचे विस्मरण होऊ नये. 'उदार कृपाळ अनाथांचा नाथ' (११३२) असा देव आहे, याची जाणीव ठेवायला हवी. 'विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।' (४६) ही वारकरी मान्यता आहे आणि याचे आचरण करणारे साक्षात प्रति भगवंत म्हणजे संत आहेत. म्हणून तुकोबांनी 'देव ते संत देव ते संत। निमित्य त्या प्रतिमा।।' (२४९९) असे स्पष्ट शब्दांत म्हटलेले आहे.
देवाचा विसर होऊ नये, याचा अर्थ देवाच्या गुणांचा विसर होऊ नये, असा आहे. देव ज्या समदृष्टीने सर्वांकडे पाहतो, सर्वांच्या मदतीला धावतो, सर्वांचे उत्तम कुशल मंगल चिंततो, ती वृत्ती अंगी बाणली पाहिजे. म्हणजेच देवाच्या देवगुणांचे स्मरण झाले पाहिजे. देवगुणांनी केलेल्या सगळ्या कामाचे गुणगौरव करणे, हे संतांचे कर्तव्यच आहे. कलियुगात देवाचे गुण गाणे आणि त्याच्या कथा इतरांना ऐकवणे, हे संतांचे काम आहे, असे नामदेवांनी म्हटले आहे. अर्थातच तुकोबा देखील गुण गाईन आवडी म्हणतात त्यामागील भावार्थ हाच आहे. देवाच्या गुणांचे वर्णन करता करता ते गुण अंगी बनवायचे असतात. 'देव पहावया गेलो, देव होऊनिया ठेलो', हा अनुभव घ्यायचा असतो. म्हणूनच तुकोबा आपल्या अभंग-कीर्तनातून देवाचे गुणगान गाताना दिसतात.
हा देवाचा गुणगौरव मुक्ती मिळावी या कारणासाठी नाही किंवा इतर कोणत्याही प्रकारची संपदा म्हणजेच लौकिक गोष्टी मिळाव्यात यासाठीही नाही. वैदिक परंपरेत मुक्ती हे अत्यंत अत्युच्च साध्य आहे. मुक्तीसाठीच अनेक साधनांची आटाअटी आहे. परंतु संतांनी मुक्तीच ठोकरली आहे. नाकारली आहे. 'सांडोनी पंढरीची वारी मोक्ष मागे तो भिकारी।' अशा शब्दात नामदेवांनी मुक्ती नाकारली होती. कारण या संतांनी वैकुंठ भूवरी खेचून आणला आहे. भजन कीर्तनाच्या माध्यमातून अवघे जग दुमदुमून गेले आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी वृत्ती झालेली आहे. हा अनुपम्य सुखसोहळा सोडून मुक्तीच्या मागे लागणे संतांना रुचत नाही. याउलट संतसंगतीचे सुख पुन्हा पुन्हा लाभावे हीच त्यांची तीव्र आकांक्षा आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास ते आनंदाने तयार आहेत. तुकोबा दुसऱ्या एका अभंगात लिहितात,
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें।
आम्हां जन्म घेणें युगायुगीं।।
विटे ऐसें सुख नव्हे भक्तिरस।
पुडतीपुडती आस सेवावें हें।। (१७१७)
थोडक्यात सांगायचे तर, संत तुकोबांनी एक वेगळा जीवनमार्ग येथे स्वीकारलेला दिसतो. 'सावळें सुंदर रूप मनोहर। राहो निरंतर हृदयी माझे।। आणिक कांही इच्छा आम्हा नाहीं चाड। तुझे नाम गोड पांडुरंगे।।' (४०१४) या भावनेने ते वाटचाल करीत आहेत. प्रत्यक्ष पांडुरंगाचे सावळे सुंदर रूप हृदयी धारण करायचे, ओठावर त्याचे गोड नाम ठेवायचे आणि त्या देवाच्या सदगुणांचा आपल्या कृतिउक्तीतून अविष्कार करायचा, हे तुकोबांनी ठरविलेले आहे. याचेच दुसरे नाव शुद्धाचरण असे आहे. यामध्येच परम सुख आहे. रंजल्या गांजल्यांना मदत करत, आडलेल्यांना आधार देत या पृथ्वीवरच आनंदओवरी निर्माण करणे संतांना आपले जीवितकार्य वाटते. हे कार्य करण्यासाठी एक जन्म अपुरा आहे. म्हणूनच पुन्हा पुन्हा गर्भवास मिळावा, पुन्हा पुन्हा नरदेह प्राप्त व्हावा आणि भक्तीचे परमसुख वाट्यास यावे, असे तुकोबांचे मागणे आहे. त्यांचे हे मागणे फक्त स्वतःसाठी नाही, तर वारकरी संप्रदायातील सर्व हरिभक्तांसाठी आहे. या भक्तांच्या वतीने सर्व जगाच्या कल्याणासाठी केलेले हे उच्च दर्जाचे मागणे आहे. म्हणूनच तेही अभिनव पसायदानच आहे.
*डॉ. श्यामसुंदर मिरजकर*
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
ता. खटाव, जि. सातारा - ४१५ १०२
दूरभाष : ९४२१२१२३५२
('संतसाहित्यातील मूल्यविचार' या ग्रंथात प्रकाशित झालेला लेख)
मार्मिक भाष्य..
उत्तर द्याहटवाअतिशय अभ्यासपूर्ण विवेचन🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख, वारकरी संतांच्या विचाराचे सार प्रगट करणारा लेख..
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख. खूप अभ्यासपूर्वक लिहिला आहे. संत वचनासह दीर्घ विवेचन केले आहे. संतांची शिकवण व त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आजही महत्त्वाचे आहे. धन्यवाद श्याम 🙏
उत्तर द्याहटवालेख उत्तम झाला आहे. मूल्यांचे साधार, ओघवते, संक्षिप्त पण नेमके विवेचन.
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवालेखन प्रासादिक व मार्मिक स्वरुपाचे असून, त्यांच्या अभंगातील तत्वज्ञान स्पष्ट होते.