यारा सीली सीली...

 यारा सीली सीली...    
        अत्यंत प्रिय व्यक्ती किंवा स्थळ किंवा काळ यांच्या वियोगाचे दुःख म्हणजे विरह. विरहाचे नाते हे नेहमी आत्ममग्नतेशी असते. जीवनातील अत्यंत आवडणारी व्यक्ती दुरावली किंवा अत्यंत आवडते स्थळ दुरावले किंवा अत्यंत आवडता काळ नकळत हातून निसटून गेला, याचे ते दुःख असते. या विरह वेदनेतून लवकर मुक्ती नसते. किंचित उबदार गोडसर असणाऱ्या या विरह भावनेतून संवेदनशील माणूस लवकर बाहेर पडत नाही. स्थळ-काळ-व्यक्तींच्या प्रिय आठवणीतच तो रमतो. त्याचे मन तिथेच घुटमळत राहते. त्या भावूक करणाऱ्या आठवणी गुंतवून ठेवतात. त्या भावओल्या आठवणींमध्ये धुपत धुपत जळत जाणे वाट्याला येते. 
      कवी गुलज़ारजींनी 'लेकिन'(१९९१) चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यामध्ये ही अवस्था नेमकेपणाने पकडली आहे. 

यारा सीली सीली बिरहा की रात का जलना
यारा सीली सीली, यारा सीली सीली

         विरहाची रात्र म्हणजे एकटेपणाची रात्र. अशा रात्री ना धड झोप येते, ना धड जीवाला चैन पडते. त्याच्या आठवणीने, त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीने तिचे मन व्याकूळ झाले आहे. आता तसे प्रिय क्षण आपल्या वाट्याला आणून देणारा तो कुठे तरी क्षितिजाच्या पल्याड गेलाय. अन् त्याच्या आठवणीने तिचे डोळे पावसाळू लागलेत. दुसऱ्या बाजूला त्याच्या आठवणीने तिच्या अंतरंगात विरहाग्नी पेटलाय अन् ती त्यामध्ये जळते आहे. या आसवांनी भिजलेल्या ओलसर रात्रींचे जळणे म्हणजेच 'सीली सीली जलना!'

ये भी कोई जीना है ये भी कोई मरना
टूटी हुए चूड़ियों से जोड़ूं ये कलाई मैं
पिछली गली में जाने क्या छोड़ आयी मैं
बीती हुई गलियों से, फिर से गुज़रना

      त्याच्याशिवाय  विरहात जगणे हे खऱ्या अर्थाने जीवन नाही आणि या निरस निष्प्राण जगण्याला मृत्यूही म्हणता येत नाही. दोहोंच्या दरम्यान कुठेतरी भावशून्य रसहीन अस्तित्व उरलेले आहे. फुटलेल्या बांगड्या जोडून ती पुन्हा मनगट बांधू पाहते. चुडा भरू पाहते. भूतकाळात हरवून गेलेल्या जुन्या गल्लींमधून न जानो काय काय मागे सोडून ती आली आहे. त्या गतकालीन गल्ल्यांमधून पुन्हा (कदाचित मनानेच) ती फिरून येते. तिथे अनेक हरवून गेलेल्या त्या क्षणांचा आनंद पुन्हा मिळत नाही. फक्त मन त्या हरवलेल्या काळात कुठे कुठेतरी अडकून राहते. 

पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे
मेरे साथ जाये ना मेरी परछाईं रे
बाहर उजाड़ा हैं, अन्दर वीराना

       आता माणसेच काय पण तिची सावली सुद्धा तिला सोडून गेली आहे. डोक्यावर कोणाचा आश्वासक वरदहस्तही नाही. तिच्यासोबत तिची पडछाया देखील चालत नाही, इतका प्रतिकूल काळ आहे. असे म्हणतात की स्वतःच्या सावलीने साथ सोडली, तर जग देखील तुमचे नसते. त्यामुळे तिला हवेसे असणारे जग उजाड झाले आहे आणि मनाचे आवार तिला प्रिय असणाऱ्या सहचराशिवाय विराण झालेले आहे. जणू त्या वैराण ओसाड मनाच्या प्रदेशात आता पुन्हा कोणी येणारे देखील नाही. अशी विरहवेदनेत बुडालेली दुखरी जाणीव या गीतातील विरहिणी व्यक्त करते आहे. परंतु त्याचवेळी ती या अवस्थेतून मुक्त करेल अशा व्यक्तीच्या प्रतीक्षेत आहे. भिरभिरत्या नजरेने ती त्याला शोधतेय. गाण्याच्या शेवटी समीर नियोगीचे (विनोद खन्ना) आगमन होते. गतकालातून मुक्त करून तिला पैलपार नेणारा हा सांगाती आहे. 
        गुलजारजींनी दिग्दर्शित केलेल्या 'लेकिन' या चित्रपटासाठी त्यांनीच हे गीत लिहिले आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या 'हंग्री स्टोन्स' या लघुकथेवर आधारित हा चित्रपट आहे. विरहवेदनेची भळभळती जखम व्यक्त करणारा लताजींचा स्वर, हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि डिंपल कपाडियाचा अभिनय यांचा सुमेळ विरहाची खोल व्याकूळता व्यक्त करतो. फार पूर्वी मृत्यू पावलेल्या परंतु त्या काळातून मुक्त न झालेल्या अतृप्त तरुणीची पडछाया अशा स्वरूपाची व्यक्तिरेखा डिंपल कपाडियाने या चित्रपटात निभावली आहे. ती मनुष्ययोनीतील नाही हे दृश्यमान करण्यासाठी गुलजारजींनी डिंपल कपाडियाला पापण्यांची उघडझाप न करण्याचा सल्ला दिला होता. पापणी न लवता डिंपलचे एकटक पाहणे खोलवर स्पर्श करते. तिच्या नजरेच्या परिघातून सुटणे केवळ अशक्य. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा तळ ठाव शोधणारे डोळे, निळसर काळ्या रंगाची वेशभूषा, भग्न जुना राजवाडा या पार्श्वभूमीवर रेवा ही व्यक्तिरेखा डिंपलजींनी मोठ्या ताकदीने पेलली आहे. राजस्थानमधील मरुभूमीच्या पार्श्वभूमीवर ही गूढ रहस्यमय कहाणी  अधिकच व्याकुळ करते 
       राजस्थानी लोकवाद्यांचा वापर करत हृदयनाथजींनी अतिशय वेगळी धून बनवली आहे. ३७वा फिल्मफेअर पुरस्कार व ३८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये या गीतासाठी गुलजारजींना सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचे पारितोषिक मिळाले होते. याशिवाय लताजींना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, नितीश रॉय यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक, भानू अथय्या यांना वेशभूषा, हृदयनाथ मंगेशकर यांना पार्श्वसंगीत यासाठीचे पारितोषिक प्राप्त झाले होते. गहनगूढ अनुभव देणारे हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावे इतके श्रवणीय आहे. 
       नीरज शर्मा आपल्या Gulzariyat - Gulzar's Songs: Discover What’s Beneath  या पुस्तकात पहिल्या दोन ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे स्पष्ट करतात, "The night of separation burns slowly like wet wood, neither complete ablaze nor wholly extinguished. It is more painful because this is neither complete death nor complete life, just hung in between." या दोन ओळींमध्येच चित्रपटाचा सार दडला आहे. 

गाणे पाहण्यासाठी लिंक :

https://youtu.be/piZeqcugoiw?si=8rENGWqCb-XkoDsX

टिप्पण्या

  1. हे गीत खूप वेळा ऐकले आहे, परंतु गीताचा भावार्थ एवढा काही समजला नव्हता. परंतु श्याम तू खूप चांगल्या पद्धतीने विरहाचे वर्णन केले आहेस.

    उत्तर द्याहटवा
  2. गहनगूढ अनुभव ✅

    उत्तर द्याहटवा
  3. फ़ार सुन्दर, ही खरोखर फ़ार सुन्दर कविता आहे, आगदी मोजक्या शब्दात याची समीक्षा केली आहे, एक खरा कवीच हे करू शकतो ।।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)