तू ही तो मेरी दोस्त है...!

तू ही तो मेरी दोस्त है... मानवी नातेसंबंध हा कवी गुलजार यांच्या चिंतनाचा विषय आहे. नात्यातील प्रांजळपणा, दृढता, गहराई, ओलावा या गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण असते. परंतु त्याची जाणीव होण्यासाठी वेळ लागतो. अनुभवातून चुकतमाकत अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. आपले कोणीतरी जवळचे असावे, आपण कुणासाठी तरी जवळचे व्हावे, या गोष्टीचे मोल थोडे उशिरा लक्षात येते. कवी गुलजार सत्तरच्या दशकापासून आजपर्यंत आपल्या कवितांमधून, गाण्यांमधून विविध नात्यांचा पैस उलगडत आहेत. ' हम ने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो।' असे एकेकाळी गुलजारजींनीच लिहिले होते. कारण त्या काळात स्त्री-पुरुषांची मैत्री, प्रेम, जवळीकता यांना समाजमान्यता नव्हती. नाती अंतःकरणापासून समजून घ्यावीत, जपावीत, पण त्यांना नाव देऊ नये. फक्त त्या नात्यातील प्रेम अनुभवावे, असा तो काळ! पण आता काळ बदलला आहे. समाजमन बदलले आहे. तरुणाई खुलेआम आपली मैत्री जाहीर करते. निभावते. कधी कधी मैत्रीचे प्रेमातही रूपांतर होते. हे सगळे समाजाने स्वीकार...