तुम आ गये हो...
तुम आ गए हो...
जीवनसाथीची भेट हा प्रत्येकाच्या जीवनातील एक वळणबिंदू असतो. या जादुई भेटीनंतर जगण्याचे रंगरूप पालटते. जीवनाला चैतन्याचा, सौंदर्याचा स्पर्श होतो. एखाद्या शुष्क निष्प्राण पुतळ्याला प्रेमाचा स्पर्श व्हावा आणि तो साजिवंत होऊन सामोरा यावा, तसे काहीसे घडते. कवी गुलज़ारजींनी एका गीतामधून हे प्रत्ययकारी रितीने नोंदविले आहे. आँधी (१९७५) चित्रपटात संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यात हे मधुर क्षण नजाकतीने टिपले आहेत. त्याच्या/तिच्या रूपाने मूर्तिमंत प्रेम जीवनात अवतरते. जीवनाला नवी झळाळी, नवे तेज, नवे सौंदर्य लाभते. या भेटीनंतरचा जीवनप्रवास आणि भेटीपूर्वीचा जीवनप्रवास या दोन अवस्था गुलज़ार साहेबांनी तंतोतंत टिपल्या आहेत.
जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर एक अस्पष्टसा चेहरा अधून मधून मनात डोकावत असतो. या चेहऱ्याचे भास होत राहतात, पण प्रत्यक्ष भेट होत नाही. ऋतू येतात, जातात. थोडीशी निराशा, थोडीशी उदासी मनावर दाटून येते. या आशानिराशेच्या संधिकालातच तिचे/त्याचे आगमन होते. चैतन्याचा, उबदार जाणिवांचा अल्हाददायक प्रकाश जीवनात प्रवेशतो. जणू जीवनात सहस्ररश्मी प्रदीप्त होतात. कदाचित ही भेट झाली नसती, तर? तर आशेच्या दिव्यांची ज्योत विझून निराशेचा काळोख दाटला असता. पण ती येते/तो येतो आणि सगळा कॅनव्हास बदलून जातो. हा भाव शब्दबद्ध करताना गुलजारजी लिहितात,
तुम आ गए हो, नूर आ गया है
नहीं तो चरागों से लौ जा रही थी (किशोर)
तू आलीस/आलास आणि जीवनात प्रकाश आला. नाहीतर (आशेच्या) दिव्यांची ज्योत विझू लागली होती.
ही भेट फक्त त्याच्यासाठी सुखकर आनंददायी असते असे नाही, तर तिच्यासाठीही ती तितकीच मौल्यवान असते. या भेटीमुळे जगण्याला एक प्रयोजन प्राप्त होते. अर्थपूर्ण संदर्भ लाभतात. संथ आणि निरर्थक चाललेल्या आयुष्याला नवे वळण लाभते. म्हणूनच ती म्हणते,
जीने की तुमसे वजह मिल गई है
बड़ी बेवजह ज़िन्दगी जा रही थी (लता)
या भेटीपूर्वीची अवस्था कशी होती, हे व्यक्त करताना तो म्हणतो, या जीवनप्रवासात कुठून निघालो आहे, कुठे पोहोचायचे आहे, हे स्पष्ट नव्हते. परंतु या प्रवासाचाही एक चरमबिंदू (सिरा) असेल आणि त्या ठिकाणी हमराही असणारी तू नक्की भेटशील, असे वाटत होते. कारण नकळतपणे माझ्यापर्यंत तुझी सद्भावना, तुझे भावतरंग पोहोचत होते.
कहाँ से चले, कहाँ के लिए
ये खबर नहीं थी मगर
कोई भी सिरा जहाँ जा मिला
वहीं तुम मिलोगे
कि हम तक तुम्हारी दुआ आ रही थी (किशोर)
अशावेळी तिची अवस्था काही वेगळी नव्हती. तिला वाटत होते, अजून दिवस सरलेला नाही, रात्र घनगर्द होऊन संपली नाही. हा जीवनप्रवास कसा आहे, याची पुसटशीही कल्पना नाही. अशा प्रवासात स्वप्नांचे दिवे डोळ्यांत घेऊन त्या ठिकाणी येत होते, जेथून तुझा आश्वासक स्वर येत होता.
दिन डूबा नहीं रात डूबी नहीं
जाने कैसा है सफ़र
ख़्वाबों के दिए, आँखों में लिए
वहीं आ रहे थे
जहाँ से तुम्हारी सदा आ रही थी (लता)
अनावर ओढीने हे दोन जीव परस्परांकडे खेचले गेले. अद्भुत भेट झाली. दीर्घ प्रतीक्षा संपली अन् अवघे जीवन प्रकाशाने न्हाऊन निघाले. दोघेही एका सुरात गाऊ लागले, "तुम आ गए हो, नूर आ गया है... "
अनेकांच्या जीवनात अशी अनुभूती येते. त्यांचे जीवन बहरते. आनंदाने फुलून जाते. नवे प्रकाशाचे गाणे त्यांच्या जीवनात अवतरते. मात्र हे जादुई आनंदक्षण जगता आले पाहिजेत. जपता आले पाहिजेत. टिकवता आले पाहिजेत. प्रवास दोघांचा आहे आणि शेवटपर्यंत हातात हात गुंफलेले असणे हेच जीवनाचे साफल्य आहे.
सिरा = काठ, किनारा, टोक
सदा = आश्वासक आवाज, ध्वनी
नूर = ज्योति, तेज, प्रकाश
लौ = ज्योत, ज्वाला
आँधी (१९७५)
दिग्दर्शक : गुलज़ार
गीतकार : गुलज़ार
गायक : लता मंगेशकर, किशोर कुमार
संगीतकार : आर. डी. बर्मन
*गाणे पाहण्यासाठी लिंक*
https://youtu.be/tSjrsT8pTbQ?si=YBMyvbNF7rA3YYjn
अत्यंत भावस्पर्शी.....सर
उत्तर द्याहटवा