छोड़ आए हम वो गलियाँ...

छोड़ आए हम वो गलियाँ... 

      कवी गीतकार दिग्दर्शक गुलजार हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समाजाच्या वर्तमान प्रश्नावर वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य करणे ही त्यांची खासीयत. 'माचिस' (१९९६) हा चित्रपट असाच एक वेगळा प्रयोग होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिख आतंकवादी तरुणांना पकडण्याची जोरदार मोहीम हाती घेतली गेली. या प्रक्रियेत निष्पाप तरुण विनाकारण भरडले गेले. त्यांच्यावर अन्याय झाला. मग असे तरुण हिंसेच्या रस्त्यावरून पुढे गेले. अशाच भरकटलेल्या तरुणांची कहाणी म्हणजे 'माचिस' होय. काडीपेटी मधील काडीचा वापर चूल पेटवण्यासाठी होऊ शकतो, तसाच घर पेटविण्यासाठीही होऊ शकतो. हे ज्वलनशील युवक कुणाच्या हाती लागतात यावर पुढचे भवितव्य अवलंबून असते. 
      पोलीस आणि प्रशासनाच्या अन्यायाचा बदला घ्यायचा म्हणून चार तरुण स्वतःचे घरदार, गाव सोडून आतंकवाद्यांना मिळतात. अशा घरदार सोडलेल्या तरुणांच्या ओठी एक अतिशय अर्थपूर्ण गाणे आले आहे. 'छोड़ आए हम वो गलियाँ! ' गाण्याचा हा मुखडा तसा कुणालाही लागू पडणारा आहे. एका विशिष्ट ध्येयासाठी स्वतःचे घरदार, गाव सोडलेले तरुण कमी नाहीत. ते शरीराने घर गावापासून दूर जातात, परंतु त्यांचे मन मात्र त्याच घर-शिवारात, गल्लीमध्ये रेंगाळत असते, जिथे बालपण गेले. तारुण्यातील हसरे खेळते दिवस गेले. अशा स्वतःच्या गल्लीमधील आठवणी हे तरुण जागवत आहेत. गाण्याच्या सुरुवातीलाच "छोड़ आए हम वो गलियाँ..." या मुखड्यानंतर आनंदाने शीळ वाजवीत जाणारी तरुण मुले दिसू लागतात. मुलांचे शीळ वाजविणे हे बंधन रहित जगण्याचे आणि बेफिकिरीचे निदर्शक आहे. समाजव्यवस्थेची बंधने ठोकरून हे तरुण आता मुक्त झाले आहेत. तरीही जुन्या आठवणींबद्दलच्या संमिश्र भावना त्यांच्या मनात घर करून आहेत. ते आठवणींमधले प्रेम या गीतामधून व्यक्त होत आहे. 

       जहाँ तेरे पैरों के कँवल गिरा करते थे 
       हँसे तो दो गालों में भँवर पड़ा करते थे 
       तेरे कमर के बल पे नदी मुड़ा करती थी 
       हँसी तेरी सुन सुन के फसल पका करती थी

     प्रेमाच्या आठवणी म्हणजे अत्यंत मधुर भावना! त्या आठवतात आणि मन आनंदी होते. खरे तर प्रेम हेच जीवन आहे! तरीही ते प्रेम बाजूला सारून घर आणि गाव सोडलेले हे तरुण प्रेमाच्या मधुर स्मृती जागवताना म्हणतात की, "आम्ही आता त्या गल्ल्या सोडून आलो आहोत, जिथे तुझ्या पावलांचे ठसे उमटत होते. तू हसायचीस तेव्हा दोन्ही गालांवर खळी पडायची. तुझ्या वळणदार शरीराप्रमाणेच आपल्या गावातील नदीही वळणे घ्यायची. तुझे खळखळून हसणे ऐकून शेतातील धान्य पक्व व्हायचे. आता असे मन वेडावणारे गाव आणि तेथील गल्ल्या आम्ही  सोडून आलो आहोत." 

    जहाँ तेरी एडी से धूप उड़ा करती थी 
    सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती है     
    लटों से उलझी लिपटी एक रात हुआ करती थी 
    कभी कभी तकिये पे वो भी मिला करती है

      ते पुढे म्हणतात, "जिथे तुझ्या गतिमान चालण्यामधून सकाळची कोवळी उन्हे सर्वत्र पसरायची. असे ऐकले आहे की आता त्याच घराच्या चौकटीत संध्याकाळ राहते आहे. अंधार भरू लागला आहे. पूर्वी तुझ्या केसांच्या बटांशी बिलगलेली रात्र असायची. आता कधी कधी उशीवर डोके ठेवून डोळे बंद केल्यावर गतकालीन स्मृतींमध्ये ती पुन्हा सापडते."
       या दुसऱ्या कडव्यात अगोदरच्या आनंदी स्मृतींना कुठेतरी वेदनेचा स्पर्श झालेला दिसतो. येथे परस्परांपासून दुरावल्याचे दुःख आहे. वियोगाची काळीज कातरणारी वेदना आहे. 
      
        दिल दर्द का टुकड़ा है, पत्थर की डली सी है 
        एक अँधा कुआँ है या एक बंद गली सी है 
        एक छोटा सा लम्हा है जो ख़त्म नहीं होता 
        मैं लाख जलाता हूँ ये भस्म नहीं होता

       ... आणि या तरुणांची आजची अवस्था काय? तर, "हृदय म्हणजे वेदनेचा एक तुकडा. ते देखील आता दगडाच्या तुकड्यासारखे कठीण झाले आहे. जगणे म्हणजे जणूकाही एक अंधेरी विहीर किंवा सगळे येणे जाणे, सगळी चाहूल बंद झालेली एक गल्ली आहे. अंत:करणात कुठेतरी आठवणींचा एक क्षण जपून ठेवला आहे. जो काही केल्या संपत नाही. त्या क्षणाला जाळण्याचा/संपविण्याचा लाख प्रयत्न केला, तरी त्याची राख होत नाही. खोलवर ती संवेदना तशीच जिवंत राहते."
        माणसाच्या जीवनात कधी कधी परिस्थिती इतकी विपरीत होऊन जाते, की बालपण व तरुणपणातील सगळे आनंदी क्षण नष्ट होतात. अंत:करण जाळणारी दाहक अनुभवांची राख हळूहळू आयुष्यावर पसरते. जे खूप आतून हवेसे वाटत होते, प्रिय होते, आनंदमय होते, ते कुठेतरी दूर मागे राहते. आंधळा प्रवास करत माणूस एका भयप्रद वास्तवात येऊन पडतो. काही वेळेला जीवनाला प्रचंड गती असते. काही वेगवान घटना घडतात आणि जीवनाचे सगळे चित्रच पालटून जाते. आवडणाऱ्या गल्ल्या, तेथील माणसे, तेथील छोट्या-छोट्या आठवणी, सकाळची कोवळी उन्हे, संध्याकाळची कातळवेळ, प्रिय व्यक्तीच्या सहवासात घालवलेल्या रात्री हे सगळेच हरवून जाते. वर्तमान जीवनातून या सगळ्या जुन्या गोष्टी हरवल्या असल्या, तरी अंत:करणाच्या एका कोपऱ्यात त्या कायम जाग्या असतात. म्हणूनच गुलजारजी लिहितात, 

एक छोटा सा लम्हा है जो ख़त्म नहीं होता 
मैं लाख जलाता हूँ ये भस्म नहीं होता 

      खरे तर 'एक छोटासा लम्हा' म्हणजेच खरी जिंदगी असते. ते अल्पकाळात वाट्याला आलेले प्रेम, ती आत्मीयता काळजाच्या कुपीत जपून ठेवावी आणि तिचा सुगंध आयुष्यभर अनुभवावा! म्हणून तर ती प्रेमानुभूती संपत नाही. कितीही प्रयत्न केले, तरी त्याचे भस्म होत नाही. नेहमीच ती स्मृती ताजी टवटवीत राहते. 
      जीवनातील हरवलेला अमूल्य ठेवा या आठवणींमध्ये जिवंत असतो. अंत:करणात खोलवर एक वेदना असते. काही गोष्टी कितीही प्रयत्न केल्या तरी सुटत नाहीत. त्यांच्यापासून सुटका नसतेच. तरीही कधी स्वतःला, कधी इतरांना समजूत घातल्यासारखे सतत सांगावे लागते, "छोड़ आए हम वो गलियाँ...!"

          कृष्णकुमार कुन्नथ (के के) या अल्पायुषी गायकाचे हिंदीत पदार्पण या गाण्याने झाले होते. हरिहरन, सुरेश वाडकर, विनोद सेहगल या सगळ्यांचे स्वर गाण्याला अतिशय परिणामकारक बनवितात. विशाल भारद्वाज यांनी दिलेले संगीत मूळ कथा आणि गाण्याची पार्श्वभूमी यांना न्याय देणारेच आहे. काही प्रादेशिक वाद्यांचा वापर झालेला दिसतो. मूळात हा चित्रपट कलात्मकतेच्या अंगाने बनविला गेलेला असला, तरी तो व्यावसायिक अंगानेही यशस्वी ठरला. विशेषतः या चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली. विशाल भारद्वाज आणि अभिनेत्री तब्बू यांच्यासाठी हा चित्रपट स्वतंत्र ओळख निर्माण करणारा ठरला. 
   
कँवल = कमल
एड़ी = टाच
डली = छोटा तुकडा

चित्रपट : माचिस (१९९६) 
दिग्दर्शक व गीतकार : गुलजार
गायक : हरिहरन, सुरेश वाडकर, विनोद सेहगल, के के 
संगीतकार : विशाल भारद्वाज


गाणे ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा
https://youtu.be/RraeHart9uY?si=GH31RUvKCmO50f6U

चित्रपट : माचिस (१९९६) 
दिग्दर्शक व गीतकार : गुलजार
गायक : हरिहरन, सुरेश वाडकर, विनोद सेहगल, के के 
संगीतकार : विशाल भारद्वाज

                      श्यामसुंदर मिरजकर

टिप्पण्या

  1. खरोखरच खूप सुंदर लेखन झाले आहे भावार्थ नेमकेपणाने उलगडला आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)