कथाकथी (Story Telling)
कथाकथी (Story Telling)
गोष्टी रंगवून सांगणे आणि ऐकणे हे पूर्वापार चालत आलेले लोकसंचित आहे. गोष्टीवेल्हाळ माणसे नेहमीच इतरांना आवडतात. त्यांच्याकडे घटना, प्रसंग शब्दांच्या माध्यमातून साक्षात उभे करण्याचे सामर्थ्य असते. स्टोरी टेलिंग या इंग्रजी शब्दांसाठी मराठीत मात्र तीन भिन्न कृती अस्तित्वात असलेल्या दिसतात. त्या पुढील प्रमाणे :
गोष्ट सांगणे
ही लोक परंपरेतील लोकप्रिय पद्धती आहे. अनेक जण सांगोवांगीच्या गोष्टी एकमेकांना ऐकवत असतात. यातील काही अनुभव खरे, काही खोटे असतात. मूळ घटनेला तिखट मीठ लावून रंजक बनविले जाते. या गोष्टींमधून नीती शिकविली जाते. बोध दिला जातो. या सांगितलेल्या लोककथा असतात. दंतकथा असतात. प्राणीकथा किंवा भुताखेताच्या गोष्टी देखील असतात. कधी कधी दैवतकथा देखील रंगवून सांगितल्या जातात. या सगळ्या गोष्टींचा कर्ता म्हणजेच लेखक अज्ञात असतो. एका अर्थी या गोष्टी म्हणजे समूहाची निर्मिती असते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे लोककथांचे व दंतकथांचे संचित पोचविले जाते. समाजातील बुजुर्ग माणसे अशा पद्धतीच्या गोष्टी सांगण्याचे काम करीत असत. अजूनही ग्रामीण भागात भटक्या समूहांमध्ये असे गोष्टी रंगवून सांगणे सुरू असलेले दिसते.
पूर्वी लहान मुलांना खाऊ भरवता भरवता चिऊ काऊच्या गोष्टी सांगितल्या जात असत. मग नंतर पऱ्यांच्या, राक्षसांच्या, भुताखेतांच्या गोष्टी सांगितल्या जात. हीच परंपरा मोठेपणीही काही लोक चालवतात. त्यातून गोष्ट सांगण्याची, आख्यान लावण्याची वेगळी कथनपरंपरा निर्माण झालेली दिसते.
कथाकथन
स्वातंत्र्योत्तर काळात अनेक लेखक स्वलिखित कथा साभिनय सांगू लागले. त्यांनी कथा वाचनाला वाचिक अभिनयाची जोड दिली. द. मा. मिरासदार, व. पु. काळे, शंकर पाटील अशा अनेकांनी असे प्रयोग केले. विशेषतः शहरी निमशहरी भागात होणाऱ्या व्याख्यानमालांमधून आणि साहित्य संमेलनांमधून कथाकथनाचे सत्र होऊ लागले. त्यातूनच पुढे कथाकथनाचा एक वेगळा प्रांत बहरलेला दिसतो.
यामध्ये कथाकार लिखित कथा श्रोत्यांसमोर सादर करतो. कथेतील आशयाला अनुरूप आवाजातील चढ-उतार, विविध व्यक्तिरेखांचा बोलण्याचा वेगळा ढंग, लकबी सादर केल्या जातात अनेक वेळेला या कथा विनोदी असतात. तर कधी कधी त्या शोकात्म देखील असतात.
आज कथाकथनासाठी मोठे मानधन देऊन कथाकारांना सन्मानाने बोलवले जाते. त्यामुळे कथाकथन हा एक व्यवसाय बनू लागलेला आहे.
काही कथाकथन करणारे लोक दुसऱ्या लेखकांच्या कथा स्वतः रंगवून सांगतात. त्यांनाही अनेक ठिकाणी संधी दिली जाते. साधारणपणे २० ते ४० मिनिटे कथाकथन चालते. त्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील कथा सादर केल्या जातात.
कथावाचन व कथेचे अभिवाचन
आधुनिक काळात तंत्रज्ञानाची मोठी प्रगती झालेली आहे. इंटरनेटच्या वापरामुळे सर्वांना अनेक समाजमाध्यमे वापरण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आता पुस्तके स्वतः वाचण्याऐवजी इतरांनी त्यांच्या त्या पुस्तकांचे वाचन करावे व आपण ऐकावे, अशी अपेक्षा वाढली आहे. अशावेळी मान्यवर लेखकांच्या चांगल्या कथा सरळसोटपणे वाचून दाखवल्या जातात. त्याचे एक तर व्हिडिओ चॅनल द्वारे प्रसारण होते किंवा पॉडकास्ट केले जाते. अशा कथा घरात काम करता करता किंवा प्रवास करता करता ऐकणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
कथा वाचनापेक्षा अभिवाचन हे अधिक दर्जेदार असते. कारण त्यामध्ये अभिनयाची जोड दिलेली आढळते. कथेतील आशय व भाव योग्य पद्धतीने सादरीकरण करणे यामध्ये साधले जाते. त्यासाठी आवाजातील चढउतार, अचूक शब्दफेक, विविध भावभावनांची अभिव्यक्ती या गोष्टी साधल्या जातात. स्त्री-पुरुष, नायक-खलनायक अशा विविध व्यक्तिरेखांना अनुसरून आवाजात, उच्चारणामध्ये बदल करून कथा सादर केली जाते. बोलण्याची लकब, ढंग पकडून त्या पद्धतीने सादरीकरण होते. त्यामुळे असे अभिवाचन रंगतदार होते. प्रभावी होते. हसू आणि आसू आणण्याचे सामर्थ्य अशा अभिवाचनामध्ये असते. असे कथांचे अभिवाचन आकाशवाणीवरून किंवा व्हिडिओ चॅनल, पॉडकास्ट इत्यादी माध्यमातून सादर केले जाऊ शकते.
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा